सुश्री विभावरी कुलकर्णी
विविधा
☆ स्वातंत्र्य स्वतःचे… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
१५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा करतो. एक वेगळाच उत्साह सगळ्या वातावरणात असतो. त्याचा सर्वांनी अनुभव घेतला आहे. पण माझ्या मनात वेगळेच विचार सुरु झाले. स्वातंत्र्य म्हणजे सत्ता बदल झाला. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. विचार, आचार, भावना, कृती याचे स्वातंत्र्य मिळाले. आणि काही वेगळी आव्हाने समोर उभी राहिली. ती भौतिक आव्हाने जरी अवघड वाटली तरी आपण त्यातून मार्ग काढू शकतो.
आपण खरेच स्वतःला स्वतंत्र करु शकतो का? स्वतःचे स्वातंत्र्य म्हणजे इतर कोणत्या व्यक्तींच्या पासून स्वतंत्र होणे नव्हे तर आपल्या मनातील विकार, नकारात्मक विचार, क्रोध, भीती, न्यूनगंड, भूतकाळातील वाईट अनुभव, जखमा आणि भविष्यातील चिंता या पासून मुक्त होणे. मानवी मनात सतत उलट सुलट विचार चालू असतात. आपल्याला कोणी आपले जुने अनुभव किंवा आठवणी विचारल्या किंवा बोलण्याच्या ओघात आल्या तर त्या कटू किंवा वाईट आठवणी असतात. एखाद्या व्यक्ती विषयी सुद्धा बरेचदा चांगल्या आठवणी सांगितल्या जात नाहीत. या साठी मला एक अनुभव आठवतो. एकदा एका सरांनी वर्गात मोठ्या पांढऱ्या बोर्ड वर एक बारीक काळा ठिपका काढला त्यावेळी सर्वांचे लक्ष त्या छोट्या काळ्या बिंदू वरच जात होते. आणि जास्त असलेला पांढरा भाग मात्र दुर्लक्षित होत होता. असेच आपल्या मनाचे असते. आणि भविष्याचा विचार करताना चिंता जास्त वाटतात. या दोन्हीतून आपण स्वतःला स्वतंत्र करु शकलो, तरच मनाने खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ. आणि वर्तमानात राहू शकू. मात्र त्या साठी स्वतः साठी स्वतःलाच प्रयत्न करावे लागणार आहेत.
या साठी आपल्याला आपल्या मनाशी मैत्री करावी लागणार आहे. आपण दुसऱ्यांशी मैत्री करण्यासाठी खुप वेगवेगळे प्रयत्न करतो.
पण मन तर आपलेच असते कायम आपल्या बरोबर असते. आणि ते आपल्याला आरसा दाखवत असते. त्याच मनाशी होणारा संवाद आपल्याला बदलायचा आहे. आत्मभान ठेवायचे आहे. आत्मविश्वास वाढवायचा आहे. विविध नवीन गोष्टी शिकताना वेगळं बघण्याची व आत्मविश्वासाने जगण्याची क्षमता मिळवायची आहे. स्वतः इतरांचे अंधानुकरण करण्यापेक्षा सजग व्हायचे आहे. मनाची शिस्त कायम ठेवायची आहे. स्वतःमधील संवेदनशिलता जपायची आहे. अंतर्मुख व्हायचे आहे. अंतर्मुख झालो की, सृजनशील विचार, कल्पना शक्ती व सकारात्मकता वाढते. तरच आपण इतरांशी मोकळे पणाने संवाद साधू शकतो. आणि त्या मुळे बरेच मानसिक अडथळे दूर करु शकतो. हे सगळे समाजासाठी सुद्धा उपयुक्त असते.
अशा काही छोट्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टी व बदल करुन आपण आपले मानसिक स्वातंत्र्य मिळवू शकतो. आंतरिक अडथळ्या पासून मुक्त होऊ शकतो. विचारशक्ती, भावना आणि कृती याचा उत्तम समतोल साधू शकतो. आणि हेच खरे मनाचे, श्वासाचे, आणि अस्तित्वाचे स्वातंत्र्य!
© सुश्री विभावरी कुलकर्णी
मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.
सांगवी, पुणे
– ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






