सौ अंजली दिलीप गोखले
जीवनरंग
☆ तुज सगुण म्हणो की… – भाग – १ ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆
पहाटेच्या काकड आरतीचे सूर कानावर आले म्हणून मंगला काकूंनी डोळे उघडले.
‘उठा-उठा हो सकळीक वाचे स्मरावा गजमुख.. ‘ ऐकता ऐकता त्यांनी रिद्धी सिद्धीच्या नायकाला अंथरूणातूनच हात जोडले. कराग्रे वसते लक्ष्मी.. म्हणत त्या उठल्या व देवघरात आल्या.
देवघरातील प्रभू श्रीरामाच्या प्रसन्न चेहऱ्याकडे बघत त्या खाली बसल्या.
“श्रीरामा, आजवर सारे आयुष्य तुझ्या आधाराने जगले. जप, तप, व्रतवैकल्य करताना आणि तू दिलेल्या आयुष्याला सामोरं जाताना सत्तरी कधी आली कळलच नाही.. आता एकच इच्छा आहे की तू सगुण रूपात येऊन दर्शन द्यावस. आता किती दिवस उरलेत कुणास ठाऊक! पण तू भेटत नाहीस. रागावले आहे बरका मी तुझ्यावर! ”
श्रीरामचंद्र हा त्यांचा सखा, सोबती होता आणि जन्मभरीच्या श्वासा इतुके अखंड राम नाम मोजियल्यामुळे त्याच्याशी फार वेगळं नातं होतं. त्याच्यावर रागावणं, रुसणे, फुगणं कधी मधी चालू असायचं. श्रीरामालाही त्याची सवय असावी. कारण त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य त्यांच्या रागाने कधीच लोपलं नव्हतं.
दुखणाऱ्या गुडघ्यावर हात ठेवत त्या उठल्या. “आई आई ग…रामराया! तुझे गुडघे दुखतात का रे? बाबा रे, तुझं घोंगडं निर्गुणाचं.. न झिजणारं पण आमचं घोंगडं मात्र सगुणाचे.. झिजणारं.. असं म्हणून गेले माऊली. असं का केलस रे? ” उठताना मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे ते सुंदर रूप डोळ्यात साठवून घेतले आणि म्हणाल्या, “रागवत नाही रे तुझ्यावर पण एवढी एक इच्छा पूर्ण होईल का? माझी म्हातारीची बडबड सुरु राहते पण तुझ्याकडून एक नाही की दोन नाही. ”
मंगला काकूंनी सर्व आन्हिके उरकून काठापदराचे तलम पिवळं नऊवारी लुगडं नेसायला काढलं. त्याचे चंदेरी काठ हाताने सरळ करून ते लुगडं त्या चापून चोपून नेसल्या. रूपेरी केस विंचरून त्याचा एक छोटासा अंबाडा बांधला. त्यात सवयीप्रमाणे दोन मोगऱ्याची फुलं अडकवली.
कानात टपोऱ्या मोत्यांच्या सासुबाईंनी केलेल्या कुड्या घातल्या. स्थूल बांधा, गव्हाळ वर्ण, मध्यम उंची आणि सर्वांवर प्रेम करणाऱ्या मंगलकाकू आख्ख्या कॅालनीमधे काकू या नावाने प्रसिद्ध होत्या.
त्यांचे यजमान केशवराव ७५ वर्षाचे होते. ते काकूंना त्यांच्या कामात जमेल तेवढी मदत करत असत. मुलगा परदेशी होता व मुलगी मुंबईला होती. चारचौघांसारखा कभी खुशी कभी गम असणारा काकूंचा संसार ठीक चालला होता पण एकच खंत होती.. श्रीराम प्रभू भेटला नव्हता. जाणवला होता, भासला होता पण भेटला नव्हता. पण देव कसा भेटेल ही गोष्ट कधी कुणाला बोलली की ते हसण्यावारी नेत. टर देखील उडवतं.
“देव कधी भेटतो होय? ते ही आपल्या सारख्याला? आपण थोडेच तुकाराम- रामदास आहोत? ” या पलिकडे कुणी उत्तर देत नसे. “काय हा वेडेपणा! ” हा भावही काकूंनी बरेचदा अनुभवला होता.
शेजारच्या गोखले आजी खवचटपणे म्हणत, “मंगला, खरंच कधी आला राम तर मला बोलव बरका. ह्यांना पेन्शन मिळेल का विचारायचे आहे. ” त्यावर बर्वे वहिनी म्हणत, ” अहो आता पेन्शनच्या घोळात रामाला ओढू नका. काय बाई मागणं हे.. कसलं हे ऐहिकात रमणं म्हणत त्या गुडघेदुखी जाऊ दे असं मागुया म्हणत.
जोशी काका पक्के नास्तिक होते. ते म्हणत, ”अहो देव बिव काही नसतं. सगळं मानव निर्मित कुभांड आहे! ” पण काकूंना परमेश्वराची आस ठेवण्यात काही चूक आहे असे कधीच वाटले नाही.
कल्पवृक्ष काॅलनीत राहायला आल्यापासूनच त्यांनी आपल्या अवती भोवतीचा परिसर जमेल तसा सुधारण्याचे व्रत घेतले होते व आज वयाच्या सत्तरीमधे देखील ते व्रत चालू ठेवले होते.
कॅालनी मधे धुणभांडी करणाऱ्या शांतीच्या नवऱ्याला चहाची गाडी घेऊन देण्याची कल्पना त्यांचीच. ड्रायव्हरच्या मुलीला, सुमाला, शिवणाचे मशिन घेऊन देणाऱ्या काकूच. कॅालनीच्या मिटींग्ज मधे “अरे घरटी १००/२०० रूपये टाका रे पटपट.. फार नाही हो मागत. ५००० चं शिवणाचे मशिन सुमाला घेऊन देऊ सर्वजण. बिचारीला चार पैसे मिळतील. नवऱा वाईट निघाला ही काय तिची चूक? पटतय ना? ” म्हणून काकूंनी खड्या आवाजात सवाल केला की साऱ्या कॅालनीला माहित असायचं की शिवणाचे मशिन सुमाला मिळणारचं. कॉलनी मध्ये धुणे भांडी करणाऱ्या बायकांच्या मुलांच्या शिकवण्या घेण्याची कल्पना त्यांचीच.
त्यांच्याकडे केरवारे करणाऱ्या पारूचा मुलगा श्रीपाद तर उत्तम ह्रदयरोग तज्ञ बनला होता. त्याच्या मेडिकल च्या फी साठी कॅालनीच्या लोकांना आवाहन करून पैसे जमवलेल्या काकूंचा श्रीपाद कायमचा ऋणी होता. काकूंमुळे कल्पवृक्ष कॅालनी नावाप्रमाणे मनातील गोष्टी पुरवणारी कॅालनी बनू लागली होती. काकू रंजल्या गांजलेल्यांना कधीच विन्मुख पाठवत नसतं आणि या सेवेत त्या रमून जात.
पण आज सकाळपासून मात्र काकूंचे मन श्रीराम दर्शनासाठी व्याकूळ झालं होतं. हट्टी पण झालं होतं. नसेना का आमची पात्रता समर्थ रामदासांएवढी म्हणून काय आम्ही अशी इच्छा पण नाही ठेवायची म्हणत त्या स्वयंपाक घरात आल्या.
दर रविवारी येणं जाणं खूप असतं म्हणून त्यांनी शिरा करायला घेतला. साजूक तुपात परतलेल्या रव्याच्या वासाने घर पवित्र झाल्यासारखं वाटलं. बेदाणे, बदाम, काजू युक्त शिऱ्यात साखर, वेलची पावडर व केशर घालून त्यांनी गॅस बंद केला.
तेवढ्यात दारावरची बेल वाजली. त्या गॅस बंद करून बाहेर आल्या. बघावं तर दारात दशरथ नंदन रघुवीर राम उभा होता. “ ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं.. ” पिवळा पितांबर, जांभळा शेला, गळ्यात मोत्यांच्या माळा.. नील कमलासारखे शरीर.. “देवा आलास? ” त्या भारावून गेल्या.
“काकू, अग मी आशिष आहे! .. त्या भानावर आल्या.
शेजारचा आठवीतला आशिष शाळेच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रभू श्रीराम बनला होता.
“माते इक्ष्वाकू कुळातील मी दशरथ पुत्र राम आपल्याला नमन करतो” म्हणत आशिष नाटकीपणाने पुढे वाकला. काकूंनी त्याला जवळ घेतलं.
“अरे खरा रामच दारात आला असं वाटलं रे. थांब आत्ताच शिरा केलाय. दोन घास खा आणि निघ” म्हणत त्यांनी त्याला घाईने थोडासा शिरा दिला.
“काकू फसलीस ना! ” म्हणत हसत आशिष बाहेर पडला.
“अगबाई, रामाला शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा राहिला या गडबडीत! असुदे. दिसतेय सगळं त्याला! ” काकूंच्या मनात आलं.
त्या आत आल्या आणि जेवायची ताटे घेऊन त्यांनी केशवरावांना जेवायला बोलावले. जेवण संपे संपेपर्यंत कॅालनीतला डॅाक्टर शशांक मुलाच्या १२ वी च्या निकालाचे पेढे द्यायला आला. शशांक त्यांच्या मुलाचा मित्रच होता. काकूंकडे लहानपणी शिकवणीला यायचा.
“अहो डॅाक्टर आज काम नाही का?” केशवराव त्याला विचारत होते.
मंगलाताई लगबगीने बाहेर आल्या. “छान बातमी दिलीस हो शशांक. शिरा खाऊन जा.” त्या म्हणाल्या.
शशांक म्हणाला, “काम बाजूला ठेवून पेढे द्यायला आलोय काका! गप्पा मारता मारता काही वेळाने तो काकांना म्हणाला, “काका पावलावर थोडी सूज वाटते आहे. बघू का?”
केशवराव म्हणाले, “बघ की. अरे, कालपासून घशाशी पण येत आहे फार… आणि थोडी धाप लागतेय.. काय करू सांग. ” शशांकचा चेहरा बदलला.
“काका मी आत्ता श्री च्या क्लिनिक मधे चाललोच आहे म्हणून चला माझ्याबरोबर! काळजीचे कारण नाही पण बोलू एकदा श्रीपाद बरोबर. ” शशांकने लगेच श्रीपादला फोन केला.
“काकू, मी काकांना घेऊन जातोय श्री कडे” ते दोघे बाहेर पडले.
काकूंना वाटलं – “कालपासून हे सारखे ॲसिडिटी चा फार त्रास होत आहे म्हणत आहेत पण दाखवून या म्हटलं तर ऐकत नव्हते. बरं झालं शशांक आला ते! “
त्यांचा बसल्या बसल्या डोळा लागला. काही वेळाने शशांकच्या फोनमुळे त्यांना जाग आली.
– क्रमशः भाग पहिला
लेखिका : सुश्री ज्योती रानडे
प्रस्तुती : सौ अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





