श्री सुभाष धारणकर

? मनमंजुषेतून ?

हवेत आम्हांला आजी-आजोबा! ☆ श्री सुभाष धारणकर 

मध्यंतरी एकदा लहान मुलांचे मित्र ज्येष्ठ चित्रकार श्री. ल. म. कडू सर यांचे व्याख्यान ऐकण्याचा योग आला. त्यांनी आपल्या व्याख्यानात सांगितलेला अनुभव,

“लहान मुलांना एकदा एका स्पर्धेत मी चित्र काढायला सांगितले. चित्राचा विषय होता आपले घर. मुलांच्या मनातील घराचे चित्र आपापल्या कल्पनेप्रमाणे मुलांनी काढले. एका मुलाने एक छोटे घर काढले पण त्याला एक मोठे कुलूप दाखविले. मला ते चित्र जरा वेगळेच वाटले. माझी उत्सुकता ताणली गेली आणि त्या मुलास मी विचारले. “अरे तू घर एकदम छोटे काढले आणि त्याला भले मोठे कुलूप दाखविलेस. ” तो छोटा निरागस बाळ मला म्हणाला, “सर, माझे घर असेच आहे. माझे आई बाबा सकाळीच बाहेर पडतात. जाताना घराला कुलूप लावून जातात. मला पाळणाघरात सोडतात. संध्याकाळी घरी येताना मला पाळणाघरातून घेतात आणि घराचे सकाळी लावलेले कुलूप काढतात. आम्ही घरात प्रवेश करतो. असे आमचे दिवसा आई बाबा घरी नसलेले सतत कुलूप असलेले घर. ”

… प्रसंग तसा खूप छोटाच. पण मनात घर करून गेला. जाणवले ज्या घरात आजी आजोबा नसतात. त्या घराची जवळजवळ अशीच परिस्थिती असते. आजी आजोबा हेच त्या घराचे घर सांभाळणारे कुलूप. माझे मन त्या मुलाशी समरस होवून विचार करू लागले. घरी आजी आजोबा आहेत असे समजून ते मूल माझ्याशी बोलायला लागले.

आजी – आजोबा हवे असतात. त्यांच्यावर संस्कार करायला, संध्याकाळी श्लोक शिकवायला, झोपताना गोष्टी सांगायला, माया करायला, घरात आजी आजोबा हवेच.
बाबा कामावर जातात. आईपण नोकरी करते, त्यांना वेळ नसतो पण आजी आजोबा मात्र घरी असतात, नातवंडाना सांभाळतात. आई रागावल्यावर आजीच्या पदराखाली आजी घेते आणि काय चुकले ते गोडीने सांगते. बाबांचा धपाटा चुकतो आजोबांच्यामुळे. आजोबा म्हणजे घरातील वरिष्ठ न्यायालयाच.
शाळेतून आल्यावर घर उघडे असते. हसत मुखाने आजी समोर येते. दप्तर जागेवर ठेऊन, हातपाय धुवून जेवायला ये. असा हुकूम देते. आपोआपच ती सवय लागते. मला आजीमुळे शिस्त लागली आहे. माझी प्रकृती चांगली आहे. कारण गरमागरम जेवण आजी वाढते, सगळ्या भाज्या खाण्यास बजावते आणि खायला पण लावते, मुरंबा, सुधारस काहीतरी गोड पण देते. आजी मला सगळ्या भाज्या, कोशिंबिरी खायला लावते. सणाच्या दिवशी उकडीचे मोदक, धिरडी, वाटलीडाळ, पुरणपोळी, गुळाची पोळी, भाजी कुरडई, पापडी आजी आवर्जून करते. आजीच्या हाताला छान चव आहे कारण ते पदार्थ ती प्रेमाने करते. माझे जेवण होईपर्यंत जवळ बसते. जेवायला बसताना वदनी कवळ घेता म्हणायला लावते, जेवण झाल्यावर पान स्वच्छ करून उचलायला लावते. तिला खूप अभंग, ओव्या पाठ आहेत. सकाळी काम करताना आजी ते गुणगुणत असते.

सगळ्या वर्गात माझे वाचन छान आहे, जेवणानंतर आजोबाना पेपर वाचून दाखवण्याचे काम माझे आहे. कारण स्वच्छ, अर्थ समजून आवाजाचे चढ उतार घेऊन कसे वाचायचे ह्याची शिकवणी असते ती. स्वातंत्र्याचा सगळा इतिहास मला आजोबांनी सांगितला आहे. मला वक्तृत्वात नेहेमी नंबर मिळतो. कारण माझे आजोबा. ते तयारी करून घेतात. माझे आजी आजोबा म्हणजे नवं आणि जुनं यांचा संगम आहे. नवीन नवीन पदार्थ खा म्हंटले तर आजोबा चमचाभर तरी खाऊन पाहतात आणि छान आहे म्हणतात. त्यांना वेगवेगळे छंद आहेत. लेख लिहितात, कथा लिहितात. त्या छापुनेही येतात. त्यांना संगीताची, गाण्यांची, वाद्यांची आवड आहे. त्यांना संगणकाचे ज्ञान असल्याने त्याचा मला खूप उपयोग होतो. या वयातील त्यांचे संगकाबद्दल काही नवे शिकण्याची आवड पाहून खूप हेवा वाटतो. माझी आजी तर नवी विजेची उपकरणे सहजगत्या वापरते.

खरंच आजी-आजोबा घरात असणे म्हणजे देवघरात देव असणं. धकाधकीच्या जीवनात या परिवाराचा बॅलन्स डळमळीत होत चालल्याचं खूपदा नाही लक्षात येत! आणि तो बॅलन्स डळमळीत होऊ नये यासाठीच गरज असते आजोबा आजीची. खरं सांगायचं झालं मुलांच्या संगोपनाच्या वेळी प्रत्येक पालकाची ओढाताणच होत असते. प्रपंचातल्या ओढाताणीमुळं आपली मुलं लहान असताना, आपल्याला त्यांचं बालपण एन्जॉय करता येत नाही. म्हणून नातवंडांमधेच आपल्या मुलांचं बालपण पहायचं असतं. हातातून निसटून गेलेले ते निरागस क्षण परत मिळवण्यासाठीची एक सन्धी असते. आपली नातवंडं! नातवंड म्हणजे नको असलेली जबाबदारी नव्हे तर तो आहे म्हातारपणाचा विरंगुळा… 

म्हातारपण हे एक बालपणच आहे. मग तुम्हालाही खरंतर एक सवंगडी मिळत असतो नातवाच्या किंवा नातीच्या रूपात. मग किती छान आहे म्हातारपण…! रिटायर्ड लाईफ एन्जॉय करण्यासाठी मुलाना आणि नातवंडांना दूर ढकलायला पाहिजे असं कुणी सांगितलंय. आता यापुढे तुमच्या नातवंडाला पहाल ना तेव्हा त्याच्यात तुमची मुले पहा… आणि प्रपंचाच्या व्यापात मुलांना जे तुम्हाला देता आलेलं नाही ते नातवंडांना द्या… तुमचा मायेचां स्पर्श द्या.. आपुलकीचा ओलावा द्या… त्याला गोष्टी सांगा… त्याच्यासाठी गाणं म्हणा…त्याचे बरोबर नाचा. अहो… तेच मागे राहणार आहे… तुम्ही हे जग सोडून जाल तेव्हा… आणि हीच संस्कारांची शिदोरी तुमची नातवंडे आयुष्यभर जपणार आहे. नव्हे…. नव्हे… त्या संस्काराच्या शिदोरीवरच त्यांचे आयुष्य उभं राहणार आहे.

मला वाटतं ….

आजी – आजोबांचे प्रेम । त्याला बासुंदीची गोडी । 

त्यांच्या प्रेमासाठी । आम्ही मुलं वेडी

आणि आजीआजोबांना काय वाटतं आमच्या सांगू तुम्हाला?

दुधापेक्षा साय गोड । नातवंडांच्या प्रेमाला I

गात नाही तोड। 

©  श्री सुभाष धारणकर

बिबवेवाडी, पुणे. भ्र. ध्व. ९४२३००२९५४ ध्व. क्र. ०२०-२६९६००६४. ईमेल – address-subhashdharankar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted