डॉ. धनंजय देशपांडे
मनमंजुषेतून
☆ जीव द्यावासा वाटतोय? .. जरा थांबा!! ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆
प्रचंड निराश झाल्यावर जीव द्यावासा वाटतोय?
– – जरूर द्या.. पण त्याआधी पाच मिनिट वेळ काढून हे वाचा.
काहीवेळा असंही घडत की, आपली कसलीही चूक नसतानाही आपण बेदम संकटात सापडतो. किंवा फारतर असं म्हणूया की, १ टक्का असेल आपली चूक पण त्याची इतकी मोठी शिक्षा का मिळावी? असंही काहीजण म्हणतात.
अशावेळी सहनशक्तीच संपल्याने नाईलाजाने जीव द्यावासा वाटतो. ज्येष्ठ मंडळी यावर म्हणतात की, जीव देणं हा भ्याडपणा आहे. पण तेही खरं नाही. शेक्सपियर म्हणतो त्याप्रमाणे इतकी वर्ष स्वतः जपलेलं हे शरीर, हे जीवन असं सहज संपवून टाकण्यासाठी उलट जास्त ताकद लागते. हिंमत लागते. येरागबाळ्याचे ते काम नाही. मग त्या मानाने जगणे सोपे आहे की!
मात्र जीव देण्यापूर्वी एकच विचार करावा की, जन्म आणि मरण या दोन्ही गोष्टी विधात्याच्या हाती असतात. जन्म घेणं जसे आपल्या हाती नव्हते तसेच मरणे तरी का आपण आपल्या हाती घ्यावे? विधाता म्हणा किंवा नियती म्हणा, त्याला त्याचे काम करू द्यावे. आपण जन्माला आलोय तर जगणं आपल्या हाती आहे. ते जगावं.
मायनस १२० कोटीतून अमिताभ बच्चन पुन्हा “शहेनशहा” होऊ शकतो अथवा कैक हॉटेलचे मालक असलेले विठ्ठल कामत एका रात्रीत भाऊबंदकीच्या दणक्याने चक्क रस्त्यावर येतात. मात्र पुन्हा उठून उभे राहून लढतात आणि जिंकतात.
तर त्यापेक्षा आपण बरेच नशीबवान आहोत, असं समजल तर बरेच प्रश्न सुटतील.
बचेंगे तो और लढेंगे म्हणा!
जायचं तर आहेच प्रत्येकाला, पण कस जायचं हे आपण का ठरवायचं? ते वरच्या बाप्पाला ठरवू दे न अशा मनस्थितीत असलेले अनेकजण मी महिन्यातून दोन-चारजण तरी पाहतो, त्यावरून एक लक्षात आलं की, जे काही असं संकटमयी घडत ती टेम्पररी फेज असते. कायमची नसते.
“हेही दिवस जातील”
असं म्हणत उभं राहील की परिस्थितीसुद्धा तुम्हाला शरण येते.
“माझ्यामागे तसेही आता कुणी रडणारे नाही” असे म्हणत “म्हणूनच आता संपवून टाकाव वाटत सगळं” या विचाराचेही काही असतात. त्यांना हेच सांगणं की, ठीके, तुमच्यामागे रडणारे कुणी नाहीत. पण म्हणून आपण “जायचं? ” मग त्यापेक्षा भोवती अशीही अनेक माणसे, मुले, संसार आहेत ज्यांना कदाचित तुमची गरज असू शकते. त्यांच्या पाठीशी राहण्यात बाकीचे जीवन जगा. मग पहा, एकाचवेळी तुमच्याही जीवनात आनंद येईल आणि ज्यांना आधार देताय त्यांनाही सुखाचे दिवस येतील.
नैसर्गिकपणे मरण यायचे तेव्हा येईल. आपण ते ओढून का घ्यायच?
स्व. निर्मलाताई पुरंदरे यांचे एक वाक्य आठवलं. “वर” गेल्यावर चित्रगुप्ताने जर विचारलं की, इतकं चांगलं आयुष्य दिल होत, तर त्याचे काय केले? “
तर त्याला एक तरी काम दाखवून सांगता आलं पाहिजे की, “हे मी केले मगच वर आले”
*
थोडक्यात काय तर स्वतःसाठी जगायची इच्छा संपून गेलीय असं वाटायला लागत तेव्हा इतरांसाठी जगणे सुरु करावे.
जीव द्यावा वाटतोय या अवस्थेत अजून एक प्रकारचे लोक असतात. ज्याचे घरदार मुलं बाळ असतात (म्हणजे त्यांच्या जाण्याने रडणारे नक्की असतात) मात्र खूप प्रयत्न करूनही अपयश आल्यावर “संपवून टाकतो सगळं” या मोडवर ते येतात. खरेतर त्यांच्या हातून नकळत का होईना काहीतरी चूक झालेली असते, त्यामुळे अपयश आलेलं असत. हे आधी मान्य करावं आणि दुसरं म्हणजे तुमच्या चुकीमुळे अपयश आलं म्हणून “जीव द्यायचा? ” आणि त्याची शिक्षा मग काहीच चूक नसलेल्या घरच्यांनी का भोगायची? अपयश तुमचं अन शिक्षा त्यांना? हे पटत का पहा? जीव द्यायचे विचार जेव्हा येतात न, त्या रात्री जवळ शांतपणे झोपलेल्या आपल्या लेकरांचा चेहरा फक्त पाच मिनिट पहा. तुम्ही आहात म्हणूनच ते लेकरू शांतपणे झोपलेलं असत. हे लक्षात घ्या. स्वतःला संपवून, त्याला का सैरभैर जीवन जगायला भाग पाडायचे? हा विचार करा.
पानिपतावर चहूबाजूनी शत्रूंनी वेढलेले असताना आणि शत्रूचा सेनापती विचारतोय की, “अब क्या करोगे? “
तेव्हा शेकडो जखमा अंगावर घेऊन रक्तबंबाळ झालेले आपले दत्ताजी शिंदे त्वेषाने म्हणाले होते, “बचेंगे तो और लढेंगे”
हा बाणा, हि हिम्मत आपण काय फक्त पुस्तकात वाचायची? आणि पाच मार्कापुरती उत्तरपत्रिकेत लिहायची? छे! ते प्रत्यक्ष जगण्यात आणायचं असत.
अजून एक करता येईल. अशा निराश प्रसंगी आपल्या मनात साचलेलं आपल्या जवळच्या मात्र “विश्वासू” माणसाजवळ बोलून मोकळे व्हा. भले तो समोरचा तुम्हाला काही मदत करणार नसेल किंवा आधार देणार नसेलही पण तो विश्वासू असल्याने शांतपणे ऐकून तर घेईल न. आणि त्यामुळे मन आणि दुःख नक्की हलकं होत. हे नक्की!!
अशा निराश अवस्थेत जर कुणी असेल तर त्यांच्यासाठी “रेडू” सिनेमातील एक फार सुंदर गाण्याचे शब्द सांगतो. ते वाचा. जमल्यास ते गाणे यु ट्यूबवर एकांतात पहा.
खात्रीने सांगतो, तुमची निराशा निघून जाईल. आणि लढण्यासाठी पुन्हा तुम्ही उभे राहिला!!
(Soulful devotional Marathi song 2018 “देवाक काळजी रे | Dewak Kalaji Re” sung by re known singer Ajay Gogavale from Marathi Movie Redu)
**
देवाक काळजी रे
माझ्या देवाक काळजी रे sssss
होणार होतला जाणार जातला
मागे तू फिरू नको
उगाच सांडून खऱ्याची संगत
खोट्याची धरू नको
येईल दिवस तुझा हि माणसा
जिगर सोडू नको
तुझ्या हाती आहे डाव सारा
इसार गजाल कालची रे
देवाक् काळजी रे
माझ्या देवाक काळजी रे
देवाक काळजी रे
माझ्या देवाक काळजी रे
—
© डॉ. धनंजय देशपांडे
(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)
मो न. ९४२२३०४३४४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





