सौ. शामला पालेकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘सत्संग म्हणजे काय?’ – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर

एकदा नारद मुनींनी भगवान विष्णूंना सहज विचारले-

“देवा सत्संग सत्संग म्हणतात

त्याचा एवढा काय हो महिमा”?

यावर देवांनी त्यांना काही एक उत्तर न देता एका कीटकाचा निर्देश करून सांगितले की, “तो कीटक तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल. “

नारद मुनी त्या कीटकाला शोधत

नरकापर्यंत गेले आणि त्यांनी त्या कीटकाला विचारले-

“सत्संगाचे काय फळ आहे, तुला माहीत आहे का? “

कीटकाने त्यांचेकडे एक कटाक्ष टाकला आणि तो मृत झाला.

प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने ते पुन्हा भगवान श्रीविष्णूंकडे आले आणि म्हणाले,

“देवा तो कीटक तर काही बोलल्याविनाच मृत झाला. आता तुम्हीच उत्तर सांगा. “

देवांनी नारदांचे म्हणणे ऐकून घेतले आणि ते म्हणाले,

“तेथे पहा. त्या समोरच्या झाडावर घरट्यात एक नुकतेच जन्मलेले पोपटाचे पिलू आहे. ते तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल. “

नारदमुनी त्या पोपटाचे पिलाजवळ गेले आणि त्यांनी त्यालाही तोच प्रश्न विचारला.

पोपटाचे पिलाने एकदा डोळे उघडून त्यांचेकडे पाहिले आणि त्याने डोळे मिटले ते कायमचेच.

नारद मुनी मनाशीच विचार करू लागले, काय सत्संग करण्याचे फळ मृत्यू आहे? कारण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न केला ते मृत्यू पावले.

अत्यंत दुःखी होऊन ते पुन्हा भगवान श्रीविष्णूंपाशी आले. म्हणाले,

“देवा आपल्याला सांगायचे नसेल तर नका सांगू. पण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न विचारतोय ते मृत होत आहेत.

अजून किती जणांच्या हत्येच्या पापाचे धनी मला करणार आहात? “

तेव्हा देव त्यांना म्हणाले,

“त्याची चिंता तू करू नकोस. तुला खरेच जर या प्रश्नाचे उत्तर हवे असेल, तर ते पहा. नुकत्याच तिथे एका गाईने बछड्याला जन्म दिलाय. तो बछडा तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल. “

दुःखी अंतःकरणाने नारदांनी तेथे जाऊन त्या बछड्याच्या कानाशी लागून त्यालाही तोच प्रश्न केला.

त्यानेही दृष्टी वळवून त्यांचेकडे पाहिले आणि ते तेथेच लुढकले.

नारद मुनी घाबरून देवांकडे परत आले. तथापि त्यांना पुन्हा एकदा आश्वासित करून भगवान श्रीविष्णु म्हणाले,

“एका राज्यात नुकताच एक राजपुत्र जन्माला आहे. त्याचेकडून तुम्हाला निश्चित या प्रश्नाचे उत्तर मिळेल. “

नारदांनी विचार केला, आता पर्यंत कीटक, पोपट व गाईच्या बछड्याचे मृत्यूने माझ्यावर काही आपत्ती आली नाही, पण राजकुमाराचे जर काही बरेवाईट झाले तर माझे प्राणही संकटात येऊ शकतात.

तथापि देवाचे विश्वासावर ते राजकुमाराकडे गेले आणि त्यांनी धाडस करून राजकुमाराला मांडीवर घेतले आणि पापा घेण्याचे निमित्त करून हळूच त्याचे कानात विचारले-

“सत्संगतीत राहिल्याने काय लाभ होतो? “

प्रश्न ऐकून राजकुमार हसू लागला आणि म्हणाला,

“मुनिश्रेष्ठ, आपण अजून नाही समजलात का?

अहो, आपण पहिल्यांदा मला भेटला तेव्हा मी कीटक होतो. आपण मला हा प्रश्न विचारला आणि मी मेलो आणि पोपट झालो.

नंतर आपल्या दर्शनाने मी घरट्यात मेलो आणि मला गाईच्या बछड्याचा देह प्राप्त झाला.

पुन्हा आपले दर्शन घडले आणि बछड्याचा देह पडून सर्व देहांमध्ये श्रेष्ठ असा हा मनुष्यदेह प्राप्त झाला आणि पुन्हा आपल्या दर्शनाने मला पूर्णत्व प्राप्त झाले.

हे सर्व आपल्यासारख्या संतांचे दर्शनाचेच फळ आहे. ज्यांना आपल्यासारख्या संतांचा सहवास मिळतो ते धन्य आहेत. “

नारदांना त्यांचे प्रश्नाचे उत्तर मिळाले

व सत्संगाचा महिमाही कळला.

“नारायण, नारायण, ” प्रेमाने म्हणत ते देवांकडे आले आणि म्हणाले,

“देवा, जशी आपली लीला अगाध आहे, तशीच आपली समजावून देण्याची पद्धतही दिव्य आहे. “

म्हणून मित्रांनो,

जीवन जगताना संगत ही खूप महत्त्वाची आहे.

बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर,

बाभळीच्या काट्याने त्याची संपूर्ण पाने फाटून जातात.

याउलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर,

लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो.

ज्याप्रमाणे श्रीरामांच्या सहवासात हनुमान धन्य झाले,

श्रीकृष्णांच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला,

याउलट दुर्योधनाच्या सहवासाने कर्ण श्रेष्ठ असूनही त्याचा नाश झाला.

आपण ज्यासोबत राहतो त्याच्या विचारांचा, रहाणीचा, वागणीचा, अंमल हा आपल्यावर होत असतो.

संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दूषित होतात

संगत कशी हवी याचा विचार करावा…

!

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments