सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “गाठोड्यातली भांडी” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

गौरी गणपतीच्या सणासाठी जास्तीची भांडी काढली होती. तेव्हा वरच्या कप्प्यातलं एक गाठोडं आनंदला सांगितलं,

” खाली दे”

तो  हसतच म्हणाला,

“आई तुझ्या आठवणींचं गाठोडं का?”

“हो रे..तेच… खूप दिवसात बघितलं नाही..”

त्या गाठोड्यात मला मिळालेली अनेक भांडी मी ठेवलेली आहेत. अगदी लहान वाटीपासून ते मोठ्या पाटीपर्यंत… गंमत म्हणून सगळी भांडी काढून बसले.

एका कुंड्यावर नाव  लिहिलेले दिसले. म्हणून नीट वाचायला लागले. तर त्यावर लिहिले होते…

चि. सौ. का.  मंदाकिनीच्या लग्नाप्रित्यर्थ श्री. देशमुख यांच्याकडून सप्रेम भेट….

गंमत अशी की ही मंदाकिनी कोण हेच मला आठवेना…. विचार करत होते…जिच्या लग्नाला मी गेले असणार.. जेवले असणार… मग कोण ही मंदाकिनी…खूप वेळा नंतर एकदम आठवले माझ्या मावस भावाच्या बायकोच्या बहिणीची मुलगी….तिच्या लग्नात मिळालेला हा कुंडा नाही का?

अशी कशी मी विसरले?नंतर ते मे महिन्यातल लग्न, जिलेबी चे जेवण आठवलं..

एकापाठोपाठ एक भांड्यांवरची नावे वाचायला लागले. कोणाकोणाच्या कार्याला मी गेले होते. आणि काय काय घेऊन आले होते.

पूर्वी काही कार्य असलं की घरातल्या मोठ्या बाईला साडी नेसवली जायची. सुनांना काही ना काही वस्तू म्हणजे बहुतेक वेळेस स्टीलची भांडी दिली जायची.  एक  एक भांड्यांचा जमाना असतो…

काही वर्षे अशी होती की कुठेही कार्याला गेले की कुंडाच मिळायचा. मोठा किंवा लहान.. कुंड्यांचे खूप प्रकार घरात लागायचे.म्हणून वापरायला काढले जायचे. जादाचे गाठोड्यात ठेवले होते.

काही दिवसांनी कॉपर बॉटमची फॅशन आली.त्याचे वेगळ्या आकाराचे कुंडे,छोट्या बादल्या,कढया आल्या..

नंतर झाकणाचे कुंडे.. ही कुंड्यांची फॅशन खूप दिवस टिकली.

चायना प्लेट बाजारात आल्या. काही लहान काही मोठ्या अशा प्लेट माझ्याकडे जमा झाल्या.

दोन कप्पे असलेल्या इडली सांबर प्लेट त्या पण  होत्या.

पावभाजी हा प्रकार फेमस झाल्यानंतर तीन कप्प्यांच्या प्लेट आल्या. त्याही गाठोड्यात आहेत.

लहान मुलांना जेवायला उपयोगी होईल असा चार कप्प्यांच्या जेवायच्या लहान ताटल्या.. त्या दोन-चार मिळालेल्या आहेत.

गंमत अशी की त्या डिशमध्ये ते ते पदार्थ कधी खाल्ले गेले नाहीत. त्या प्लेट गाठोड्यातच राहिल्या.

घरातले अनेक छोटे मोठे डबे मला कुणी ना कोणी दिलेले आहेत. डबे देताना प्रत्येक जण म्हणायचे,

” डबे काय ग.. किती असतील तेवढे लागतातच..”मग मी पण,

“हो हो..खरचं” अस म्हणायची.

ते कोणी दिले आहेत हे माझ्या लक्षात आहे. त्यामुळे मनातल्या मनात मावशीचा,आक्काचा,ऊषाचा, ताईंचा..अशी त्या डब्यांना माझी नांवे आहेत.

मला एक चौकोनी डबा मिळाला. तो एकटाच कसा ठेवायचा? मग त्याच्या जोडीला मी अजून दोन डबे घेतले.

गाठोड्यात एका पिशवीत मी लहान लहान भांडी भरून ठेवली होती. छोटी उलथणी, झाऱ्या, वाट्या, निरांजन,छोट्या प्लेट,हे मला सगळे संक्रांतीला मिळालेले होते.त्यातील छोटी भातवाढी देताना अंजु म्हणाली होती की..

“या भातवाढीने इडली स्टॅन्ड मधून ईडली चटकन निघते.”

त्यानंतर मी शंभर वेळा इडली केली. पण एकदाही त्याचा उपयोग केला नव्हता.  त्या भातवाढी वरून  अंजूची आठवण आली. आज तिला  फोन करायचा  ठरवले.

लग्न होऊन आल्यानंतर खाली बसून स्वयंपाक करत होते. तेव्हा हाताशी नळ नव्हता.

स्वयंपाक करताना लागणारं पाणी ठेवण्यासाठी आईने दिलेली स्टीलची छोटी बादली माझ्याकडे अजून आहे…

राहू दे…अशा गोष्टी समोर बघून पण  आनंद होतो. तिच्याकडे बघितलं तरी आई आठवते….

हे स्टेट बँकेत नोकरी करत होते. बदलीमुळे अनेक गावे हिंडलो. गावोगावी घेतलेल्या भांड्यांची आठवण आहे.  उदगीरला असताना माझ्याकडे कामाला असलेल्या  सुभद्रा मावशींनी आनंदला दिलेला मोठा ग्लास घरी आहे. आज त्यांच्या आठवणीने डोळे पाणावले..त्यांचे ते अकृत्रिम प्रेम आठवले.

घरी दोन कप्प्यांचा, कडी असलेला शाळेत न्यायचा आनंदचा  स्टीलचा ऊभा डबा होता. एकदा माझी मैत्रीण   सुधा आली होती. तेव्हा डबा  समोर होता.तो बघितल्यावर ती  म्हणाली,

” तुझ्याकडे हा डबा आहे?

” खूप वर्ष झाले..जुना आहे तो.”

ती म्हणाली,

” या डब्याची तुला आठवण सांगते. आमच्या वर्गात उषा वर्तक नावाची  श्रीमंत मुलगी होती. तिच्या एकटीकडे असा डबा होता. भाजी वरच्या डब्यात आणि खाली पोळी. आमचा छोटा डबा असायचा. खाली भाजी आणि त्यावर आई पोळी घडी करून ठेवायची. पोळीला भाजी लागायची.

” हो तेव्हा आपल्या सगळ्यांकडे तसाच छोटा डबा असायचा..”

” उषासारखा डबा आपल्याला असावा असे मला वाटायचे पण  वडिलांची परिस्थिती नव्हती ग.. तसे गरीबच होतो आणि त्यात आम्ही चौघं भावंड…”एवढे म्हणेपर्यंत तिचे डोळे भरून आले होते…

थोडा वेळ थांबून ती म्हणाली,

” आपले वडील जे घेऊ शकणार नाहीत तर ते मागायचं नाही.हा समंजसपणाचा शहाणपणा उपजतच आपल्यात होता.त्यामुळे आपण  कधी हट्ट केला नाही.”

“हो हे अगदी खरं…. आणि आहे त्यात आपण समाधानी होतो.”

आम्ही दोघी जुन्या गप्पात रंगून गेलो…

जाताना तो डबा तिच्या हातात  दिला.म्हटलं,

” हा घेऊन जा तु “

” अग खरचं…तु देतेस तर नेते… नाही म्हणत नाही..”

तिला खूप आनंद झाला होता…. तिने तो हळूच हातात घेतला..  डबा उघडला आतला कप्पा बघितला..  कडी हातात धरून ती तो डबा जाताना घेऊन गेली….. लहानपणी मनात असलेली गोष्ट आज अचानक तिच्या हातात आली होती….. तेवढ्याने तिचा जीव सुखावला होता… बरीच वर्षे ऊलटली तरी मनात अशा हळव्या आठवणी असतातच…

गाठोडं समोर ठेवून मी आठवणीत रंगले होते….

यातल्या भांड्यांचा वापरण्यासाठी उपयोग होऊ दे किंवा नको..

पण संसारातील ही भांडी आठवणींचा आनंद देतात हे मात्र नक्की…

माणसे दूर असतात.एकमेकांना वरचेवर भेटतही नाहीत.. पण मनात त्यांची आठवण असते. भांड्यांमुळे त्या त्या लोकांच्या आठवणींच्या खेळात मी आज चांगलीच रंगले होते.

लहानपणी भातुकलीची भांडी घेऊन खेळत होते तशी….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted