ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १५ ऑक्टोबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

?१५ ऑक्टोबर  – संपादकीय  – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ?

? वैविध्यपूर्ण विचारांचं सोनं नेहेमीच लुटत राहणाऱ्या ई – अभिव्यक्तीच्या सर्व लेखक – लेखिका, कवी – कवयित्री आणि सर्व रसिक वाचकांना आजच्या “दसऱ्याच्या शुभदिनी“ संपादक मंडळाकडून अनेकानेक शुभेच्छा. ?

आज “वाचन-प्रेरणा दिन“ — जगभरातील संपूर्ण साहित्यक्षेत्राला ज्यांच्यामुळे प्रसिद्धीच्या आणि लौकिकाच्या झोतात येण्यास आणि दीर्घकाळ त्या झोतात राहण्यास उद्युक्त केले जाते, अशा तमाम रसिक वाचकांना या विशेष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मा. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा वाचन-प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. ज्ञानसंपन्न आणि माहितीसमृद्ध समाजाची घडण, व्यक्तिमत्व विकास, साहित्य आणि भाषाविकास यासाठी वाचन संस्कृती जोपासणे गरजेचे आहे, हा दूरदर्शी विचार यामागे आहे. डॉ. कलाम म्हणत असत की ‘एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते.’ त्यांचा रोख मुख्यत्वे विद्यार्थी आणि तरुण वर्गाकडे होता.

 “ जे आपणासी ठावे ते इतरांसी सांगावे । शहाणे करून सोडावे सकल जन “ हा अतिशय व्यापक विचार श्री. रामदास स्वामींनीही खूप वर्षांपूर्वी समाजाला दिलेला आहे. इथे 

 “ शहाणे “ या शब्दाचा अर्थ ‘विवेक-विचार- समृद्ध’  हाच अपेक्षित आहे, असे निश्चितपणे म्हणावे लागेल. आणि आपले विचार इतरांच्या विचारांशी ताडून पाहिले तरच ते जास्त जास्त समृद्ध होऊ शकतात. इतरांचे विविध विषयांवरचे विचार जाणून घेण्यासाठी  “वाचन “ हा  राजमार्ग आहे. . अभिवाचन, काव्यवाचन, समूह वाचन, वाचन कट्टा, असे अनेक उपक्रम याच उद्देशाने सुरु झालेले दिसतात. म्हणूनच, प्रत्येक जातिवंत वाचकाने इतर अनेकांना वाचनासाठी प्रेरणा द्यावी, या उद्देशाने हा दिवस साजरा केला जावा , एवढीच अपेक्षा. 

☆☆☆☆☆

आज १५ ऑक्टोबर — डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन . ( १५/१०/१९३१ –२७/०७/२०१५ ) 

“  पीपल्स प्रेसिडेंट “ म्हणून गौरवले जाणारे भारताचे ११ वे राष्ट्रपती, भारतरत्न पुरस्कार आणि इतर कितीतरी पुरस्कारांचे मानकरी, “ मिसाईल मॅन “ म्हणून जगभरात ख्यातनाम असलेले, आणि विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या सर्वांचेच “ प्रेरणास्थान “ असणारे एक सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ — अशी डॉ. कलाम यांची ओळख खरंतर सर्वांनाच आहे. 

त्यांच्याबद्दल विशेषत्वाने सांगण्याची गोष्ट अशी की इतक्या विविध कामांमध्ये सतत अतिशय कार्यमग्न असूनही डॉ. कलाम यांनी पंचवीसहूनही जास्त पुस्तके लिहिलेली आहेत. ही बहुतेक सर्व पुस्तके इंग्रजी भाषेत लिहिलेली असली, तरी इतर अनेक भाषांप्रमाणेच मराठीतही ती अनुवादित केली गेली असल्याने मराठी वाचकांसाठी ज्ञानाचा आणि माहितीचा मोठाच खजिना उपलब्ध झालेला आहे. त्यापैकी काही पुस्तकांचा नामोल्लेख इथे करणे फक्त  उचितच नाही तर आवश्यक आहे ——–” Wings of Fire “– “ अग्निपंख “ हे त्यांचे आत्मचरित्र. // “ अदम्य जिद्द “ – (अनुवादित नाव ) // “ Ignited Minds–Unleashing the power within India “–” प्रज्वलित मने “ // “ India – My Dream “ // “India 2020 – a vision for The New millenium “ —-

“ भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध “ // “ सायंटिस्ट टू प्रेसिडेंट “ याच अनुवादित नावाचे त्यांचे आत्मकथन // “ Turning Points “– याच नावाने मराठी अनुवाद . ——आणि इतर कितीतरी पुस्तके. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, सन २०१२ मध्ये त्यांनी भारतीय तरुणांसाठी 

“ भ्रष्टाचाराचा पराजय करण्यासाठी मी काय करू शकतो “ या विषयावर आधारित एक कार्यक्रम सुरु केला होता. त्यांना फक्त भारतातच नाही तर जगभरातल्या अनेक देशांनी सन्मानपर पुरस्कार प्रदान करून गौरवले होते. खरोखरच भारताचे “ भूषण “ ठरलेल्या डॉ. अब्दुल कलाम यांना त्यांच्या आजच्या जन्मदिनी अतिशय मनापासून आदरांजली . 

☆☆☆☆☆

आज प्रसिद्ध कवी श्री. नारायण सुर्वे यांचा स्मृतिदिन. ( १५/१०/१९२६ – १६/०८/२०१० ) 

समाज परिवर्तन व्हायलाच हवे, हा विचार अगदी मनापासून करणाऱ्या श्री. नारायण सुर्वे यांनी आपला हा विचार स्वतःच्या कवितांमधून, अनेक कवनांमधून अतिशय प्रभावीपणे लोकांसमोर मांडला. हा विचार कविवर्य केशवसुत यांच्या जातकुळीतला होता. याबाबत अशी एक आठवण सांगितली जाते की, श्री. पु.ल.देशपांडे एकदा असे म्हणाले होते की, “ अरे, केशवसुत कशाला शोधताय ? तुमचा केशवसुत परळमध्येच रहातोय.” या एकाच वाक्यात सुर्वे यांच्याबद्दल बरंच काही सांगितलं गेलं आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. श्री सुर्वे यांच्यावर मार्क्सवादी विचारांचा पगडा होता, असं त्यांच्या कविता बघता म्हटलं जातं—–

“शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले , रात्र धुंद झाली —

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली —-” किंवा —

“असे आम्ही लक्षावधी नारीनर, दिवस असेतो वावरतो–

राबता , खपता आयुष्य मेणबत्तीसम विझवून घेतो —” 

 —-अशा धाटणीची  त्यांची कविता संवेदनशील मनाला थेटपणे  जाऊन भिडणारी आहे. 

१९९५ साली परभणी इथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद श्री. सुर्वे यांनी भूषविले होते. पद्मश्री पुरस्काराबरोबरच सोविएत रशियाच्या नेहरू अवॉर्डसह अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुणे येथे, तळागाळातल्या साहित्यिकांना आणि कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारी, “ नारायण सुर्वे कला अकादमी “ स्थापन करण्यात आली आहे. त्यांच्या नावानेही काही पुरस्कार दिले जातात. त्यांचे काव्यसंग्रहही प्रकाशित झाले आहेत. कवितेची अशी वेगळी वाट आपलीशी करणारे कविवर्य नारायण सुर्वे यांना विनम्र श्रद्धांजली.  

☆☆☆☆☆

मराठी नाटककार आणि विनोदी लेखन करणारे साहित्यिक श्री. वसंत सबनीस यांचाही आज स्मृतिदिन  ( ६/१२/१९२३ – १५/१०/२००२ ) 

सुरुवातीच्या काळात कवी म्हणून ओळख प्राप्त केलेले श्री. सबनीस, पुढे विनोदी लेखक आणि नाटककार म्हणून प्रसिद्ध झाले. चिल्लरखुर्दा, मिरवणूक, आमची मेली पुरुषाची जात , असे त्यांचे बरेच विनोदी लेखसंग्रह, आणि, बोका झाला संन्यासी, आत्याबाईला आल्या मिशा , अशासारखे बरेच विनोदी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच सौजन्याची ऐशी तैशी , गेला माधव कुणीकडे, घरोघरी हीच बोंब, अशी त्यांची नाटके गाजलेली आहेत. विच्छा माझी पुरी करा या त्यांच्या नाटकाने तर यशस्वितेचा विक्रम केलेला आहे. तमाशा या लोककला प्रकाराला आधुनिक रूप देण्याचा पहिला महत्वाचा प्रयत्न म्हणून त्यांचा “ छपरी पलंगाचा वग “ या नावाचा वग खूपच उल्लेखनीय ठरला होता, आणि त्यावरूनच “ विच्छा माझी —” हे नाटक साकार झाले. मार्मिक राजकीय भाष्य आणि चतुर संवाद ही वैशिष्ट्ये असणाऱ्या या नाटकाने लोकनाट्याला वेगळे परिमाण दिले. या नाटकाचे “ सैंय्या भये कोतवाल “ हे हिंदी रूपांतरही खूप लोकप्रिय झाले. सबनीस यांनी लिहिलेले दोन एकांकिका-संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांना दोन वेळा महाराष्ट्र राज्याचा ‘ उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार ‘ दिला गेला होता. “ किशोर “ या तेव्हाच्या प्रसिद्ध मासिकाचे ते प्रमुख संपादक होते. श्री. वसंत सबनीस यांना मनःपूर्वक श्रद्धांजली.  

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

(संपादक मंडळासाठी)

ई अभिव्यक्ती मराठी

संदर्भ :- १) कऱ्हाड शिक्षणमंडळ, “ साहित्य- साधना दैनंदिनी “ . २) गूगल गुरुजी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १४ ऑक्टोबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

?१४ ऑक्टोबर  – संपादकीय  – श्री सुहास रघुनाथ पंडित ?

आज 14 ऑक्टोबर. सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक श्री.सुभाष भेंडे आणि थोर विचारवंत श्री.आ.ह.साळुंखे यांचा आज जन्मदिवस.

श्री.सुभाष भेंडे यांचा जन्म 14/10/1936 ला गोव्यातील बोरी येथे झाला. त्यांचे शिक्षण सांगली व पुणे येथे झाले. कीर्ती महाविद्यालय, मुंबई येथे त्यांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून दीर्घ काळ सेवा केली.अर्थशास्त्रातील डॉक्टरेट संपादन केली असली तरी अंगभूत साहित्यिक गुणांमुळे त्यांच्या कडून विविध विषयांवरील सुमारे पन्नास पुस्तकांची निर्मिती झाली.अदेशी, अंधारवाटा, उध्वस्त, ऐंशी कळवळ्याची जाती, गड्या आपला गाव बरा, हास्यतरंग, दिलखुलास ही त्यातील काही पुस्तके. 2003साली कराड येथे भरलेल्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.तसेच 21 व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 13/12/2010 रोजी त्यांचे निधन झाले.

श्री.आण्णासाहेब हरी तथा आ.ह.साळुंखे यांचा जन्मही आजचाच. खाडेवाडी ता.तासगाव जि.सांगली येथे 1943 ला त्यांचा जन्म झाला. मराठी व संस्कृत या विषयात एम्.ए. व संस्कृत विषयात पी.एच्.डी. त्यांनी संपादन केली आहे. सातारा येथील लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयात 32 वर्षे अध्यापनाचे कार्य केले. सुमारे साठ ग्रंथांचे लेखन त्यांच्या हातून झाले आहे. हे सर्व लेखन सांस्कृतिक परिवर्तनाचा पाया घालून विचारांना दिशा देणारे असे आहे. गौतम बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवणारे थोर विचारवंत अशी त्यांची ख्याती आहे. विचारवेध संमेलन, सत्यशोधक संमेलन, विद्रोही साहित्य संमेलन, शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद अशा अनेक ठिकाणी त्यांनी अध्यक्षपद भूषविले आहे.

समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण यासंबंधी बुद्धीवादी विचार प्रवर्तन  व प्रत्यक्ष कार्य करणारे थोर विचारवंत कै.रघुनाथ धोंडो कर्वे यांचा आज स्मृतीदिन. (1953) गणित विषयातील प्रावीण्याशिवाय समाज प्रबोधनाचे फार मोठे कार्य त्यांनी केले आहे.त्यांच्या काही कलाकृती… संततिनियमन -विचार आणि आचार, गुप्तरोगापासून बचाव, आधुनिक कामशास्त्र, आधुनिक आहारशास्त्र यावरून त्यांच्या कार्याची कल्पना येईल.

साहित्यसम्राट न. चि. केळकर यांचा आज स्मृतीदिन (1947).केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांचे 41 वर्षे संपादन, नाटक, निबंधलेखन, सुभाषिते, विनोद अशा सर्व प्रांतात त्यांनी विपुल लेखन केले आहे.अमात्य माधव, तोतयाचे बंड, चंद्रगुप्त, यासारखी नाटके,ग्यारीबाल्डीचे चरित्र, लोकमान्यांच्या चरित्राचे दोन खंड, भारतीय तत्वज्ञान,मराठे आणि इंग्रज, ज्ञानेश्वरी सर्वस्व, हास्य विनोद मिमांसा, अशा पुस्तकांची निर्मिती त्यांच्या नावावर आहे.

थोर इतिहास संशोधक सेतु माधवराव पगडी यांचा आज स्मृतीदिनानिमित्त. (1994) ते महाराष्ट्र राज्याचे सचीव म्हणून कार्यरत होते. त्याशिवाय इतिहास संशोधनासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले. विशेषतः शिवकालीन इतिहास हा त्यांचा आवडता विषय होता. त्यांना पद्मभूषण या नागरी किताबाने  गौरवण्यात आले होते.

वरील माहिती विविध लेख,व इंटरनेट वरून उपलब्ध झाली आहे.

सुहास रघुनाथ पंडित

(संपादक मंडळासाठी)

ई अभिव्यक्ती मराठी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १३ ऑक्टोबर – संपादकीय ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

?१३ ऑक्टोबर  – संपादकीय  ?

  • गिरीजाबाई केळकर

ज्या काळात स्त्रीयांचे लेखन समाजमान्य नव्हते, त्या काळापासून गिरीजाबाई केळकर या लेखन करत होत्या. म्हणजे स्त्री लेखिकांच्या पहिल्या पिढीतल्या त्या लेखिका. सुरूवातीला त्यांनी ज्ञानप्रकाशमध्ये लिहायला सुरुवात केली. हे लेखन त्यांनी निनावी केलं होतं. काकासाहेब खाडीलकर यांनी स्त्रीयांचे बंड’ असे नाटक लिहिले. त्याला उत्तर म्हणून की काय, त्यांनी पुरूषांचे बंड हे नाटक लिहिले. हे नाटकही त्यांनी निनावीच लिहिले होते. पुढे भारत नाटक कंपनीच्या य. ना. टीपणीस यांनी ते रंगभूमीवर आणले. त्या पहिल्या स्त्री नाटककार आहेत. त्यांनी पुढे आयेषा, मांदोदरी, राजकुवर, वरपरीक्षा, सावित्री इ. नाटके लिहिली.

ज्ञानप्रकाशमध्ये त्यांनी लिहिलेल्या लेखांची गृहिणीभूषण नावाची पुस्तके, दोन भागात प्रकाशित झाली. समाजचित्रे -2 भाग, संसार सोपान हे त्यांचे वैचारिक लेख आहेत. त्यांनी ‘स्त्रीयोनुं वर्ग या गुजराती पुस्तकाचा स्त्रीयांचा वर्ग हा अनुवादही केला आहे. न. चिं. केळकर यांच्या त्या वाहिनी. पुढे त्यांचे चिरंजीव मनोहर केळकर यांनी वङ्मयशोभा नावाचे साहित्यिक मासिक काढून अनेक वर्ष चालवले.

स्त्रीयांचे लेखन समाजमान्य नव्हते, त्या काळात गिरीजाबाई केळकर यांनी इतके समृद्ध साहित्य निर्माण केले आणि पुढील लेखिकांना लेखनाचा मार्ग प्रशस्त करून दिला, त्याबद्दल त्यांचा अभिमान मिश्रित आदर वाटतो. त्यांचा जन्म १८८६ सालचा तर त्यांचा स्मृतीदिन १९८०सालचा.

  • इंदूमती शेवडे 

इंदूमती शेवडे या लेखिका होत्या. पत्रकारही  होत्या. त्यांनी नागपूर तरुण भारतमध्ये महिलांचे मनोगत हे सदर अनेक वर्षे चालवले. नंतर त्या दिल्लीला गेल्या. तिथे त्यांनी नॅशनल बुक ट्रस्टने प्रसिद्ध केलेल्या अनेक पुस्तकांचे इंग्रजीत भाषांतर केले. त्यांचा जन्म १३ ऑक्टोबरचा दिल्लीत त्यांनी ‘मिर्झा गलीब’ची माहिती मिळवली. नागपूरला पुन्हा गेल्यावर त्यांनी  ‘मिर्झा गालीबचे चरित्र लिहिले. त्या उत्तम चित्रकारही होत्या. आपल्या पुस्तकातील चित्रे त्यांनी स्वत:च काढली आहेत.

त्यांचे संत कवियत्री हे पुस्तक स्त्रीमुक्तीच्या चळवळीच्या अभ्यासातील पहिले पुस्तक मानले जाते. महदाईसा, मुकताबाई, जनाबाई, बहिणाबाई, वेणाबाई या ५ संत कवियात्रींच्या काव्याचा या पुस्तकात वेगळ्या दृष्टीने विचार आहे. या शिवाय, इये साहेबाचीये नागरी’, पु.य. देशपांडे (चरित्र) इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

त्यांनी नागपूर आकाशवाणी वरून अनेक श्रुतीकाही सादर केल्या.

  • लक्ष्मण लोंढे

लक्ष्मण लोंढे हे विज्ञान कथा लेखक म्हणून प्रसिद्धा होते. त्यांची दुसरा आईन्स्टाईन   ही कथा सायन्स टूडे या मासिकात प्रकाशित झाली आणि पुढे या कथेला जागतिक सर्वोत्कृष्ट कथा म्हणून कॅन्सास विद्यापीठाचा पुरस्कार मिळाला. त्यांची एक कथा जेम्स गुण यांच्या द रोड तू सायन्स या पुस्तकाच्या १९८९ च्या  आवृत्तीत निवडली गेली आहे. अशा तर्‍हेने आंतरराष्ट्रीय बहुमान मिळवणारे ते भारतातील पहिले विज्ञान लेखक.त्याचा जन्म १३ ऑक्टोबर १९४५ साली झाला.       

 विज्ञान कथांशिवाय त्यांनी अन्य ललित लेखनही केले. सोबतमध्ये, लक्ष्मण झूला या नावाने ते सादर चालवीत. असं घडलंच नाही ही त्यांची कादंबरी, आणि वसंत पुन्हा बहरला हे त्यांनी लिहिलेले चरित्र. याशिवाय त्यांची थॅंक्यू इमस्टर फॅरॅडे, काऊंट डाउन, देवासि जीवे मरिले इ. पुस्तके विज्ञान पुस्तके म्हणून खूप गाजली.

त्यांच्यादुसरा आईन्स्टाईन या पुस्तकाला कॅन्सास विद्यापीठाचा, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारचाही पुरस्कार मिळाला.        

  • लीलाताई दीक्षित

लीलाताई दीक्षितांनी लग्नानंतर एम. ए. पीएच. डी. या पदव्या घेतल्या. नंतर पुण्याच्या एस.एन.डी. टी. कॉलेजमध्ये अध्यापनाचे काम केले. बालसाहित्याच्या लेखिका म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. गंमत गाव, गाणारे झाड, नाच रे मोरा, पंख नवे, पॉपतचा झाड फुलांना रंग मिळाले. इ. बालसाहित्याची पुस्तके लिहिली. बालसाहित्यातील त्यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांना २००५ मध्ये पर्भणी येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले. त्यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९३५ मध्ये झाला.

विविध विषयांवरील त्यांनी ५० पुस्तके लिहिली. बालसाहित्याशिवाय त्यांनी आनंदयोगिनी(९ स्त्री संतांची चरित्रे) , अंतरीचे भावे (आठवणी), आजोबांचे घर, घर आमचा कोकणातलं, स्वामी अपरांताचा ( कादंबरी) इ. पुस्तके लिहिली. लिहिली. प्राचीन मराठी साहित्यातील स्त्री दर्शनया त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य सरकारचापुरस्कार मिळाला.       

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ 

मराठी विभाग. 

संदर्भ : कर्‍हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी , गुगल गुरुजी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १२ ऑक्टोबर – संपादकीय ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

 

( १२/१०/१९२२ – ६/६/२००२ )

?१२ ऑक्टोबर  – संपादकीय  ?

आज १२ ऑक्टोबर :- कवयित्री शांता शेळके यांचा जन्मदिन .

श्रीमती शांता शेळके या एक अतिशय प्रतिभासंपन्न कवयित्री तर होत्याच, पण त्यांची एकूणच साहित्यिक कारकीर्द चौफेर- चतुरस्त्र अशीच होती, ज्याबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे. त्या प्राध्यापिका होत्या, गीतकार, उत्कृष्ट लेखिका, कादंबरीकार, अनुवादिका, बालसाहित्यकार,आणि पत्रकारही होत्या. सुरुवातीच्या काळात ‘ वसंत अवसरे ‘ या टोपण नावानेही त्यांनी काव्यरचना केलेल्या आहेत. आचार्य अत्रे यांच्या “ नवयुग “ मध्ये त्यांनी ५ वर्षं उपसंपादक म्हणून काम केले होते. चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या , तसेच राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते. १९९६ साली आळंदी  येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले होते. तसेच काही पुरस्कार त्यांच्या नावाने दिले जातात. “ आठवणीतील शांताबाई “, “ शांताबाईंची स्मृतीचिन्हे “, अशासारखी पुस्तकेही त्यांच्या कार्यकर्तृत्वावर लिहिली गेली आहेत. त्यांची अनेक काव्ये खरोखरच अजरामर झालेली आहेत, हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे ‘ निवडक ‘ हा शब्द त्याबाबतीत वापरताच येणार नाही.

स्वतःला उपजतच लाभलेल्या अतिशय संपन्न अशा प्रतिभेच्या प्रत्येक पैलूला सहज सुंदर अशा साहित्य-कोंदणात सजवून,  मराठी साहित्य- शारदेचे तेजच त्यांनी जणू आणखी उजळून टाकले. 

मराठीसाहित्याच्या आकाशातल्या या तेजस्वी ताऱ्याला जणू ध्रुवपद प्राप्त झाले आहे, यात साहित्य-रसिकांचे दुमत असणार नाही. 

श्रीमती शांताबाईंना त्यांच्या आजच्या जन्मदिनी अतिशय मनःपूर्वक आदरांजली ……    ?

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ 

मराठी विभाग. 

संदर्भ : कर्‍हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी , गुगल गुरुजी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ११ ऑक्टोबर – संपादकीय ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

( ३०/०४/ १९०९ – ११/१०/ १९६८)

?११ ऑक्टोबर  – संपादकीय  ?

आज ११ ऑक्टोबर : संत तुकडोजी महाराज यांचा स्मृतीदिन.

अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद निर्मूलन, आणि समाजाच्या सर्व घटकातील लोकांचा उद्धार,  या स्वतःच्या सुनिश्चित ध्येयांसाठी आयुष्य वेचलेले तुकडोजी महाराज हे राष्ट्रसंत म्हणून ओळखले जातात. हे महत्वाचे आणि मोठे ध्येय सर्वसामान्यांच्या मनात रुजवण्यासाठी त्यांनी भजन- कीर्तनाचा अतिशय प्रभावी मार्ग अवलंबला होता. ‘ खंजिरी भजन ‘ हे त्यांच्या सामाजिक प्रबोधनाचे मोठेच वैशिष्टय ठरले होते. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये त्यांनी काव्यरचना केल्या. “ ग्रामगीता “ या काव्यातून त्यांनी ‘आत्मसंयमन ‘ या आचरणात आणण्यास अवघड पण आवश्यक अशा विचारावर सहजसुलभ भाषेत विवेचन केलेले आहे. आध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मकतेचा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रबोधन करत ते देशभर फिरले. 

१९४२ च्या “ भारत छोडो “ आंदोलनादरम्यान काही काळ ते अटकेत होते, आणि “ आते है नाथ हमारे “ हे त्यांचे गीत त्यावेळी त्या लढ्यासाठी स्फूर्तिगीत ठरले होते, हेही विशेषत्वाने सांगायला हवे. 

त्यांची ध्येये, त्यातही विशेषतः ग्रामविकासाचे ध्येय साकार व्हावे यासाठी त्यांनी उपाययोजनाही सुचवल्या होत्या, ज्या त्यावेळी आणि नंतरच्या काळातही परिणामकारक ठरल्या. त्यांनी सामुदायिक तसेच सर्वधर्मीय प्रार्थनेचा नेहेमीच आग्रहाने पुरस्कार केला. राष्ट्रपतीभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून तेव्हाचे राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी “ राष्ट्रसंत “ या उपाधीने त्यांना गौरविले. ग्रामगीता, अनुभव -सागर भजनावली, सेवास्वधर्म, राष्ट्रीय भजनावली– अशासारखे त्यांचे साहित्य प्रसिद्ध आहे. त्यांनी  हिंदीतून लिहिलेले “ लहरकी बरखा “ हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांच्या आठवणी, विचार आणि चरित्र यावरही अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत.  “ तुकडोजी महाराज साहित्य संमेलन “ आणि “ तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन “ अशी दोन संमेलने त्यांच्या नावाने भरवली जातात. नागपूर विद्यापीठाला “ तुकडोजी महाराज विद्यापीठ “ असे नाव दिलेले आहे, त्यावरून त्यांच्या महान कार्याची महती सहजपणे समजून येते. 

अशा सर्वार्थाने “ राष्ट्रसंत “ असणाऱ्या श्री. संत तुकडोजी महाराज यांना अतिशय मनःपूर्वक श्रद्धांजली..  

आजच्या अंकात वाचू  या –“ हर देशमें तू “ ही त्यांची हिंदी रचना. हे एक भजन आहे, जे जपानमध्ये भरलेल्या विश्व हिंदू परिषदेत म्हटले गेले होते, आणि दिल्लीतल्या राजघाटावरही हे नियमित ऐकवले जाते. 

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ 

मराठी विभाग. 

संदर्भ : कर्‍हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी , गुगल गुरुजी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १० ऑक्टोबर – संपादकीय ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

? १० ऑक्टोबर  – संपादकीय  ?

आज आपण कबीर सन्मान पुरस्कारा विषयी माहिती घेणार आहोत.

भारतामध्ये  साहित्य क्षेत्रासाठी जे विविध सन्मान ठेवले आहेत, त्यामध्ये कबीर पुरस्कार हा महत्वाचा पुरस्कार आहे. हा पुरस्कार अखिल भारतीय पातळीवर प्रदान केला जातो. मध्यप्रदेश शासनाच्या संस्कृतिक विभागामार्फत स्थापन केलेल्या विशेष समितीकडून, भारतीय भाषांमधील कवी, लेखक, समीक्षक आणि साहित्य संस्था यांच्याकडून नामनिर्देश केलेल्या साहित्यिक व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. या विशेष समितीमध्ये राष्ट्रीय पातळीवरील साहित्य क्षेत्रातील श्रेष्ठ व्यक्तींचा समावेश केला जातो. कवी, लेखक, समीक्षक आणि साहित्य संस्था यांच्याकडून नामनिर्देश केलेल्या व्यक्तींव्यतिरिक्तही, साहित्यिकांची निवड करण्याचा अधिकार या निवड समितीला आहे. त्यानुसार हा महत्वाचा पुरस्कार देण्यासाठी साहित्यिकाची निवड सर्व साहित्यिक मापदंडांना अनुसरून व नि:पक्षपातीपणे  केली जाते.

मराठीत केवळ ३ साहित्यिकांना आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळाला आहे.

  • विंदा करंदीकरांना ९० -९१ चा पुरस्कार मिळालाय.

जातक, ध्रुपद, स्वेदगंगा, अष्टदर्शने, विरुपिका, मृद्गंध इ. त्यांचे कविता संग्रह प्रसिद्धा आहेत.

त्यांच्या बालकविताही प्रसिद्ध आहेत. राणीचा बाग , एकदा काय झालं, एटू लोकांचा देश इ. त्यांचे १२ बालकवितांचे संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी  मराठी काव्यमंजुषेत  विविध घाटाच्या, रंजक व वैचारिक काव्यलेखनाची भर घातली.

याशिवाय त्यांनी गद्य लेखनही केले आहे. ललित व वैचारिक लेखन त्यांनी केले आहे. स्पर्शपालवी, उद्गार इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.  त्याचप्रमाणे ते समीक्षकही होते. त्यांनी मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमधून समीक्षा लिहीली आहे.

ते उत्तम अनुवादकही होते. त्यांनी इंग्रजी ग्रंथांची भाषांतरे केली आहेत. विंदा करंदीकरांना वरील  पुरस्काराव्यतिरिक्त केशवसूत, जनस्थान, कोणार्क व सगळ्यात महत्वाचा म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला आहे. त्यांच्या अष्टदर्शने या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला आहे.  

  • नारायण सुर्वे यांना ९९ – २००० चा कबीर सन्मान पुरस्कार मिळालाय

ऐस गा मी ब्रम्ह, जाहीरनामा, नव्या माणसाचे आगमन, सनद इ. त्यांचे काव्यसंग्रह आहेत.

त्यांच्या कवितेतून कामगारांच्या जिवनाचे, त्यांच्या दु:ख – दैन्याचे आणि त्यांच्या चाळवळीचेही दर्शन घडते.

त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा नरसिंह मेहता पुरस्कार, जनस्थान, सोव्हिएट राशीयाचा नेहरू सन्मान इ. सन्मान व पुरस्कार लाभले आहेत. भारत सरकारने त्यांना पद्मश्री दिली आहे.    

  • मंगेश पाडगावकर यांना २००८-२००९ चा कबीर सन्मान पुरस्कार मिळालाय

पाडगावकरांचे आनंद ऋतु , धारानृत्य , जिप्सी , छोरी, उत्सव हे सारे कविता संग्रह प्रेम भावनेच्या विविध छटा वर्णन करणारे आणि निसर्गाची विविध रूपे साकार करणारे आहेत. ‘सलाम’ पासून त्यांच्या कवितेने आपले वळण बदलले. ती सामाजिक, राजकीय जीवनातले अनुभव व्यक्त करू लागली. त्यांच्या अनेक कवितांची गाणी झाली. त्यांनी बालकविता व बालगीतेही लिहिली आणि ती लोकप्रिय झाली.

ते उत्तम अनुवादक होते. त्यांनी मीरेच्या पदांचे, कबिराच्या दोहयांचे आणि सूरदासाच्या  रचनांचे अनुवाद केले आहेत. त्यांनी मेघदूताचाही अनुवाद केलाय . शेक्सपियरच्या तीन नाटकांचाही त्यांनी अनुवाद केला आहे. विविध विषयांवरील २५ हून अधीक पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केला  आहे. २००९-१० सालात त्यांनी बायबलचाही अनुवाद केला. ‘सलाम’ कविता संग्रहासाठी त्यांना साहिती अअ‍ॅकॅडमीचा पुरस्कार मिळाला. त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पद्मभूषण या पदव्यांनीही सन्मानित केले गेले. 

 

श्रीमती उज्ज्वला केळकर

(ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ)

संदर्भ : कर्‍हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी , गुगल गुरुजी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ९ ऑक्टोबर – संपादकीय ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

?९ ऑक्टोबर  – संपादकीय  ?

* मराठीतील स्त्रीवादी लेखिका विजया राजध्यक्ष या श्रेष्ठ समीक्षक आहेत. आधांतर हा त्यांचा पहिला कथासंग्रह. त्यानंतर त्यांचे वैदेही, अनोळखी, अकल्पित इ. १९ कथासंग्रह प्रकाशित झाले. त्यांच्या कथा, मध्यम वर्गीय स्त्री जीवनावर आधारित आहेत. त्यांची कवितारति आदिमाया, संवाद इ. समीक्षेवरची पुस्तके प्रसिद्ध आहेत. मर्ढेकरांची कविता स्वरूप आणि संदर्भ या समीक्षेच्या पुस्तकाला साहित्य अ‍ॅकॅडमीचापुरस्कार प्राप्त झालाय. २००० मध्ये इंदूर यथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९३३ चा.

* मराठीतील महान नाटककार म्हणून ज्यांची ओळख आहे, त्या महेश एलकुंचवार यांचा  जन्मही ९ ऑक्टोबरचा. त्यांनी आपल्या नाटकांची रचना, वास्तववादी, प्रतिकात्मक, अभिव्यक्तीवादी, आशा अनेक शैलीत केली आहे. जन्म ते मृत्यू या दरम्यानच्या अनेक  थिम्स त्यांनी आपल्या नाटकातून मांडल्या. त्यांच्या नाटकांची भारतीय आणि पाश्चात्य आशा विविध भाषेत भाषांतरे झाली आहेत. त्यांच्या होळी, पार्टी अशा नाटकांवर चित्रपट झाले. गार्बो, वासनाकांड , पार्टी, प्रतिबिंब, मग्न तळ्याकाठी  इ. त्यांची नाटके गाजली. तरी सर्वात गाजले, ‘वाडा चिरेबंदी. २७ फेब्रुवारी १९ ला त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारचा विंदा करंदीकर जीवन गौरवपुरस्कार मिळाला. २०११ ला त्यांना जनस्थान पुरस्कार मिळाला, तर २०१३ मध्ये संगीत नाटक अ‍ॅकॅडमीचा विष्णुदास भावे पुरस्कार मिळाला. मराठी नाट्यसृष्टीला नवे वळण देणारे , नवे आयाम अजमावणारे ते नाटककार आहेत.  

*१९ व्या शतकाच्या पूर्वार्धात ( १३ डिसेंबर १९२८ ) गोपाळ हरी देशमुख हे मोठे अर्थतज्ञ होऊन गेले. मराठीतून लेखन करणारे ते पहिले अर्थतज्ञ. त्यांनी अर्थशास्त्रावर ५ पुस्तके लिहिली. समाजहिताला  प्राधान्य देऊन त्यांनी, लोकहितवादी या नावाने शंभर पत्रे लिहिली. शतपत्रे म्हणून ती गाजली. त्यांनी सर्वांगीण समाज सुधारणेला महत्व दिले. बालविवाह, हुंडा घेण्याची पद्धत, बहुपत्नीत्वाची पद्धत यावर त्यांनी टीका केली. त्यांनी ग्रंथालय चळवळीला चालना आणि प्रेरणा दिली. ते इतिहासाचे अभ्यासकही होते. त्यांची इतिहासाची १० पुस्तके आहेत. त्यांनी सामाजिक विषयावरील ५ पुस्तके व संकीर्ण ७ पुस्तके लिहिली आहेत. ९ ऑक्टोबर हा त्यांचा स्मृतिदिन॰

*बाबा कदम – मराठीतील लोकप्रिय कादंबरीकार बाबा कदम यांचं नाव वीरसेन आनंदराव कदम. यांचाही स्मृतिदिन आजच.  (१९८९ )॰ त्यांनी ऐतिहासिक पार्श्वंभूमीवर अनेक कादंबर्‍या लिहिल्या. संस्थानिक, त्यांच्या गढया, वाडे, त्यांची बोलण्याची शैली. रीती-रिवाज  इ. ची वर्णने त्यांच्या कथा-कादंबर्‍यातून येतात. ते स्वत: वकील होते. त्यामुळे त्यांच्या कादंबर्‍यातून कोर्ट–कचे-या, पोलीस, कायदे इ. गोष्टी येतात. तिथल्या अनुभवावर त्यांनी अनेक कथा-कादंबर्‍या लिहिल्या. त्यांची ‘आवडलेली माणसे’ (व्यक्तिचित्रण), चक्र (एकांकिका), चार्वाक (नाटक) , पोपटी चौकट, देवचाफा, टेकडीवरचे पीस इ. कथा संग्रह माता द्रौपदी ( नाटक). शाश्वतचे रंग ( समीक्षा ) इ. महत्वाची पुस्तके आहेत.

श्रीमती उज्ज्वला केळकर

(ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ)

संदर्भ : कर्‍हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी , गुगल गुरुजी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ 8 ऑक्टोबर – संपादकीय ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

?ऑक्टोबर – संपादकीय  ?

शं. वा. किर्लोस्कर ( ‘शंकर वासुदेव किर्लोस्कर) यांचा जन्म ८ ऑक्टोबर १८९१ साली झाला. किर्लोस्कर मासिकाचे ते संस्थापक आणि संपादक होते. सुरूवातीला ते ‘किर्लोस्कर खबर’ ही पत्रका काढत. कारखान्यात तयार होणार्‍या मालाच्या जाहिरातीसाठी प्रथम ‘किर्लोस्कर खबर’ ही पत्रिका सुरू झाली. त्या नंतर त्यातून ‘‘किर्लोस्कर’ हे मासिक परिणत झाले. पुढच्या काळात स्त्री व मनोहर ही मासिके निघाली. महाराष्ट्राच्या नियतकालिकांच्या इतिहासात  या मासिकांचे स्थान अतिशय महत्वाचे आहे. महाराष्ट्राची  संस्कृती आणि कालमानानुसार त्यात झालेले बदल याचे दर्शन या मासिकांमधून घडते. ‘शंवाकीय’ हे त्यांचे आत्मकथन आसलेले पुस्तक. यातून पाच दशकाचे महाराष्ट्राचे संस्कृतिक जीवन स्पष्ट होते. ते व्यंग चित्रकारही होते. ‘त्यांचे ‘टाकाच्या फेकी’ हे व्यंग चित्रांचे पुस्तकही त्या काळात अतिशय नावाजले गेले.

उद्धव शेळकेउद्धव शेळके हे वैदर्भीय लेखक कादंबरी लेखक म्हणूनते प्रसिद्ध आहेत. धग ही त्यांची कादंबरी खूप गाजली.’शिळान’ हा यांचा पहिला कथासंग्रह. वैदर्भीय ग्रामीण बोलीत त्यांनी लेखन केले. धुंदी, पुरुष, नांदतं घर, कोवळीक, इ. अनेक कादंबर्‍यांचे त्यांनी लेखन केले. त्यांचाही जन्मदिन आजचाच.

कमल पाध्ये –  या प्रभाकर पाध्ये यांच्या पत्नी. त्यांचे बंध- अनुबंध हे आत्मचरित्र खूप गाजले.

शैलजा राजे – या मरारीतल्या नामांकित व लोकप्रिय लेखिका. यांचा आज स्मृतिदिन. त्यांचे ३९ कथासंग्रह, ४३ कादंबर्‍या व २५ बालकथा- कादंबरिका व काही गद्य लेखन प्रसिद्ध आहे.मुखवटा, यज्ञ, आठवणींचे मोहोळ,आभास, अर्थहीन, बंधन इ. त्यांच्या गाजलेल्या कादंबर्‍या.

गोदावरी पारुळेकर – ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात, त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाबद्दल यांनी मोठाच लढा उभारला होता. त्या संघर्षावर आधारित त्यांनी ‘जेव्हा माणूस जागा होतो’, हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाला ‘साहित्य अ‍ॅकॅडमीचा पुरस्कार मिळाला. या  संघर्शाच्या वेळी कायदा मोडल्याबद्दल त्यांना अटक करून तुरुंगात ठेवण्यात आले होते. तेथील स्त्रियांच्या कहाण्या ऐकून त्यांनी ‘बंदिवासाची आठ वर्षे हे पुस्तक लिहिले. यांचाही आज स्मृतिदिन.

श्रीमती उज्ज्वला केळकर

(ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ)

संदर्भ : कर्‍हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी , गुगल गुरुजी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ 7 ऑक्टोबर – संपादकीय ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

? 7 ऑक्टोबर – संपादकीय  ?

? आजपासून सुरु होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ?

 

आज ७ ऑक्टोबर—- ख्यातनाम कवी केशवसुत ( कृष्णाजी केशव दामले ) यांचा जन्मदिन.

(७/१०/१८६६ – ७/११/१९०५)

मराठीतली ‘ संतकाव्य ‘ आणि ‘ पंतकाव्य ‘ ही बऱ्याच वर्षांपासून रूढ झालेली परंपरा मोडून, अन्य अनेक विषयांवर वेगळ्या धाटणीची कविता करणारे “ आद्य मराठी कवी “ म्हणजे केशवसुत असे म्हटले जाते. वर्ड्सवर्थ, शेली , किट्स , अशा परदेशी कवींचा त्यांच्यावर प्रभाव होता, आणि त्यामुळे त्यांनी मराठीत कवितेचा एक नवा दृष्टिकोन रुजवला. १९ व्या शतकाची जन -मानसिकता त्यांनी त्यांच्या कवितेतून सादर केली असे म्हटले तर वावगे होणार नाही, कारण  त्यांच्या अनेक कविता स्वतंत्रता, समानता, आणि क्रांती, या संकल्पनांभोवती गुंफलेल्या दिसतात. याबरोबरच त्यांच्या निसर्गकविता, प्रेमकविता, आणि विशेष म्हणाव्यात अशा ‘झपुर्झा‘ , ‘म्हातारी ‘, यासारख्या गूढ कविताही खूप प्रसिद्ध झाल्या होत्या. “ तुतारी “ ही त्यांची कविता तर इतकी जास्त लोकप्रिय झाली की, त्या कवितेची शंभरी साजरी करतांना , म्हणजे २०१७ साली, दादर-सावंतवाडी एक्सप्रेसला “ तुतारी एक्सप्रेस “ हे नाव देण्यात आले. विद्यार्थीदशेत असतांनाच केशवसुतांनी एक नाटक आणि एक कादंबरीही लिहिली होती हे फारसे कुणाला कळलेही नव्हते. अशा “ आधुनिक मराठी काव्याचे जनक “ म्हणूनच नावाजल्या गेलेल्या कवी केशवसुत यांना भावपूर्ण आदरांजली.

——————– 

७ ऑक्टोबर —- कवी आणि बालकुमार साहित्यिक विनायक महादेव म्हणजे वि.म. कुलकर्णी यांचा जन्मदिन.

(७/१०/१९१७ – १३/०५/२०१०)

‘नाटककार खाडिलकर ‘ यांच्यावर प्रबंध लिहून वि. म. कुलकर्णी यांनी  पीएच.डी. मिळवली आणि दीर्घकाळ ‘ मराठीचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक ‘ म्हणून त्यांनी काम केले. त्याजोडीनेच त्यांनी काव्यलेखन, ग्रंथसंपादन, बालकविता, अनुवाद, कथा, असे विविध प्रकारचे लेखन केले. ‘ अंगतपंगत ‘, ‘ चंद्राची गाडी ’, ‘ छान छान – गाणी ‘, यासारखे कितीतरी बालकवितासंग्रह, ‘ कमळवेल ‘, ‘ पहाटवारा ‘, प्रसाद रामायण ‘, अशासारखे काव्यसंग्रह, ‘ न्याहारी ‘ हा कथासंग्रह, ‘ नौकाडुबी ‘ ही अनुवादित कादंबरी, ‘ गरिबांचे राज्य ‘ ही चित्रपटकथा, आणि ‘ झपुर्झा ‘, ‘ पेशवे बखर ‘ अशासारख्या ग्रंथांचे संपादन— असे त्यांचे विपुल साहित्य प्रकाशित झालेले आहे. त्यांच्या काही कवितांची गाणीही लोकप्रिय झालेली आहेत. असे चौफेर लेखन करणाऱ्या श्री. वि. म. कुलकर्णी यांना विनम्र अभिवादन. 

————————

७ ऑक्टोबर– मराठी साहित्यविश्वात “ बालकवी “ म्हणून ख्यातनाम झालेले कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा स्मृतिदिन.

(१८९० – १९१८) 

बालकवी यांचा “ मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी “ असा यथार्थ गौरव केला जातो. १९०७ साली झालेल्या पहिल्या महाराष्ट्र कविसंमेलनात अध्यक्ष डॉ. कीर्तिकर यांनी त्यांना “बालकवी“ ही उपाधी दिली. त्यांची काव्य-क्षेत्रातली मुशाफिरी फक्त १० वर्षांची होती. त्यांच्या बहुतेक कवितांमध्ये निसर्ग मध्यवर्ती होता, पण रूढार्थाने निसर्गवर्णन करणे हा त्यांचा हेतू नव्हता. तर निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे ते सहजोद्गार असायचे, असे जाणकार म्हणतात. त्यांच्या कवितांमध्ये जसा आनंद व्यक्त व्हायचा, तशीच काही कवितांमध्ये उदासीनताही व्यक्त झालेली दिसते. “ औदुंबर “, “फुलराणी“, “श्रावणमास “, “ आनंदी आनंद गडे “, अशासारख्या त्यांच्या कविता माहिती नसलेला काव्यरसिक सापडणार नाही. त्यांच्या कवितांचे संग्रहही प्रसिद्ध आहेत, आणि त्यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. असे विशेषत्वाने म्हटले जाते की, नंतरचे ख्यातनाम कवी मर्ढेकर, ग्रेस, महानोर अशा भिन्न प्रकृतीच्या कवीच्या जडणघडणीवर बालकवींचा प्रभाव जाणवतो. श्रावण महिन्याची चाहूल लागताच ज्यांच्या “श्रावणमासी हर्ष मानसी“ या कवितेची हटकून आठवण आल्याशिवाय राहत नाही, अशा कविश्रेष्ठ बालकवी यांना मनःपूर्वक श्रद्धांजली.   

——————–

७ ऑक्टोबर — प्रसिद्ध मराठी लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक श्री प्रभाकर पेंढारकर यांचा स्मृतीदिन.

(१९३२ – ७/१०/२०१०)

चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचे सुपुत्र असणारे श्री प्रभाकर पेंढारकर नेहेमीच प्रसिद्धीपासून लांब राहिले. “ प्रतीक्षा “, “ आणि चिनार लाल झाला “, “ चक्रीवादळ “ या त्यांच्या कादंबऱ्या अतिशय गाजल्या. भारताच्या सीमावर्ती भागांमध्ये रस्ते बांधण्याचे अतिशय अवघड काम करणाऱ्या सैन्याच्या ‘ बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन ‘ वर डॉक्युमेंटरी बनवतांना त्यांना “ रारंगढांग “ या कादंबरीची कल्पना सुचली, आणि एखादा सुंदर सिनेमाच पाहत आहोत असं वाटायला लावणारी ही कादंबरी वाचकांना मंत्रमुग्ध करणारी ठरली.  “ एका स्टुडिओचे आत्मवृत्त “ या  त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला होता. तसेच सर्वोत्तम शैक्षणिक चित्रपटासाठीचा राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना मिळाला होता. फिल्म्स डिव्हिजन मधली त्यांची यशस्वी कारकीर्दही खूप गाजली होती. उत्कृष्ट लघुपट- निर्मितीसाठी त्यांनी आयुष्यातली बरीच वर्षे काम केले, अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली. त्यांचा जीवनपट उलगडणारा “ प्रभाकर पेंढारकर — एक परीसस्पर्श “ हा लघुपट तयार केला गेला आहे. आजच्या त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन. 

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

(ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ)

संदर्भ : कर्‍हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी / गुगल गुरुजी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ 6 ऑक्टोबर – संपादकीय ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

?6 ऑक्टोबर – संपादकीय  ?

आज महामहोपाध्याय द.वा. पोतदार (दत्तो वामन पोतदार) यांचा स्मृतीदिन. (६ ऑक्टोबर १९७९) . ५ ऑगस्ट १८९०ला त्यांचा जन्म झाला.  हे मोठे इतिहासकार, लेखक आणि वक्ते होते. भारताच्या केंद्रशासनाचे ते मान्यता प्राप्त पंडित होते. १९४८ मधे भारत सरकारने त्यांना महामहोपाध्याय ही पदवी दिली. १९६१ ते१९६४ ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. ‘मराठी शुद्धलेखन महामंडळा’चे ते अध्यक्ष होते. ‘मराठी साहित्य आणि मराठ्यांचा इतिहास’ हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता. १९३९ साली अहमदनगर येथे झालेल्या साहित्य समेलमनाचे ते अध्यक्ष होते.हिन्दी साहित्य समेलनात त्यांना ‘साहित्य वाचस्पती’ ही पदवी दिली होती.बनारस हिंदू विश्व विद्यालय आणि पुणे विद्यापीठ या दोन्हीही संस्थांनी त्यांना डी. लिट. पदवी दिली होती. ‘त्यांची ऐतिहासिक चरित्र लेखन’, ‘भारताची भाषा समास्या’, ‘मराठी इतिहास व संशोधन’, ‘मराठी गद्याचा इंग्रजी अवतार इ. अनेक पुस्तक प्रसिद्ध आहेत. १९६७ मधे त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार मिळला होता.

☆☆☆☆☆

ग.रा. कामत यांचाही आज स्मृतीदिन. (६ ऑक्टोबर २०१५). त्यांचा जन्म १२ मार्च १९२३ चा. मराठी आणि हिन्दी चित्रपटांचे कथा लेखन त्यांनी केले. मौज व सत्यकथा या मासिकांचे ते काही काळ संपदक होते. ‘नवसाहित्य या शब्दाचे ते जनक. जसे नवकविता, नवकथा इ.. कन्यादान, लाखाची  गोष्ट, (ग.दी.मांसहित), शापित इ. गाजलेल्या चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या होत्या. त्यांची कथा असलेल्या ‘शापित’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.त्यांनी लिहीलेल्या पटकथांचे हिन्दी चित्रपटही गाजले. कच्चे धागे, कला पानी, मेरा गाँव मेरा देश इ. चित्रपटांच्या कथा त्यांच्या होत्या. त्यांना सह्याद्री वाहिनी आणि झी मराठीचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार मिळाला होता.

☆☆☆☆☆

वा.रा.कांत ( वामन रामराव कांत ) या कविवर्याँचा जन्म ६ऑक्टोबर १९१३चा ‘विहंगमाला’ या नियतकालिकाचे ते संपदक होते. निजाम सरकारच्या हैद्राबाद आणि औरंगाबाद या आकाशवाणी केंद्रावर ते मराठी विभाग प्रमुख म्हणून काम करत होते. मुंबई आकाशवाणी केंद्रावरून ते निवृत्त झाले. त्यांनी कविता, समीक्षा, अनुवाद या क्षेत्रात लेखन केले. त्यांचे दोनुली, पहाटतारा, रुद्रवीणा इ. १० कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. या तरुतळी विसरले गीत, सखी शेजारिणी तू हसत रहा, बगळ्यांची माळ फुले इ. त्यांची गाणी लोकप्रिय झाली. वेलांटी (कविता संग्रह ),  दोनुली (कविता संग्रह) मरणगंध (नाट्यकाव्य) या संग्रहांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

☆☆☆☆☆

निरंजन उजगरे या कवीचा जन्मही ६ ऑक्टोबर(१९४९)चा. तेही लेखक, कवी आणि अनुवादक होते. ते बहुभाषिक असून मराठी, हिंदी, इंग्लीश, तेलुगू, सिंधी , रशियन इ. भाषा त्यांना येत होत्या. काव्यपर्व, जायंट व्हील, म्हराष्ट्राबाहेरील मराठी, फळणीच्या कविता, दिनार  प्रहार इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांना सोव्हिएत लँडचा नेहरू पुरस्कार व ना.वा.टिळक पुरस्कार मिळाले होते. मालवण इथे १९९६साली  झालेल्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे १९९९ साली डोंबिवलीयेथील कवि रसिक मंडळाच्या साहित्य समेलनाचे ते अध्यक्ष होते.

श्रीमती उज्ज्वला केळकर

(ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ करता)   

संदर्भ : कर्‍हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी / गुगल गुरुजी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print