श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ७१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- आयुष्यात अनेकदा येणाऱ्या अनपेक्षित अडचणीच्या वेळी प्रत्येकाची सर्वसाधारण प्रतिक्रिया नकारात्मकच असते.मीही त्याला अपवाद नव्हतो.माझ्या अकोला ब्रॅंचला झालेल्या बदलीच्या संदर्भात मीही तसाच विचार करत होतो. माझ्या त्या दृष्टीकोनातली निरर्थकता पुण्याला झालेल्या माझ्या पोस्टींगमुळेच मला समजू शकली. तोवर माझ्या बाबतीत घडलेल्या सगळ्याच तेव्हा प्रतिकूल वाटणाऱ्या घटनाही माझ्या कशा हिताच्या ठरल्या आहेत हे इथे आल्यामुळेच मला लख्खपणे जाणवलं!)

हे मला जाणवलं, त्यालाही निमित्त ठरली ती इथं माझ्यावर सोपवली गेलेली पी.अॅण्ड डी.(प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट)ची जबाबदारी. पुणे झोनल-आॅफिसच्या अधिकारात येणाऱ्या अडीचशे ब्रॅंचेसमधल्या कर्मचाऱ्यांच्या संबंधीच्या सर्व प्रकारच्या बाबींचं व्यवस्थापन करणारा एक विभाग माझ्या पी.अॅंड डी. डिपार्टमेंटच्या अखत्यारीतच होता.त्यामुळेच पहिल्या डी.जी.एम्. साहेबांची अशा पद्धतीने एक्झिट होण्यामागची कारणे व पार्श्वभूमी मला अतिशय विश्वसनीयरित्या समजू शकली. आम्हा सर्वच अधिकाऱ्यांच्या प्रमोशन रिझल्टसवर तत्कालीन डी.जी.एम् साहेबांची त्यांनी अॅप्रेझल रिपोर्ट्समधे मार्क्स देताना दाखवलेली सरसकट नकारात्मकता दूरगामी परिणाम करणारीच ठरली असल्याचे चित्रही माझ्या अधिकारातील या स्टाफ डिपार्टमेंटमुळेच मला स्वच्छपणे दिसू शकले होते.

त्या डी.जी.एम् साहेबांची पुढे अशी अपमानास्पद एक्झिट होणं ही त्यांच्याच एकंदर नकारात्मक अॅप्रोच आणि मानसिकतेचीच परिणती होती. तथापी आश्चर्य हे किं याचा अतिशय वाईट परिणाम इतर अनेक अधिकाऱ्यांना त्रासदायक ठरला असला, तरी डी.जी.एम् साहेबांच्या मला त्रास देण्यासाठी घेतलेल्या सर्वच निर्णयांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मला मात्र नकळत काव्यगत न्यायच मिळाला होता, आणि तो तसा मिळावा याचसाठी वेळोवेळी मला सहन करावी लागलेली अडचणीची परिस्थिती हा ‘त्या’ने निर्माण केलेलाच एक भुलभुलैय्या होता हेही सगळं वादळ शांत झाल्यावर मी मनोमन केलेल्या विश्लेषणातून नेमकेपणाने माझ्या लक्षातही आलं होतं.

मी अहमदनगरला जाऊन एक वर्ष पूर्ण झालं नव्हतं, तरी तिथला माझा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच, मी तिथे चार्ज घेण्यापूर्वीच्या ऑडिट

रिपोर्टमधील त्रुटी व साचून राहिलेली महत्त्वाची कामे याला मीच जबाबदार असल्याप्रमाणे मला अतिशय अपमानास्पद वागणूक देऊन माझी अकोला ब्रॅंचला केली गेलेली ट्रान्सफर, तिथे प्रतिकूल परिस्थितीत तग धरून रहाताना माझी झालेली ओढताण आणि घुसमट, मला अतिशय अन्यायकारक वाटली होती. मी न केलेल्या गुन्ह्याची ती शिक्षाच समजत होतो मी. पण ती शिक्षा नव्हती तर पुढे येऊ पहाणाऱ्या संकटापासून माझं रक्षण करणारं, ‘त्या’ने माझ्यासाठी आवर्जून निर्माण केलेलं एक सुरक्षाकवच होतं. हे माझ्या तेव्हा लक्षात येणं शक्य नसलं तरी ते तसंच होतं!

माझी अकोल्याला झालेली आणि मला तेव्हा त्रासदायक वाटत राहिलेली बदली, आणि डी.जी.एम.साहेबांनी अन्यायकारक पध्दतीने अॅप्रेझल रिपोर्टमधे दिलेले कमी मार्कस् या मुख्यत: माझ्या करिअरसाठी अडचणीच्या ठरु शकणाऱ्या दोन घटनांदरम्यानच्या सर्व प्रसंगांची ‘त्या’ने केलेली गुंफण केवळ माझं हित जपण्यासाठीच कशी केली होती हे समजून घ्यायला त्या सगळ्याच घटनाक्रमांचा मागोवा घेणे अगत्याचे आहे.

या सगळ्याची तर्कसंगत मांडणी करायची तर बॅकेच्या कार्यपध्दतीतील संबंधित तांत्रिक आणि क्लिष्ट वाटू शकतील अशा दोन गोष्टींची थोडक्यात माहिती असणे आवश्यक आहे.एक म्हणजे अॅप्रेझल रिपोर्ट्समधे वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेले मार्कांचं प्रमोशनसाठीचं महत्त्व आणि सेंट्रल ऑफिसकडून ठरवली जाणारी प्रमोशन पोस्टिंग संदर्भातली पॉलिसी.

अॅप्रेझलमधील मार्कांचं स्कोअरींग प्रमोशन मिळण्यासाठी आवश्यक गुणवत्तेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरते. त्यासाठी अखेरच्या तीन वर्षातील अॅप्रेझल रिपोर्टसमधील मार्कांची सरासरी ग्राह्य धरली जाते.

अगदी माझ्या हितसंबंधांपुरता विचार केला तरी माझं हित आणि समाधान फक्त प्रमोशन मिळण्यावरच नव्हे तर त्याच्याइतकंच प्रमोशननंतरचं माझं पोस्टिंग कुठं होणार यावरही अवलंबून होतंच.

डी.जी.एम् साहेबांच्या जेमतेम दीड वर्षांच्या इथल्या कार्यकाळात स्टाफ मॅटर्समधल्या थेट हस्तक्षेपामुळे तोवर चांगलं रेकाॅर्ड असणाऱ्या कितीतरी अधिकाऱ्यांचं करिअर पणाला लागलं होतं. त्यांच्यापैकी अर्थात मीही एक होतोच. तरीही इतरांपेकी बरीच जणं त्यांना प्रमोशन न मिळाल्याने बळीचा बकरा तरी ठरले होते किंवा काहींचे अॅप्रेझल रिपोर्टमधील कमी मार्कस् मेरीट लिस्टमधे मागे पडायला निमित्त झाले होते. त्यामुळे आऊट आॅफ स्टेट पोस्टिंग झाल्याने ते न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत राहिले.

इतर अनेकांच्या अशा पार्श्वभूमीच्या तुलनेत डी.जी.एम्. साहेबांचा अॅप्रोच माझ्याबाबतीतही तितकाच नकारात्मक असूनसुद्धा मेरीट लिस्ट आणि प्रमोशन पोस्टिंग दोन्ही बाबतीत त्यांचा तथाकथित नकारात्मक अॅप्रोचच माझ्या पथ्यावर पडला होता तो केवळ ‘त्या’ने माझ्यासाठी निर्माण केलेल्या सुरक्षाकवचामुळेच!

माझे आधीच्या दोन वर्षांमधील अॅप्रेझल्समधील मार्कांचे स्कोअरिंग खूप चांगले असूनही तिसऱ्या वर्षातील डी.जी.एम्. साहेबांनी दिलेल्या अतिशय कमी मार्कांमुळे तीन वर्षांच्या सरासरीवर प्रतिकूल परिणाम होऊन मेरिटलिस्ट मधला माझा नंबर पहिल्या पन्नासांत येऊ शकला असता तो बराच मागे पडल्याने कसाबसा पहिल्या शंभरात आला होता. तो पहिल्या पन्नासात नसणे जसे माझ्या हिताचे ठरले तसेच ते पहिल्या शंभरात कसाबसा असणेही अतिशय पूरक ठरले. कारण पहिल्या पन्नासमधे असणाऱ्या जवळजवळ सर्वांचेच पोस्टिंग मेट्रोपॉलिटन सिटीज् मधल्या अतिशय मोठ्या, क्रिटिकल ठरू शकणाऱ्या हेवी ब्रॅंचेसमधे केले गेले जे माझ्यासाठी आगीतून उठून फोफाट्यात पडण्यासारखेच ठरले असते. शिवाय पहिल्या शंभरात आल्यामुळे माझे पोस्टिंग आऊट ऑफ स्टेट न होता, फक्त आऊट ऑफ रिजन झाले. म्हणजेच नागपूर रिजनमधून पुणे रीजनमधे. अकोल्याला माझी झालेली बदली आणि जेमतेम पाच ते सहा महिन्यांचा तिथला कार्यकाळ हा केवळ ‘नागपूर रिजनमधील प्रमोटी’ हा शिक्का बसण्यापुरताच होता आणि त्यामुळे नागपूरमधे खिचपत न पडता मला पुण्याला सोयीचे पोस्टिंग मिळू शकले. शिवाय अकोला ब्रॅंचमधील कामाचे दडपण व प्रतिकूल परिस्थितीही मला तेव्हा अडचणीची वाटली असली तरी माझ्यासाठी तीच प्रयत्नपूर्वक प्रामाणिक कष्ट करायला पूरक ठरली. आणि त्यामुळेच इंटरव्यूमधेही तो कळीचा मुद्दा ठरुन, त्या इंटरव्हृयूमधले मार्कस् निश्चितच माझ्या प्रमोशनसाठी निर्णायक ठरले!

माझे आधीच्या दोन वर्षांमधील अॅप्रेझल्समधील मार्कांचे स्कोअरिंग खूप चांगले असूनही तिसऱ्या वर्षातील डी.जी.एम्. साहेबांनी दिलेल्या किरकोळ मार्कांमुळे तीन वर्षांच्या सरासरीवर प्रतिकूल परिणाम होऊन मेरिटलिस्ट मधला माझा नंबर पहिल्या पन्नासांत येऊ शकला असता तो बराच मागे पडल्याने कसाबसा पहिल्या शंभरात आला होता. तो पहिल्या पन्नासात नसणे जसे माझ्या हिताचे ठरले तसेच ते पहिल्या शंभरात कसाबसा असणेही अतिशय पूरक ठरले. कारण पहिल्या पन्नासमधे असणाऱ्या जवळजवळ सर्वांचेच पोस्टिंग मेट्रोपॉलिटन सिटीज् मधल्या अतिशय मोठ्या, क्रिटिकल ठरू शकणाऱ्या हेवी ब्रॅंचेसमधे केले गेले जे माझ्यासाठी आगीतून उठून फोफाट्यात पडण्यासारखेच ठरले असते. शिवाय पहिल्या शंभरात आल्यामुळे माझे पोस्टिंग आऊट ऑफ स्टेट न होता, फक्त आऊट ऑफ रिजन झाले. म्हणजेच नागपूर रिजनमधून पुणे रीजनमधे. अकोल्याला माझी झालेली बदली आणि जेमतेम पाच ते सहा महिन्यांचा कार्यकाळ हा केवळ ‘नागपूर रिजनमधील प्रमोटी’ हा शिक्का बसण्यापुरताच होता आणि त्यामुळे नागपूरमधे खिचपत न पडता मला पुण्याला सोयीचे पोस्टिंग मिळू शकले. याउलट मी अहमदनगर ब्रॅंचलाच असतो तर ‘पुणे रिजनमधील प्रमोटी’ म्हणून माझे प्रमोशन पोस्टिंग नागपूर किंवा मुंबई रिजनला होणे अपरिहार्यच ठरले असते जे माझ्यासाठी सर्वार्थानी गैरसोयीचेच होते.शिवाय अकोला ब्रॅंचमधील कामाचे दडपण व प्रतिकूल परिस्थितीही मला तेव्हा अडचणीची वाटली असली तरी माझ्यासाठी तीच प्रयत्नपूर्वक प्रामाणिक कष्ट करायला पूरक ठरली. आणि त्यामुळेच इंटरव्ह्यूमधेही तो कळीचा मुद्दा ठरुन तिथे मिळालेले मार्कस् निश्चितच माझ्या प्रमोशनसाठी निर्णायक ठरलेले होते!

या सगळ्याच घटनाप्रसंगांचा मागोवा हा दिलासा देणारा ‘त्या’चाच हळुवार स्पर्श असावा तसा मला आयुष्यातल्या पुढील वाटचालीतही दिलासा देत रहाणार होता!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted