मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “अपरिचिताचा शेवटचा प्रवास…” (अनुवादित) – मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात – कन्नड अनुवादक : अज्ञात – मराठी अनुवादक : डॉ. सुभाष भोसले ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

🌸 जीवनरंग 🌸

☆ “अपरिचिताचा शेवटचा प्रवास…” (अनुवादित) – मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात – कन्नड अनुवादक : अज्ञात – मराठी अनुवादक : डॉ. सुभाष भोसले ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

(‘अपरिचिताचा शेवटचा प्रवास’ ही एक सोशल मीडियावर लोकप्रिय झालेली हृदयस्पर्शी कथा आहे. या कथेत एका टॅक्सी चालकाचा आणि एका वृद्ध प्रवाशाचा अनुभव मांडला आहे. या कथेचे मूळ लेखक केंट नर्बर्न (Kent Nerburn) आहेत. ही कथा त्यांच्या Make Me an Instrument: The Humble Journeys of a Everyman या पुस्तकातील एका भागावर आधारित आहे, ज्याला The Taxi Ride या नावाने ओळखले जाते. या कथेचा कोणताही एक अधिकृत ‘एकुलता एक’ अनुवादक नाही. ही कथा प्रामुख्याने सोशल मीडिया (फेसबुक आणि व्हॉट्सॲप) आणि ब्लॉग्स द्वारे मराठीत लोकप्रिय झाली.-  AI आधारीत जानकारी)

मी एक टॅक्सी चालक आहे. बहुतेक वेळा मी रात्रीची पाळी करतो. गेल्या आठवड्यात रात्री साधारण अकरा वाजता एक वयस्कर गृहस्थ माझ्या टॅक्सीत बसले. पांढ रा कुर्ता, धोतर, थकलेले डोळे—पण त्यांच्या आवाजात एक वेगळीच ठामपणा होता.

टॅक्सीत बसताच ते म्हणाले,

“आज रात्री तू मला पाच ठिकाणी घेऊन जायचे आहे. मी तुला ५००० रुपये रोख देईन. पण प्रवास संपेपर्यंत ‘का?’ असा एकही प्रश्न विचारायचा नाही.”

त्यांनी माझ्या हातात एक चिठ्ठी दिली. त्यावर पाच पत्ते लिहिले होते.

पहिला थांबा

दक्षिण कोलकात्यातील एक जुने घर. मी गाडी थांबवली. ते खाली उतरले नाहीत. फक्त काच खाली करून त्या घराकडे शांतपणे पाहत राहिले. दहा मिनिटे गेली. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण आवाज नव्हता.

“चला… पुढच्या ठिकाणी जाऊया,” ते हळूच म्हणाले.

दुसरा थांबा

एक प्राथमिक शाळा. गेट बंद होते. आत अंधारात खेळाचे मैदान दिसत होते. ते गाडीतून उतरले आणि हळूहळू झोपाळ्याजवळ गेले. त्यावर बसून हलके हलके झोके घेऊ लागले. वीस मिनिटांनी ते परत आले.

ते म्हणाले, “इथे मी ४३ वर्षे शिक्षक म्हणून काम केले. माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ इथेच गेला.”

तिसरा थांबा

एक छोटंसं जुने कॉफी हाऊस. ते आत गेले आणि चहाचा एक कप मागवला. एका कोपऱ्यात बसले, पण चहाला हातही लावला नाही. फक्त आजूबाजूला पाहत बसले. पंधरा मिनिटांनी हलकंसं हसत बाहेर आले.

ते म्हणाले, “इथेच मी पहिल्यांदा उमादेवीला भेटलो होतो… १९६९ साली.”

चौथा थांबा

निम्ताला स्मशानभूमी. ते खाली उतरले. एका स्मृतीफलकासमोर उभे राहून काहीतरी पुटपुटत होते—जणू प्रार्थना करत होते. अर्ध्या तासाने परत आले तेव्हा त्यांचे डोळे लाल झाले होते.

ते म्हणाले, “ती गेल्याला आता तीन वर्षे झाली.”

पाचवा थांबा

एक मोठे सरकारी रुग्णालय. त्यांनी गाडी थांबवायला सांगितले. मग माझ्याकडे पाहून म्हणाले,

“आता मी तुला कारण सांगतो. मला चौथ्या टप्प्यातील कॅन्सर आहे. डॉक्टर म्हणतात—काही आठवडे… कदाचित काही दिवसच उरले आहेत. म्हणून आज रात्री माझे संपूर्ण आयुष्य शेवटच्या वेळेस पाहून घ्यायचे होते.”

.. .. हे ऐकून मी स्टेअरिंगवर डोके टेकवून रडू लागलो.

ते शांतपणे म्हणाले—

“ते घर… जिथे मी माझी मुलं वाढवली.

ती शाळा… जिथे मला माझ्या आयुष्याचा उद्देश सापडला.

ते कॉफी हाऊस… जिथे मी प्रेमात पडलो.

ते स्मशान… जिथे मी माझ्या पत्नीला शेवटचा निरोप दिला.

आणि हे रुग्णालय… जिथे आज मी दाखल होणार आहे. मी पुन्हा घरी परतणार नाही.”

.. .. .. त्यांनी ५००० रुपये माझ्या हातात दिले.

“धन्यवाद. तू मला माझे आयुष्य पुन्हा एकदा पाहायला मदत केलीस. माझ्या आयुष्यातील शेवटचा अपरिचित माणूस—पण खूप माणुसकीने वागणारा.”

मी म्हणालो, “नको तात्या, हे पैसे मी घेऊ शकत नाही.”

ते म्हणाले, “घे. हे देण्यासाठी माझ्याकडे आता कोणी नाही. माझी मुलं माझ्याशी बोलत नाहीत. मित्रही उरले नाहीत. पण तू मला तीन तास दिलेस—तीन तास माणुसकीचे. त्याची किंमत पैशापेक्षा जास्त आहे.”

त्यांनी आपली छोटी बॅग घेतली आणि रुग्णालयात आत गेले.

दुसऱ्या दिवशी मी फुलांचा गुच्छ घेऊन त्यांना भेटायला गेलो. त्यांनी मला पाहून हलकंसं हसलं.

“तू आलास?”

मी म्हणालो, “तुम्हाला असंच सोडून येणं मनाला पटत नव्हतं.”

आम्ही दोन तास बोललो—त्यांच्या पत्नी उमादेवीबद्दल, त्यांच्या विद्यार्थ्यांबद्दल, आणि दूर गेलेल्या मुलांबद्दल.

मी रोज जाऊ लागलो. चहा घेऊन जायचो, त्यांना वर्तमानपत्र वाचून दाखवायचो. कधी कधी फक्त त्यांच्या शेजारी शांत बसायचो.

एकदा ते म्हणाले,

“मी एकटाच मरणार असं वाटत होतं. पण तू आता इथे आहेस. शेवटी एक अपरिचितच कुटुंबासारखा झाला—हेच माझं भाग्य.”

मी त्यांचा हात हातात घेत म्हणालो,

“तुम्ही एकटे नाही.”

दुसऱ्या दिवशी पहाटे ३:१७ वाजता त्यांचं निधन झालं. मी त्यांचा हात धरून तिथेच बसलो होतो.

त्यांचे शेवटचे शब्द होते—

“सगळ्यांना सांग… अपरिचित लोकांकडे लक्ष दे. आपण सगळे कुठेतरी निघालो आहोत. काहीजण जलद, काहीजण हळूहळू. पण वाटेत माणुसकी दाखवत जा. तू तसं केलंस… आणि माझे शेवटचे दिवस सुंदर केलेस.”

मॉनिटरचा आवाज थांबला… आणि सरळ रेषा दिसू लागली.

त्यांच्या अंत्यसंस्काराला फक्त सहा लोक होते—

मी, तीन परिचारिका, एक वकील आणि त्यांचा एक जुना विद्यार्थी.

४३ वर्षांचे अध्यापन.

५२ वर्षांचा संसार.

८१ वर्षांचे आयुष्य… आणि शेवटी फक्त सहा माणसं.

त्या दिवशी मला एक मोठा धडा मिळाला—

प्रत्येक अपरिचित माणूस कोणाच्या तरी आयुष्याचं संपूर्ण जग असतो.

प्रत्येक प्रवाशामागे एक कथा असते.

प्रत्येक माणूस जगत असतो… आणि कुणीतरी आपल्याला समजून घ्यावं, इतकीच त्याची अपेक्षा असते.

आजही ते ५००० रुपये मी खर्च केलेले नाहीत. ते माझ्या टॅक्सीतच ठेवले आहेत. कारण प्रत्येक प्रवासी कदाचित आपल्या आयुष्याच्या शेवटच्या प्रवासावर असू शकतो.

त्या एका शिक्षकाने मला शिकवले—

माणुसकी ही काही अतिरिक्त गोष्ट नाही; तीच खरं आयुष्य आहे.

चला… आपणही असा प्रयत्न करूया.

कदाचित आपल्याला  भेटणारा एखादा अपरिचित माणूस त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या प्रवासात असेल.

आपण त्याच्या आयुष्यात थोडासा का होईना, प्रकाश आणि माणुसकी देऊया.

माणूस म्हणून जन्माला आलो, तर माणुसकी विसरून कसं चालेल?

अनुवादक : डॉ. सुभाष भोसले

(हा एखाद्या टॅक्सी चालकाचा खरा अनुभव आहे की एखाद्या लेखकाची कल्पित कथा आहे, हे मला माहीत नाही. कोणीतरी हे इंग्रजीतून कन्नडमध्ये भाषांतर केले होते. मी ते कन्नडमधून मराठीत अनुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे. वाचलेल्या मजकुरात थोडेफार बदल करून, चांगला संदेश देण्याच्या सद्भावनेने येथे शेअर करत आहे). 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माणुसकी… लेखिका : सुश्री ज्योती निंबाळकर ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

🌸 जीवनरंग 🌸

☆ माणुसकी… लेखिका : सुश्री ज्योती निंबाळकर ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

दरवाजा अर्धवट उघडाच होता. आत ऑफिसमध्ये प्रचंड शांतता होती… फक्त एका जुन्या छडीचा जमिनीवर टेकतांना टक-टक आवाज येत होता. रिसेप्शनवर बसलेल्या मुलीने वर मान करून पाहिलं, दारात एक कृश, वृद्ध माणूस उभा होता. पांढरे केस, जुना फाटलेला सदरा, आणि हातात निळे प्लास्टिक फोल्डर… कदाचित बायोडाटा. तो हळूहळू आत आला… जणू प्रत्येक पाऊल उचलताना त्याला वेदना होत होत्या.

रिसेप्शनिस्ट मुलीने विचारलं.. “आपण? ”

तो वृद्ध म्हणाला, “नोकरीसाठी… अर्ज द्यायचा होता. ”

त्या एका वाक्याने संपूर्ण ऑफिस अवाक् झालं. HR मॅनेजर अभिषेक त्याच्याकडे पाहून थक्क झाला. ६८–७० वर्षांचा माणूस, काठी टेकत चालत… नोकरी मागण्यासाठी आला होता. अभिषेकने अचंबित होऊन विचारलं,

“आजोबा, नोकरी? कोणती नोकरी हवी तुम्हाला? ”

वृद्धाने फोल्डर पुढे केला. त्यांचे हात थरथरत होते. “काहीही काम चालेल बेटा. मी शिकून घेईन.” त्याच्या आवाजात अशी वेदना जाणवत होती की, जणू आयुष्याने त्यांचं सगळं काही हिरावून घेतलं होतं.

अभिषेकने त्यांचा बायोडाटा उघडला आणि वाचताच त्याचे डोळे पाणावले.

बायोडाटा:

नाव: सुरेश पाटील

वय: ६९ वर्षे

शिक्षण: बारावी पास

अनुभव: ३२ वर्षं सरकारी शाळेत शिपाई. शाळा उघडणे, साफ- सफाई, मुलांना मदत, चहा-पाणी.

निवृत्ती: ९ वर्षांपूर्वी

पण शेवटची ओळ वाचून अभिषेक थबकला –

“पेन्शनचे पैसे फसवणुकीने गेले, घरात कोणी कमावणारा नाही,

दोन नातवंडे शाळेत जातात, सुनेची तब्येत बरी नसते. नोकरी नाही मिळाली तर घर चालवणं अवघड होईल. ” 

अभिषेकने त्याच्याकडे पाहिलं.

त्या डोळ्यांत फक्त नव्हती तर विवंचना होती.

ऑफिसमध्ये कुजबुज सुरू झाली..

“या वयात नोकरी?”,

“आता या वयात काय काम करणार?”

“चॅरिटी थोडी चाललीये इथे?”

पण अभिषेकच्या डोळ्यांसमोर त्याच्या वडिलांचा चेहरा आला. ‘जर माझ्या बाबांवर कधी अशी वेळ आली तर? ’ त्याचं मन ढवळून निघालं. तो म्हणाला, “आजोबा, बसा ना. छोटासा इंटरव्ह्यू घेऊया.”

वृद्ध थोडा गोंधळला… “बेटा, इंटरव्ह्यू नको… फक्त काम दे. मी सगळ्यात आधी येईन, मेहनत करीन.”

अभिषेक हसला. “ठीक आहे, पण सांगा ना… नोकरी का हवी आहे?”

ते ऐकून वृद्धाचा गळा भरून आला. “बायको गेली तीन वर्षांपूर्वी…

मोठा मुलगा ट्रक अपघातात गेला. सून एकटी आहे, दोन नातवंडं शाळेत शिकत आहेत. लहान भावाने फसवून पेन्शन घेतली… केस चालू आहे पण न्याय कुठे इतक्या लवकर मिळतो?” त्याने हलकेच हसत म्हटलं.. “सून आजारी आहे, मुलं शिकत आहेत… शाळेची फी भरू शकत नाही, म्हणून झोप येत नाही… घरात धान्यही नाही राहिलं. शेजाऱ्यांकडून उधार मागितले तेव्हा तर खूप अपमानित वाटलं होतं, ” त्याचे डोळे पाणावले. म्हणूनच बेटा, नोकरी हवी आहे… कोणतीही.”

अभिषेक गप्प झाला… मग तो थेट मालकीण मीरा किल्लेदार यांच्याकडे गेला.

सगळं ऐकल्यावर मीरा म्हणाल्या, “अशा लोकांना आपण टाळतो अभिषेक… काहीतरी करायला हवं.”

अभिषेक म्हटला, “मॅडम, त्यांना दया नको… सन्मान हवा आहे.

मीरा म्हणाल्या, “ठीक आहे. त्यांना ऑफिस असिस्टंटची नोकरी द्या. हलके फुलके काम द्या.. आणि प्रत्येक महिन्याला थोडं जास्त पेमेंट देऊया, पण त्यांना असं वाटलं पाहिजे की हा त्यांचा कष्टाचा पैसा आहे, मदत नाही.”

जेव्हा दोघे बाहेर आले, ते वृद्ध आजोबा हातात फोल्डर घट्ट पकडून उभे होते… कदाचित आता नकार मिळेल… असा भाव त्यांच्या डोळ्यांत होता.

मीरा हसून म्हणाल्या, “श्री सुरेश पाटील?”

वृद्ध दचकून उभा राहिला.

“तुमची नियुक्ती झाली आहे.”

क्षणभर त्याला विश्वासच बसला नाही. “ख…खरच?” त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

“हो आजोबा, उद्यापासून काम सुरू.”

तो फोल्डर छातीशी घट्ट धरून रडू लागला… “बेटा, आज तुम्ही माझं अंधारं घर उजळून टाकलं.”

अभिषेक म्हणाला, “आता तुम्ही आमच्या ऑफिसचे आजोबा आहात.”

दुसऱ्या दिवशी तो वृद्ध व्यक्ती स्वच्छ कुर्ता घालून आला, दाढीही थोडी ट्रिम केली होती. पाणी ठेवणे, फाइल्स नेणे, झाडांना पाणी देणे..

सगळी कामं प्रेमाने करत होता. एका महिन्यानंतर त्याला पगार मिळाला ८, ००० रुपये + ३, ००० बोनस.

आजोबा सदगदित होऊन म्हणाले… “इतके पैसे मी कधीच पाहिले नाहीत बेटा…” त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.

अभिषेक म्हणाला.. “हे पैसे तुम्ही कमावले आहेत आजोबा…

ही तुमची स्वाभिमानाची कमाई आहे. “

पण दोन महिने झाल्यावर एका सकाळी तो कामावर आला नाही. फोन करून तपास केला तर सून म्हणाली – “दादा, बाबा आजारी आहेत… आम्ही रुग्णालयात आहोत…”

अभिषेक आणि मीरा धावत दवाखान्यात गेले. बेडवर आजोबांना ऑक्सिजन लावलेला होता. अभिषेकला पाहताच आजोबा हसले. म्हणाले, “बेटा… कामावर येऊ शकलो नाही… सॉरी…”

अभिषेकचे डोळे भरून आले.

आजोबा म्हणाले, “आज नातवाची फी भरायची होती… तेवढी तू भरशील ना बेटा?”

अभिषेक म्हणाला, “आजोबा, ती मी आधीच भरली आहे.. तुमच्या नावाने.” 

आजोबांच्या डोळ्यांत पाणी आलं. “देव तुझं भलं करो बेटा…

तू मला पुन्हा माणूस असल्याची जाणीव दिलीस…” आणि पुढच्याच क्षणी त्यांचा हात सैल झाला… आजोबा गेले…

त्या दिवशी ऑफिसमध्ये कुणाचंही कामात मन लागलं नाही…

सगळ्यांनी दोन मिनिटे शांत राहून मौन पाळलं.

मीरा म्हणाल्या, “श्री सुरेश पाटील आमचे कर्मचारी नव्हते, ते आमच्या कुटुंबाचा भाग होते. त्यांच्या नातवंडांच्या शिक्षणाचा खर्च कंपनी उचलेल.”

अभिषेकने त्यांचा फोल्डर उघडला, त्यात एक चिठ्ठी होती. “जर मला नोकरी मिळाली, तर माझा नातू शिकेल. नाही मिळाली, तर तो शाळा सोडेल… माझी एकच इच्छा.. तो माझ्यापेक्षा चांगला माणूस बनो.”

अभिषेकच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, “आजोबा, तुमचा नातू नक्की काहीतरी मोठं काम करेल.”

कंपनीने आजोबांच्या नावाने शिष्यवृत्ती सुरू केली.. ‘सुरेश पाटील स्मृती शिष्यवृत्ती’. अनेक गरीब मुलांची फी त्या निधीतून भरली जाऊ लागली.

काही लोक बायोडाटामध्ये कौशल्य लिहितात, पण त्या आजोबांनी माणुसकी लिहिली होती. कारण कधी कधी नोकरी म्हणजे फक्त पोट भरणं नसतं, ती एखाद्या घराची आशा, एखाद्या नातवाचं भविष्य, आणि एका वृद्ध बापाची इज्जत असते.

‘आणि सुरेश आजोबा शेवटपर्यंत इज्जतीने जगले…’

तुम्हीही कुणाच्या आयुष्यात ‘अभिषेक’ आणि ‘मीरा’ होऊ शकता का?

**

लेखिका : सुश्री ज्योती निंबाळकर

प्रस्तुती : श्री मेघ:श्याम सोनावणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मैत्र जिवांचे… – भाग – २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ मैत्र जिवांचे… – भाग – २ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

(दहावीचा रिझल्ट लागण्यापूर्वीच सुरेखा विवाह बंधनात अडकली. तिच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी आपण काही मदत करू शकलो नाही याचं दुःख त्यावेळी आपल्या डोळ्यातून वाहत होतं.)

इथून पुढे – – 

बारावीच्या परीक्षेनंतर आपण ब्युटी पार्लरच्या कोर्स करीत होता तेव्हा सुरेखाच्या सासरी जाऊन तिची मॉ॑ तिला घेऊन आली. सुरेखाचा रसरशीत आनंदी चेहरा हरवून गेला होता. डोळ्यात कसलीही ओळख नव्हती. मागच्या दोन वर्षात तिची दोन ऍबॉर्शन्स झाली (की केली) होती. आता तिला तिसऱ्यांदा दिवस गेले होते. लाडक्या लेकीची अशी अवस्था पाहून खंतावून वडील देवाघरी गेले. सुरेखाची मॉ॑ मात्र मोठ्या धीराची. अनेक औषधोपचार करून तिने सुरेखाला सावरलं. जीवाचं बरं वाईट करायला निघाली सुरेखा हळूहळू लहानग्या सुरजमध्ये रमायला लागली. मुंबईत कामासाठी आलेला सुरेखा चा नवरा गावी गेला तो परत आलाच नाही. आता सुरेखा एका नर्सिंग ब्युरोतर्फे वृद्ध आजारी स्त्रियांची सेवा करण्याचं काम करते. लग्न होऊनसुद्धा सुख मिळेलच असं नाही. काय लिहिलं असेल आपल्या नशिबात? या विचाराने सोनल जागीच होती.

नाक्यावर चकाट्या पिटून, सिगारेटी फुंकून उशिराने घरात आलेला सुनील पाणी पिऊन झोपायला गेला तरी सोनल जागीच होती.

सुरेखाची नाईट ड्युटी होती म्हणून एक दिवस त्यांचं टिटवाळ्याला जायचं ठरवलं. गाडीच्या वेगाबरोबर त्यांच्या गप्पांचा वेगही वाढला. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झाल्यावर मी टिटवाळ्यायला एक छोटी जागा बुक केलीये त्या बिल्डिंगचं काम कुठपर्यंत आलाय ते बघून येऊया. तुला माहितीये माझी मॉ॑ मोठ्या जिद्दीची आहे. तिने आम्हाला कष्ट करायला शिकवले. मॉ॑चा आधार आहे म्हणून जमतय सारं. पण स्वतःच्या आणि सुरजच्या भविष्याचा विचार करायलाच पाहिजे…

गणपतीचे दर्शन घेऊन दोघी साईटच्या ठिकाणी गेल्या.

टिटवाळ्याच्या बिल्डरचा मॅनेजर मॉ॑चा गाववाला आहे. त्यांच्यामुळे थोडं लोन मिळालं. थोडे पैसे मॉ॑ने लोन म्हणून दिलेत. लोनचे हप्ते भरताना दमछाक होते. पण स्वतःसाठी, सुरजसाठी सारं सोसलंच पाहिजे.

किती लांब जागा आहे ग. इथून कशी तू तुझी ड्युटी करणार. ?॔

॓आपल्या बजेटमध्ये बसणारी जागा लांबच असणार.

॓ माझ्या व्यवसायाला आता वाढती मागणी आहे. तूसुद्धा लोन काढून इथे जागा घेतेस का? आपण दोघी मिळून इथे ब्युटी पार्लर आणि नर्सिंग ब्युरो काढू.॔

सोनलच्या मनात विचार गरगरू लागले. खरंच काय हरकत आहे जागेसाठी प्रयत्न करायला!

चाळीच्या दाराशी सुरज आईची वाट पाहत उभाच होता. त्याला प्रेमाने जवळ घेऊन सुरेखाने सोनलला अच्छा केलं.

विचारांच्या भोवऱ्यात गरगरताना आपण देखील जागा घेऊ शकतो का? प्रयत्न करायला काय हरकत आहे?

जिना चढून सोनल खोलीत शिरली. घरात काय झालंय हे कळल्यावर सोनलच्या पायाखालची जमीनच सरकली. आई ज्यांच्याकडे अनेक वर्ष काम करत होती त्याच घरात चोरी करण्याचा तिने प्रयत्न केला ते देखील बाबांच्या हट्टाला धमकावणीला बळी पडून. गदगदून रडणाऱ्याआईकडून ही हकीगत तुटक- तुटक ऐकताना त्यादिवशी आपण सुरेखाला भेटून घरी आलो होतो त्यावेळच्या आई पप्पांच्या बोलण्याचा अर्थ लक्षात आला. उमाताईंच्या घरी प्रामाणिकपणे आई अनेक वर्षे काम करते. उमाताई त्यांच्या प्रशस्त फ्लॅटमध्ये एकट्याच राहतात. त्यांच्या फ्लॅटची किल्ली साने वाहिनींकडे असायची. त्या आईला चांगल्या ओळखत असल्यामुळे शिवाय आई विश्वासू असल्यामुळे, त्यांनी आईला पुन्हा उमाताईंच्या फ्लॅटची चावी दिली. डुप्लिकेट किल्लीचा वापर करून आई त्यांच्या घरात शिरली. पण बाहेर गेलेल्या उमाताई बँकेची कागदपत्र विसरल्या म्हणून स्वतःजवळच्या किल्लीने दार उघडून अचानक आत आल्या आणि हा सगळा प्रकार उघडकीला आला. आई सर्वांच्या हाता पाया पडू लागली. नवऱ्याच्या दमदाटीमुळे मी हे केलं माझी चूक मला कबूल आहे. तुमच्या कशालाही हात लावायचा धीर मला झाला नाहीये. मला माफ करा. कामावरून काढा पण पोलिसात जाऊ नका. अशा गयावया केल्या. पण उमाताईंचा मुलगा आणि मुलगी पोलीस कम्प्लेंट करण्याच्या निर्णयावर ठाम होती.

॓फसले ग तुझ्या पप्पांच्या नादाने. मलाही मोह आवरता आला नाही. इतकी वर्ष कष्ट करून अब्रूने राहिले साऱ्याची माती झाली.॔ स्वतःच्या थोबाडीत मारून घेत वत्सलाबाई असहायपणे रडत बडबडत होत्या. सोनलचं काळीज गोठून गेलं होतं. उद्या सकाळी पोलीस दारात येणार या कल्पनेने घाबरून पप्पांनी दारूचा आधार घेतला व उशिरा घरी परतले. पण आता सुटका नाही या भावनेने सोनलला रडूसुद्धा फुटत नव्हतं. सकाळी कसंबसं आवरून खाल मानेने सोनल बाहेर पडली पण झालेला सगळा प्रकार डोळ्यापुढे नाचत होता. विचाराच्या तंद्रीत व लोकांच्या अविश्वासाच्या नजरांना सामोरे जात सोनल जिना उतरून रेल्वे प्लॅटफॉर्मवर आली. पण तितक्यात मागून आलेल्या सुरेखाने तिला घट्ट पकडून तिथल्या एका बाकावर बसवलं. तिला शांत करीत सुरेखा म्हणाली ॓आई वडिलांच्या चुकीचं फळ आपण कशाला भोगायचं? आपण आपली लढाई लढायची. एकदाच मिळणाऱ्या या आयुष्याला पाठ दाखवायची नाही.

सोनल तुला आत्तापर्यंत न सांगितलेली एक गोष्ट सांगते. माझ्या नवऱ्याने त्याच्या गावी एका मुलीशी केंव्हाच दुसरी शादी केली. त्यांना दोन मुलेही आहेत हे समजल्यावर देखील मी हिम्मत सोडली नाही. भाईच्या मदतीने मी इथे स्वतंत्र जागा घेतली. आशेचे धागे तुटून गेले असले तरी मी हिम्मत सोडली नाही. माझं आयुष्य मी सन्मानाने जगणार आहे. तुलाही तुझं आयुष्य संपविण्याचा अधिकार नाही. तू माझ्याबरोबर तिथे राहायला ये. आपण तिथे पार्लर आणि नर्सिंग ब्युरो चालू करू. माझी टिटवाळ्याची जागा सहा महिन्यात पूर्ण होईल. आता थोडी कळ काढ. चल्, आपण स्नेहा मॅडमकडे जाऊ. त्या नक्की तुझी बाजू समजून घेतील याची मला खात्री आहे.

नशिबावर मात करायला निघालेली त्या दोघींची पावलं एकमेकींच्या साथीने निश्चयाने पुढे पडत होती.

समाप्त –

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मैत्र जिवांचे… – भाग – १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ मैत्र जिवांचे… – भाग – १ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

नेहा मॅडमनी सांगितलेलं काम पूर्ण करून पार्लरमधून बाहेर पडायला सोनलला थोडा उशीरच झाला होता. ठरलेल्या कॉर्नरजवळ सुरेखा तिची वाट पाहत होती. हातातली प्लास्टिक बॅग सोनल पुढे करत सुरेखा म्हणाली,

  ॓ आज शेठाणिच्या सुनेने दोन छान ड्रेसेस दिलेत. तुला आवडेल तो घे यातला.॔

 सुरेखा आणि सोनियाची बालपणापासूनची घट्ट मैत्री चाळीतल्या सगळ्यांच्या कौतुकाचा विषय होता. मैत्रीचा धागा अतूट होता. घेतलेली किंवा मिळालेली प्रत्येक गोष्ट वाटून घेण्याची दोघींची सवय कायम होती.

  ॓ बरं झालं तू इथे बोलावलंस ते! खूप दिवसांनी असं भेटायला, बोलायला मिळालं आपल्याला.॔

  ॓ एक बात कहूॅं क्या?॔ मूळची उत्तर प्रदेशची असल्यामुळे सुरेखाच्या तोंडून सहजपणे हिंदी येत असे.

  ॓हो. सांग ना.॔

॓ तुझा तो बॉयफ्रेंड मनोज अलीकडे दुसऱ्या एका मुलीबरोबर भटकताना दिसतो. ये नादान लडके भॅ॑वरे जैसे होते है.॔

  ॓चूक झाली. अगदी कंटाळले होते मी घरातल्या वातावरणाला! एकदा सुनील मार्गाला लागला की तुझ्या लग्नाचं बघता येईल असं घरातील लोक सतत सांगायचे.॔

  ॓पगली है तू. तुझा बॉयफ्रेंड, तुझे आई-बाबा, भाऊ सगळे तुला ब्लॅकमेल करताहेत. तुझी आई चार ठिकाणी घरकाम करते. पण तुझा पप्पा काय करतो? सुनील तरी कुठे स्टडी करतो? माझ्या बड्या भाईने सुनीलला दोन-तीनदा सांगितलं की मी तुला टॅक्सी चालवायला शिकवतो. रविवारी सकाळी येत जा. कुठे आला? मेहनत करायला नको त्याला. उलट तू सांगितलंस की आईकडून भांडून एक हजार रुपये घेऊन मित्रांबरोबर तिरुपतीच्या ट्रीपला गेला. काय बोलणार?॔

  ॓माझं लग्न होईल तेव्हाच मी या सगळ्यातून सुटेन. पण मी ही अशी काळी. सगळ्यांची माझ्या पैशावर नजर. पण रात्री झोपायला सुरक्षित जागा लागते ना म्हणून सगळं सहन करायचं.॔

  ॓माझ्या मॉ ने तर सगळ्यांना मेहनत करून कमवायला शिकवलं. सोनल, तू बारावी पास आहेस. सावळी पण स्मार्ट आहेस. पार्लरमध्ये नोकरीही करतेस. थोडे- थोडे तरी पैसे बँकेत जमा कर. वहीं तेरे काम आयेंगे.॔

 घर जवळ आल्यावर सुरेखा म्हणाली ॓आता मी या रस्त्याने जाते. इकडे नवीन बांधलेल्या टॉवरमध्ये एका घरी रात्रीचं बर्तन साफ करायचं काम करते हल्ली. मेरी पैसेवाली बात ध्यान मे रख. बाय.॔

 सुरेखाला बाय करायला सोनलनेही हात उंचावला. सुरेखाच लक्ष नकळत सोनलच्या उंचावलेल्या हाताकडे गेलं. त्या हातावरची भाजल्याची खूण अजूनही आपलं अस्तित्व दाखवत होती. क्षणभर त्याच्याकडे पाहून सुरेखाने चटकन पुढे होऊन सोनलला गळामिठी मारली. जिव्हाळ्याच्या मैत्रीचा आश्वासक ओलावा त्यात होता. दोघींच्या मनात तो प्रसंग जागा झाला होता. शाळेत असताना एका दिवाळीत सुरेखा नवीन ड्रेस घालून पणतीवर फुलबाजी लावत होती. फुलबाजीची ठिणगी ओढणीवर पडून तिने पेट घेतलेला सुरेखाच्या लक्षात आलं नव्हतं. त्याचवेळी आपला नवीन ड्रेस सुरेखाला दाखवायला आलेल्या सोनलने कसलाही विचार न करता हाताने ती पेटती ओढणी खेचून दूर केली म्हणून सुरेखा जीवानिशी वाचली होती. घाबरलेल्या दोघीजणी नंतर एकमेकींना मिठी मारून रडत राहिल्या. त्यांना शांत करायला, सोनलच्या भाजलेल्या हातावर औषध लावायला सुरेखाची मॉ॑ आणि शेजारी धावून आले होते.

 घराच्या दिशेने जाताना सोनलच्या मनात आलं,॓ गेल्या काही वर्षात किती भराभर बदल होत गेला. स्वप्नातल्यासारखे टॉवर्स उभे राहिले. मनोजच्या बाईकवरून भन्नाट वेगाने जाताना आपणही असाच संसाराच्या स्वप्नांचा टॉवर उभारला होता. मनोजनं बाईक दुसरीकडे वळविल्यावर तोसुद्धा कोसळला. आता काय म्हणे तर लोअर परळला अप्पर वरळी म्हणायचं. ज्यांच्या जीवावर हे टॉवर्स उभे राहिले त्यांच्या नशिबी फक्त माना उंचावून या टॉवर्सचं ॓ दूरदर्शन घेणं आलं.॔ विचारांच्या भोवऱ्यात गरगरत चाळीचा जिना चढून सोनल वर गेली. खोलीच्या दाराशी सँडल्स काढताना तिला आतलं बोलणं ऐकू आलं. रडवेल्या आवाजात आई म्हणत होती, ऀकिती वर्षं काम करतेय मी त्यांच्याकडे. त्यांचा सगळ्यांचा पूर्ण विश्वास आहे हो माझ्यावर. आता हे किल्लीचं असलं काम करायचं म्हणजे…

 ॓ काय झालं पपा?  ॔

॓काही नाही ग. माळ्यावरच्या एका जुन्या ट्रंकेची चावी शोधायला सांगितलय मी तुझ्या आईला.॔

 स्वतःचा विचारात गुंतलेल्या सोनालीचे आईच्या भेदरलेल्या चेहऱ्याकडे लक्ष गेले नाही.

 ताई आणि सुमन यांचं लग्न झालं तेव्हा घरातील परिस्थिती तशी ठीक होती पण बाबांच्या फॅक्टरीत संप सुरू झाला आणि आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. मी आणि सुरेखाने तेव्हा नुकतिच दहावीची परीक्षा आटोपली होती.

 दहावीचा रिझल्ट लागायच्या आधीच सुरेखाचं तिच्या मनाविरुद्ध लग्न करण्यात आलं. जास्त शिकली तर बिरादरीमध्ये कोण लग्न करेल हिच्याशी! सुरेखाच्या वडिलांच्या जुनाट विचारसरणीमुळे, प्रचंड कर्ज काढून सुरेखाच्या लग्नाचा घाट घातला होता. सुरेखाच्या कोरड्या डोळ्यातली उदासी लपत नव्हती. जिवलग मैत्रीण दूर अलाहाबादच्या पुढे सासरी जाणार म्हणून आपण रडत आहोत असं वाटून सर्वजण आपलीही समजूत घालीत होते. सुरेखाला एवढ्यात लग्न करायचं नव्हतं. तिने कॉलेज बघून येण्याचा हट्ट धरला. कॉलेजच्या आवारात हमसाहमशी रडणारी सुरेखा आपल्या डोळ्यापुढे येत होती. दहावीचा रिझल्ट लागण्यापूर्वीच सुरेखा विवाह बंधनात अडकली. तिच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी आपण काही मदत करू शकलो नाही याचं दुःख त्यावेळी आपल्या डोळ्यातून वाहत होतं.

– क्रमशः भाग पहिला 

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भाऊ बामण… ☆ सौ.प्रभा हर्षे ☆

सौ. प्रभा हर्षे

? जीवनरंग ?

☆ भाऊ बामण… ☆ सौ.प्रभा हर्षे

भाऊ बामण गेल्याची बातमी समजली आणि क्षणात मी हताश झालो. काही केल्या डोळ्यातून बाहेर यायला तयारच होईना भाऊ बामण. तसाच डोळ्यांच्या पापणीत घट्ट रुतून बसलेला. कधी काळी त्यानं म्हंटलेला कानात अजूनही तोच आवाज, “तुज्या बापाच्या लग्नाचा आंतरपाट म्याच धरला अन तुजा बी म्याच! तुमच्या आज्ज्या-पंज्ज्या सकट सगळ्यांचं महाळ बी म्याच केलं, पण कधी तुमच्याकडून एक रुपया बी घेतलेला नाय!” माणसं म्हणायची, “झोपलेला देव जागा करण्याची हिम्मत फ़क्त पांडोबाच्या हलगीत अन भाऊ बामणाच्या घंटीतच आहे. ” भाऊ बामण नुसत्या गावाचा बामण नव्हता तर अख्ख्या पंचक्रोशीचा बामण होता. तांबडं फुटायच्या आधीच जाग यायची त्याला. अगोदर भाऊ बामण जागा व्हायचा मग जाग यायची गावाला. अंधारात गोठ्यातली रिकामी बादली घेऊन मंदिरापुढच्या आडावर हजर व्हायचा भाऊ बामण. राहाटावरून खाली बादली सोडून साखर झोपेत असलेलं पाणी शेंदायचा भाऊ बामण. कितीही कडाक्याची थंडी असो, पावसाची कितीही उभी धार असो, तरीही थंड पाण्याने गावात पहिली अंघोळ उरकायचा भाऊ बामण. कडाक्याच्या थंडीत उघड्या अंगावर दानवं घातलेला भाऊ बामण गावच्या देवळातली ठण-ठण आवाज घुमवत जेव्हा पहिली घंटा वाजवायचा, तेव्हा कुठे जाग यायची गावाला. माणसं म्हणायची, “गड्या भाऊ बामण उठला! पहाट झाली! उठा आता!”

गावात तशी बामणाची मोजून चार घरं. एकाच बुडक्यातली. एकाच रांगेत उभी. छोटीशी बामण गल्लीच. गावच्या प्रमुख मंदिरातील पूजा अर्चा यांच्याकडेच आळी पाळीने येई. कालमानानुसार यातील तीन घरे कायमची शहराकडे स्थलांतरित झाली. गावगाड्यात उरलेला भाऊ बामण मात्र गावाला चिकटून मागं राहिला. कशासाठी राहिला असेल? माहीत नाही. पण वडिलोपार्जित मिळालेल्या शेताच्या तुकड्यात आयुष्यभर तो राबला. नेमका कुणासाठी तो राबला असेल? माहीत नाही. त्यानं त्याचं अख्खं आयुष्य गावकी करण्यातच का घालवलं असेल? ते ही माहीत नाही.

भाऊ बामणानं सबंध आयुष्यात पायाला कधीही चप्पला घातल्या नाहीत. आयुष्यभर तो अनवाणी पायानं जमीन तुडवत आणि सायकलचं पायंडल मारीत राहिला. माणसं म्हणायची, “कोणताही विधी करावा तर भाऊनच!” घाई नाही की गडबड नाही. सगळं कसं त्याच्या हातून शांततेत पार पडणार. भाऊ बामणानं अख्ख्या पंचक्रोशीतील कित्येक पिढ्यांची लग्ने लावली. कित्येक घरात शांततेचे होमहवन पेटवले. कित्येकांचे अभिषेक घातले. कित्येक घरात सत्यनारायणाचे सकळ खंडाचे अध्याय वाचले. कित्येक घरांच्या कुंडल्या जुळवल्या. कित्येक घरांची साडेसाती घालवली. सत्यनारायणाची पूजा वाचताना त्याने एका विशिष्ट लयीत वाचलेली साधू वाण्याची कथा अजून माणसांच्या कानात तशीच घुमते. खरं खोटं माहित नाही पण अजून जुनी माणसं सांगतात, “भाऊ बामणाचा हात जर पिंडाला लागला नसेल तर कावळा सुद्धा शिवायचा नाही पिंडाला!”

बारशापासून ते चौदाव्या पर्यंतचे सर्वच कार्यक्रम अगदी यथासांग पार पाडायचा भाऊ बामण. पितृ पंधरावड्यात तर त्याची सायकल कधी थांबायचं नावच घ्यायची नाही. गावासोबत साऱ्या पंचक्रोशीत महाळ घालायच्या विधीचा मान हा भाऊ बामणालाच असणार. त्याशिवाय वाडवडील जेवले असं म्हणताच यायचं नाही. आता कदाचित तुम्हाला वाटेल की, भाऊ बामणानं त्याच्या आयुष्यात चिक्कार कमाई केली असेल. पण मंडळी, यातलं काहीच त्यानं केलं नाही. मिळेल त्या पसा-मूठ शिदोरीवर त्यानं आयुष्यभर गावगाड्यातली गावकी सांभाळली. मंदिराच्या दानपेटीत कधीही त्याच्या हाताची बोटे शिरली नाहीत की तिजोरीत असलेल्या देवीच्या जुन्या दागिन्यावर त्याची नजर रुतली नाही. की कधी त्याच्या बायकोच्या गळ्यातल्या काळ्या मण्यांचं, सोन्याच्या मण्यात रूपांतर झालं नाही. इतका प्रामाणिक आणि विश्वासू होता भाऊ बामण.

पण त्याचं दुर्दैव हे की भाऊ बामणाला फक्त पाच वर्षेच संसार लाभला. एका सकाळी आडावर धुणं धुवायला गेल्यावर पाणी शेंदताना त्याची बायको आडात पडली. आडावर ओरडून बायकांनी नुसता कल्लोळ उठवला. सगळं गाव आडाकडं पळत सुटलेलं. पण बिन पायऱ्याचा आड. कोणी उडी मारायचं धाडसच करेना. अखेर मातंगवाड्यात कोणीतरी पळत जाऊन निरोप दिला. क्षणाचाही विलंब न लावता पट्टीचा पोहणारा चंदू नाईक आडाच्या दिशेने धावत सुटला. त्याने आडात कपड्यासहीत उडी टाकली. काही वेळातच तळातून रहाटाच्या साखळीला बांधून भाऊ बामणाच्या बायकोचं प्रेत त्यानं वर काढलं. उशीर झाला होता. तिला वर काढल्यावर “आरं रं रं लई वाईट झालं गड्या! नांदनं कडंवर जायाला पायजे व्हूतं! बयो कशी ग घसरलीसं आडात! लेकरानं कुणाला गं आय म्हणून हाक मारावी आता!” म्हणत चंदू नाईक मुळातून हळहळला.

दिवस पुढे सरकले. भाऊ बामण हळूहळू या दु:खातून बाहेर आला. पण त्यानं दुसरं लग्न काही केलं नाही. त्याच्या आई वडिलांसोबत त्यानं लहान पोर वाढवलं. शिकवलं. पोरगं मोठं झाल्यावर ते कामधंद्यासाठी शहराकडे बाहेर पडलं. सगळं काही सुरळीत चालू होतं. पण हळूहळू पोरगं गावाला यायचं कमी झालं. भाऊ बामण गावाकडून पत्र पाठवायचा. सुरुवातीला उत्तर यायचं. पण नंतर-नंतर पत्राला उत्तर येईनासं झालं आणि अशातच एक दिवस गावात कोणी तरी बातमी आणली. ‘भाऊ बामणाच्या पोरानं तिकडंच कुठल्यातरी पोरीशी लग्न केलयं. ’ भाऊ बामणाच्या कानांवर ही बातमी पडली. खात्री करण्यासाठी एक दिवस भाऊ बामण शहराकडे जाऊन आला. माघारी आल्यावर पोराचा नवा संसार सुरळीत आणि सुखाचा चालू असल्याचं त्यानं गावाला सांगितलं. खरं खोटं काय ते भाऊलाच माहीत. काही दिवसातच गाव भाऊच्या पोराला विसरून कामाला लागलं…

… एक-दीड वर्षे उलटलं असेल. अचानक भाऊचा पोरगा मतदानाला म्हणून एकटाच गावाला आला. महिना झाला. दोन-महिने झाले तरी परत जाण्याचे काही नावच घेईना. गावात हळूहळू कुजबुज सुरू झाली. रिकामी डोकी वळवळू लागली. आणि कुठून तरी गावाला खरी बातमी समजली. भाऊ बामणाची सून त्याच्या पोराला घटस्फोट देऊन निघून गेलीय. भाऊनं हळूहळू माणसात उठणं बसणं बंद केलं. अन्न पाण्यावरची त्याची वासनाच उडाली. आजूबाजूच्या गावात जाणंही त्यानं बंद केलं. गावातलं विधीकार्यही त्यानं कमी केलं. काही महिन्यांनी भाऊचा पोरगा पुन्हा शहराकडे वळाला. पण पुन्हा काही तो गावाकडे परतला नाही.

काळ हळूहळू पुढे सरकत राहिला. दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्षे संपत गेली. भाऊचे आई-वडीलही कधीच गेले होते. भाऊ बामणही म्हातारपणाकडे झुकला. मावळतीच्या सावल्या त्याच्या अंगावर कधी चढून बसल्या गावाला कळले सुद्धा नाही आणि एके दिवशी दिवस उगवायला भाऊ बामण गेल्याची बातमी गावभर पसरली. गावातले व्यवहार थांबले. नव्या दुकानांची उघडलेली शटरे पुन्हा झाकली गेली. भाऊ बामणाच्या पडक्या घरापुढं माणसांची तुडूंब गर्दी. माणसं हळहळली. जुन्या आठवणी काढू लागली. काही वेळाने तिरडीवर बांधलेल्या भाऊ बामणाचं प्रेत गावानं उचललं. रडायला जवळचं कोणी आलंच नाही. गावाचा शेवटचा बामण स्मशानात जळून राख झाला. एक वटवृक्ष कायमचा उन्मळून पडला…

… डोक्यात नुसता प्रश्नांचा भडीमार. काळासोबत जे बामण गावगाडा सोडून शहराकडे वळाले ते स्थिरस्थावर झाले. त्यांच्या पुढच्या पिढ्याचं घडलंही असेल आयुष्य? त्यांच्या पुढच्या पिढ्या शिकून गेल्याही असतील देश-विदेशात? भलेही त्यांनी मोठमोठे प्रबंध लिहिले असतीलही. पण त्यात भाऊ बामणासारख्यांना किती स्थान? मंडळी, गावासोबत गावकीला जोडून घेत जे गावगाड्यातल्या प्रथा परंपरा जपत राहिले त्या भाऊ बामणासारख्यांची नेमकी नोंद तरी कुठे? भले नव्या जागतिकीकरणात त्यांनी केलेल्या पूजा अर्चा, होमहवन निव्वळ अंधश्रद्धाही ठरतील? पण त्यांनी ज्या निष्ठेने त्या श्रद्धा जपल्या असतील त्याचं काय?

आयुष्यभर भाऊ बामणानं साऱ्या गावाचे विधी पार पाडले असतील. कित्येकांच्या नावाने पिंड तयार केले असतील. कित्येकांचे चौदावे पार पाडले असतील. पण त्याच्याच मृत्यूनंतर त्याचा स्वतःचा विधी करायला गावाला बामण उरलाच कुठे? अख्ख्या गावाच्या मंडवळ्या भाऊ बामणानं बांधल्या असतील पण स्वतःच्या लेका-सुनाच्या मंडवळ्या बांधण्याचं भाग्य त्याच्या नशिबी आलंच कुठे? मंडळी, हे त्याचं भाग्य म्हणायचं की दुर्भाग्य? मरून जाण्याआधी स्वतःच्या जमिनीची आणि घरादाराची मालकी त्याने पोराच्या नावावर करण्या ऐवजी गावाच्या मंदिर ट्रस्टीच्या नावे का केली असेल? आयुष्यभर त्याने कित्येकांच्या घरात शांततेचे होम पटवले असतील. तितकेच मंत्र म्हटले असतील. पण त्याच्या घरात शांतता नांदायला आलीच कुठे?

शेवटी, गावात आता पहाटेच्या वेळी “ठणsss ठणsss” वाजणारी घंटा नेहमीसारखी वाजत नसेल तेव्हा गावाला आणि मंदिरातल्या देवाला चुकल्या-चुकल्यासारखं वाटत असेल का? नव्या काळात पूजा आरत्या, होमहवन, पिंडदान हे सगळं कालबाह्य होईलही. पण हे सारं प्रामाणिकपणे आणि ज्या निष्ठेने त्यानं गावकीसाठी केलं म्हणून निदान त्याच्या आठवणी तरी कुणाच्या काळजात मागे उरतील का? की ऊठ सूठ आजूबाजूला बामणांना खच्चून शिव्या घालायच्या या नव्या जमान्यात तुम्हीही म्हणाल, “साला एक बामण मेलं म्हणून काय बिघडलं? देशात चिक्कार गर्दी बामणांची…!”

 

लेखक : ज्ञानदेव पोळ

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

 ९८६०००६५९५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ टॅटू… (अनुवादित) इंग्रजी लेखिका : मेलिसा म्याककिनी ☆ मराठी अनुवाद  – श्री मकरंद पिंपुटकर  ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ?

☆ टॅटू… (अनुवादित) इंग्रजी लेखिका : मेलिसा म्याककिनी ☆ मराठी अनुवाद  – श्री मकरंद पिंपुटकर 

(परदेशामध्ये मद्यपान आणि अंमली पदार्थांचे सेवन या व्यसनांची तीव्रता भीषण आहे. अनेकजण यातून बाहेर पडण्यासाठी – व्यसनमुक्त होण्यासाठी प्रयत्न करतात. काहीजण यशस्वी होतात, तर काही पुन्हा पुन्हा त्या व्यसनांच्या विळख्यात सापडतात. आजची कहाणी या व्यसनमुक्तीच्या लढ्याबद्दलची…)

मी एक यशस्वी टॅटू आर्टिस्ट आहे – लोकांच्या अंगावर, त्याच्या आवडीप्रमाणे गोंदवून देतो. पुण्यात कँपात माझा स्टुडिओ आहे. भयंकर बिझी असतो मी. खोऱ्याने पैसा ओढतो, त्याहीपेक्षा महत्त्वाचं, म्हणजे मी अजरामर कलेला जन्म देतो. तुमच्या अंगावरचा मी कोरलेला टॅटू – माझी कला – तुमच्या शरीरावर कायम वास्तव्य करून राहते. एकदा टॅटूचं नक्षीकाम – डिझाईन ठरलं, रंगसंगती ठरली, मी कामाला सुरुवात केली आणि मी माझी सिगारेट शिलगावली, की मग मी माझ्याच धुंदीत असतो.

टॅटू तयार झाला की ग्राहकापेक्षा मलाच जास्त खुशी होत असते. मग ती खुशी सेलिब्रेट करण्यासाठी, सिगारेटचा आणखी एक झुरका ! माणसाला आयुष्यात आणखी काय पाहिजे ?

– – हां, माझ्या गर्लफ्रेण्डला माझं हे असं सिगारेट पिणं आवडत नाही. पण कलाकाराची आणि कलेची नशा काय असते, हे तिला काय समजणार ? आणि अर्थात, मला काही धूम्रपानाचे व्यसन नाहीये. माझा माझ्यावर पूर्ण ताबा आहे. असो.

आज दुपारी ४ वाजता एक महिला माझ्या टॅटू स्टुडिओमध्ये आली. अपॉइंटमेंट नव्हती घेतलेली तिनं. ‘मी तिच्या हातावर एक टॅटू काढू शकतो का ?’ असं तिनं विचारलं.

“कसा टॅटू हवा आहे तुम्हाला ?” थोडा मोकळा वेळ होता माझ्याकडे, म्हणून मी विचारलं.

तिने मला तिच्या फोनवर एक फोटो दाखवला. त्यावर ३९२ आकडा लिहिलेला होता. “ ३९२. माझ्या मनगटावर. साधी काळी शाई. तुम्ही हे आत्ता करू शकता का? ”

– – मी तिच्याकडे पाहिले. ती रडत होती. रडून रडून डोळे लाल झालेले, सुजलेले. हात थरथरत होते.

“ हो, मी ते करू शकतो. पण मी विचारू का – हे ३९२ म्हणजे काय? ”

ती माझ्या खुर्चीवर बसली. तिने एक दीर्घ श्वास घेतला.

– – “ माझी मुलगी – चार दिवस गायब होती, काल मला ती सापडली. ड्रग ओव्हरडोसने तिचा मृत्यू झाला होता. पण मला याची आठवण ठेवायची आहे, की तिने व्यसनमुक्त राहण्याचे खूप प्रयत्न केले होते. तब्बल ३९२ दिवस तिने नशा केली नव्हती. प्रयत्नपूर्वक, संयम ठेवून, ती सलग ३९२ दिवस व्यसनमुक्त राहिली होती. ते ३९२ दिवस – तो निग्रह, ते प्रयत्न महत्त्वाचे होते. ”

काय बोलावे हे मला कळत नव्हते. मी फक्त मान डोलावली. मी टॅटू काढायची तयारी सुरू केली.

– – इकडे ती बोलतच राहिली. तिला मोकळं व्हायचं होतं.

“ बोलणारे बोलतील की तिने पुन्हा ड्रग्स घेतलीच, त्यातच ती मेली. ती अपयशी ठरली. तुम्ही कधीच नशा करणे सोडून देऊ शकत नाहीत. पण ते हे मान्य करणार नाहीत की तिने ३९२ दिवस ड्रग्सना स्पर्शसुद्धा केला नव्हता. ती व्यसनमुक्तीच्या बैठकांना – सभांना गेली होती. तिला नोकरी मिळाली होती. ती पुन्हा चित्रं काढू लागली होती. ३९२ दिवस ती पुन्हा एकदा माझी मुलगी होती. इतरांना फक्त तिचा शेवटचा एक व्यसनाधीन दिवस आठवेल. पण मला तिचे सोबर व्यसनमुक्त ३९२ दिवस आठवतील. ”

… तिचा आवाज कातर झाला. “ हा टॅटू मला तिच्या त्या ३९२ सोनेरी दिवसांची आठवण करून देईल. तिने लढा दिला. हे आकडे मला सांगतील – तिने प्रामाणिकपणे प्रयत्न केला. ”

मी टॅटू पूर्ण केला. साधे आकडे… ३९२. तिच्या मनगटाच्या आतल्या बाजूला. जिथे ती दररोज पाहू शकत होती.

तिने माझी फी दिली. आणि त्याशिवाय मला खूप जास्त टिप दिली. ती निघून जाऊ लागली. पण अचानक मागे वळली आणि तिनं विचारलं – “ माझं आणखी एक काम कराल का, प्लीज ? या टॅटूचं हे स्टेन्सिल तुम्ही तुमच्या शो-केसमध्ये ठेवू शकाल का? ३९२? आणि जर कोणी इथे व्यसनाशी झुंजत आला असेल किंवा एखाद्याने व्यसनामुळे कोणाला गमावले असेल, तर त्याला तुम्ही हे टॅटू कमी दरात गोंदवून देण्याची ऑफर देऊ शकाल का? मग तो किंवा ती कितीही कमी दिवस व्यसनमुक्त राहिला असला तरी… १०० दिवस. १० दिवस. १ दिवस. किती दिवस हे महत्त्वाचे नाही. पण मनापासून केलेल्या प्रयत्नांची नोंद घेतली जाते हे जगाला कळू द्या. “

– – मी उत्तर देण्यापूर्वीच ती निघून गेली.

मी ते ‘३९२’ चे स्टेन्सिल माझ्या काउंटरच्या मागे एका फ्रेममध्ये ठेवले. त्याखाली लिहिले :

” तुमचे / जीवलगांचे व्यसनमुक्त दिवस गोंदवून घ्या – मोफत. आकडा कितीही लहान असो वा मोठा असो. कोणताही आकडा. कारण तुमचा प्रयत्न महत्त्वाचा असतो, प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. “

… खरं सांगू, मला अजिबात वाटले नव्हते की कोणी या फोटोकडे गंभीरपणे लक्ष देईल.

एका महिलेने तिच्या मुलीच्या सलग ३९२ दिवस व्यसनमुक्त राहण्याची आठवण म्हणून हातावर ३९२ आकडा गोंदवून घेतला होता. तिच्या विनंतीवरून, कोणाला आपल्या / जीवलगांच्या व्यसनमुक्त राहण्याचे आकडे गोंदवून घ्यायचे असले तर ते मी मोफत गोंदवून देईन असा बोर्ड मी माझ्या टॅटू स्टुडिओमध्ये लावला.

– – – आणि तीन दिवसांनी, एक माणूस आत आला. त्याला तो बोर्ड दिसला. तो हमसून हमसून रडू लागला. मला समजेच ना तो का रडत आहे ते…

” तो बोर्ड – तुम्ही १, २७९ गोंदवून देऊ शकाल का? “.. त्याने मला विचारले.

” नक्कीच. कोणासाठी?”

” माझा सख्खा भाऊ. त्याला दारूचे व्यसन होते. पण त्याने शपथ घेतली होती, त्याने निर्धाराने दारू सोडली होती. सलग १, २७९ दिवस – जवळजवळ चार वर्षे त्याने दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नव्हता. दुर्दैवाने गेल्या आठवड्यात एका कार अपघातात त्याचा मृत्यू झाला. दारू सोडलेल्या माझ्या भावाला, एका दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरने उडवले. माझ्या भावाने तिथेच प्राण सोडले. “

… मी मोफत टॅटू काढला. मला मिठी मारून तो ढसाढसा रडला.

– – – बातमी पसरली. इंस्टाग्राम, टिकटॉक, यु ट्यूब, लोकांनी या गोंदवण्याला अमाप प्रसिद्धी दिली.

प्रत्येकाचे वेगळे आकडे, प्रत्येकाची वेगळी कहाणी. ४७ दिवस. ६ दिवस. १, ८२३ दिवस. २ दिवस.

एका महिलेने “१४ तास” टॅटू काढला.

“१४ तास ?” मी आश्चर्याने विचारलं.

“ड्रग्सच्या ओव्हरडोसने मृत्यू होण्यापूर्वी माझ्या मुलाने सलग १४ तास ड्रग्स घेतली नव्हती. प्रत्येकजण म्हणतो की १४ तास हा काही मोठा कालावधी नाही. पण ते खरं नाही. त्याने प्रयत्न केला. १४ तास त्याने प्रयत्न केला. “…

… मी तिच्या खांद्यावर १४ तास टॅटू काढला. ती संपूर्ण वेळ रडत राहिली. काम संपवल्यावर, तिने टॅटू पहिला आणि कुजबुजली, “आता सगळ्या जगाला कळेल की त्याने प्रयत्न केला, त्याने प्रामाणिक प्रयत्न केला. “

काल कोणीतरी आले आणि म्हणाले “शून्य दिवस गोंदवता येईल का ?”

मी चक्रावलो.

“शून्य?”

त्याने होकार दिला.

… “ माझी मुलगी कधीच पूर्णतः व्यसनमुक्त झाली नाही. पण तिने अनेक वेळा ड्रग्स सोडण्याचा मन:पूर्वक प्रयत्न केला. चार वेळा ती व्यसनमुक्ती केंद्रात दाखलही झाली होती. पण तिला ते जमलं नाही. अवघ्या २३ व्या वर्षी तिचे निधन झाले. सगळे म्हणतात की तिने प्रयत्न केले नाहीत. पण तिने केले. तिने खूप प्रयत्न केले. लाखो प्रयत्न. अनंत प्रयत्न. त्या शून्य संख्येखाली एक छोटं इन्फिनिटी (अनंत) “” चिन्ह गोंदवू शकता का? कारण जरी लोकांना दाखवण्यासाठी तिच्याकडे व्यसनमुक्त दिवस नव्हते तरी तिचे प्रयत्न अनंत होते. “

… एरवी मी टॅटू काढायचो, आणि गोंदवून घेणारा रडायचा. आज तो टॅटू गोंदवताना मी रडलो. अनंत चिन्हासह शून्य…. अशा मुलीसाठी जी यशस्वी झाली नाही, पण जिने कधीही प्रयत्न करणे थांबवले नाहीत.

दोन दिवसांपूर्वी एक सतरा वर्षांची मुलगी आली – तिच्या वडिलांसोबत.

“ तुम्ही ९१ दिवस करू शकता का? माझ्यासाठी. मी ९१ दिवस ड्रग्स घेतली नाहीयेत. मला हे लक्षात ठेवायचं आहे. पुढच्या वेळी जेव्हा मला ड्रग्स घ्यावीशी वाटतील तेव्हा मी हा टॅटू पाहीन. मी ९१ पर्यंत पोहोचले होते, मग मी ९२ पर्यंतही पोहोचू शकते याचं भान ठेवण्यासाठी. “

… टॅटू काढून झाल्यावर तिच्या वडिलांनी माझे हात हातात धरले. ” तुझ्या शाईने तू लोकांचे जीव वाचवत आहेस, त्यांना निर्व्यसनी राहण्यास प्रेरणा देत आहेस. “

– – ती मुलगी दर ३० दिवसांनी परत येते. मी तिच्या ९१ आकड्याच्या पुढे एक लहान टॅली मार्क जोडतो. ती आता १५१ दिवसांपर्यंत पोहोचली आहे.

– – – 

मी हे व्यसनमुक्तीचे टॅटू काढू लागलो त्याला वर्ष होऊन गेलं होतं. जिच्यामुळे या उपक्रमाला सुरुवात झाली, ती ३९२ टॅटूवाली आई काल परत आली.

… ” मला तुम्हाला काहीतरी दाखवायचे होते, ” ती म्हणाली. तिने तिचे मनगट दाखवले, त्यावर मी गोंदवलेला ३९२ होता. त्याच्यावर एक नवा नंबर गोंदवला होता, “१. ” फक्त नंबर १.

मी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिले.

ती अश्रू ढाळत हसली.

” माझी मुलगी वारली, त्याला एक वर्ष झाले. एक वर्ष मी तिच्याशिवाय जगले आहे. मला कोणीतरी सांगितले की मी आता माझ्या स्वतःसाठी टॅटू काढावा. लेकीच्या मृत्यूचं हलाहल मी वर्षभर पचवलं त्याची आठवण म्हणून. “

… ती गेली. मी समोरच्या भिंतीकडे पहात राहिलो. व्यसनमुक्तीच्या आकड्यांचे टॅटू – ० पासून, १४ तासांपासून ते ६, २४७ दिवसांपर्यंतचे आकडे… प्रत्येक आकडा अशा व्यक्तीची कहाणी आहे ज्याने प्रयत्न केला. त्यांच्या लढाईची कहाणी आहे. प्रत्येक आकडा महत्त्वाचा आहे. ज्याने व्यसनमुक्त होण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासाठीही आणि त्यांच्या जीवलगांसाठीही.

… आणि ते व्यसनमुक्त दिवस, ते प्रयत्न, तो निर्धार – लक्षात ठेवण्यास पात्र आहेत. चिन्हांकित…. सन्मानित….

मी हे सुरू केले कारण एका दुःखी आईने मला तिच्या मुलीची ३९२ दिवसांची झुंज लक्षात ठेवण्यास सांगितले. आता मला असे शेकडो दिवस आठवत आहेत – अशा शेकडो झुंजी माझ्या मनावर गोंदवल्या गेल्या आहेत. प्रत्येक आकडा मला एकच गोष्ट सांगतो : प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. लढणे महत्त्वाचे आहे. जरी तुम्ही हरलात तरी लढा महत्त्वाचा आहे. फक्त तुमच्यासाठीच नव्हे, तुमच्या जीवलगांसाठीही.

… आणि हा सगळा प्रवास आठवताना, मी स्वतः काय करायला पाहिजे हे अचानक मला लख्ख लक्षात आलं. मी माझ्या गर्लफ्रेंडला बोलावून घेतलं, ती आल्यावर तिला म्हटलं, ” मी एक स्पेशल टॅटू काढतोय, आणि तो काढताना मला तू साक्षीदार हवी आहेस. “

… मी माझ्याच हातावर गोंदवून घ्यायला सुरुवात केली – “१”. तिने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.

“ सिगारेट फुंकणे हेही व्यसन आहे. आजपासून मी सिगरेट सोडली. आणि आजच्या दिवसाची आठवण म्हणून हा टॅटू. “

तिच्या डोळ्यातील अश्रू मला दाद देत होते…

… ३९२ ने सुरू झालेला प्रवास एका आणखी महत्वाच्या टप्प्यावर पोचला होता.

(मेलिसा मॅककिनी यांच्या फेसबुक वॉलवरील कथेचा स्वैर अनुवाद)

अनुवादक / लेखक : मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देवळाबाहेरचे देव… — भाग – २ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

? जीवनरंग ?

☆ देवळाबाहेरचे देव…  — भाग – २ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(‘दुर्गे दुर्घट भारी.. तुजवीण संसारी…

टाळ, झान्जा जोरात खणखणायला लागल्या. त्याच्यात लोकांनी जोरात टाळ्या वाजवून आरती म्हणायला सुरवात केली.) इथून पुढे – – 

रेवतीच्या बाजूला मिसेस नाडकर्णी आणि त्यान्च्या बाजूला नाडकर्णी टाळ्या वाजवून आरती म्हणत होते…

‘जय देवी जय देवी महिषासुरवादिनी.. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी..

आरती टिपेला पोचली असताना मिसेस नाडकर्णी एकदम ओरडल्या.. ‘

‘अहो काय होतंय.. काय होतय…

रेवतीने पाहिले.. मिसेस नाडकर्णी खाली वाकल्या होत्या आणि खाली पडलेल्या नाडकर्णीना उठवत होत्या. रेवती पण खाली बसली आणि तिने पाहिले.. नाडकर्णी निपचित पडले होते आणि मिसेस नाडकर्णी मोठमोठ्याने ‘आरती थांबवा.. आरती थांबवा’ असे ओरडत होत्या. देवकीच्या लक्षात आले.. नाडकर्णीना जास्त बरे नाही आहे आणि त्याना मेडिकल मदत हवी आहे.. चटकन तिने आपल्या बॅग मधून पाण्याची बाटली काढली आणि पाणी हातावर घेऊन त्याचा फटकारा त्यान्च्या तोंडावर मारला. एक.

दोन.. तीन.. पण नाडकर्णी डोळे उघडत नव्हते.. तोपर्यंत त्यान्च्या आजूबाजूच्या लोकांना पण कळले.. एक माणूस आरती म्हणता म्हणता खाली बेशुद्ध पडला आहे.. पटकन त्यातील दोघे पुढे आले आणि त्यानी नाडकर्णीना उचलले आणि बाहेर घेऊन आले आणि बाहेरच्या बाकावर झोपवले आणि लोकांची गडबड सुरु झाली.. लोक ओरडू लागले तशी देवींची आरती आटोपती घेतली..

काही लोक म्हणू लागले.. देवीचे तीर्थ तोंडात घाला.. ते उठून बसतील. पुजाऱ्याने देवीचे तीर्थ नाडकर्णीच्या तोंडात घातले पण ते तोंडातच जाईना.. मिसेस नाडकर्णी मोठमोठ्याने रडू लागल्या आणि त्याचवेळी रेवतीने आपला मोबाईल बाहेर काढला आणि नवऱ्याला फोन लावला..

‘झाली काय आरती.. मी गाडी आणू का?

‘मधुर.. तू पटकन आत ये.. नाडकर्णी आरती म्हणता म्हणता खाली पडलेत बेशुद्ध.. लवकर ये..

मधुरने ऐकले आणि तो गाडीकडे धावला.. त्याने गाडी देवळाच्या बाहेर लावली आणि आपली डॉक्टरबॅग घेऊन तो धावला. गर्दी करुंन राहिलेल्या भक्त मंडळींना त्याने लांब केले आणि स्टेथो त्यान्च्या छातीला लावला… पटकन त्याने बॅगेतून एक गोळी काढली आणि नाडकर्णीचे तोंड उघडून त्यान्च्या जिभेखाली ठेवली आणि तो त्यान्च्या छातीवर बुक्के मारू लागला.

दोन मिनिटांनी नाडकर्णीनी डोळे उघडले तसा तो म्हणाला” तातडीने आयसीयू मध्ये न्यायला पाहिजे.. कुणीतरी यांना उचला आणि माझ्या गाडीत ठेवा..

पटकन दोन माणसे पुढे आली, त्यानी नाडकर्णीना उचलले आणि मधुरच्या गाडीत नेऊन झोपवले.. रेवती आणि मिसेस नाडकर्णीपण गाडीत बसल्या आणि गाडी चालवता चालवता मधुरने डॉ. भागवत हॉस्पिटलमध्ये फोन लावला आणि आयसीयू मध्ये कॉट ठेवायला सांगितली.

..

भागवत हॉस्पिटलच्या बाहेर ट्रॉली ठेवलेलीच होती.. वार्डबॉय तयारीत होते.. त्यांनी चटकन नाडकर्णीना गाडीतून बाहेर काढले आणि स्ट्रेचरवरुन आयसीयू मध्ये नेले, डॉ. मधुर सोबत होताच.. डॉ. भागवत आत आले, त्यांनी बीपी चेक केल आणि हृदयात तीन इंजेकशन मारली आणि मॉनिटरवर ठेवले. ऑक्सिजन जोडला. आता नाडकर्णी श्वस घेऊ लागले.

‘ओके.. मधुर, आता काळजी नाही, ट्रीटमेंट सुरु आहे.. काळजी नाही.. हे तुझे नातेवाईक की काय? स्वतः गाडीतून आणलंस म्हणून विचारले..

‘नाही डॉ. भागवत, हे माझ्या शेजारील बंगल्यात राहतात. आज माझी पत्नी या नाडकर्णीजोडी बरोबर देवीच्या देवळात गेलेली महाआरतीसाठी. मी त्याना सोडायला म्हणून गेलो होतो आणि आरती होईपर्यंत बाहेर कामत मेडिकलमध्ये थांबलो होतो, बहुतेक आरती चालू असताना नाडकर्णी बेशुद्ध झाले आणि खाली पडले.. आत गडबड उडाली.. मला बायकोचा फोन आला म्हणून मी आत गेलो.. माझ्या लक्षात आले अटॅक आलाय.. माझ्याकडे सोरबिट्रेट गोळी असतेच.. मी पटकन त्यान्च्या जिभेखाली ठेवली आणि छातीवर बुक्के मारले..

‘अरे वा.. त्यामुळेच नाडकर्णी वाचले. कारण या आधीपण त्याना अटॅक येऊन गेलाय, हा काय त्यान्च्या ecg मध्ये स्पष्ट दिसतोय. ब्लड प्रेशर वाढलेले होते.. मला वाटते ही मंडळी देवावर जास्त विश्वास ठेवातात आणि मेडिकल सायन्सवर कमी.

‘होय.. दुर्दैवाने हे मला पण माझ्या प्रॅक्टिसमध्ये दिसते.

‘काय असते मधुर, यांचा कधीही न पाहिलेल्या देवावर इतका विश्वास असतो की समज आज तू योगायोगाने देवीच्या देवळाबाहेर होतास ते पण देवीच्या कृपेनें.. असे म्हणून परत देवींची दुप्पट आराधना करत बसतील.

‘पण डॉक्टर.. आपण काय करू शकतो.. वर्षानुवर्षे आपल्या समाजावर झालेले हे संस्कार हे पुसून टाकू शकत नाही ना?

‘नाही हे दुर्दैव आहे.. पण काही वेळा वाईट वाटते.. उदा. ही नाडकर्णी जोडी.. जर कालपासून नाडकर्णीना श्वस घ्यायला त्रास होत असेल.. तर आधी देवीच्या आरतीला जातील की डॉक्टरकडे जातील..

डॉ. भागवत यांचे मॉनिटरवर लक्ष होते..

‘ओके.. मधुर, आता त्त्यांचा Bp स्थिर होतोय, पल्सरेटपण खाली येतोय. पुढे तपासण्या कराव्या लागतील पण त्याला वेळ आहे, आता नाडकर्णी धोक्याच्या बाहेर आहेत.

 डॉ. भागवत बाहेर पडून आपल्या कॅन्सलटिंगरूममध्ये गेले आणि मधुर नाडकर्णीच्या बाजूला बसुन मॉनिटरवर लक्ष ठेवून होता.

डॉ. भागवतनी मिसेस नाडकर्णीना आत बोलावले.. त्यान्च्यासोबत रेवती पण आत गेली.

‘बस रेवती.. तूझ्या आणि मधुरच्या लग्नाला मी आलो होतो, त्यामुळे तुला ओळखले. या मिसेस नाडकर्णी ना.. मिसेस नाडकर्णी, तुमचे मिस्टर आता धोक्याच्या बाहेर आहेत. म्हणजे अजून काही टेस्ट कराव्या लागतील पण त्याला वेळ आहे.. जर टेस्टमध्ये काही सापडले तर पुढील गोष्टी. पण आज ते वाचले कारण डॉ. मधुर ने त्यान्च्या जिभेखाली गोळी ठेवली त्यामुळे. हार्टअटॅकमध्ये सुरवातीची काही मिनिटे महत्वाची असतात. त्यावेळी शांत डोक्याने घरी उपचार केले तर पेशन्ट वाचतो. आज तुमचे मिस्टर वाचले पण त्याना याआधी एक अटॅक येऊन गेलाय आणि त्त्यांचा Bp खूप वाढला होता..

‘हो का? मला..

‘कालपासून त्याना श्वस घयायला त्रास होत होता.. मग तुमच्या शेजारी डॉ. मधुर रहातो त्याला नाही का दाखवायचं? त्याला न दाखवता त्याना देवीच्या देवळात आरतीला घेऊन गेलात? त्या ठिकाणच्या गडबडीने, त्या अगरबत्तीच्या उग्र वासाने त्याना स्वास घेणे अशक्य झाले आणि ते खाली पडले आणि अटॅक पण आला. म्हणजे महत्वाचे काय देव की मेडिकल ट्रीटमेंट?

‘डॉक्टर.. मला एव्हडे सिरीयस असेल असे वाटले नव्हते..

‘त्याना श्वास घयायला जमत नव्हते तरी तुम्हाला वाटले हे फारसे गंभीर नाही. आणि तुम्ही देवीच्या देवळात त्यांना घेऊन गेलात? अशावेळी देवी नाही वाचवत आपल्याला.. तुमचा नवरा वाचला देवळाबाहेरील देवामुळे.

‘देवळाबाहेरचा देव? कोण डॉक्टर? रेवतीने विचारले.

‘देवळाबाहेर असे देव असतात.. ते धावतात अडचणीप्रसंगी. आजच्या प्रसंगात डॉ. मधुर होता देवळाबाहेरचा देव.

‘खरेच डॉ. आज डॉ. मधुर आजूबाजूला नसते तर..

‘मिसेस नाडकर्णी, असे देवळाबाहेरचे देव असतात. ते समाजासाठी झटत असतात. पण आपले दुर्दैव, आशा देवांना समाजाचा आणि लोकांचा पाठिंबा मिळतं नाही. त्यामुळे त्त्यांची शक्ती अपुरी पडते. मोठमोठे उद्योगपती आणि समाजातील बहुतेक मंडळी देवळाना देणग्या देतात, सोने देतात.. त्या पैशाचे काय होते कोण जाणे? कोट्यावधीचे सोने मंदिरात, मशीदीत पडून आहे. अनेक मालमत्ता नावे आहेत.. बहुतेक ठिकाणी त्त्यांचा वापर होत नाही.

‘पण देवळाबाहेरचे देव कोण?

‘आहेत.. अशा देवांना समाजाचा पाठिंबा हवा असतो, मग ते अजून बरेच काही करतील. असे आपल्या राज्यात बाबा आमटे होते, डॉ. अनिल अवचट होते.. डॉ. बाबा आढाव होते.. डॉ. अभय बंग आहेत.. दिनदुबल्या, अपंग लोकांसाठी धडपडले, पण त्त्यांची शक्ती कमी पडली.

‘मग आम्ही काय करावे डॉक्टर?

‘आपण सामान्य माणसे, अशी माणसे दिसतील त्याना मदत करणे.. आम्ही डॉक्टरमंडळी पण अशा उपक्रमाना पाठिंबा देत असतो.. आर्थिक आणि शारीरिक.. मी वर्षातील दहा दिवस डॉ. प्रकाश आमटे यांच्या हॉस्पिटलमध्ये फुकट सेवा देतो.. त्याने मला समाधान मिळते.

एव्हड्यात डॉ. मधुर आत आला..

‘डॉक्टर.. नाडकर्णी शुद्धीत आलेत..

डॉक्टर हसून म्हणाले.. ‘पाहिलेत मिसेस नाडकर्णी.. आपला दवाखाना कधीही बंद न ठेवणारा हा डॉ. मधुर आज आपल्या रोजच्या पेशन्टकडे दुर्लक्ष करून नाडकर्णी यांचा जीव वाचावा म्हणून धडपडतोय, यालाच म्हणतात ‘देवळाबाहेरचा देव…

अशी माणसे समाजात असतात, आपण त्याना ओळखायला हवे.

समाप्त

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देवळाबाहेरचे देव… — भाग – १ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

? जीवनरंग ?

☆ देवळाबाहेरचे देव…  — भाग – १ ☆ श्री प्रदीप केळूसकर

रेवती आंघोळ करून तयार होत होती. तिचा नवरा डॉ. मधुर नाश्ता करत होता, त्याला रेवती म्हणाली..

‘मधुर, माझ्यासाठी आज एक काम कर..

‘काय?

‘बारा वाजता देवीच्या देवळात महाआरती असते, तू आता दवाखान्यात गेलास की साडेअकराला घरी ये आणि मला देवळात सोड..

‘अग पण मला कस जमेल?

‘जमेल.. बाकी पुरुष बघ आपल्या बायकोला घेऊन सायंकाळी फिरायला जातात, हॉटेलात जातात, मॉलमध्ये जातात आणि देवळात पण जातात, तू माझ्याबरोबर कुठे येतोस का?

“अग त्त्यांचे आणि माझे प्रोफेशन वेगळे आहे, मला सायंकाळी दवाखान्यात जायचे असते आणि..

‘आणि नाही बाणी नाही.. पुढचे सर्व मला माहित आहे.. तुला देवळात यायची फारशी इच्छा नसते.. मग आत येऊ नको ना.. मला आरतीला सोड आणि फक्त अर्ध्या तासाने घरी आण. एकदिवस पेशन्ट थोडी वाट बघतील..

‘अग पण.. तुला सोडायला जायला इथून वीस मिनिटे, परत घरी सोडायचे, म्हणजे मला अर्धा तास बाहेर वाट पहात राहायला हवी..

‘मग तू आत का येत नाहीस आरतीला? तेव्हडेच पुण्य…

‘प्रत्येकाची पुण्य मिळविण्याची कल्पना वेगवेगळी असते. तुला देवींची ओटी भरून, आरती करून पुण्य मिळते असे वाटते, मला तसे नाही वाटतं. मला माझ्या पेशन्टना रोगमुक्त करण्याने त्त्यांचे आशीर्वाद महत्वाचे वाटतात..

‘ठीक आहे.. तू येतोस की नाही साडेअकराला ते बोल…

‘मी येईन पण बाहेर बसेन तुझी वाट बघत.. त्या निमित्ताने तो परिसर पहाणे होईल आणि कोणी ओळखीचे भेटले तर..

‘गप्पा? बरोबर..

‘अग गप्पा पण मारायला हव्यात, त्यामुळे समाज कळतो, लोकांना सध्याच्या परिस्थितीबंद्दल काय वाटते हे कळते.. एक भारतीय नागरिक म्हणून लोकांचा आरसा पण पहायला हवा..

‘तू आरसा बघ किंवा आणि काय बघ.. मी साडेअकराला तुझी वाट पहात आहे..

‘ठीक.. मी येतो अकराला..

 डॉ. मधुरने स्कुटर स्टार्ट केली आणि तो दवाखान्यात गेला.

मधुर दवाखान्यात पोचला. आज कोणता तरी सण होता त्यामुळे नेहमीसारखी गर्दी नव्हती. त्याने एप्रन अंगात चढवीला आणि पेशन्ट तपासायला सुरवात केली. अधूनमधून त्याचे लक्ष हातातील घड्याळाकडे जात होते.. साडेअकराला रेवतीला घरी येतो म्हणून सांगितले आहे.. तसे रेवतीला पण फारसे बाहेर जात येत नाही.. एकतर आपले घर शहरापासून लांब आहे आणि दुसरे म्हणजे आपली आई आपल्यासोबत असते.. सध्या ती बहिणीकडे गेली आहे म्हणून नाहीतर तिला एकटीला घरी सोडून रेवती कुठे जात नाही.

सव्वाअकराला डॉ. मधुर बाहेर पडला.. जाताजाता तो मंदाला म्हणाला..

‘मंदा.. मी रेवतीला घेऊन देवीच्या देवळात जातोय.. एक पर्यत येतो.. पेशन्टना सांग डॉक्टर एकनंतर येतील.

आपले साहेब आज बायकोला घेऊन देवळात जात आहेत हे ऐकून मंदाला आश्यर्यच वाटले.

पण काही न बोलता तिने मान हलवली.

मधुर घरी पोचला. त्याने स्कुटर घराबाहेर लावली आणि मोठी चारचाकी बाहेर काढली.. एकतर देवीचे मंदिर सहा किलोमीटरवर होते आणि दुपारचे ऊन होते.. त्याने हॉर्न वाजवताच देवीसाठी ओटी घेऊन रेवती बाहेर पडली, तिने घराला कुलूप केले आणि ती गाडीत बसली.

‘किती दिवसापासून माझ्या मनात होते.. देवींची ओटी भरायची आणि महाआरतीला पण हजर राहायचे.. पण जमतच नव्हते.. माझी आई रोज फोनवर विचारत असते.. देवींची ओटी भरलीस का म्हणून.. पण वेळ यावी लागते म्हणतात ना..

‘आज योग्य वेळ आली काय?

‘अरे, ते बाजूच्या बंगल्यातील नाडकर्णी आहेत ना.. त्या नाडकर्णीना हल्ली बरे नसते.. म्हणून सावित्रीबाई म्हणजे मिसेस नाडकर्णीना देवीला गाऱ्हाणे घालायचे आहे आपल्या नवऱ्याच्या तब्येतीसाठी..

‘बरं मग?

‘आज त्या आपल्या नवऱ्याला घेऊन देवीच्या देवळात जायच्या होत्या.. म्हणजे सकाळीच गेल्या पण त्या.. त्यानी मला विचारले तुम्ही आज देवळात याल का? म्हणजे काय होत.. देवीच्या देवळात जाताना रिक्षा मिळते पण येताना काही वाहन मिळतं नाही, म्हणून त्या म्हणाल्या.. तुम्ही आणि डॉ. मधुर जर आज देवीच्या दर्शनाला आलात तर येताना गाडीची सोय होईल..

डॉ. मधुर हसत म्हणाला. , ‘असं काय? म्हणजे तुम्हाला आज घरचा ड्रायव्हर हवा होता तर..

‘तस नाही रे… मला पण देवीची ओटी भरायचीच होती.. लग्नाला चार वर्षे झाली आणि अजून…

‘त्या करिता डॉ. दीक्षित यांची ट्रीटमेंट सुरु आहे ना.. आणि मध्येच देवी..

‘असुदे.. माझा आहे विश्वास..

मधुरने देवीच्या देवळाजवळ गाडी उभी केली, रेवती त्यातून उतरली आणि देवळाच्या दिशेने चालू लागली, मधुरने गाडी कामत मेडिकलच्या दिशेने वळवली. अशोक कामत त्याचा कॉलेजमधील मित्र, त्याचे या भागात मेडिकल होते.. अशोकने दुकानात येणाऱ्या मधुरकडे पाहिले आणि तो ओरडला..

‘अरे मध्या.. आज दवाखाना बंद ठेवून इकडेकुठे?

‘आली आज मित्राची आठवण.. तुला कुठे येते माझी आठवण?

‘अरे बाबा रोज येते.. तुझे पेशंट या भागात पण आहेत, ते दुकानात येतात तू लिहून दिलेली औषधे घ्यायला.. पण तू या वेळी.. आणि ते पण पेशन्टना सोडून?

‘अरे आज रेवतीला देवीच्या महाआरतीला यायचं होत.. तिला सांगत होतो रिक्षाने जा.. पण तिचे म्हणणे दुपारी या भागात रिक्षा मिळतं नाहीत.. त्यामुळे आज थोडावेळ दवाखान्यातून वेळ काढला आणि तिला इकडे घेऊन आलो..

‘बर.. म्हणजे वहिनी देवळात आणि तू बाहेर..?

‘ज्याला जिथे आवडत तिथे त्याने जावे.. तिला देवळात जायला आवडते मला माणसात मिसळायला आवडते.. तूझ्या दुकानात दहा मिनिटे बसले तर दिल्ली पासून गल्लीपर्यतच्या बातम्या आणि माणसे भेटतात..

‘ये ये.. बर वाटल.. असं म्हणूं कामतने खुर्ची पुढे केली आणि टाळी वाजवून चहाची ऑर्डर दिली

रेवती देवळात गेली.. अजून फार गर्दी नव्हती, तुरळक माणसे होती, आरतीच्या वेळी देऊळ आणि परिसर भरून जायचा. रेवती देवीची ओटी भरायला म्हणून आत आली तेंव्हा तिला नाडकर्णी जोडी दिसली.. दोघे डोळे मिटून देवीचे स्तोत्र म्हणत असावी बहुतेक. रेवतीने देवीची ओटी भरली, पुजाऱ्याने तिला तीर्थ आणि प्रसाद दिला.. तो घेऊन ती मिसेस नाडकर्णीच्या बाजूला बसली.. मिसेस नाडकर्णी तिला बघून हसल्या..

 ‘एकटीच आलीस, डॉक्टर नाही आले काय?

‘आले आहेत, मला दारात सोडल त्यांनी आणि त्त्यांचा मित्र आहे ना कामत केमिस्ट त्याच्यकडे गेलेत..

‘मग आत आले नाहीत ते? ही डॉक्टरमंडळीना बहुदा नास्तिक असतात..

‘मधुरला नास्तिक नाही म्हणता येणार.. तो लहानपणापासून आंघोळ केल्यावर अथर्वशीर्ष म्हणतोच.. सकाळी बाहेर पडताना घरच्या देवांना नमस्कार करतो.. पण मग मात्र कुठल्या देवळात जात नाही की कसला उपास करत नाही. पण त्याचा मला विरोध नसतो. मी उपास करते त्याला तो कधीच काही म्हणत नाही उलट मेडिकल सायन्सच्या दृष्टीने उपास चांगला पण उपासाला साबूतांदूळ किंवा बटाटे खाणे योग्य नसते असे त्याचे म्हणणे.

‘आरती बारा वाजता सुरु होईल.. डॉक्टर बाहेर आहेत ना? इथे रिक्षा मिळतं नाहीत म्हणून विचारले?

‘तो कामतकडे आहे.. आरती झाली की मिसकॉल दे म्हणाला.. मग आपण जाऊ. मिस्टरांची तब्येत कशी आहे?

‘नरमच आहे.. आज देवीचा प्रसाद घेतला की बरे वाटेल..

‘अहो पण ट्रीटमेंट घयायला नको का? अंगावर काढू नका..

‘जाऊ दोन दिवसांनी.. माझा या देवीवर विश्वास आहे. तिचे चमत्कार ऐकलेत मी..

‘ते असुदे.. पण उद्याच त्याना चांगल्या डॉक्टरकडे न्या. मी मधुरला सांगते, तो तुम्हाला चांगला डॉक्टर सुचविल.

एव्हड्यात देवळातील घंटा मोठमोठ्याने वाजायला लागल्या.. मोठी आरती पेटवली गेली आणि झपझप माणसे आरतीसाठी जमा झाली.

आरतीसाठी भक्तमंडळी जमली.. टाळ मृदंग वाजू लागले, लोकांनी टाळ्या वाजून आरती म्हणायला सुरवात केली..

‘दुर्गे दुर्घट भारी.. तुजवीण संसारी…

टाळ, झान्जा जोरात खणखणायला लागल्या. त्याच्यात लोकांनी जोरात टाळ्या वाजवून आरती म्हणायला सुरवात केली.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आत्मनिर्भर — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ मुखवटे — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(ड्रायव्हरने दिलेल्या पत्त्यावर बरोबर कार नेली. एका सोसायटीमध्ये रो हाऊसच्या रांगेत एका बंगल्यासमोर कार उभी राहिली. बाहेरची पाटी मात्र सांगत होती, हे कोणा कर्नल पाटणकर यांचे घर आहे. श्री व सौ पाटणकर.)

इथून पुढे – – 

भार्गवने पुढे होऊन बेल वाजवली. बऱ्याच वेळाने एका मध्यमवयीन बाईनी दार उघडलं. नीटनेटक्या. अंगावर भारी साडी आणि उत्तम रहाणीमान असलेल्या बाईनी दार उघडलं.

“कोण हवंय आपल्याला? मृदु स्वरात त्यांनी विचारलं. भार्गव म्हणाला मकरंद साने इथेच रहातात ना? पत्ता हाच दिलायआम्हाला. ’

हो हो. या ना आत या. ”बाईनी दोघांना घरात घेतलं. हॉलमध्ये बसवलं.

“कोण आलंय ग ममा? ”विचारत आतून पूर्ण दिवस भरत आले असावेत अशी मुलगी बाहेर आली. तिने ढगळ गाऊन घातला होता. साधीसुधी दिसायला अगदीच बेताची पण सरळ वाटणारी मुलगी त्यांना म्हणाली या ना. कोण आपण? ”

भावना चमकलीच तिला बघून”. तुम्ही लीना साने का? मकरंद ची मिसेस? आम्ही त्याच्या पुण्याच्या ऑफिसचे सहकारी. मी भावना वझे आणि हे भार्गव परचुरे”लीनाच्या आईने त्यांना पाणी दिलं.

“ मकरंद जरा बाहेर गेलाय. येईलच इतक्यात. लीनाचे रिपोर्ट्स आणायला गेलाय तो.

फार काळजी घेतो हो तो आमच्या लीनाची. मी आई लीनाची. हा बंगला आमचाच आहे. लीनाचे कर्नल बाबा आता हयात नाहीत. लीना आमची एकुलती एक मुलगी. मकरंदशी लीनाने प्रेमविवाह ठरवला.

मकरंद अनाथ होता गरीबच होता. लीनाच्या वडिलांना हे लग्न मान्य नव्हतं पण लेकीचा हट्ट.!

मग मकरंद घरजावई म्हणून इथे आला. लीना त्याच्या त्या चाळीतल्या एका खोलीत कशी राहू शकली असती? पण मुलगा चांगला आहे हो. ” ममा भडाभडा बोलत सांगत होत्या.

आता लीना म्हणाली, ”कधी बोलला नाही मकरंद मला, की इतकी सुंदर मुलगी त्याची कलिग आहे ते. ”

भावना संकोचून हसली.

लीना म्हणाली “मकरंदचं माझ्यावर जिवापाड प्रेम आहे. मला काही जरी झालं तरी तोच आधी कासावीस होतो. आत्ता सुद्धा स्वतः रिपोर्टस् आणायला गेलाय. म्हणूनच तर रजा घेतलीय त्यानं. फक्त माझ्यासाठी.

“मग लीना, तू कधी नोकरी नाही केलीस का? भावनाने विचारलं.

“ करत होते मी. पण मकरंदला मी नोकरी केलेली आवडत नाही. ‘तू घरी बस. मला बायकांनी बाहेर नोकऱ्या केलेल्या आवडत नाहीत. मी मिळवतोय ना भरपूर? ’ असं म्हणतो तो. ”अभिमानाने लीना म्हणाली.

भार्गव आणि भावनाने नकळत एकमेकांकडे बघितलं.

“ हाच मकरंद ऑफिसमध्ये तावातावाने वाद घालायचा. ‘घरी बायका नुसत्या बसतातच कशा? आपल्या शिक्षणाचा उपयोग नको का करायला? कसल्या या मुली हो. ’.. भावना, मला तुझं फार कौतुक वाटतं हं. आमच्या बरोबरीने पगार मिळवतेस तू. मला नवऱ्याच्या जिवावर आयते बसून खाणाऱ्या बायका अजिबात आवडत नाहीत. ”, मकरंदची सगळी वक्तव्ये आठवली भावनाला.

इथे लीना सांगत होती, मकरंदला तिने नोकरी केलेली आवडत नाही. तेवढ्यात मकरंद आला. त्याला बघूनही आश्चर्य वाटलं भावनाला.

ऑफिसमध्ये टिपटॉप असणारा मकरंद आत्ता गबाळ्या म्हणाव्या अशाच टी शर्ट पँट मध्ये होता.

“ममा, लीनाचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत हो. काळजीचे काहीच कारण नाही. मी डॉक्टरांना भेटून आलो. कारमध्ये पेट्रोल भरलं. आणखी काही आणायचं असलं तर यादी द्या. संध्याकाळी आणतो. ”

“मकरंद उरलेले पैसे ममाकडे दे”. लीना म्हणाली. रिपोर्ट्स आणि पैसे मकरंदने ममांच्या हातात ठेवले.

इतक्यात त्याचं लक्ष समोर सोफ्यावर बसलेल्या भार्गव आणि भावनाकडे गेलं. मकरंद दचकून उभाच राहिला.

… अत्यन्त खऱ्याखुऱ्या आश्चर्याने त्याने विचारलं “तुम्ही इथं कसे? ” त्याला शॉकच बसलेला दिसत होता. आता भार्गव म्हणाला,

“अरे. माझं आपल्या हेड ऑफिस मध्ये काम होतं. तू अशी मधेच अचानक का रजा घेतलीस काहीच समजलं नाही. तर म्हटलं भावनाला, चल भेटून येऊया मकरंदला. ”प्रांजलपणे भार्गव म्हणाला.

ममा म्हणाल्या “अहो. आता मकरंदला कसं जमेल ऑफिसला पुण्याला यायला? लाडक्या बायकोची डिलीव्हरी जवळ आली आता. मी तर म्हणते दे सोडून नोकरी” ममा म्हणाल्या. “काही गरज नाहीये त्याला नोकरीची. माझं ते सगळं लीनाचंच तर आहे. म्हणजे मकरंदचंच. अर्थात माझ्या पश्चात हं.. आत्ता नाही. ”

त्या घरात मकरंदची काय किंमत होती हे दिसलंच की मगाशी. लीनाने उरलेले पैसेही ममाना दे असं फर्मावलं तेव्हाच.

मकरंद घरजावई झाला होता. केवळ याच्या रूपावर भाळून लीनाने याच्याशी लग्न केलेलं दिसलं आणि मग ती म्हणेल, सासू म्हणेल तसं जगणं मकरंदने निमूट स्वीकारलेलं दिसलं भार्गवला आणि भावनाला.

एका नोकराने सगळ्याना चहा आणून दिला. मकरंदची अवस्था अत्यंत अवघड झालेली होती.

भावनाला त्याने सांगितलं होतं, “ माझी बायको दुर्मुखलेली आहे आमचं पटत नाही. मी घटस्फोट घेणार आहे. ”

… आणि आता प्रत्यक्ष चित्र वेगळंच दिसत होतं. चक्क दिवस गेलेले दिसत होते त्याच्या बायकोला.

म्हणे आमचा वर्षानुवर्षे संबंध येत नाही.

माय लेकींनी मकरंदचे अगदी पायपुसणे करून टाकलेले दिसले भावनाला. किती अपराध्यासारखं जिणं जगत होता मकरंद.

चहा संपवून भावना आणि भार्गव जायला निघाले.

“कळव ग लीना बाळ झालं की. ”… मकरंदकडे मुद्दाम बघत भावना खोचून म्हणाली.

“हो तर. येईलच की मकरंद पेढे घेऊन ऑफिसला. ” ममा म्हणाल्या. “ पण मला नाही वाटत तो नोकरी करील. नाही का ग लीना? ”

मकरंद गप्प उभा होता.

“बरंय मकरंद. छान वाटलं तुम्हाला भेटून. ”भार्गव म्हणाला.

त्यांना निरोप द्यायलासुद्धा मकरंद बाहेर आला नाही.

कार मध्ये बसल्यावर भावना आणि भार्गव निःशब्द होते.

भार्गवला मकरंदची दया आली

न राहवून तो भावनाला म्हणाला, ”काय ग हे. इतका चांगला मुलगा पण घरजावई होऊन सगळं गमावून बसलाय. किती सामान्य आहे ग ती लीना. दिसायला याच्या जवळपास तरी आहे का? मूर्ख आहे मकरंद. ”भावना काहीच बोलली नाही. येतानाचा तिचा उत्साह ओहोटीला लागला आता. अचानक भावनाला हसू आलं. ”भार्गव. किती रे गाढव असेन मी. पण मला आता सुटल्या सारखं का वाटतंय? म्हणजे मी खरी गुंतले नव्हतेच रे या मकरंदमध्ये.. ”

भार्गव म्हणाला”भावना, सहाजिकच आहे तुला हा शॉक बसणं. नशीब समज, थोडक्यात बचावलीस तू.

नाहीतर फसलीच असतीस या उनाड माणसाच्या जाळ्यात.

भावना म्हणाली” हो रे भार्गव. किती विश्वास ठेवला मी याच्यावर. काय वाटेल ते सांगत होता आपल्या बायकोबद्दल. प्रत्यक्ष तर ताटाखालचे मांजर आणि गुलाम झालाय त्या चढेल मायलेकींचा. बरं झालं मला तुझ्याबरोबर यायची बुद्धी झाली. म्हणे मी डिव्होर्स घेणार आहे. तोंड बघा. सोकावलाय तिथे रहायला. मग देतोय किंमत त्याची. त्या मायलेकींचा दास होऊन. हा कसला घेतोय डिव्होर्स. ”. भावना म्हणाली.

“भार्गव, मला पश्चाताप होतोय. अशी कशी मी याच्यात अडकले रे? तू परोपरीने सांगूनही माझा तुझ्यावर विश्वास बसला नाही. माझ्यावर विश्वास ठेवशील? मी त्याला मला आजपर्यंत हातसुद्धा लावू दिला नाहीये. बायकांना एक इनर सेन्स असतो, तो सावध करत होता मला, असं म्हण हवं तर. मला माफ कर भार्गव. ”खऱ्या खुऱ्या प्रांजलपणे भावना म्हणाली.

कार फूड मॉलला थांबली. ड्रायव्हर चहा प्यायला उतरला”. भावना चल कॉफी घेऊया मस्त पैकी”. भार्गव म्हणाला. भावना कॉफी टेबल जवळ बसली.

एक मिनिट. आलोच. तू ऑर्डर दे कॉफीची. भावना कॉफीची ऑर्डर देऊन आली.

भार्गव हातात गुलाबाच्या फुलांचा मोठा गुच्छ घेऊन आला. भर मॉल मध्ये गुडघ्यावर बसून तिच्या हातात तो गुच्छ देऊन म्हणाला will you marry me? ”

भावना लाजून लाल झाली. मॉल मध्ये एकच हशा उसळला आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या.

भावना म्हणाली yes dear. i will, i will. ”

भावनाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. एक वृद्ध पारशी बाई म्हणाल्या “डिकरी लकी हायेस बाय. चांगला पोऱ्या आहे हा. बेस्ट लक. हो म्हणून टाक.”

लाजलेली भावना गाडीत जाऊन बसली. हसत हसत भार्गव मागून आला आणि म्हणाला”, माझी ऑफर कायम असणार म्हणालो होतो ना? आपलं पहिल्यापासून प्रेम आहे तुझ्यावर.. ”

त्याला घट्ट मिठी मारून भावना म्हणाली सॉरी. सॉरी माझ्या सगळ्या सगळ्या वेडेपणाबद्दल भार्गव. मला माफ कर मी चुकले. तुला ओळखलंच नाही रे मी. ”भार्गवने तिला जवळ घेऊन तिचे डोळे पुसले. चला आता घरी म्हणाला. कार घराच्या दिशेने धावू लागली.

समाप्त –

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आत्मनिर्भर — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ मुखवटे — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

भावनाला या ऑफिस मध्ये नोकरी मिळाल्यावर तिचा आनंद गगनात मावेना. इतके दिवस तिला एमबीए असूनही मनासारखी नोकरी मिळत नव्हती. या ऑफिसचे जॉइनिंग लेटर आल्यावर भावना मनापासूम खूषच झाली.

पहिल्या दिवशी ऑफिस मध्ये गेल्यावर शेजारच्या क्युबिकल मध्ये बसलेला हसतमुख तरुण हिला बघून बाहेर आला.

हॅलो, मी भार्गव परचुरे. तुमच्या आधी सहा महिने जॉईन झालो. वेलकम टू होरायझन कंपनी.

आपल्याएवढाच असलेला हा हसतमुख तरुण बघून भावनाला हायसं झालं. त्याने सगळ्या स्टाफशी तिची ओळख करून दिली.

हे तुमचं टेबल. त्याने तिला तिचं टेबल दाखवलं आणि तो कामाला निघून गेला.

भावना मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंबातली मुलगी. चार खोल्यांचा साधासुधा फ्लॅट आणि आईवडील भाऊ आणि ही असं कुटुंब.

भावना दिसायला सुरेख स्मार्ट तर होतीच. जरा महत्त्वाकांक्षी आणि उच्च रहाणीची आवड असलेली सुद्धा.

ऑफिसमध्ये भावना चार महिन्यात रुळून गेलीसुद्धा. तिची आणि भार्गवची चांगली मैत्री झाली.

अचानक ऑफिस मध्ये मुंबईहून बदलून एक स्मार्ट तरतरीत तरुण जॉईन झाला. हॅलो मी मकरंद साने.

त्याने सगळ्याना आपली ओळख करून दिली.

किती स्मार्ट होता मकरंद. किती पॉश कपडे होते त्याचे. त्याच्या परफ्यूमने ऑफिसमध्ये सुंदर गंध दरवळला.

मकरंद पण होता एमबीए. भावनाच्या पलीकडेच त्याचे टेबल होते.

आता टिफिन च्या सुट्टीत भार्गव आणि भावनाबरोबर मकरंद पण त्यांना जॉईन झाला. , मकरंदचं घर मुंबईला होतं. इथे मात्र तो एका मित्राबरोबर रूम शेअर करून रहात होता.

“मी पुण्याला कायम नाही रहाणार रे बाबा. लवकर मुंबईला जातो बघ खटपट करून. माझं स्वतःचं सुंदर घर आहे मुंबईला. मकरंद म्हणायचा.

भार्गवपेक्षा भावना पटकन आकर्षित झाली मकरंदकडे. भार्गव ला टाळून बऱ्याच वेळा ती त्याच्या मोटर सायकलच्या मागे बसून लांब लंचला जाई.

भार्गव हे निमूटपणे बघत होता.

भार्गव एकदा म्हणाला”काय भावना,, काय म्हणतोय नवा मित्र?

 बरेच वेळा दिसतेस हल्ली मकरंद बरोबर. लग्न झालंय बरं का त्याचं.

सांगितलं असेलच तुला ना. ”

“भार्गव, बरीच माहिती आहे रे तुला बाकीच्या जगाची. हो, सांगितलं आहे बरं त्याने. ”भावनाला राग आला भार्गवचा.

भार्गव हसला म्हणाला” हे बघ. ते काहीही असो. माझं प्रेम आहे तुझ्यावर. ते काही कमी होणार नाही. करतेस का लग्न माझ्याशी?

आपलं बाबा सगळं सरळसरळ असतं. मी एकुलता एक आहे.. श्रीमंत नाही पण परिस्थिती मस्त आहे आमची. जबाबदारी नाही काही. बघ. विचार कर”.

भावना म्हणाली “, काही नको. मला नाही लग्न करायचं इतक्यात. ”

भार्गव म्हणाला ओके. पण विचार करशील तेव्हा माझं नाव लक्षात असू दे म्हटलं. आपलं प्रेम आहे तुझ्यावर. ”भार्गव हसून तिथून निघून गेला.

भावनाला हसू आलं. तिला भार्गव मनापासून आवडायचा पण आता मकरंदने तिला चांगलीच भूल घातली होती.

त्या दिवशी मकरंद आणि भावना सहज लॉंग ड्राईव्हला गेले.

भावना म्हणाली, काय रे मकरंद, बायको कशी आहे तुझी?

सांगितलं नाहीस मला तिच्याबद्दल काहीही. ”

मकरंदचा चेहरा पडला. ”अग काय सांगायचं, सांगण्या सारखं काहीही नाही ग. अगदी दुर्मुखलेली आणि रडतराव आहे आमची लीना मॅडम. सतत तक्रारी.

मी म्हणून सहन करतोय बरं. पण आमचं अजिबात पटत नाही ग भावना. मला तुझ्यासारखी बायको मिळालीअसती तर किती भाग्यवान ठरलो असतो मी.

मी घटस्फोट घ्यायच्या विचारात आहे. ते सगळं झालं की करशील माझ्याशी लग्न? थांबशील ना माझ्यासाठी? ”मकरंद डोळ्यात पाणी आणून म्हणाला.

भावना म्हणाली, ते बघू नंतर. आधी म्हणतोस तसा नक्की घटस्फोट तर घे”. मकरंद म्हणाला, गेले कित्येक वर्षे माझा तिच्याशी शारीरिक संबंध पण आलेला नाही. त्याही बाबतीत सगळा उजेडच आहे लीनाच्या बाबतीत. ” 

मला तुझ्यासारखी रसिक हुशार आनंदी मुलगी हवी होती ग बायको म्हणून. ”मकरंदने सुस्कारा सोडला. भावनाला त्याच्याबद्दल मनापासून वाईट वाटलं. देव तरी कशा विजोड जोड्या जमवतो ना. तिच्या मनात आलं.

त्या दिवशी ती घरी गेली तर तिला आश्चर्याचा धक्काच बसला.

हॉलमध्ये भार्गव खुशाल तिच्या आईवडिलांशी गप्पा मारत होता.

चहा झालेला दिसत होता.

भावना आल्याबरोबर भार्गव म्हणाला “या या. तुमचीच वाट बघत होतो. आई, चहा द्या ना भावनाला. खूप काम असतं हो हल्ली आम्हाला ऑफिस मध्ये. ’ भावना ओरडून म्हणाली, तू इथं आमच्या घरी काय करतो आहेस भार्गव? ”

भावनाचे वडील म्हणाले, भावना ही काय पद्धत ग तुझी बोलायची?

सॉरी म्हण त्यांना आधी.

समोरच्या गुप्तेकाकांना त्यांचे पार्सल द्यायला आले होते हे. सहज आपलं नाव बघितलं आणि मग तुझं नाव घेऊन म्हणाले, हिच्याच ऑफिस मध्ये मी काम करतो.

आम्हीच बोलावलं त्यांना चहाला. ”

भार्गव हसत होता.

भावना अगदी ओशाळून गेली.

सॉरी हं. मला नव्हतं माहीत. ”ती नरमाईने म्हणाली. होतं असं कधीकधी भावना. भार्गव म्हणाला.

चलो बाय. भेटू पुन्हा म्हणत तो निघून गेला.

आई म्हणाली”, किती चांगला मुलगा आहे ग हा. गुप्ते काका आजारी असतात ना, त्याच्या वडिलांचे मित्र आहेत ते. हा मुलगा त्यांची औषधे न चुकता आणून देतो.

त्याला नव्हतं माहीत ग की हे तुझं घर आहे ते. ”

भावनाला अगदी गिल्टीवाटलं. सॉरी हो बाबा. चुकलंच माझं. ”

उद्या मी सॉरी म्हणेन त्याला पुन्हा. ”

त्या नंतर भावनाचे पंधरा दिवस अगदी गडबडीत गेले. वर्क लोड खूप होतं आणि मकरंद दोन आठवडे रजेवर होता. त्याचेही काम भावनालाच बघायला लागलं. हा मकरंद फोनसुद्धा का उचलत नाहीये म्हणून चिडचिड झालीच होती तिची.

त्या दिवशी लंचब्रेक मध्ये भार्गव म्हणाला, मला ऑफिसच्या कामासाठी पुढच्या आठवड्यात मुंबईला जावं लागणार आहे आपल्या हेड ऑफिसला.

भावना येतेस का तू पण मुंबईला? टाक की एक दिवस रजा.

माझं काम झालं की मस्त हिंडू. आणि आणखी एक तुला आवडेल असं काम.

ऑफिसमधून मकरंदचा पत्ता घेऊ आणि त्याला सरप्राईज म्हणून भेटून पण येऊ. आवडेल तुला? ”भार्गवने तिला आवर्जून विचारलं.

भावनाला त्याचं मनापासून कौतुक वाटलं. किती सरळ आहे हा मुलगा. माझी मकरंदशी वाढत असलेली मैत्री बघूनही हा जेलस नाही होत.

भार्गव तिला आणखीचआवडायला लागला.

“खरंच की रे भार्गव. जाऊया का आपण? येते मी तुझ्याबरोबर. मस्त आऊटिंग होईल मला बघ. आणि खरंच भेटून येऊ मकरंदला. सरप्राईज देऊ त्याला. ”भावना आनंदाने म्हणाली.

भावनाने त्या दिवशी रजा टाकली.

भार्गवला ऑफिस मुंबईला जाण्यासाठी कार देणार होतं.

मग तर काय.

भावनाला न्यायला भार्गव तिच्या घरी गेला.

भावना तयार होऊन खाली आली. “माय माय. कसली ग वंडरफुल दिसते आहेस तू या ब्लॅक टाईट्स आणि मरून टॉप मध्ये. मार्व्हलस”.

भार्गवने दिलखुलास पावती दिली.

कार मुंबईच्या दिशेने धावू लागली.

वाटेत गप्पा मारताना भावनाच्या लक्षात आलं किती हुशार आणि बहुश्रुत आहे भार्गव. इंग्लिश आणि मराठीही तो अफाट वाचतो. त्याचे जनरल नॉलेज फारच छान आहे.

नकळत तिच्या मनात आलं, मकरंद किती कमी आहे याच्यापुढे.

सिनेमाशिवाय आणि त्यांच्या गॉसिपशिवाय त्याला कशातच इंटरेस्ट नसतो. फक्त छान कपडे हॉटेलिंग आणि खरेदी यापलीकडे जग नाही मकरंदचं.

भार्गवचं ऑफीसचं काम झालं.

त्याने भावनाला एका सुंदर हॉटेल मध्ये नेलं. समुद्रकाठी असलेलं ते सुंदर हॉटेल, नारळाच्या झावळ्यानी बनवलेल्या छोट्या हट्स. आणि सुंदर जेवण. बरोबर असलेला हा उमदा हुशार तरुण. इतका आनंद आपल्याला आजपर्यंत मकरंदच्या सहवासात अनेक वेळा राहूनही मिळाला नाही असं भावनाच्या मनात आलंच. पण तरीही मकरंद ची मोहिनी काही उतरत नव्हती भावनाच्या मनावरून.

“चला. आता जायचं ना मकरंदच्या घरी? मी ऍड्रेस घेतलाय त्याचा. ” भार्गव म्हणाला.

“हो जाऊया. किती आनंद आणि आश्चर्य वाटेल ना त्याला. ’ भावना म्हणाली.

भार्गव म्हणाला “, मला बघून नाही पण तुला बघून मात्र नक्की होईल आनंद त्याला. ” भावना हसली आणि म्हणाली, “ शेवटी पुरुष ते पुरुषच. चला आता मकरंदच्या घरी.”

ड्रायव्हरने दिलेल्या पत्त्यावर बरोबर कार नेली. एका सोसायटीमध्ये रो हाऊसच्या रांगेत एका बंगल्यासमोर कार उभी राहिली. बाहेरची पाटी मात्र सांगत होती, हे कोणा कर्नल पाटणकर यांचे घर आहे. श्री व सौ पाटणकर.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares