डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची…! – भाग -२☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(“तुझी पत्नी कशी दिसत असेल, असं तुला वाटतं?”

“ती खूप सुंदरच असणार सर, दुसर्‍याला सावरणारी कोणतीच गोष्ट कधीच कुरूप नसते!”

…. काठीला छातीशी लावत तो कसानुसा हसला. मनगटावर पडलेला डोळ्यातला थेंब, मागं हात नेऊन त्यानं पँटला पुसला.

माझ्याही अंगावर शहारा आला!) इथून पुढे ——

जिला पाहिलंही नाही, ती त्याला सुंदर भासते… यानं काही पाहिलंच नाही, म्हणून याच्या डोक्यात तुलना होतच नाही! हे छान, ते घाण… हे सुंदर, ते कुरूप… हे पांढरं, ते काळं… हे मोठं, ते छोटं… असं काही वाटतच नाही. यांच्या नजरेत सारंच एकरुप… एकजीव… आणि एकाच रंगाचं!

तुलना केली की त्रास होतो…! तराजुत तोललं, की कमी जास्त होणारच… एकदा हा तराजू बाजुला ठेवला, की तुलना संपते… तुलना थांबली, की छोटं-मोठं, छान-घाण, उच्च-नीच, हे भावच नष्ट होतात… आणि मग सगळंच समसमान दिसायला लागतं…  एकदा हे समसमान दिसायला लागलं की समजावं, आपण आत्ता ‘डोळस’ झालो!….  तोपर्यंत डोळे असूनही आपण ‘अंध’च…!!!

“तुला आणि तुझ्या बायकोला काहीच दिसत नाही, याचं वाईट नाही वाटत तुला? आपण चारचौघांसारखे नाही, याची खंत नाही वाटत तुला?” डबे बॅगेत भरत मी विचारलं.

“खंत कशाची सर? प्रत्येकाला निसर्गानं डोळा, कान, नाक, कातडी आणि जीभ अशी पाच साधनं दिली आहेत… आमच्याकडे डोळे नाहीत… पण बाकी चार साधनं आहेतच की! आम्ही ती पूर्ण ताकदीनं वापरतो… आम्ही मन लावून ऐकतो, जीवाच्या आकांतानं सुगंध भरून घेतो, स्पर्शातून सुख दुःख अनुभवतो आणि कमीत कमी बोलून दुसर्‍यांचं जास्त ऐकतो!.. डोळे नाहीत, हे एका अर्थानं बरंच झालं… त्यामुळं इतर साधनांचा जास्तीत जास्त वापर करता आला!…. आम्ही डोळ्यानं नाही मनानं पाहतो सर्व!”

…. हे ऐकून मी चाट पडलो. याला कशाचंच दुःखं नाही. जे आहे, त्यातच सारा आनंद… नव्हे परमानंद!

आयुष्य एकदाच मिळतं असं म्हणतात…

साफ झूठ आहे हे…!

एकदाच मिळतं ते मरण…!

आयुष्य रोज मिळत असतं…!!!

ते फक्त जगता यायला हवं… अंध असुनही खर्‍या डोळस असलेल्या या मुलासारखं!

“अजून एक प्रश्न… तुझ्या बाळाला दिसतं?”

“सर, डॉक्टर म्हणाले, मुलगी पण पूर्ण अंध आहे…!”

.. यावेळी त्याला हुंदका आवरला नाही. दोन्ही मुठीत काठी घट्ट धरुन इकडे तिकडे तो चेहरा फिरवत होता… जणू मुलीला पहायला आसुसलेला बाप, शोधत होता तिला या दुनियेत…!

.. विचारानं माझ्या अंगावर सर्रकन् काटा आला…

हा अंध,

याची बायको अंध,

त्यांना नुकतंच झालेलं बाळही अंध!

.. कोण कुणाची कशी काळजी घेत असेल, याची कल्पनाही करवत नाही!

.. निसर्ग का अशी परीक्षा घेत असेल यांची? येणारा प्रत्येक दिवस, यांच्यासाठी अग्नीपरिक्षा आहे, आणि आपण रडत राहतो, छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी…!

हे दोघंही नवरा बायको एकमेकांची काठी झाले आहेत…

…. इथं प्रत्येकजण दुसर्‍यासाठी चिखल होतोय… दुसर्‍याला फुलवतोय…!

कागदावर नुसतंच ‘पाणी’ असं लिहून चालत नाही, पाऊस पाडायला आभाळच व्हावं लागतं…!

.. एकमेकांना न पाहताही, एकमेकांना जपायला माणूसच व्हावं लागतं!

.. फुलांना उमलू द्यायचं असेल, तर स्वतः चिखलच व्हावं लागतं!

“सर, मिळेल आम्हाला काम?” त्याच्या या प्रश्नानं माझी तंद्री भंगली!

या कुटुंबाचं काय करता येईल, याचा मी मनात विचार करायला लागलो. अनेक हितचिंतक मंडळींनी मला या अगोदरच सांगून ठेवलेलं आहे की काम करणारं एखादं जोडपं तुम्हाला जर कधी भेटलं, तर आमच्याकडे काम करण्यासाठी पाठवा. पण हे दोघंही अंध… आता यांना त्यांच्याकडे काम करायला पाठवायचं कसं? हा प्रश्न पडला.

एकेका हितचिंतकाचं नाव आठवायला लागलो.

आणि आठवलं… माझे एक ज्येष्ठ स्नेही! पंधरा दिवसांपुर्वी यांचा फोन आला होता, त्यांनी मला सांगितलं होतं,

“अभिजीत, तुला तुझ्या कामात जर कोणी अंध-अपंग अशी व्यक्ती किंवा जोडपं सापडलं, तर त्यांना माझ्याकडे पाठवून दे. माझं एक फार्महाऊस आहे. तिथं एक छानशी खोली सुद्धा आहे. मी त्यांना त्या खोलीमध्ये राहायला जागा देईन आणि त्यांचा संसारही लावून देईन.”

“पण सर, तुम्ही असं का करताहात?”

पलीकडून ते हसत म्हणाले होते…“अभिजीत, आयुष्यभर स्वतःसाठी जगलो. स्वतःचा पैसा स्वतःसाठीच वापरला, घासातला घास कधी कुणाला दिला नाही… खूप आनंद मिळाला पण समाधान नाही रे!”

.. खरंय, आपण स्वतःसाठी काही मिळवतो तेव्हा होतो तो ‘आनंद’, आपण जेव्हा दुसर्‍याला काही द्यायला लागतो, तेव्हा मिळतं ते ‘समाधान’!

.. आता दुसर्‍याचं पोट भरल्यावर त्याच्या चेहर्‍यावरचा होणारा आनंद मला बघायचाय…

.. आयुष्यात गाढव होऊन इतरांना खूप लाथा मारल्या… एखाद्याला हात देऊन, मरायच्या आधी एकदा ‘माणूस’ व्हायचंय…’

.. आयुष्यात ‘कुत्रा’ होऊन भुंकलो, खुप जणांना चावलो… पण कधी कुणाशी इमान नाही राखलं… आता मरायच्या आधी, एकदा इमानदार व्हायचंय रे…!

“देशील का संधी, मलाही…??? हवं तर तुझा भिकारी समज मला…”

…. काय म्हणू या माणसाला? त्यांच्या या वाक्यांनी मला गलबलून आलं!

काठावर नुसतं उभं राहून सल्ले देतात ते ‘सामान्य’… बुडणार्‍याला हात देतात ते ‘असामान्य’…!

…. हा असामान्य माणूस, किती प्रांजळपणे सगळं कबूल करतोय? देर सही… दुरुस्त आये…!

माझ्या बाबतीत घडणाऱ्या काही गोष्टींचं मलाच खूप आश्चर्य वाटतं…

.. माझ्या या जेष्ठ स्नेह्यांनी बरोबर पंधरा दिवसांपूर्वी मला त्यांचं हे मनोगत सांगितलं होतं आणि आज बरोबर पंधराव्या दिवशी त्यांना हवं असणारं जोडपं आज मला येऊन धडकलं होतं, त्याच्याही नकळत आणि माझ्याही…!

.. ही लीला कुणाची…???

.. कोण खेळ खेळतंय हा?

.. कशासाठी…???

मला काही वेळा खरंच कळत नाही!.. कुणीतरी कुणाचीतरी इच्छा पूर्ण करतंय…

आणि या सर्वात ‘माध्यम’ म्हणून माझी निवड होते…

कोण ठरवतंय हे सारं…?

मी झटकन त्या स्नेह्यांना फोन लावला. सर्व सांगितलं आणि हसत म्हणालो,

“सर, तुमची ‘विच्छा’ आज कुणीतरी पूर्ण केलीय, आज माणूस व्हायची तुमची वेळ आलीय…!”

फोनवर ते काहीच बोलले नाहीत… पण हुंदका मात्र ऐकू आला.

…. या हुंदक्यामध्येच सुरू असलेली गणपतीची आरती फोनवर स्पष्ट ऐकू येत होती…

‘सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची…!’

‘मी’ आणि ‘माझा’ म्हणून आपण स्वतःपुरतं पाहतो, ती ‘नजर’… या ‘नजरे’ला दुसरं कुणी ‘दिसायला’ लागतं तेव्हा होते ती ‘दृष्टी!’.. आज या माणसाला ‘दृष्टी’ प्राप्त झाली…!

काल फोन करून मी यांना म्हणालो, “सर, मी या तिघांना स्वतःच घेऊन येतोय तुमच्याकडे…”

ते म्हणाले, “छे… छे… डॉक्टर, तुम्ही कशाला वेळ घालवताय? मी माझी गाडी पाठवतो ना या तिघांना आणायला!”

मी म्हटलं, “सर, काय हो हे… येऊ द्या की त्यांच्यासोबत… आज तुम्ही माणुस व्हायला निघालात… मला किमान एक दिवस आंधळ्याची काठी तरी बनू द्या की…!”

फोनवर पुन्हा तेच हुंदके… आणि पुन्हा तीच आरती…

…. ‘सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची…!’….

– समाप्त –

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted