श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ एका संपाची कहाणी… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
( कामगारांचे म्हणणे पडले सारंगच्या यूनियनला जॉईन व्हावे म्हणजे सारंगअण्णा मालकाला पगारवाढ द्यायला भाग पाडतील.. शेवटी त्याने इतर कामगारप्रतिनिधी बरोबर सारंगअण्णांची भेट घेतली होती.
विश्वास रागाने धूमसत होता.. इतक्यात श्रद्धा शाळेतून आली.. ) – इथून पुढे —-
‘भेटले का सारंग?’
‘होय. मग?’
‘मग काहीच नाही..त्त्यांचे म्हणणे तसा संप मागे घेऊ शकत नाही.’
‘का?’
‘त्यांची आणखी अनेक कंपन्यात यूनियन आहे..त्यामुळे या कंपनीतून माघार घेतली तर इतर कंपन्यात परिणाम होतील.’
‘पण मग कामगारांनी काय करायच? दत्तूकाका सारखेच बाकीचे.. मग तू का प्रयत्न करत नाहीस संप मागे घ्यायचा?’
‘मी तस करू शकत नाही कारण आमच्या कामगारांपैकी अनेकांना सारंगअण्णा मोठी पगारवाढ देतील अशी आशा आहे आणि दुसरे..’
‘दुसरे काय?’
‘ही यूनियन चालवाणारी माणसे सरळ नसतात.. गुंड पोसत असतात हे.. मी संप मागे घेण्याचा प्रयत्न केला तर मलाच ठार मारतील ही लोक.. ‘
‘बापरे… तू नको पडूस यात.. चल जेवायला.. मी जेवण गरम करते…
ती दोघे जेवण करत असताना दार वाजू लागले म्हणून जेवणावरून उठून श्रद्धाने दार उघडले तर दत्तूकाका बाहेर होता..
‘मास्तर इलेत?
‘होय.. जेवत आहेत.. बसा.
दत्तूकाका आत येऊन बसले.
जेवण अर्धवट टाकून विश्वास बाहेर आला..
‘काका, सारंगअण्णांना भेटून आत्ताच आलो.. पण त्त्यांचे संप मागे घेण्याचे मन नाही..
‘मग.. आमी काय करायचा? किती दिवस उपाशी रवायचा?
‘मी सगळं सांगून बघितलं.. पण मालक अटी मान्य करत नाहीत आणि अण्णा अटी शिथिल करत नाहीत.. आपलंच चुकलं.. आपण उगीचच या यूनियनच्या मागे धावलो..
‘पण मास्तर.. माका पैशाची गरज आसा हो.. माज्या चेडवाचा लगीन करुचा आसा..
‘होय काका… मला समजतंय.. पण माझ्याकडे पण काहीच नाही.. तुमच्या सारखा मला पण दोन वर्षे पगार नाही. श्रद्धाला शाळेत काय थोडे पैसे मिळतात, त्यावर.. नशीब आम्हाला मूल नाही अजून.. नाहीतर..
‘पण माका आसा ना.. दोन चेडवा आसात.. दोगांय लग्नाची झालीत. थोरल्याचा लगीन ठरान दोन वरसा झाली. आता ती माणसा थांबतीत काय? मास्तर… मी अण्णाका भेटाक जावं.. माजी परिस्थिती सांगतय.. माज्यासारखी बरीच जणांची परिस्थिती अशीच..
‘ठीक आहे दत्तूकाका.. तुम्ही अण्णांना भेटा.
दुसऱ्या दिवशी दत्तूकाका सारंगअण्णाच्या ऑफिसमध्ये पोचले. दोन तास बाहेर बसल्यावर त्याना आतमध्ये घेतले..
‘बोला.. कोण तुम्ही..
‘मी दत्तू सावंत.. आमच्या कंपनीत संप सुरु आसा.. काल विश्वासमास्तर तुमका भेटून गेले.
‘बर.. तुम्ही त्या कंपनीत आहात. काय काम?
‘साहेब.. दोन वरसा आमी भायेर आसवं.. दोन वरसा म्हणजे चव्विस महिने पगार नाय.. कसा जगायचं?
‘तुम्हीच मंडळी माझ्याकडे आलात ना? मी तुमच्याकडे आलो होतो काय? तुम्हाला मोठी पगारवाढ पाहिजे.. पण थांबायला नको? कंपनीच्या मालकाकडे पगारवाढ मागितली.. पण तो देत नाही.. म्हणून संप.. मला काय हौस आहे संप पुकारण्याची?
‘पण अण्णा.. माझी खूप कुचम्बणा झाली हो.. माका दोन मुली.. दोघी पण लग्नाची झाली.. थोरलीचा लग्न ठरला पण.. माझ्याकडे पाच पैशे नाय हो.. लग्न करुचा कसा धाडस करू सांगा?
‘या तुमच्या वैयक्तिक गोष्टी मला सांगू नका.. संप केला की हे सोसावंच लागत.. डॉक्टरनी मिलचा संप पुकारला.. तुमच्याच कोकणातील कामगार देशोधडीला लागले.. मी असं ऐकलं की गिरणीकामगारांच्या मुली डान्सबार मध्ये नाच करतात म्हणे.. अजून करतात.. त्यानी आपल्या बापाचे कर्ज फिटवले, असे ऐकतो मी. असं होत..
दत्तूकाका रागाने लाललाल झाले.. त्त्यांचे मस्तक गरम झाले… रागाने ते म्हणाले..
‘म्हणजे तुमचा म्हणणं.. माज्या मुलींनी डान्सबारमधी नाच करुचो..
‘असं म्हणत नाही मी…
‘मग काय म्हणताय. तुमका संप मागे घेऊक जमणा नाय आणि असलो सल्लो देतास?
रागाने दत्तूकाका बाहेर पडले.
दत्तूकाका विश्वासच्या घरी आले तेंव्हा तो सिगरेट ओढत बसला होता.. बाजूलाच श्रद्धा मुलांचे पेपर तपासत होती.. चिडलेले दत्तूकाका विश्वासला म्हणाले..
‘सालो भडवो माका सल्लो देता.. म्हणता गिरणी कामगारांचे मुली डान्सबार मध्ये नाच करतत.. तेनी बापाचा कर्ज फेडला.. नालायक सालो.. माका असो राग इलो, साल्याचो गळो दाबीन म्हणून..
‘शांत व्हा काका.. शांत व्हा.. अहो हे पुढारी असेच.. त्याना कामगार कसे राहतात याची कल्पनाच नसते.. मी आणि श्रद्धाने तुमच्या मुलीच्या लग्नाच्या खर्चाची सोय केली आहे.
‘काय?
‘होय काका… आम्ही पनवेलमध्ये एका सोसायटीत ब्लॉक बुक केला होता दोन वर्षांपूर्वी. दिढ लक्ष भरले होते.. परत पैसे भरणे जमलेच नाही.. आजच आम्ही पनवेल मध्ये जाऊन ते अग्रीमेंट रद्द केले.. बिल्डर खूष झाला कारण आता डबल दर झाले आहेत तिकडे… ते पैसे पंधरा दिवसात मिळतील. तेंव्हा तुम्ही मुलीच्या लग्नाचे ठरवा.. तोपर्यंत पैसे येतील.. लग्न होऊन जाईल..
दत्तूकाका रडू लागले..’अजून देव आसा या जगात तुमच्यासारखो..
दत्तूकाका डोळे पुसत घरी गेले. विश्वास, श्रद्धाला समाधान वाटले कारण कितीतरी दिवसांनी दत्तूकाका हसले.. समाधानाने घरी गेले.
त्या रात्री खुप दिवसांनी विश्वास गाढ झोपला.
पहाटे पहाटे दारावर थापा सुरु झाल्या. एवढ्या पहाटे कोण म्हणत.. श्रद्धाने दार उघडले..
दत्तूकाका छाती पिटत ओरडत होते..
‘काय झाले काका?
‘काय सांगा बाय.. राती पासून माजा चेडू नायसा झाला.
‘आ.. कुठे गेली? शोधलंत का?
एवढ्यात विश्वास बाहेर आला.
‘काय झाल काका?
‘मास्तर.. माज्या चेडवान फसवल्यानं माका.. त्या बंडूदादाबरोबर पळणं गेला.. देवळात जाऊन लगीन पण केलान.
‘अरे.. काय हे? तुम्हाला काहीच कल्पना नव्हती?
‘थोडी थोडी होती.. तेचा तरी काय चूक? तीस वरसा झाली.. अजून लगीन नाय.. माजी कपंनी बंद.. मी तेचा लगीन ठरवलंय.. पण लगीन करूंक पैसो नाय.. शेवटी वाट बघून बघून तेना दुसऱ्याचो हात धरल्यानं. पण ता दुसरेपणाक..
म्हणजे?
‘त्या बंडू दादाचा पयला लग्न झाला हो.. तेका दोन झील आसात.. आणि तेचो मटक्याचो धंदो.. चार दिवस आत चार दिवस बाहेर..
‘अरेरे.. वाईट वाटले..
“आता तेका सोडूचय नाय.. सोडूचय नाय.. म्हणत संतापाने लाल झालेला दत्तूकाका बाहेर पडला..
त्याच दिवशी दुपारपासून टीव्ही वरील बातम्यात ठळक बातमी यायला लागली..
कामगारनेते जयवंत सारंग (अण्णा) यांचा त्यान्च्या ऑफिस बाहेर पोटात सुरा खुपसून खून..
खुनी दत्तू सावंत याला अटक.
– समाप्त –
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈




