ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १६ जुलै – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १६ जुलै – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

वासू बेंद्रे

वासुदेव सीताराम बेंद्रे (13 फेब्रुवारी 1894 – 16 जुलै 1986) हे थोर इतिहाससंशोधक होते.

त्याकाळी 16 वर्षांचे झाल्याशिवाय मॅट्रिकची परीक्षा देता येत नसे. बेंद्रेंचा अभ्यास तर 14 व्या वर्षीच पूर्ण झाला होता. ती दोन वर्षे त्यांनी रेल्वे ऑडिटमध्ये विनावेतन काम केले. तीन महिन्यांतच ते शॉर्टहँड व स्टेनोग्राफीत प्रवीण झाले. त्याबद्दल त्यांना सुवर्णपदक मिळाले. त्यांची कामाची तडफ, निष्ठा,निर्णयक्षमता बघून त्यांच्या वरिष्ठानी त्यांना दुसऱ्या लेव्हलचे गॅझेटेड ऑफिसर होण्याचा सल्ला दिला. एज्युकेशन डायरेक्टर जे. जी. कॉन्व्हर्टन यांनी त्यांची क्षमता बघून त्यांना मराठ्यांच्या इतिहासाचं संशोधन करण्यासाठी प्रवृत्त केलं.

त्यांनी पुण्याच्या इतिहास संशोधक मंडळ येथे संशोधन करून लिहिलेला ‘साधन-चिकित्सा’ हा त्यांचा पहिला ग्रंथ होता. हा ग्रंथ तेव्हाच्या इतिहासाकारांनी तर वाखाणलाच, शिवाय त्या क्षेत्रात संशोधन करणाऱ्यांनाही तो मार्गदर्शक ठरला.

बेंद्रे शिष्यवृत्ती मिळवून इंग्लंड व युरोपला गेले. तेथे त्यांनी अनेक ऐतिहासिक दस्तावेजांचा कसून अभ्यास केला. पुरावा असल्याशिवाय ते कोणतीही गोष्ट खरी मानत नसत.
त्यापूर्वी शिवाजी महाराजांचं म्हटलं जाणारं चित्र हे दुसऱ्याच व्यक्तीचं होतं.संभाजी महाराजांवर संशोधन करत असताना बेंद्रेनी प्रयत्नपूर्वक शिवाजी महाराजांचं चित्र शोधून काढून ते लोकांसमोर आणलं. तेच चित्र आपल्याला खरे शिवाजी महाराज कसे दिसत, ते दाखवतं.

बेंद्रेनी शिवाजी महाराजांवर दोन खंड लिहिले.

इंग्लंडमधील दस्तावेजांचा अभ्यास करून बेंद्रेनी संभाजी महाराजांचे चरित्र लिहिले. त्यामुळे तोपर्यंत संभाजी महाराजांची असणारी मलीन प्रतिमा खोटी ठरून लोकांसमोर त्यांची उमदे, शूर, विद्वान,प्रतिभाशाली साहित्यिक ही ओळख निर्माण झाली.

बेंद्रेनी संभाजी महाराजांची समाधी शोधून काढून तिचा जीर्णोद्धारही केला.

पेशवे दफ्तराचे डायरेक्टर ऑफ रिसर्च या पदावर काम करताना त्यांनी मोडीत लिहिलेली 4कोटी ऐतिहासिक कागदपत्रे तपासून त्यांची विषयवार व कालानुक्रमे सूची बनवली. सूची बनवण्याच्या पद्धतीवर त्यांनी पुस्तकेही लिहिली. ती अजूनही वापरली जातात.

यानंतर त्यांनी तंजावर दफ्तराचीही सूची तयार केली.

बेंद्रे मुंबई इतिहास मंडळाचे डायरेक्टर व महाराष्ट्र ऐतिहासिक परिषदेचे सी.ई.ओ.होते. या काळात त्यांनी 3 परिषदा भरवल्या,19 त्रेमासिक जर्नलं व 14पुस्तकांचे प्रकाशन केले.

बेंद्रेनी ऐतिहासिक संशोधन व लेखन कसं करावं याविषयी प्राध्यापकांना प्रशिक्षण दिलं.

बेंद्रेनी अनेक विद्यापीठात मराठ्यांच्या इतिहासावर परिषदा घेतल्या.

इंडियन हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स कमिशन व ऑल इंडिया हिस्टरी काँग्रेसचे ते सल्लागार होते.

इतिहासात हुंडापद्धत अस्तित्वात नव्हती, हे लोकांना पटवून हुंडाविरोधी चळवळीत त्यांनी सक्रिय योगदान दिले. ब्रदरहूड स्काऊट चळवळ व विद्यार्थी संघटनेतही त्यांचा सहभाग होता.

त्यांनी मराठी व इंग्रजीत 60हून अधिक पुस्तके लिहिली. त्यापैकी संत तुकारामांवर 8-9 पुस्तके होती.

मालोजी- शहाजी, संभाजी, शिवाजी, राजाराम यांच्या चरित्रांसाठी त्यांना पुरस्कार मिळाले.

☆☆☆☆☆

नीला सत्यनारायण

नीला सत्यनारायण (5 फेब्रुवारी 1948 – 16 जुलै 2020)या लेखिका व मुलकी अधिकारी होत्या. त्या महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त होत्या.

त्या पूर्वाश्रमीच्या नीला वासुदेव मांडके.

त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या गृहखाते, वनविभाग, समाजकल्याण अशा वेगवेगळ्या खात्यांत काम केले. त्या डायरेक्टर जनरल ऑफ इन्फॉरमेशन अँड पब्लिक रिलेशन्स होत्या.1995-99 या काळात त्या प्रिन्सिपल सेक्रेटरी होत्या.

ऍडिशनल चीफ सेक्रेटरी (रेव्हिन्यू) या पदावरून त्या निवृत्त झाल्या.

निवृत्तीनंतर त्यांची नियुक्ती राज्य निवडणूक आयुक्त या पदावर झाली.

निवृत्तीनंतर त्या एम. आय. टी. सिव्हिल सर्व्हिसेस ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये शासकीय व्यवस्थेवर व्याख्याने देत असत.

त्यांनी मुख्यत्वे मराठीत लिहिले. त्यात 7 कादंबऱ्या, 10 कवितासंग्रह व 2 आत्मचरित्रात्मक पुस्तके वगैरेंचा समावेश होतो.

‘एक पूर्ण अपूर्ण’ यात आपलं करिअर सांभाळून त्यांनी आपल्या डाउन सिंड्रोम असलेल्या मुलाला कसे वाढवले, याचं अनुभवकथन आहे.

‘जाळरेषा’त त्यांच्या करिअरमधील चार दशकांतील अनुभव वाचायला मिळतात. याच्या विक्रीतून मिळालेले उत्पन्न त्यांनी नाना पाटेकरांच्या, शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या एन.जी.ओ.ला दिले.

याव्यतिरिक्त त्यांनी ‘पुनर्भेट’, ‘सत्यकथा’, ‘एक दिवस जीवनातला’, ‘पालकांच्या मार्गदर्शनासाठी केसस्टडी’ वगैरे अनेक पुस्तके लिहिली.

नियतकालिकांत प्रकाशित झालेल्या त्यांच्या लेखांचे ‘आयुष्य जगताना’ व ‘डेल्टा 15’ हे संग्रह प्रसिद्ध झाले आहेत.

त्यांनी अनुवादही केला आहे.

त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘बाबांची शाळा’ या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन त्यांनीच केले होते.

16 जुलै 2020ला करोनामुळे त्यांचे निधन झाले .

आज वासू बेंद्रे व नीला सत्यनारायण यांचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त त्यांना सादर अभिवादन.🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १५ जुलै – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ १५ जुलै -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

गजानन विश्वनाथ केतकर  ( १० ऑगस्ट १८९८ – १५ जुलै १९८०)

ग.वि. केतकर हे सावरकरवादी, विज्ञाननिष्ठ मराठी पत्रकार होते. लो. टिळकांचे हे नातजावई. लो. टिळकांची मुलगी त्यांची आई.त्यांचे बालपण आणि तरुणपणीची काही वर्षे टिळकांच्या देखरेखीखाली गेली. कायद्याची परीक्षा देऊन ते केसरीत दाखल झाले. १९४७ ते १९५० ते केसरीचे संपादक होते. पुढे त्यांनी पराधर्मीय मुलीशी प्रेमविवाह केला. त्यामुळे त्यांना ‘केसरी’ सोडावा लागला.

२० जानेवारी १९५७ पासून तरुण भारत पुणे आवृत्तीचे ते संपादक झाले. १९६४ पर्यन्त ते तरुण भारतचे संपादक होते.

केतकरांनी अनेक वृत्तपत्रातून भगवद्गीतेविषयक लेखन करून गीताधर्म मंडळाच्या स्वीकृत कार्याचा उदंड प्रचार केला. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी हा दिवस गीताजयंती म्हणून साजरा व्हावा, यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. आता हे सर्वमान्य झाले आहे.

ग.वि. केतकरांचे लेखन –

१. ख्रिस्ती ड्रामा, २. गीताबीज, ३. गीतार्थ चर्चा , ४. मर्मभेद , ५. रणझुंजार (डॉ. खानखोजे यांचे चरित्र), ६. लोकमान्यांची भाषाशैली, ७.हिंदुत्वाची राष्ट्रीय मीमांसा ,

विश्वकोशासाठी लेखन –  जैन, ज्यू, चीन व जपान येथील अंत्यविधी व अंत्यसंस्कार

ग.वि. केतकरांविषयीची पुस्तके

१. पत्रकार महर्षी ग.वि. केतकर- संपादन, संकलन – अरविंद केतकर

२. . पत्रकार महर्षी ग.वि. केतकर- वीणा हरदास

☆ ☆ ☆ ☆ ☆

जयवंत दत्तात्रेय जोगळेकर – (७ऑक्टोबर१९२१ – १५ जुलै २०१६ )

ज.द. जोगळेकर हिंदुत्वाचे खंदे पुरस्कर्ते व भाष्यकार होते. ‘एका हिंदुत्वनिष्ठाची आत्मकथा हे त्यांचे पुस्तक वयाच्या ९२व्या वर्षी प्रकाशित झाले.

ज.द. जोगळेकर सावरकप्रेमी पत्रकार होते. ते कायद्याचे पदवीधर होते. ते मूळचे बडोद्याचे पण पुढे त्यांनी मुंबई आपलीशी केली.

द बॉंम्बे क्रॉंनिकल या वृत्तपत्राचे उपसंपादक होते.

ज. द. जोगळेकर यांची काही प्रकाशित पुस्तके –

१.अफगाणिस्तानात तालिबानचा पराभव, २. अमेरिकन क्रांती, ३. इंग्रजी दृष्टीकोणातून १८५७ चा प्रस्फोट, ४ . चिनी राज्यक्रांती, ५. जगाटेल इस्लामी समाजाची हालचाल,     ६. दोन युद्धे, ७. निधर्मी राष्ट्रवादाचे शिल्पकार, ८. भारतातील युद्धशास्त्राची उपेक्षा,      ९. रशियन राज्यक्रांती, १०. समीक्षा संचित  (निवडक ६३ ग्रंथ परीक्षणांचा संग्रह) इये. अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांची बहुतेक पुस्तके राजकारण क्षेत्राशी संबंधित आहेत.

त्यांना सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीने पुरस्कार दिला होता.

☆ ☆ ☆ ☆ ☆

प्रकाश नारायण संत (१६ जून १९३७ – १५ जुलै २००३ ) 

प्रकाश संत हे मराठीतील नामांकित कथाकार. त्यांनी ‘लंपन या लहान मुलाला केंद्रस्थानी ठेवून लिहीलेल्या अर्ध आत्मचरित्रात्मक कथा मराठी कथाविश्वात विशेष गाजल्या. सुप्रसिद्धा ललित लेखक नारायण संत आणि सुप्रसिद्ध कवयत्री इंदिरा संत यांचे ते चिरंजीव. त्यांच्या बहुतेक सगळ्या पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत.

भूरचनाशास्त्रात त्यांनी एम.एस. सी., पीएच.डी. केली. नंतर कर्हाड येथे ‘यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्समध्ये १९६१ साली सहयोगी प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तिथून ते ९७ साली निवृत्त झाले.१५ जुलै २००३ला त्यांचं अपघाती निधन झाले.

१७व्या वर्षापासून त्यांनी ललित लेखनास सुरुवात केली. २० व्या वर्षापासून ते कथा लिहू आगळे. ‘सत्यकथे’सारख्या दर्जेदार मासिकातून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचा ‘झुंबर’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. ते उत्तम चित्रकारही होते. पाहिया ३ पुस्तकांसाठी त्यांनी त्यांनी स्वत: रेखाटने केली आहेत.   

प्रकाश संत यांचे प्रकाशित साहित्य व पुरस्कार –

१. चांदण्याचा रास्ता ( ललित लेख )

२. झुंबर (कथा)

३. पंखा ( कथा)  इचलकरंजी संमेलन स्मृती ट्रस्ट पुरस्कार

४. वनवास – श्री. दा. पानवलकर पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, ग्रंथोत्तेजक पुरस्कार- इचलकरंजी, महाराष्ट्र  फाउंडेशन –मुंबई

५. शारदा संगीत – महाराष्ट्र राज्य पुरस्कार

६. शारदा संगीत या कथेस नवी दिल्ली येथील कथा पुरस्कार तर आडाम या कथेस शांताराम पुरस्कार

७. सुप्रिया दीक्षित या प्रकाश संत यांच्या पत्नी. ‘अमलताश’ या पुस्तकात त्यांनी पतीच्या सहवासातील ६० वर्षांच्या काळाचा लेखा-जोखा मांडलेला आहे. या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृतिक मंडळाचा आत्मचरित्रासाठी दिला जाणारा ‘लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार २०१४ साली मिळाला.

☆ ☆ ☆ ☆ ☆

वसुंधरा पेंडसे नाईक (२७ जून १९४६ – १५ जुलै २०१६ )

वसुंधरा पेंडसे नाईक या मराठी लेखिका व पत्रकार होत्या. सुप्रसिद्ध पत्रकार आप्पा पेंडसे हे त्यांचे वडील. भारतीय क्रिकेट संघातले आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळणारे सुधीर नाईक हे त्यांचे पती.

वसुंधरा पेंडसे नाईक यांना शालांत परीक्षेत जगन्नाथ शंकर शेठ शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यांनी मराठी, संस्कृत दोन्ही विषयात एम. ए. ची पदवी घेतली. १९६८मध्ये विल्सन  कॉलेजात त्या प्राध्यापिका होत्या. नंतर त्या ‘लोकसत्ता’मध्ये उपसंपादक म्हणून रुजू झाल्या. त्यांची साहित्याची आवड आणि कामाचा वकूब बघून १९८० मध्ये ‘लोकप्रभा’ साप्ताहिकाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. काही काळातच ‘लोकप्रभा’ साप्ताहिक मराठी परिवारात लोकप्रिय बनले. ‘लोकप्रभेतील त्यांचे सादर ‘शेवटचे पान’हे त्यांचे ‘लोकप्रभे’तील संपादकीय आवर्जून वाचले जायचे. विविध घटनांवर आधारलेले ‘लोकप्रभेचे विशेषांकही त्याकाळी खूप गाजले. त्यांनी काही काळ महाराष्ट्र टाईम्समध्ये ‘सगुण-निर्गुण’ या लोकप्रिय स्तंभासाठी लेखन केले. ‘दै. नवशक्तीच्या पुरवणीच्या संयोजनाची जबाबदारीही काही काळ त्यांनी स्वीकारली होती. १९९१मधे त्या नवशक्तीच्या संपादिका झाल्या. एखाद्या मराठी दैनिकाची संपादिका होणार्यान त्या पाहिल्याच मराठी पत्रकार होत्या. १९९४ ते १९९६ काळात त्यांनी ‘लोकसत्ता’मधे ‘कुटुंबकथा हे सर्वसाधारण कुटुंबात नेहमी उद्भवणार्यात समस्यांवर चर्चा करणारे त्यांचे सदरही वाचकप्रिय झाले.

मुंबई दूरदर्शनवरील संस्कृत भाषेचे सौंदर्य उलगडून दाखवणारा त्यांचा ‘अमृत मंथन’ हा कार्यक्रमही विशेष लोकप्रिय होता. इ. स. १९७९ते १९९२ असा १३ वर्षे चालू होता. या कार्यक्रमात महाकवी, नाट्य याबरोबरच इंजिनियरिंग, अर्थशास्त्र, विज्ञान या विषयांवरचाही अभ्यासपूर्ण आढावा त्यांनी घेतला होता.

वसुंधरा पेंडसे नाईक यांनी भूषविलेली पदे, पुरस्कार, सन्मान 

१.    अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष

२.    मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष

३.    महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेच्या आणि मराठी भाषा अभ्यास केंद्राच्या संचालक

४.    भारत निर्माण या संस्थेच्या ९९ सालच्या टॅलेंटेड लेडीज अवॉर्डच्या मानकरी

५.    कोकण मराठी साहित्य परिषदेच्या चेंबूर येथे झालेल्या ५ जून २०१०च्या मुंबई जिल्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष

वसुंधरा पेंडसे नाईक यांची पुस्तके –

१.    कुटुंब कथा – भाग १ व२

२.    कौटिल्य आर्थशास्त्र परिचय

३.    मूल्याधार  (मूल्यशिक्षणावरील लेख ) 

☆ ☆ ☆ ☆ ☆

माधवी देसाई – (२१ जुलै  १९३३ – १५ जुलै २०१३)

मराठीतील सुप्रसिद्ध लेखिका माधवी देसाई या भालजी पेंढारकर आणि लीलाताई यांच्या कन्या व सुप्रसिद्ध साहित्यिक रणजीत देसाई यांच्या पत्नी होत्या. आपल्या पतीबरोबरच्या नातेसंबंधांवर आधारलेले त्यांचे आत्माचरित्र ‘नाच ग घुमा’ खूप गाजले. याच्या मराठीत अनेक आवृत्या निघाल्या. याचे हिन्दी आणि कन्नडमध्ये अनुवाद झाले.

‘घे भरारी’ या त्यांच्या कादंबरीवर चित्रपट निघाला. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद लेखन त्यांचेच होते. त्यांच्या १५ कादंबर्याघ, एक आत्मचरित्र, काही कथासंग्रह, व्यक्तिचित्रे,  आणि अनुवाद मिळून ३५ पुस्तके आहेत.

माधवी देसाई यांची निवडक पुस्तके –

१. कथा एका राजाची – कादंबरी, २. कस्तुरी गंध –  कादंबरी, ३. किनारा – कथा ४. कांचनगंगा – कथा, ५. नर्मदेच्या तीरावर – व्यक्तिचित्र, ६.. विश्वरंग – चित्रकार विश्वनाथ नागेशकर यांचे व्यक्तिचित्रण ७. अंजनीबाई मालपेकर – चरित्र, ८. अमृता प्रीतम यांच्या हिन्दी पुस्तकाचा अनुवाद, ९. फिरत्या चाकावरती – हावठण या कोकणी कादंबरीचा अनुवाद १०. महाबळेश्वर शैल यांच्या कोकणी पुस्तकांचे अनुवाद   

माधवी देसाई यांना मिळालेले पुरस्कार

सोलापूरयेथील भैरू दामाणी पुरस्कार

सीमावर्ती भागातील ( बेळगाव, कारवार, गोवा ) साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार

बेळगावजवळ कडोली येथे प्रा. तुकाराम पाटील  यांच्या सहकार्याने माधवी देसाई यांनी साहित्य संमेलन सुरू केले. त्यानंतर सीमा भागात साहित्य संमेलने सुरू झाली.

आज ग. वि. केतकर, जयवंत द. जोगळेकर , प्रकाश संत, वसुंधरा पेंडसे नाईक , माधवी देसाई यांचा स्मृतीदिन. त्यानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १४ जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १४ जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

मराठी लेखक आणि चरित्रकार श्री नारायण कृष्ण गद्रे यांचा आज स्मृतिदिन. ( ७/३/१८७० – १४/७/१९३३ ) 

श्री गद्रे यांचे प्राथमिक शिक्षण त्या काळाच्या परंपरेनुसार पंतोजींच्या शाळेत झाले. १८८१ सालापासून त्यांच्या इंग्रजी शिक्षणास प्रारंभ झाला. काही वर्षे पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असतांना त्यांना लोकमान्य टिळक आणि मा. आगरकर हे दोघेही शिक्षक म्हणून लाभले होते . नंतर सन १८९० ते १९२३ एवढा प्रदीर्घ काळ त्यांनी मुंबईमध्ये हवामान खात्यात नोकरी केली. 

लो. टिळकांच्या प्रेरणेने सुरु झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात तेव्हा विविध मेळे भरत असत. गद्रे यांनीही १८९५ साली एक मेळा सुरु केला, आणि १९१४ सालापर्यंत तो चालवला. त्यासाठी त्यांनी राष्ट्रभक्तीपर आणि इतर विविध विषयांवर गीते लिहायला सुरुवात केली. इथूनच साहित्यक्षेत्रातली त्यांची वाटचाल सुरु झाली असे म्हणता येते. 

पुढे त्यांनी नाटक, कविता, कादंबरी, चरित्र-लेखन, इतिहास-लेखन, अशा विविध साहित्यप्रकारात लेखन केले. काही लेखन त्यांनी ‘दिनकर‘ या त्यांच्या जन्मनावाने, तसेच  ‘कृष्णात्मज दिनकर‘ या नावानेही केलेले आहे. 

‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय‘ या संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक महत्वाचे सदस्य – ही त्यांची आणखी एक विशेष ओळख. १९२३ सालापर्यंत या संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाचेही ते सभासद होते. स्वतःकडची अनेक पुस्तके त्यांनी या संग्रहालयाला देणगी म्हणून दिली होती. 

१९०१ सालापासून पुण्यात प्रकाशित होणाऱ्या ‘सरस्वतीमंदिर‘ या नियतकालिकाच्या प्रकाशनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. ‘महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग‘ हा त्यांचा तेव्हा गाजलेला लेख याच नियतकालिकात प्रकाशित झाला होता. 

त्यांचे इतर साहित्य पुढीलप्रमाणे —

१) कादंबरी — ‘प्याद्याचा फर्जी‘ – अर्थात ‘भोसले घराण्याचा अभ्युदय‘. हिंदुवा सूरज ‘— बाप्पा रावळ चक्रवर्ती. ‘मनूच फिरला ‘ ( कृष्ण तनय ) 

२) कविता — श्रीमत प्रतापसिंह  : पहिला खंड 

३) नाटक — अक्षविपाक अथवा संगीत द्युतविनोद. हे नाटक आणि ‘ महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग ‘ हा प्रदीर्घ लेख पुढे १९७१ साली महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाने मुंबई येथे प्रकाशित केला आहे.  

४) चरित्रे — कै. प्रो. श्री. ग. जिनसीवाले यांचे चरित्र, कै. पं. विष्णुपंत छत्रे यांचे चरित्र. 

५) संपादन — कवीश्वर भास्करकृत शिशुपाल- वध कथा. 

श्री. नारायण कृष्ण गद्रे यांना त्यांच्या आजच्या स्मृतिदिनी मनःपूर्वक श्रद्धांजली. 🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १३ जुलै – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ १३ जुलै – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

कै. इंदिरा संत (इंदिरा दीक्षित)

इंदिरा संत

“अजंठ्याच्या कलाकाराची विसरून राहिलेली एक पुसट रेषा माझ्या रक्तातून वाहते आहे”

स्वतःच्या काव्य निर्मितीविषयी असे मत व्यक्त करणा-या आणि कवितेला आपल्या लेखनाचा आणि जगण्याचा गाभा मानणा-या ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांचा आज स्मृतीदिन.

महाविद्यालयीन जीवनापासून कविता लेखन करणा-या इंदिरा संत यांच्या कविता ज्योत्स्ना, साहित्य, सत्यकथा अशा मासिकांतून प्रसिद्ध होत होत्या. त्यांनी बी.ए., बी.टी., बी.एड्. शिक्षण पूर्ण करून अध्यापनाचे काम केले. कवी व निबंधकार ना. मा. संत यांच्याशी त्यांचा  विवाह झाला. 1 941 साली त्या उभयतांचा ‘सहवास’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. 1946 मध्ये त्यांच्या पतींचे निधन झाले. पुढील सर्व आयुष्य सांसारिक जबाबदा-या व पतिविरहाच्या दुःखात व्यतीत झाल्यामुळे त्याचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यात दिसून येते. त्यांची कविता त्यामुळेच आत्ममग्नतेतून सार्वत्रिक सुखदुःख व्यक्त करणारी वाटते. निसर्गाच्या माध्यमातून मानवी भावना व्यक्त करणारी त्यांची कविता निसर्गा इतकीच चिरतरूण वाटते. स्वानुभवातून साधलेला शब्दसंवाद एक वेगळाच सौंदर्यानुभव देऊन जातो. त्यांचे गद्य लेखनही नितळ काव्यात्मक अनुभूती देणारे आहे.

इंदिरा संत यांची साहित्यसंपदा:

कविता- शेला, वंशकुसुम, रंगबावरी, मेंदी, मृगजळ, मरवा, निराकार, गर्भरेशमी, बाहुल्या, चित्कळा

ललित लेख – मृद्गंध, फुलवेल, मालनगाथा

कादंबरी – घुंघुरवाळा

कथा – शामली, कदली, चैतू

बालसाहित्य – गवतफुला, अंगत पंगत, मामाचा बंगला.

पुरस्कार:

‘गर्भरेशमी’ या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार व अनंत काणेकर पुरस्कार.

घुंघुरवाळा’ ला साहित्य कला अकादमी पुरस्कार.

शेला, रंगबावरी व मृगजळ या काव्यसंग्रहाना महाराष्ट्र शासन पुरस्कार.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार.

“मातीतून मी आले वरती

मातीचे मम अधुरे जीवन”

असे म्हणणा-या या कवयित्रीचे वयाच्या 86व्या वर्षी 13 जुलै2000 रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! 🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :विकिपीडिया, कोलाज इन.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ११ जुलै – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ ११ जुलै -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

मंगेश तेंडुलकर

मंगेश तेंडुलकर हे मराठी हास्य-व्यंग चित्रकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी काही विनोदी पुस्तकेही लिहिली. त्यांच्या व्यंगचित्रांची अनेक प्रदर्शने झाली. ते उत्तम व्याख्यातेही होते. प्रसिद्ध नाटककार आणि लेखक विजय तेंडुलकरांचे ते धाकटे बंधू. वडलांचे पुस्तकांचे दुकान असल्याने लहानपणापासून त्यांना वाचनाची आवड होती. लेखन  आणि व्यंगचित्रे दोन्ही डगरींवर त्यांनी सफलतापूर्वक पाय रोवले.वयाच्या ६०व्या वर्षी त्यांनी कॅरीकेचार हा प्रकार हाताळला.

मंगेश तेंडुलकर यांची पुस्तके

 १.भुईचक्र, २.रंगरेषा व्यंगरेषा, ३. संडे मूड,

संडे मूडमध्ये ५३ लेख आहेत आणि तेवढीच व्यंगचित्रे आहेत.

नियतकालिकातून प्रसिद्ध झालेले काही सुप्रसिद्ध लेख –

अतिक्रमण, कुणी पानपतो अजून काळोख , चौकटीतल्या आत्म्याला, व्यंगचित्रांची भाषा, व्यंगचित्रातून संवाद साधताना, इ. 

पुरस्कार – संडे मूड या पुस्तकाला वि. मा. दी. पटवर्धन पुरस्कार   , महाराष्ट्र साहित्य परिषदेचा चिं. वि. जोशी पुरस्कार. 

☆ ☆ ☆ ☆ ☆

शांताराम नांदगावकर  (१९ ऑक्टोबर १९३६ – ११ जुलै २००९)

अनेक उत्तम चित्रपट गीते, भावगीते लिहिणारे कवी म्हणून शांताराम नांदगावकर यांची ओळख मराठी रसिकांना आहे. ते कोकणातील कणकवलीजवळच्या नांदगावचे. पुढे मुंबईत परळ येथील शिरोडे हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. १९८५ साली महाराष्ट्र विधान परिषदेवर ते निवडून आले.

कारकीर्द –

अशी ही बनवाबनवी, अष्टविनायक, गंमत जमंत, तू सुखकरता, धुमधडाका, नवरी मिळे नवर्या ला, पैजेचा विडा इ. चित्रपटांसाठी त्यांनी गीते लिहिली.

शांताराम नांदगावकर  यांची गाजलेली गीते –

१.    अनुरागाचे थेंब झेलती प्रीत लतेची पाने

२.    अश्विनी ये ना

३.    अष्टविनायका तुझा महिमा कसा

४.    असाच यावा पहाटवारा

५.    कुठं कुठं जायाचं हनिमूनला

६.      तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला

७.      दाटून कंठ येतो

८.      धुंदीत गांधीत होउनी सजणा

९.      दोन बोक्यांनी आणला हो आणला चोरून लोण्याचा गोळा

१०.      हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा 

इ. अनेक लोकप्रिय गाणी त्यांनी लिहिली. १९८७ सालली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर ‘दलितांचा राजा ‘ या आल्बमसाठी त्यांनी अप्रतिम गाणी लिहिली.

☆ ☆ ☆ ☆ ☆

सुहास शिरवळकर (१५ नोहेंबर १९४८ – ११ जुलै २००३ )

सुहास शिरवळकर हे सुप्रसिद्ध रहस्यकथा लेखक आणि कादंबरीकार. १९७४ साली त्यांनी आपल्या कथालेखनास सुरुवात केली. १९७९ पर्यन्त त्यांच्या छोट्या- मोठ्या २५०  लिहून झाल्या. १९८० पासून त्यांनी सामाजिक कादंबर्यास लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी काही लघुकथाही इहिल्या. त्यांचेही संग्रह झाले. त्यांनी बालकथादेखील लिहिल्या.

त्यांच्या देवकी या कादंबरीवर मराठी चित्रपट झाला, तर ’दुनियादारी’ आणि ‘कोवळीक’ दूरचित्रवाणी मालिका तयार झाल्या. त्यांची बरीचशी पुस्तके दिलीपराज प्रकाशनाने प्रकाशित केली. 

सुहास शिरवळकर यांची काही पुस्तके –

१.    वेशीपालीकडे, २. ऑब्जेक्शन युयर ऑनर, ३. वंडर ट्वेल्व्ह, ४. शब्दवेध ५. इंसनियत, ६. सालं, ७. सॉरी सर ८. जाई, ९. हॅलो… हॅलो’, १० जस्ट हॅपनिंग

एके काळी त्यांच्या रहस्यकथांवर तरुणाई अतिशय खूश असायची.

मंगेश तेंडुलकर, शांताराम नांदगावकर, सुहास शिरवळकर या तिघाही प्रतिभावंतांचा आज स्मृतीदिन. त्यानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १० जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १० जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

साम्यवादी विचारसरणीचे मराठी लेखक, समीक्षक, आणि पत्रकार श्री. प्रभाकर ऊर्ध्वरेषे यांचा आज स्मृतिदिन. 

(९/१/१९१८ – १०/७/१९८९)

मार्क्सवादी विचारवंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. ऊर्ध्वरेषे यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सुरुवातीपासूनची जडणघडण आणि स्थित्यंतरे जवळून अनुभवलेली होती. त्याच अनुषंगाने “ नवे जग “ या साम्यवादाला वाहिलेल्या नियतकालिकाच्या, तसेच “ युगवाणी “ या त्रैमासिकाच्या संपादकपदाची धुराही त्यांनी सांभाळली होती. 

नोकरीच्या शोधात ते ब्रह्मदेशला गेलेले असतांना, म्हणजे १९३९ साली दुसरे महायुद्ध सुरु झाले. आणि चारशे मैलांचा पायी प्रवास करत त्यांना भारतात परत यावे लागले. त्यानंतर नागपूर विद्यापीठात इंग्रजीचे रीडर म्हणून त्यांनी काम सुरु केले. 

पण मराठीवरही त्यांचे चांगलेच प्रभुत्व होते. त्यांनी धर्म आणि राजकारण या विषयांचाही सखोल अभ्यास केला होता. “ प्रतिभा “ आणि “ किर्लोस्कर “ या मासिकांमध्ये लिहिलेल्या लेखांपासून “ लेखक “ म्हणून ते ओळखले जाऊ लागले. “ आम्ही हिंदू आहोत का ?” हा १९४२ साली किर्लोस्कर मासिकात प्रकाशित झालेला त्यांचा पहिला लेख.

“ प्राध्यापकांनो, शिक्षक व्हा “ हाही त्यांचा त्याकाळी गाजलेला एक लेख. 

त्यांचे प्रकाशित साहित्य असे आहे —-

१. “ आई “ — मॅक्झिम गॉर्की यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद . 

२. “ बियॉन्ड दि लास्ट ब्लू माऊंटन “ — रुसी लाला यांच्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद. 

३. “ शृंखलाबद्ध प्रॉमिथ्युस “ – ग्रीक नाट्यकृतीचे भाषांतर . 

४. “ सफलतेमधील आनंद “ — जे.आर.डी. टाटा यांच्यावर रुसी लाला यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद. 

५. “ हरवलेले दिवस “ – हे अगदी वाचनीय असे आत्मचरित्र. यामध्ये कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते म्हणून  अनुभवलेल्या कम्युनिस्ट पक्षाचे सविस्तर चित्रण श्री. ऊर्ध्वरेषे यांनी केलेले आहे.  या पुस्तकाला १९८९ सालचा “ साहित्य अकादमी पुरस्कार “ दिला गेला होता. 

६. याव्यतिरिक्त त्यांनी चिनी आणि रशियन भाषेतील अनेक पुस्तकांचे , तसेच माओ , स्टॅलिन , पुश्किन यांच्या ग्रंथांचे अनुवाद केलेले आहेत. 

एक सुस्वभावी , उत्साही , आणि इंग्रजीचे विद्यार्थीप्रिय निष्णात प्राध्यापक अशी ज्यांची ओळख सांगितली जात असे , त्या श्री. प्रभाकर ऊर्ध्वरेषे यांच्या स्मृतीस विनम्र प्रणाम.🙏

☆☆☆☆☆

इतिहास-संशोधक आणि मराठी – कोंकणी लेखक म्हणून सुपरिचित असणारे श्री. पांडुरंग सखाराम शेणवी-पिसुर्लेकर यांचाही आज स्मृतिदिन. (३०/५/१८९४ – १०/७/१९६९ )

श्री. पिसुर्लेकर हे सुरुवातीला एका पोर्तुगीज शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असत. पुढे इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी इतिहास-संशोधन क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. त्यासाठी तेव्हाच्या पोर्तुगीज सरकारच्या दफ्तर-खात्यात ते विनावेतन काम करू लागले. तिथे पोर्तुगीज, डच, फारसी, कन्नड, तमीळ, बंगाली, मराठी, अशा अनेक भाषांमधल्या विस्कळीत पडलेल्या अनेक कागदपत्रांची योग्य मांडणी करता यावी यासाठी , कोंकणी, मराठी बरोबरच पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्लिश, संस्कृत, अशा अनेक भाषा त्यांनी आवर्जून शिकून घेतल्या ही गोष्ट विशेषत्वाने लक्षात घ्यावी अशीच. त्यांच्या नियोजनबद्ध कामाची दखल घेत १९३० साली त्यांची त्याच खात्याचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली, आणि तेव्हा कुठे त्यांना वेतन द्यायला सुरुवात झाली. आणखी संशोधनासाठी पोर्तुगीज सरकारने त्यांना लिस्बन आणि पॅरिस इथे पाठवले. 

त्यांचे सर्व संशोधन त्यांनी लिहिलेले अनेक शोधनिबंध आणि पुस्तके याद्वारे प्रकाशित झाले होते , आणि यामध्ये इतर भाषांमधीलही अनेक पुस्तकांचा समावेश होता. 

यापैकी, मराठा साम्राज्य व भारतातील पोर्तुगीज वसाहतींच्या परस्पर संबंधांवर लिहिलेला “ पोर्तुगीज – मराठे संबंध – अर्थात पोर्तुगीजांच्या दफ्तरातील मराठ्यांचा इतिहास“ हा अतिशय महत्वाचा ऐतिहासिक ग्रंथ मानला जातो. त्यांच्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या इतर भाषांमधील अनेक ग्रंथांपैकी, “अ आंतिगिदादि दु कृष्णाइज्मु “ या ग्रंथाद्वारे ‘कृष्ण संप्रदाय इसवीसनापूर्वीपासून अस्तित्वात होता ‘ हे सिद्ध करण्याचा श्री. पिसुर्लेकर यांनी प्रयत्न केला होता. 

त्यांचे हे इतके सगळे काम त्यावेळी खूपच दखलपात्र ठरले होते. आणि त्यामुळेच त्यांना पुढीलप्रमाणे गौरविण्यात आले होते —

१. इतिहास संशोधनाबद्दल लिस्बन विद्यापीठातर्फे ‘ डी. लिट. ‘ पदवी देऊन गौरव. 

२. बंगालच्या रॉयल एशियाटिक सोसायटीकडून ‘ जदुनाथ सरकार ‘ सुवर्णपदक . 

३. मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीतर्फे ‘ कॅम्बल मेमोरियल ‘ सुवर्णपदक .   

४. पोर्तुगीज सरकारने दिलेले उच्च किताब —– ‘ नाईट ऑफ दि मिलिटरी , ऑर्डर ऑफ सॅंटियागो ऑफ सायन्स, लेटर्स अँड आर्टस् ‘ , ‘ शेव्हेलियर ‘. 

५. पॅरिसच्या पौरस्त्य सोसायटीचे माननीय सदस्यत्व – सन १९२३.  

६. सन १९२६ मध्ये पणजीच्या ‘ इन्स्टिट्यूट वास्को दि गामा ‘ या सरकारी संस्थेचे सभासदत्व . 

अशा कितीतरी महत्वाच्या मानसन्मानांना पात्र ठरलेले अतिशय मोलाचे आणि तितकेच कष्टप्रद काम सातत्याने ज्यांनी केले, आणि पुढच्या पिढीसमोर एक वेगळाच आदर्श ठेवला, त्या आदरणीय श्री. पांडुरंग पिसुर्लेकर यांना त्यांच्या आजच्या स्मृतिदिनी मनःपूर्वक आदरांजली. 🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ९ जुलै – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ ९ जुलै – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

सोनोपंत दांडेकर

सोनोपंत दांडेकर यांचे मूळ नाव  शंकर वामन दांडेकर.ते सोनुमामा  तसेच मामासाहेब दांडेकर या नावाने प्रसिद्ध होते.ते विचारवंत,शिक्षणतज्ञ,तत्वज्ञान व संत साहित्याचे अभ्यासक व वारकरी संप्रदायाचे प्रवचनकार होते.पुणे येथील सर परशुरामभाऊ ( एस्.पी.)महाविद्यालयाचे प्राचार्य होते.

त्यांचे प्रकाशित साहित्य: अध्यात्मशास्त्राची  मूलतत्वे, अभंग संकीर्तन भाग 1 ते4, ईश्वरवाद, दैनिक स्वाध्याय, भारतातील थोर स्तीया, श्रीमद्भगवद्गीता, सटीप ज्ञानेश्वरी, तुकारामांचे आध्यात्मिक चरित्र, सौंदर्याचे व्याकरण, ज्ञानदेव आणि प्लेटो, श्री ज्ञानदेवांचे जीवनविषयक तत्वज्ञान इ.इ.

सन्मान: पालघर येथे महाविद्यालयाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.तसेच तत्वज्ञान विषयक ग्रंथाला त्यांचे नावे पुरस्कार देण्यात येतो.

09/07/1968 रोजी मामासाहेब दांडेकर यांचे दुःखद निधन झाले.ज्ञानेश्वरी तसेच अन्य संत साहित्याचा घरोघर प्रसार करण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे.त्यांच्या कार्यास शतशः प्रणाम! 🙏

☆☆☆☆☆

 डाॅ. गंगाधर मोरजे

डाॅ.गंगाधर मोरजे हे लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक होते.बार्शी व अहमदनगर येथील महाविद्यालयत त्यांनी प्राध्यापक व मराठी विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली.”मराठी लावणी प्रारंभ ते 1850 ” ह्या विषयात त्यांनी डाॅक्टरेट मिळवली होती.तसेच “गोमंतकातील ख्रिस्ती-मराठी वाड्मय” हा सुद्धा त्याच्या अभ्यासाचा विषय होता.लोकसाहित्याचा अभ्यास करून त्यातील गूढ,अद्भुत,रहस्यमय कथा त्यांनी प्रकाशात आणल्या.

मोरजे यांचे प्रकाशित साहित्य: लोकसाहित्य: बदलते संदर्भ, बदलती रूपे.

जिप्सी लोककथा, लोककथांतर्गत नवलकथा, श्री ज्ञानेश्वरी शब्दरूपसंबं इ.

संपादित: सगनभाऊकृत लावण्या व पोवाडे संपादन.

सन्मान: गंगाधर मोरजे स्मृती प्रित्यर्थ लोकगंगा पुरस्कार लोकसाहित्य विषयक ग्रंथांना दिला जातो.

आज त्यांचा स्मृतीदिन आहे.त्यांच्या कार्यास अभिवादन.🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :विकिपीडिया 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ८ जुलै – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ८ जुलै – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

बा. भ. बोरकर

बाळकृष्ण भगवंत बोरकर (30 नोव्हेंबर 1910 – 8 जुलै 1984) हे कवी, लेखक, कथाकार होते.

बा.भ.मूळचे गोव्याचे. त्यांचे शालेय शिक्षण गोव्यात व धारवाडला झाले . कर्नाटक कॉलेजमध्ये शिकत असताना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट राहिले. थोडे दिवस मुंबईला राहून ते गोव्याला परतले. तिथे एका इंग्रजी शाळेत त्यांनी शिक्षकाची नोकरी धरली. नंतर त्यांनी पुण्याच्या रेडिओ स्टेशनवरही काम केले.

त्यांचा पहिला कवितासंग्रह 1930मध्ये प्रसिद्ध झाला. नंतर ‘जीवन संगीत’, ‘चैत्रपुनव’, ‘चांदणवेल’,  ‘कांचनसंध्या’ वगैरे अनेक कवितासंग्रह प्रसिद्ध झाले.

त्यांच्या कवितेवर भा. रा. तांबे यांचा प्रभाव होता. निसर्गसौंदर्य, दिव्यत्वाचा साक्षात्कार, समृद्ध शब्दभंडार, नादमय रचना ही त्यांच्या कवितेची लक्षणे होती. अक्षरगणवृत्ते, मात्रा, जातिवृत्ते यावर त्यांची हुकमत होती.

कवितांव्यतिरिक्त त्यांनी इतरही लेखन केले.त्यांची ‘कागदी होड्या’, ‘चांदण्याचे कवडसे’, ‘सासाय’ इत्यादी ललित लेखांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. स्टीफन झ्वाइगच्या कादंबऱ्यांचा व  महात्मा गांधीसंबंधित काही पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केला. रवींद्रनाथ टागोरांवरही त्यांनी काही पुस्तके लिहिली. कोकणी भाषेत त्यांच्या दहा साहित्यकृती आहेत.

मराठी ‘आमचा गोमंतक’ व  कोकणी ‘पोर्जेचो आवाज’चे संपादक म्हणूनही बा.भ.नी काम केले.

भारत सरकारने ‘पद्मश्री’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. गोव्याच्या स्वातंत्र्य आंदोलनातील सहभागाबद्दल त्यांना ताम्रपट मिळाला होता.

बा. भ. बोरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. 🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, मराठी माती, फोंडिया.कॉम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ६ जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ६ जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

प्रसिद्ध मराठी लेखिका श्रीमती कमला फडके यांचा आज स्मृतिदिन. ( ४/८/१९१६ – ६/७/१९८० ) 

त्या काळचे सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक श्री. ना. सी. फडके यांच्या सुविद्य पत्नी , आणि सुप्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांची धाकटी बहीण , अशी ठळक ओळख असणाऱ्या कमला फडके यांनी स्वतःच्या समृद्ध लेखनामुळे साहित्यविश्वाला स्वतःची “ उत्तम लेखिका “ अशी पूर्णपणे स्वतंत्र आणि तितकीच ठळक ओळख करून दिली होती. 

ना. सी. फडके यांच्या “ झंकार “ या साप्ताहिकात कमलाताईंचे लेख , कथा , मुलाखती हळूहळू प्रसिद्ध होऊ लागल्या, आणि त्यांच्यातली लेखिका वाचकांसमोर आली. पुढे याच साप्ताहिकात इंग्रजी साहित्याचा परिचय करून देणारे त्यांचे एक वेगळे सदर प्रसिद्ध होऊ लागले , आणि लेखिका म्हणून त्यांची खरी ओळख निर्माण झाली. अनंत अंतरकर यांच्या ` हंस ` आणि ` मोहिनी ` या सुप्रसिद्ध मासिकांमध्ये त्यांच्या अनेक विनोदी कथा प्रसिद्ध झाल्या. तसेच इतर कथा ` किर्लोस्कर ` आणि ` स्त्री ` मासिकांमध्ये प्रकाशित झाल्या. 

लेखनासोबतच त्यांनी नागभूषण नावाच्या प्रख्यात गुरूंकडून कथक नृत्याचेही शिक्षण घेतले होते. तसेच ना. सी. फडके यांच्या “ जानकी “ या नाटकातली मुख्य भूमिकाही त्यांनी समर्थपणे साकारली होती, ज्याचे चिंतामणराव कोल्हटकरांसारख्या मान्यवरांनी कौतुक केले होते. आणि या दोन्ही गोष्टी विशेषत्वाने सांगण्यासारख्या आहेत.

त्यांचे वैविध्यपूर्ण असे प्रकाशित साहित्य :— 

 १. आसावरी – ही संगीत-विश्वावर आधारित कादंबरी 

 २. ` उटकमंडची यात्रा ` आणि ` त्रिवेंद्रमची सफर ` – ही दोन प्रवासवर्णने 

 ३. एडमार पो यांच्या भयकथा — हा अनुवादित कथासंग्रह 

 ४. जेव्हा रानवारा शीळ घालतो —  कादंबरी 

 ५. थोरांच्या सहचारिणी – लेखसंग्रह 

 ६. धुक्यात हरवली वाट – कादंबरी 

 ७. निष्कलंक – अनुवादित कादंबरी – मूळ लेखक हिल्टन 

 ८. पाचवे पाऊल – एका अणुशास्त्रज्ञाच्या आयुष्यावर आधारित कादंबरी 

 ९. प्रा. फडके यांची गाजलेली भाषणे – संकलन व संपादन 

१०. बंधन – मिरजेच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका डॉक्टरच्या आयुष्यावर आधारित कादंबरी 

११. भूल – हातून चुकून झालेल्या खुनाची किंमत चुकवणाऱ्या एका पुरुषाची कथा सांगणारी कादंबरी 

१२. मकरंद – कथासंग्रह 

१३. हृदयाची हाक — १९७१ साली जगातली पहिली हृदयरोपणाची शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड यांच्या 

     “ One Life “ या इंग्रजीतील आत्मकथनाचा मराठी अनुवाद 

१४. ओशो, म्हणजेच आचार्य रजनीश यांच्या अनेक इंग्रजी पुस्तकांचे मराठीत केलेले अनुवाद 

–यापैकी “ निष्कलंक “ या त्यांच्या कादंबरीला दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनात खास पारितोषिक देऊन 

गौरविण्यात आले होते. 

असे विविधांगी लेखन करणाऱ्या श्रीमती कमला फडके यांना त्यांच्या स्मृतिदिनी भावपूर्ण श्रद्धांजली . 🙏

☆☆☆☆☆

इतिहास-संशोधक म्हणून अधिकतर प्रसिद्ध झालेले श्री. पांडुरंग नरसिंह पटवर्धन यांचाही आज स्मृतिदिन. 

( ५/१/१८८६ – ६/७/१९२१ ) 

पुण्याच्या ` भारत इतिहास संशोधक मंडळात ` सदस्य म्हणून कार्यरत असतांना श्री. पटवर्धन यांचे त्या मंडळाच्या वृत्तांमध्ये आणि त्रैमासिकांमधून इतिहासविषयक अनेक लेख सातत्याने प्रकाशित होत असत. 

याच्याच जोडीने “ राष्ट्रहितैषी “ नावाचे साप्ताहिकही त्यांनी बराच काळ चालवले होते. 

“ राष्ट्रकुटांचा पुणे ताम्रपट “ हाही त्यांनीच प्रकाशित केला होता. 

त्यांचे विशेषत्वाने सांगायला हवे असे पुस्तक म्हणजे “ बुंदेल्यांची बखर “ हे त्यांनी अनुवादित केलेले पुस्तक —

“ तारिखे दिलकुशा “ हे भीमसेन सक्सेना लिखित एक फारसी हस्तलिखित होते. कॅप्टन जोनाथन स्कॉट यांनी १८७४ मध्ये त्याचा इंग्रजी अनुवाद केला होता. आणि १९२० साली श्री. पटवर्धन यांनी त्याचा मराठीत केलेला अनुवाद म्हणजे हे पुस्तक . 

इतिहास संशोधनासाठी केले जाणारे काम लोकांपर्यंत पोहोचावे या हेतूने उत्तम लेखन करणाऱ्या श्री. पटवर्धन यांना विनम्र आदरांजली. 🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ५ जुलै – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ५ जुलै – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

बाबूराव अर्नाळकर

चंद्रकांत सखाराम चव्हाण हे मूळ नाव असलेले प्रसिद्ध मराठी रहस्यकथा लेखक म्हणजेच बाबूराव अर्नाळकर! आयुष्यभर त्यांनी याच टोपणनावाने लेखन केले.

त्यांचे शिक्षण फक्त मॅट्रीक पर्यंत झाले होते.पण वाचकांच्या सर्वख थराला आवडतील अशा 1042 रहस्यकथा लिहून त्यांनी लोकांमध्ये वाचनाची गोडी लावली. ज्या काळात ना.सि.फडके,साने गुरुजी,वि.स.खांडेकर यांचा खूप मोठा वाचक वर्ग होता,त्या काळात अर्नाळकर यांनी आपलाही एक वाचक वर्ग तयार केला होता. विजयदुर्ग किल्ल्यावरून परतताना त्यांना एक कथा सुचली.ती कथा म्हणजे ‘सतीची समाधी’.त्यांची ही पहिली कथा करमणूक मासिकातून प्रसिद्ध झाला.ज्येष्ठ लेखक नाथमाधव यांच्या वाचनात ही कथा आली.त्यांनीच अर्नाळकर यांना रहस्यकथा लिहायला प्रोत्साहन दिले.तेव्हापासून बाबूरावांनी अखेरपर्यंत आपली लेखणी रहस्यकथांसाठी वाहून घेतली.नाथमाधव यांच्याप्रमाणेच त्यांना आचार्य अत्रे,यशवंतराव चव्हाण,अनंत काणेकर,पु.ल.देशपांडे,वि.भि. कोलते यांनी लेखनासाठी प्रोत्साहन दिले.

त्यांनी 1942 च्या चळवळीतही भाग घेतला होता.तसेच स्वा.सावरकरांच्या आवाहनानुसार त्यांनी 1946 ते1948 या काळात सैन्यात काम केले होते.त्या दोन वर्षानंतर त्यांनी पुन्हा लेखन चालू ठेवले.

त्यांच्या कथा पाश्चिमात्य कथांवर आधारित असल्या तरी त्याला मराठी समाजजीवनाचे सुंदर रूप दिलेले असल्यामुळे त्या अस्सल देशीच वाटत असत.त्यांच्या प्रत्येक कथेचा शेवट ‘सत्यमेव जयते’ ने होत असे.

त्यांच्या पाचशे कथांचे लेखन झाल्यावर महाराष्ट्र शासनाने 10,000/रूपये देऊन त्यांचा सन्मान केला होता.

पोलिस अधिकारी आनंदराव, चंद्रवदन उर्फ काळापहाड, कृष्णकुमारी, चारूहास, धनंजय, छोटू, पंढरीनाथ, झुंजार, दर्यासारंग ही त्यांची वारंवार येणारी लोकप्रिय पात्रे !

त्यांच्या कथा लता मंगेशकर, बालगंधर्व यांच्याकडून रसिकतेने वाचल्या जात असत.

त्यांची काही पुस्तके: कृष्णसर्प, काळापहाड, कालकन्या, कर्दनकाळ, अकरावा अवतार, ज्वालामुखी, चौकटची राणी, वेताळ टेकडी, रूद्रावतार, भद्रंभद्र, भीमसेन, मृत्यूचा डाव, राजरहस्य, चोरांची दुनिया इत्यादी.

वयाच्या 90 व्या वर्षी 05/07/1996 ला त्यांचे दुःखद निधन झाले व मराठी रहस्यकथांचे एक पर्व अस्तास गेले.

त्यांच्या स्मृतीस अभिवादन 🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :विकिपीडिया 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print