सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ आमचं जगणं वेगळंच… लेखिका: सुश्री शामली निंबाळकर नागपूरकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

फौजीची बायको म्हटली कि कायम जवानाचीच बायको हेच चित्र सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोर येतं, म्हणजे त्यात काही वावगं नाही पण आज मला फौजीच्या बायको विषयी आणखी भरपूर काही सांगायचे आहे. मी शामली, एका फौजी डॉक्टरची बायको. माझा नवरा भारतीय वायुदलात डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. आमचा तसा प्रेमविवाह, आणि लग्नाआधीच त्यांच्या सैन्यात जायच्या निर्णयाला माझा पूर्ण  पाठिंबा होता. आणि तसेच झाले सुद्धा ते सैन्यदलात भरती झाले.

आमचे लग्न झाले आणि माझे संपूर्ण आयुष्य बदलले. माझ्या  बिनधास्त आणि निर्धास्त आयुष्याला शिस्त लागली. त्यांचा युनिफॉर्म, बूट, रँक, बेल्ट आणि सगळंच माझी जबाबदारी झाली. हळू हळू आयुष्य बदलत होतं. पण सगळ्यात आधी गेल्यावर  सिनियरच्या बायकोने समजावून सांगितलेली गोष्ट म्हणजे, “बघ शामली, फौजीशी लग्न केलस खरी पण त्याच्याकडून सामान्य नवऱ्या सारख्या अपेक्षा ठेऊ नको. कितीही काही झालं तरी पहिले त्याचे काम त्यानंतर त्याचा परिवार. आणि हि गोष्ट तुला मान्य करावी लागेल. आणि हो,  जे जसं आहे त्यात आनंदी राहायला शिकावं लागेल. “पुणे आमची पहिली पोस्टिंग त्यांनी सांगितलेल्या गोष्टींची खोली मला नंतरच्या पोस्टिंग मध्ये कळली.

बंगालच्या एका अगदी छोट्याश्या कसब्यामध्ये आम्हाला  आमची  पुढची पोस्टिंग मिळाली. त्या गावामध्ये फक्त नेमकी दुकाने, आजूबाजूला  बकऱ्या, गाई आणि नुसती हिरवळ. राहायला घर नाही, एका खोलीत घर मिळत पर्यंत राहायचं आणि मुख्य म्हणजे संध्याकाळ झाली कि घरची दारं बंद ठेवायची कारण आजूबाजूला दाट जंगल असल्याने विंचू, साप आणि इतर प्राणी घरात येण्याची भीती असायची. तसे ते आजूबाजूला भटकत हि असायचे. सामान्य शहराच्या २० किलोमीटर अंतरावर स्टेशन असल्याने घरासाठी लागणाऱ्या साध्य  गोष्टींसाठी महिन्यातून एखाद्यावेळा बाहेर निघायचा योग यायचा ( नवरा एकुलता एक डॉक्टर असल्याने स्टेशन सोडून जायला परवानगी नव्हती.) आणि त्यातच मला धन्यता वाटायची.

पुण्याहून अश्या ठिकाणी आल्यावर चीड चीड झाली, रडायला आलं, पण यातून मी एक गोष्ट शिकले  कि थोडक्यात, आणि जे आहे त्यात समाधान मानण्यात खरा आनंद आहे. आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे आपल्या माणसाची साथ सदैव असणं खूप महत्वाची असते, कारण थोड्या थोडक्यात आपल्या माणसासोबत अडीच वर्ष सहज काढता येतात पण त्याच्या पासून दूर राहून ते दिवस काढणं खूप कठीण असतं. हळू हळू सगळ्या सवयी बदलल्या, सामान्य माणसं बोअर होत म्हणून सिनेमा बघायला बाहेर फिरायला निघतात पण आम्ही बोअर झालं कि एकमेकांच्या घरी जात असू, आहे त्या घोळक्यात आनंदाने रमत असू.

एकमेकांच्या सणावाराला आवर्जून जात असू. आणि असे दिवस पार पडले. मग आलो अश्या ठिकाणी जे वायुदलाचे सगळ्यात मोठ्या स्टेशन्स पैकी एक होते. नवऱ्याशी सकाळी जे बोलणे झाले ते झाले नंतर सरळ रात्री ८ ला कधी ९ ला असा संवाद व्हायचा. इथे बाहेर ये जा करायला बरीच मुभा होती पण मग आमच्याजवळ तसा वेळ नव्हता. इथे राहता राहता दोन वर्षे पूर्ण होणारच होती तर येथून आमची पोस्टिंग थेट हार्ड एरिया मध्ये झाली. अश्या ठिकाणी कुटुंब नेता येत नाहीत अशीही ठिकाणे आहेत पण आमचं नशीबच कि आम्हाला इतक्या खडतर जागेवर सुद्धा सोबत राहण्याची संधी  मिळाली.

अत्यंत संवेदनशील ठिकाण असल्याने येथून ‘फिरायला’ बाहेर जाणे म्हणजे जीव मुठीत घेऊन जाण्यापेक्षा कमी नाही. या आसपासच्या जागेत फक्त नयनरम्य दृश्यांशिवाय रमणीय वाटावं असे काहीही नाही. सध्या आम्ही जिथे राहतोय तिथे आठवड्यातून फक्त एकचदा भाजीपाला येतो. संपूर्ण आठवडा त्याच भाजीपाल्यांवर, फळांवर अवलंबून राहणे असते. वातावरण खराब असेल तर अगदी मोजकीच भाजी उपलब्ध असते, आणि आजूबाजूला संशयास्पद स्थिती असेल, रस्ते बंद असतील तर भाजी येईलच हे सुद्धा निश्चित नसते. ह्या आणि अश्या  बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आम्हाला असामान्य गृहिणी बनवितात.

एका सैनिकाशी लग्न झाल्यावर त्या स्त्रीला बऱ्याच तडजोडी कराव्या लागतात. त्यातली पहिली तडजोड म्हणजे तिच्या करियरशी असते. माझ्या ओळखीच्या बऱ्याच फायटर पायलटच्या बायका ह्या  इंजिनियर, डॉक्टर, सी ए, डेंटिस्ट, शिक्षिका असतात. पण लग्न झाल्यावर सतत बदल्या होत असल्याने त्या आपल्या करियर पुढे नेऊ शकत नाही आणि म्हणून तडजोड करून आणखी काही करता येईल का हा पर्याय शोधात असतात. आणि म्हणूनच आम्ही सगळ्या घर सांभाळून करता येणाऱ्या करियरचा पर्याय शोधतो. दुसरी तडजोड असते जी आमच्या नवऱ्यांचीही असते ती म्हणजे स्वतःच्या आई वडिलांपासून खूप दूर असणं.  चुलत्यांची लग्न, साक्षगंध, सणवार यासाठी आम्हाला सहज येत येत नाही. मुलांना सुद्धा शिस्तीतच वाढवायचे असते. त्यांना सख्खे मित्र मैत्रिणी बनवायची मुभा नसते, कारण सतत होणाऱ्या बदल्यांमुळे ते शक्य होत नसतं.

मात्र या सगळ्या तडजोडी आम्हाला नेहमीच सामान्यांपासून वेगळं सिद्ध करतात.  आम्हाला घराचा मोह नसतो कारण आमचं बिऱ्हाड सतत आमच्या पाठीवर असतं. मुलांसोबत आणि नवऱ्यासोबत आम्ही आमचा संसार अगदी एका खोलीत किंवा सरकारी घराच्या ५ खोल्यांमध्ये सुद्धा तितक्याच चांगल्या प्रकारे मांडू शकतो, आणि तेच आमच्यासाठी स्वतःच घर असतं.  खाण्यापिण्यात, राहणीमानात कुठे तडजोड करायची हे आम्हाला चांगलंच जमतं.प्रत्येक ठिकाणाहून नवीन अनुभव सोनार घेऊन जायचा. मात्र खूप अपेक्षा ठेवायच्या नाहीत. आणि यासगळ्या अनुभवातून जात असताना सगळ्यात  जास्त कळते ती सोबत असणाऱ्या माणसाची किंमत कारण भीतीच्या पलीकडे जगणं हे आम्ही आमच्या नवऱ्याच्या डोळ्यात बघून शिकलेलो असतो. त्यांनी घेतलेल्या आजन्म सेवेची शपथ नकळत आम्हीही निभावतच असतो. आणि म्हणूनच आमचं जगणं हे इतरांपेक्षा खूप वेगळं असतं. आणि हे जगणं समृद्ध करण्यासाठी आम्हाला कदाचित देवानि वेगळीच हिम्मत देऊन जन्माला घातलं असतं. असो, असे बरेच अनुभव आहेत जे सगळेच लिहिणं शक्य नाही पण आज हे लिहिताना एक नक्की सांगावेसे वाटते कि आपल्या जवळ जे आहे ते आणखी चांगलं कसे करता येईल याचा ध्यास ठेवा. कारण एका चांगल्या समाजाच्या जडण घडणासाठी चांगल्या दृष्टीकोनाची आवश्यकता असते आणि तो आपण नक्कीच ठेऊ शकतो. कारण हाच दृष्टिकोन घेऊन आपली पुढची पिढी चांगला समाज व देश घडवू शकेल.

जय हिंद!

लेखिका: शामली निंबाळकर नागपूरकर

प्रस्तुती : सुश्री स्नेहलता गाडगीळ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted