सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “लग्नाचा थाट आणि आम्ही…” – लेखिका: सुश्री वंदना ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

हल्ली सगळीकडे मेसेज फिरतोय की “लग्नावर अवास्तव खर्च करू नका, लोक एक दिवस जेवतील आणि  नंतर सर्व विसरतील पण आपण त्यासाठी लाखो रुपये खर्च करतो. हा पैसा नवरा नवरीला दिला तर ते त्यांच आयुष्यात उपयोगाला आणतील “.  हे वाक्य वाचल्यावर पहिला माझा विचार होता की करू दे ना लोकांना खर्च… लग्न हे आयुष्यात एकदाच होते मग ही आठवण मनातल्या हिंदोळ्यावर कोरून ठेवली जाते… महिलांसाठी साडी आणि दागिने खरेदी करायची असेल तर घरच्या मोठ्यांची परवानगी लागत नाही कारण त्यांच्या तोंडून वर्षानुवर्षे ऐकलेले असते “ह्याच्या किंवा हिच्या लग्नात ना मी पैठणी आणि मोहनमाळ किंवा बकुळी हार करणार… वगैरे “त्यामुळे तो आपल्याच हक्क असतो… नवऱ्यासाठी एखाद धोतर कुर्ता किंवा सलवार सूट झाला की बायका त्यांच्या खरेदीला मोकळ्या. घरातलं वातावरण प्रसन्न असतं… ह्याला काय द्यायचं त्याला काय द्यायचं ह्या विचारात घरातली भांडण थांबलेली असतात… लग्नाच्या मुलाचं (कमीच) पण मुलीचे शॉपिंग असेल तर बघायला नकोच. असे आयुष्यातले सहा सात महिने भुरकन आनंदात उडून जातात. मग एक दिवस शांत वेळी नवरा लग्नाचा हिशोब  मांडतो… आपण कानाडोळा करत असतो आणि एक वाक्य येत हळूच… “अपेक्षेपेक्षा जास्त झाला ग खर्च, जरासं बजेट जास्त झालं, हे हे केलं नसतं तर जरा कमी झाला असता खर्च “. तो सांगून जातो आणि आपल्या मनाला थोडीशी हुरहूर लागते…

तसा सोन्याचा हार होता उगाचच मोहनमाळ केली, सुनेला तिच्या आईने बरेच दागिने घातलेले, आपण उगाचच दोन बांगड्या जास्त केल्या तिला…आता तर त्या लॉकरमधे ठेवल्यात कारण ती किंवा मुलगी घालत नाही. पाच महागाच्या साड्या घेण्यापेक्षा दोनच घेऊन तीन ड्रेस घ्यायला पाहिजे होते… जे नेहमी घालते…साड्या पडूनच आहेत “जड “होतात घालायला म्हणून…जवळ जवळ पाचशे माणसे जेवली असतील पण फक्त वीस पंचवीस लोकांनीच सांगितलं जेवण चांगला होते, समारंभ चांगला होता म्हणून…असे अनेक विचार डोकांवतात… मग लेकीचे किंवा लेकाचा लग्नाच्या समारंभा मधला हसरा चेहरा आठवतो आणि परत सगळं विसरून जातो.

ट्रेनमध्ये नेहमी भेटणारी मेधा आठवली, संधिवाताचा त्रास होता तिला, कोणीतरी सीट देईल ह्या आशेने मैत्रिणी बनवायची, बडबडी होती पण चेहऱ्यावर दुःख दिसत होते वाताच्या दुखण्याचं… नेहमी सांगायची “नोकरी सोडायला नवरा म्हणतोय ग, पण दोन मुली पदरात आहेत, सासुबाईंचे आजारपण ह्याला पैसा संपतो आणि आपला पगार हा वाहता पैसा असतो, त्यातच मुलांची लग्न आटोपणार कारण रिटायरमेंट नंतर मुलींच्या इच्छेप्रमाणे लग्न नाही करता येणार कारण तेव्हाचा पैसा हा साचलेल्या पाण्यासारखा असणारं… किती वापरू, कसा वापरू, पुढचं काय? हे प्रश्न उभे असतात “.  परवा सहा वर्षांनी भेटली, कसं काय? गोष्टी झाल्या तर दोन्ही मुलींनी आईवडिलांना सांगितले की आमचं लग्न रजिस्टर करा आणि जो काय खर्च करणार होतात, ती रक्कम आम्हाला जेव्हा लागेल तेव्हा मदत म्हणून द्या… एकीने घरासाठी डिपॉझिट म्हणून दोन लाख आणि नवीन संसाराला भांडीकुंडी घ्यायला काही पैसे मागितले पण त्यातले पण बरेच परत केले (तेव्हा होते म्हणून द्यायला मिळाले हे आईचे वाक्य). दुसरी लेक परदेशात गेली लग्न करून, तेव्हा तिथल्या कोर्ससाठी आईवडिलांकडून पैसे घेतले आणि नोकरीला लागल्यावर परत केले. बरं झालं लग्नात खर्च नाही केला पण असे पैसे त्यांच्या मदतीला आणि नवीन संसाराला लागले… आम्ही खरंच नशीबवान आहोत…..हे मेधाचे वाक्य ऐकून परत माझे मत बदललं…

असा पैसा उपयोगाला येणार असेल तर… खरंच एवढं मोठे लग्न समारंभ ज्यात हल्ली प्री वेडिंग शूट हा पांचटपणा चालू आहे ज्याचा खर्च अंदाजे एक लाख ते दीड लाखाच्या घरात येतो मग, संगीत थोडक्यात मेहंदी सेरेमनी मग हळद आणि नंतर लग्न… हा पंचवीस लाखाच्या घरातला खर्च करून… “आम्ही ना डेस्टिनेशन वेडिंग “केलं जिथे मोजकीच माणसे होती पण खर्च एक करोड पर्यंत झाला हे आपल्या जखमेवर मीठ चोळले जाते…. आणि आपले पंचवीस लाख किस झाड की पत्ती वाटायला लागतात… त्यापेक्षा रजिस्टर मैरिज मस्त … मुलगा किंवा मुलगी हनीमूनला गेले की आपण पण एक टूर मारायची… मस्त पैकी मन आणि शरीर मोकळं करून यायचे… मुलांना गरजेचा पैसे द्यायचे कारण ते आपले असले तरी शेवटी आपण प्रेमळ आईबाप आहोत… हे आपल्याला सिद्ध करायचे असते.

तुम्हाला काय वाटते?

लेखिका: सुश्री वंदना

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted