मराठी साहित्य – विविधा ☆ काळ आला होता पण ☆ श्री उद्धव भयवाळ

श्री उद्धव भयवाळ

☆ विविधा ☆ काळ आला होता पण … ☆ श्री उद्धव भयवाळ  ☆ 

 स्टेट बँकऑफ हेद्राबादच्या शहागड शाखेतून माझी बदली हिंगोली शाखेला झाल्यामुळे मला एक आठवड्याचा ‘जॉईनिंग पिरियड’ (नवीन शाखेत रुजू होण्यासाठीचा अवकाश ) मिळाला म्हणून मी आणि माझी पत्नी सौ. निर्मला एक आठवड्यासाठी औरंगाबादला घरी थांबलेलो होतो. त्या दरम्यान नऊ ऑक्टोबर २००४ रोजी ही घटना घडली.

माझा मोठा मुलगा मनोज आणि सुनबाई सौ. अर्चना इथेच राहात होते.  मध्यंतरी माझा छोटा अपघात झाल्यामुळे मला भेटण्यासाठी म्हणून छोटा मुलगा रवींद्रही मुंबईहून आदल्या दिवशीच आला होता.

नऊ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान नेहमीप्रमाणे सौ. फिरण्यासाठी बाहेर गेली आणि मी, घरात येऊन पडलेले ताजे वर्तमानपत्र हातात घेऊन वाचू लागलो. मुले साखरझोपेमध्ये होती. साधारणपणे साडेसातच्या दरम्यान सौ. ‘मॉर्निंग वॉक’ हून परत येईल आणि नंतर चहा करील असा अंदाज बांधून मी ब्रश करण्यासाठी बेसिनजवळ गेलो. एका हातात टूथपेस्ट घेतली अन् दुसऱ्या हातात ब्रश घेतला. पण दोन्ही हात जणू गळून गेल्यासारखे झाले. त्यामुळे पेस्ट आणि ब्रश एकत्र येईचना. मी ब्रशवर पेस्ट लावण्याचा प्रयत्न करीत असतांनाच छातीत जोरात कळ आली. मी हातातील ब्रश आणि पेस्ट खाली सोडून दिली अन् पटकन जमिनीवर पाठ टेकली. दोन्ही पाय सरळ केले. तितक्यात माझ्या छातीवर जणू हत्तीने पाय दिल्यासारखे आणि कुणीतरी माझी छाती आवळल्यासारखे वाटले अन् पूर्ण अंग घामाने ओलेचिंब झाले. लगेच माझ्या मनात विचार चमकून गेलाकी, “हीच माझी शेवटची घटका आहे. मी आता मरणार आहे.” त्या क्षणी मी अक्षरश: मृत्यूच्या दारात उभा आहे असे मला वाटले.

मी तशाही स्थितीमध्ये मुलांना हाक मारण्याचा प्रयत्न केला. पत्नी अद्याप फिरून आली नव्हती. मुलांनी आवाज ऐकला आणि दोन्ही मुले वरच्या बेडरूममधून पटकन खाली आली. काय झाले असेल ते त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी मला ताबडतोब कारमध्ये बसवून हेडगेवार रुग्णालयामध्ये हलविण्याची तयारी केली. इतक्यात पत्नीही आली. तिला काहीच कळेना. तिला मुलांनी काहीही न सांगता फक्त गाडीत बसण्यास सांगितले. ती वेळ घरातील सर्वांसाठीच कसोटीची होती. हेडगेवार रुग्णालयामध्ये तिथल्या डॉक्टरांनी मला क्षणाचाही विलंब न लावता ताबडतोब दाखल करून घेतले आणि सॉर्बिट्रेटची गोळी जिभेखाली धरायला लावली. हळूहळू छातीमधल्या वेदना कमी झाल्या आणि मला बरे वाटू लागले.

“इस्केमिक हार्ट डिसीज” असे माझ्या हृद्यरोगाचे डॉक्टरांनी निदान केले. पुढे जवळजवळ आठवडाभर मी हॉस्पिटलमध्ये राहून नंतर घरी आलो. मुलांनी तातडीने मला त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये नेले म्हणून मी मृत्यूच्या दारातून परत आलो. त्या दिवशी काळ आला होता पण वेळ आली नव्हती हेच खरे.

 

© श्री उद्धव भयवाळ

१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी, गादिया विहार रोड, शहानूरवाडी, औरंगाबाद -४३१००९

मोबाईल: ८८८८९२५४८८ / ९४२११९४८५९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ओझं… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ मनमंजुषेतून ☆ ओझं… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

मावळतीच्या उतारावरून परत निघालेला निस्तेज सूर्य रोजच दिसतो खरा. पण आज मात्र त्याला पाहून आपसूकच जाणवलं की, आपलीही गाडी आता उताराच्या दिशेने जायला लागली आहे. गाडीतल ओझं फारच वाढल्याचं आताशा  वाटायला लागलंच होतं; आणि उताराला लागण्याआधी ते हलकं करायला हवंच होतं. मग हिम्मत करून आयुष्याचं जडशीळ गाठोड एक दिवस उघडायला घेतलं. त्याला घातलेल्या गाठींमधली पहिली गाठ लवकर सुटली. हेही माझे, तेही माझे करताकरता किती काय काय साठवून ठेवले होते मीच…. आता या अडगळीची विल्हेवाट लावून टाकायचीच अशा निश्चयाने कामाला लागले. कारण अजून थोडी तरी शक्ती बाकी होती. तीही संपल्यावर, हे प्रचंड ओझं सोबत घेऊनच पुन्हा पुढच्या गाडीत बसावं लागणार याची खात्री होती. पहिली गाठ सोडताच दिसल्या, मीच साठवलेल्या असंख्य वस्तू…… काही गरज म्हणून, काही आवडल्या म्हणून, आणि त्याहीपेक्षा जास्त वस्तू, केवळ हिच्याकडे- तिच्याकडे आहेत, मग माझ्याकडे हव्यातच, या हव्यासापोटी घेतलेल्या ….. पण या वस्तू “दानधर्म” म्हणत वाटून टाकणं फारसं अवघड गेलं नाही. दरवेळी मनावर मोठा दगड ठेवून ते काम त्यामानाने सहज उरकलं.

दुसरी गाठ मात्र जास्तच घट्ट होती. ती सोडवण्यात खूप वेळ गेला. आणि मग तो पसारा कसा आवरायचा कळेचना. त्यात होत्या….. नात्या-गोत्यांमुळे, ओळखी-पाळखींमुळे, कळत-नकळतजमा झालेल्या असंख्य आठवणी… काही जागरूकपणे आवर्जून जपलेल्या, आणि बऱ्याचश्या नकळतच साठत गेलेल्या. तो गुंता सोडवतांना हळूहळू लक्षात आलं की, हा पसारा आवरण्यात वेळ घालवण्याची गरज नाही.  उतारावरून जातांना औपचारिक आठवणी आपोआपच घसरून पडतील. आणि आवर्जून जपलेल्या आठवणी.. सोबत नेण्यासाठीच तर वर्षानुवर्षे जपल्यात. मग ती गाठ हलकेच पुन्हा मारून टाकली.

शेवटची गाठ सोडवताना मात्र दम संपायला लागला. खूप प्रयत्नांती थोडे सैल झालेले काही पदर ओढून पाहताक्षणी प्रचंड दचकले. जणू गारुड्याची पोतडीच होती ती. नको नको त्या मिजासींचे खवले मिरवणारे अहंकाराचे पुष्ट साप, द्वेष-असूया-मत्सर अशा जालीम विषांचे डंख मारायला टपलेले विंचू, मोह-मायेचे गोंडस पण फसवे रूप घेऊन वश करणाऱ्या कितीतरी बाहुल्या, ऐहिक सुखाच्या राशींवर बसून अकारण फुत्कारणारे मदमत्त नाग, आणि लहानशा सुखासाठी सुद्धा सतत वखवखलेल्या इंगळ्या………

बाप रे….. हे इतकं सगळं माझ्याकडे कधी, कसं आणि का साठवलं गेलं होतं ते मलाही कळलंच नव्हतं. पण हे ओझं इथेच उतरवून टाकलं नाही तर जिथे जायचंय ते ठिकाण नक्कीच गाठता येणार नाही, याची मात्र आता उशिराने का होईना, खात्री पटली होती. हा पसारा आवरणे खूपच कठीण आणि वेळखाऊ असणार हे मनापासून उमगल आणि मग चंगच बांधला. सुरुवातीला अशक्य वाटून धीर खचायला लागला होता खरा. पण याच पोतडीत अगदी तळाला जाऊन दडलेली दिव्य अस्त्रे नजरेस पडली……. सतप्रवृत्ती, सारासार विवेक आणि आजपर्यंत कधीच न जाणवलेला स्वतःतला ईश्वरी अंश… अशी कित्तीतरी अनमोल अस्त्रे बाहेर काढून लखलखीत केली आणि त्या इतर घातक गोष्टींना वारंवार चांगलंच झोडपून नेस्तनाबूत करणे सुरू केले. हळूहळू पण निश्चितपणे तो पसारा बराचसा आवरला गेला. यात अतिशय वेळ गेला, अंगातलं त्राणच गेलं हे खरं. पण मन मात्र खूप प्रसन्न झालं. आता गाडीत बसतांना ओझं वाटण्यासारखं काहीच बरोबर असणार नव्हतं. असणार होत्या ठेवणीतल्या प्रसन्न आठवणी, आणि भक्तिभावाची कोरांटीची फुलं ….हो. कोरांटीच. कारण आयुष्य सरत आलं तरी, येतांना आणलेले भक्तीच्या मोगरीचे इवलेसे रोप नीट रुजले आहे का ते पहायचं, त्याला खतपाणी घालायच, हे विसरतांना कारणांची कमी भासलीच नव्हती कधी. आणि आवराआवर करतांना शेवटी, एका कोपऱ्यात तग धरून राहिलेली ही कोरांटी दिसली…. त्या मोगऱ्याच्या जागी. पण तिची फुलेही पांढरीशुभ्र होती, त्यामुळे मन जरा शांतावले.  आणि ज्याच्याकडे जायचं होतं त्याला भेट काय द्यायची हा संभ्रम तर नव्हताच …. मी स्वतःच तर होते ती भेटवस्तू…………..

आता गाडी कधीही आली तरी मी तयार आहे ………..

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अधिक महिमा + ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ अधिक महिमा + ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

मंडळी नमस्कार ??

सध्या कुठला महिना चालू आहे असे कुणी विचारले  तर आपण अगदी पटकन सांगू सप्टेंबर. मराठी महिना कोणता चालू आहे हे ही काहीजण सांगतील. ही जी कालगणना इंग्रजी, मराठी महिन्यांची जी अनेक कालखंडापासून अगदी सुयोग्य पद्धतीने चालू आहे,त्याला गुंफणारा एक दुवा जो साधारण तीन एक वर्षानी येतो तो म्हणजे ‘अधिक मास’/अधिक महिना/ जो आत्ता सध्या चालू आहे. अधिक अश्विन. यासंबंधी अनेक शास्त्रीय/धार्मिक माहिती आत्तापर्यंत तुम्ही वाचली असेल. तर या सदरात थोडं अधिक या अधिक  (+) शब्दाशी आपण कसे परिचित आहोत हे पहायचं?

लहानपणी गणित शिकताना अधिक  (+)  हा शब्द  पहिल्यादा आपण शिकतो. माझ्याबाबतीत बरीचशी बेरीज (अधिक+) असलेली गणिते माझी वजाबाकी असलेल्या गणितापेक्षा जास्त बरोबर आली आहेत किंवा वजाबाकीच्या गणितांपेक्षा बेरीज असलेली गणिते मला जास्त आवडायची . थोडे मोठे होत गेल्यावर परीक्षेत अगदी  इतर विषयाच्या पेपरात  ‘ अधिक + पुरवण्या ‘ लावण्या एवढी मजल मात्र मी मारू शकलो नाही .

अधिक/जास्त/अजून  या गोष्टीशी आपले नाते मानवी स्वभावानुसार  अगदी नैसर्गीक  आहे कारण जन्माला आल्यापासून आपले ‘शारीरिक वय’ हे  वाढतच असते (अधिक+), उणे कधीच होत नाही. ‘मार्केटींग स्कीम’ मध्ये या  ‘अधिक +’ गोष्टीचा अगदी पुरेपूर वापर केलेला दिसतो.  २ गोष्टीवर एक गोष्ट  फ्री (अधिक), अमुक एक गोष्ट अमुक कालावधीत घेतली तर तिसरी एखादी गोष्ट अधिक मिळेल, एखादी  पॉलिसी/ट्रॅव्हल प्लॅन/एखाद्या क्लबची मेंबरशीप घ्या आणि ही (अधिक+) बक्षसे मिळवा इ इ इ

दिवाळी/ होळी साठी  कोकणात सोडण्यात येणार-या जादा (अधिक) रेल्वे, पंढरपूर यात्रेसाठीचा अधिक बसेस, दिवाळीत काही नशीबवान कर्मचा-यांना  मिळणारा बोनस (अधिक)  एखाद्या उत्तम कलाकाराने सादर केलेली कलाकृती याला मिळालेला ‘वन्स मोर’ (अधिक+), शनिवार/रविवार काही  मालिकांचा सादर होणारा एक तासांचा  विशेष (अधिक +) भाग, कुठल्याही मॉल मध्ये सिनेमाच्या तिकिटाबरोबरच खादाडी करण्यासाठी घेतलेला (अधिक +) कॉम्बो पॅक, मराठीतील काही म्हणी जशा ‘ आधीच  उल्हास त्यात फाल्गुनमास ‘ किंवा दुष्काळात तेरावा महिना  यासगळ्या गोष्टीचा  कुठे ना कुठेतरी  ‘अधिक +’  शी संबध येतो असे वाटते. अगदी आजारीपडलो, अपघात  झाला  तर आयुष्यमान  वाढण्यासाठी जिथे आपण पोचतो त्या जागेचे चिन्ह ही ‘+’ हेच असते.  आणि शेवटी ते म्हणतात ना ‘नॉट बट लिस्ट’ का काय ते  राजकारण ?  होय राजकारण या प्रकारातही आपण अनेकदा ‘बेरजेचे राजकारण’ ऐकतो/पहातो की तर असा हा अधिक + महिमा. आपणास आवडला असेल.

तर सन २०२० हे लीप वर्ष असल्याने फेब्रुवारीही १ दिवस अधिक घेऊन आला होता. सर्व जावयांसाठी ‘ अधिक मास ‘ ही पर्वणीच असते असे म्हणतात कारण

अधिक मास, त्यात, कुठलीही तिथी

ताटलीयुक्त ताजे ताजे अनरसे किती?

दोन प्रहरी सासूरवाडीत सोहळा रंगला

तोची आनंदला ग सखे, जावई  भला

. पण कधी कधी वाटत  ही अजून अजून/अधिक अधिक ची हाव ही मर्यादित हवी. एकंदर मिळणा-या गोष्टीत समाधान आहे/ बास आता अजून अधिक नको. किती पळायचे त्या अधिक/अधिक च्या मागे? असे वाटणे ही महत्वाचे . लेखनाचा शेवट सगळ्यांसाठीच ‘धीर’ धरी  असा मोलाचा सल्ला देऊन

होसी का भयकंपित शरसी का शंका

गाजतसे वाजतसे तयाचाच  डंका

जय गोविद जय मुकूंद  जय सुखकारी

धीर धरी धीर धरी जागृत गिरिधारी

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

मैफिल ग्रुप सदस्य

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आगळं वेगळं सुख ☆ सौ. सुनिता अनंत गाडगीळ

 ☆ मनमंजुषेतून ☆ आगळं वेगळं सुख ☆ सौ. सुनिता अनंत गाडगीळ ☆ 

आम्ही दोघेच शिळोप्याच्या गप्पा करत बसलो होतो. सोसाट्याचा वारा सुटला आणि त्यापाठोपाठ पाऊस कोसळला. इतका की आम्हाला एकमेकांचे आवाज ऐकू येईनात. मग आम्ही दोघेच आमच्या नव्या नवलाईच्या दिवसांच्या आठवणी मनातल्या मनात आळवत शांत बसून राहिलो.

तीस वर्षांपूर्वी नवीन लग्न झालं. आम्ही आनंदात चिंब भिजत होतो आणि गळणाऱ्या घरात राहत होतो. कौलारू घर गळतीन भरून जायचं .   ठेवायची पातेली आणि थांबला पाऊस की त्यातलं मळकट पाणी द्यायचं  ओतून. ओली जमीन कोरडी करायची आणि पुन्हा परस्परांच्या प्रेमात चिंब व्हायचं असे ते छान दिवस होते.

दोघांनी मिळून घराच स्वप्न पाहिलं खूप मेहनत घेतली. तेव्हापासूनआमचा आयुष्य घाईगडबडीत झालं. उठा, आवरा, पळा, कामावरून या, झोपा ,आवरा, लवकर पळा असं चुकीचं पण आवश्यक. कारण भविष्यात सुख मिळायला हवं. भविष्याबाबत ची अनिश्चितता आयुष्याच्या नाण्याची दुसरी बाजू असते. अशीच स्वस्त पणाने मी आताही घरात बसले होते. शिळोप्याच्या गप्पात कुठेच अनिश्‍चितता डोकावत नव्हती.  गप्पा सरणाऱ्या नव्हत्याच….. पावसाने थांबलेल्या होत्या. अचानक छतावरून एक पावसाचा  थेंब माझ्या डोक्यात पडला. भांबावून जात मी वरती पाहिले. ज्या घराला तीस वर्षे पुरी झाली होती. त्या वास्तुने आलेला पुराचा तडाखा सोसला होता.  आमच्या घराने गतवर्षी इतक्या पावसाने सुद्धा कुठे गळती झाली नव्हती म्हणून आम्ही दोघेही खूप आनंदात होतो.

मी छताकडे पाहिले .एका कोपऱ्यातून टप टप टप संततधार सुरू झाली होती. ती पाहताना माझे डोळे मिटले. जणू बाहेरचा पाऊस  या डोळ्यात आला होता. आमच्या नव्या संसाराच्या नवलाईच्या दिवसाच्या आठवणी जाग्या करत होता. पंखात बळ आल्यावर आमची पाखरे घरट्यातूनउडून गेली होती.

पुन्हा एकदा दोघेच होतो.

पुन्हा एकदा पाऊस होता.

पुन्हा एकदा छत गळत होतं.

तेच टपटपणारे थेंब नव्हते.   यंदा या अनिश्चित वातावरणात कोणी छताची दुरुस्ती करणार आहे नव्हतं.

नवा पाऊस पडणार होता.

मनाचा आभाळ स्वच्छ करणार होता. काऊच घरटं दुरुस्त होणारच होतं. तोवर आठवणींचे आगळेवेगळे थेंब टपटपत राहणार होते……. राहणार होते.

 

© सौ. सुनिता अनंत गाडगीळ

9420761837

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ झुंबर ☆ सौ. उज्वला सहस्त्रबुद्धे

☆ विविधा ☆ झुंबर ☆ सौ. उज्वला सहस्त्रबुद्धे

आज सन्कष्टी चतुर्थी! सान्गलीच्या गणपती मन्दिराची आठवण आली. ‘झुम्बर’ म्हन्टल की मला सान्गलीचे गणेश मन्दिर डोळ्यासमोर येते. त्या दगडी कमानीतून प्रवेश करून प्रत्यक्ष मन्दिरात गेलं की ते काचेचे झुम्बर लक्ष वेधू न घेत असे. गणेशाची सुबक, सुंदर मूर्ती, प्रसन्न वातावरण आणि मन्दिराचा प्रशस्त अन्तर्भाग !विविध रंगाच्या हन्ड्यानी आणि एका  मोठया

काचेच्या झुम्बराने सजवलेले मन्दिर बघत बसावेसे वाटत असे. गणपतीत आणि सणासुदीला ही झुम्बरे दिवे लावल्यावर लखलखत असत. त्या  मोठया  झुम्बराचा प्रकाश मन्दिर उजळवून टाकत असे.

पूर्वी च्या काळी राजेरजवाड्याच्या महालान्ची, दरबाराची शोभा अशा झुम्बरानी खूपच वाढवली होती. बडोदा, म्हैसूर सारख्या ठिकाण चे राजवाडे पहाताना अशी झुम्बरे राजाच्या रसिकतेचे

आणि ऐश्वर्याचे प्रतीक म्हणून छताला टान्गलेले, दिसत असे. मोन्गलकालीन  कथा असलेल्या सिनेमात सुध्दा अशी काचेची झुम्बरे कौशल्याने वापरलेली असत!

आता हा झुम्बर प्रकार फारसा दिसत नसला तरी दिवाळीत, सणासुदीला, गणपतीच्या सजावटीत अशी झुम्बरे वापरली जातात. झुम्बराचा आकार कधी गोल तर कधी निमुळता होत गेलेला दिसतो. असन्ख्य काचेच्या लोलकानी झुम्बर बनलेले असते. त्यात रन्गीत दिव्याची भर टाकून

ते अधिक सुशोभित केले जाते !

रोषणाईतला हा झुम्बर प्रकार निसर्गातही आपल्याला पहायला मिळतो. जाम्भळ्या, पिवळ्या रंगाची कँशियाची फुले झुबक्यातून झुम्बरासारखी लोम्बकळताना पाहिली की ती नैसर्गिक झुम्बरे मनाला लोभवतात. केशरी फुलांचे गुच्छ ही असेच दिसतात !

आणखी एका ठिकाणी मला हे झुम्बर आवडलं, ते म्हणजे द्राक्षेबागेत !द्राक्षाच्या बागेतत्या मान्डवाखालून फिरताना द्राक्षाचे घोस झुम्बरासारखे आणि ती टपोरी द्राक्षे मण्यासारखी बघून मन हरखून जाते !

निसर्गात अशी वेगवेगळ्या प्रकारची झुम्बरे पहाताना पौर्णिमेच्या रात्री आकाशाच्या छताला चान्दण्यान्ची असन्ख्य झुम्बरे टान्गलेली आणि  त्यामध्ये चान्दोबा एखाद्या चांदव्यासारखा

दिसतो .त्यांच्या कडे बघता बघता माझ्या  मनात विचारांची छोटी छोटी झुम्बरे साकार होऊ लागतात! आठवणीची आणि विचारांची  अशी असन्ख्य झुम्बरे मनाच्या आकाशात लटकलेली

असतात. ती साकार, होऊ लागतात शब्दांच्या रूपात!

एक एक शब्दांची गुम्फण करतांना मनाच्या पटलावर अशा झुम्बरान्ची सुंदर आरास तयार होते. ही शब्द झुम्बरे शब्दात अशी काही उतरतात, की त्यांची एक सुंदर आरास तयार, होते आणि त्यातूनच एखादे कवितेचे किंवा लेखाचे ‘झुम्बर – शिल्प ‘कागदावर उतरते.

 

© सौ. उज्वला सहस्त्रबुद्धे

मो.नं . 8087974168

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लागेबांधे ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆  लागेबांधे ☆ श्री अरविंद लिमये ☆

वेळा सांगून येत नाहीत असं म्हणतात. त्यामुळे येणारा प्रत्येक क्षण, सुखद असो वा दु:खद तो स्थितप्रज्ञतेने स्विकारावा असं म्हणतात. पण ते शक्य होतंच असं नाही. बर्याचदा नाहीच होत. क्षण दु:खाचा, संकटाचा असेल तर नाहीच. अशीच एखादी अप्रिय घटना पुढे येणार्या संकटातलं गांभिर्य कमी करायला निमित्तही ठरु शकते. नव्हे नियतीनेच या घटनांमागचा कार्यकारणभाव नियत केलेला असतो. फक्त ते आपल्याला माहित नसतं एवढंच. पण समजतं, तेव्हा मनाला होणारा  दिलाशाचा स्पर्श,  अंगाची लाहीलाही करणार्या, असह्य

चटके देणार्या उन्हात अचानक थंड गारव्याचा शिडकावा करणार्या ओलसर काळ्या ढगासारखा सुखद भासतो. त्याचीच ही गोष्ट!

२०१६ मधे आम्ही पुण्याच्या  ‘क्वेस्ट टूर्स ‘तर्फे’ सेव्हन सिस्टर्स’

टूरला गेलो होतो. आसाम, मेघालय, अरुणाचल करुन आमचा मुक्काम काझीरंगा अभयारण्याजवळच्या एका लाॅजवर होता. टूरचे अकरा दिवस मजेत गेले होते. चाळीस जणांचा मोठा ग्रूप, पण प्रत्येकाला नावाने ओळखण्याइतका जवळ आलेला. आता नागालॅंड,  मणिपूर, त्रिपुरा होईपर्यंत ओळखी अधिक घट्ट होण्यापूर्वीच ती अप्रिय घटना घडली. त्यामुळे आम्ही जवळ आलो खरे पण असे ‘समदु:खी’ म्हणून. . !

कारण काझीरंगाला दुपारचं जेवण आवरुन आम्ही नागालॅंडसाठी प्रस्थान ठेवलं ती अनपेक्षित अरिष्टाची सुरुवात होती. आम्ही हास्यविनोद,

गप्पा, गाणी यात सर्वजण दंग असणातानाच नागालॅंड बाॅर्डरच्या खूप आधीच एका चेकपोस्टजवळ आमच्या गाड्या अडवण्यात आल्या. टूर मॅनेजर आणि ड्रायव्हर काय झालंय ते पहायला खाली उतरले आणि हताश होऊन परत आले. नागालॅंड बाॅर्डरपासून आत सर्वदूरपर्यंत सशस्त्रपोलिसांचा बंदोबस्त होता. अचानक सुरु झालेल्या आंदोलनाने उग्ररुप धारण केले होते. त्याच दरम्यान एके ठिकाणी बाॅंम्बस्फोट होताच १४४ कलम लागू केले होते. यामुळे पुढे जाणं

शक्यच नव्हते आम्ही पुन्हा मागे फिरुन काझीरंगाच्या त्याच लाॅजवर आश्रयाला आलो. टूरचा मनसोक्त आनंद घेत

असतानाच दूधात मिठाचा खडा पडावा तसं झाल़ं न् सगळ्यांचा आनंद विरजून गेला. इतर सर्वजण अगदी माझी पत्नीसुध्दा स्वत:चं वैषम्य लपवू शकले नव्हते पण मी मात्र स्वस्थचित्त होतो. त्यामागचं खरं कारण जाणवायला पुढे पुलाखालून बरंच पाणी जायला हवं होतं. पण त्याक्षणी मात्र आमच्यापेक्षाही कितीतरी पटीने टूर मॅनेजरच्यासमोर असंख्य प्रश्न आ वासून उभे असल्याचे मला जाणवले. विचार करण्यात वेळ न घालवता त्याने सगळी सूत्रे तत्परतेने हलवायला सुरुवात केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याने क्वेस्टच्या मॅनेजमेंटशी त्वरीत संपर्क साधला. सविस्तर चर्चा करुन टूर पॅकअप करायचा निर्णय घेतला. अशा अपरिहार्य कारणाने

टूर अर्धवट सोडायला लागली तर करारानुसार टूरकंपनी पैसे परत करायला बांधील नसते. तरीही कंपनीमार्फत आम्हा सर्वांची परतीची मूळ रिझर्वेशन्स कॅन्सल करुन कंपनीखर्चाने लगेचची रिझर्वेशन्स लगोलग करुन दिली गेली आणि हिशोबाने होईल ती बाकी रक्कम प्रत्येकाच्या बॅंक खात्यावर थेट जमा करण्याचे आश्वासन दिले. (आणि नंतर ते पाळलेही!)

परतीच्या प्रवासासाठी निरोप घेताना, आनंदाऐवजी असा

विरसच सर्व प्रवाशांच्या मनात होता. अर्थात हे अपरिहार्यही होतंच. म्हणूनच सर्वानी मनाविरुध्द का होईना ते स्विकारलंही.

परतीचा प्रवास सुरु झाला, तरी आरती, माझी पत्नी मात्र गप्पगप्पच होती. तिला बोलतं केलं, तर विषय तोच.

“खूप आधीपासून प्लॅनिंग करुन, एडवांस बुकिंग करुनसुध्दा काय झालं ते पाहिलंत ना?”ती म्हणाली.

“आपण नागालॅंडच्या लाॅजवर चेक इन केल्यानंतर कर्फ्यू लागला असता तर काय करणार होतो आपण?उरलेले दिवस आणि पैसे सगळंच फुकट गेलं असतं आणि आपण पुन्हा अधांतरीच. आत्ता आपण सुखरुप आहोत आणि मार्गीही लागलोय हे महत्वाचं. . “स्वत:चीच समजूत काढल्यासारखं मी बोललो तरी ते खरंही होतंच. पण नियतीने माझ्यापुरता नियत केलेला या घटनेमागचा नेमका कार्यकारणभाव मलातरी तेव्हा कुठे माहित होता?

आम्ही दोघे अकल्पितपणे खूप दिवस आधीच परत आल्याचं पाहून आमच्या दोन चिमुरड्या नातींच्या उत्साहाला तर उधाणच आलं. त्यांच्या त्या बालसुलभ उत्साहात आमचं ट्रीप अर्धवट राहिल्याचं दु:ख नकळत विरुन गेलं. चहापाणी, बॅगा आवरणं, आणि ट्रीपमधे आलेल्या अडचणीबद्दल सविस्तर सगळं सांगणं यात रात्रीची जेवणंही आवरत आली. गप्पात सून भाग घेत असली तरी नेहमीसारखी मोकळी वाटत नव्हती आणि सलील, माझा मुलगा कांहीसा गंभीर. माझं जेवण झालं तसं तो जवळ येऊन बसला.

“बाबा, तुम्ही टेन्शन घेणार नसाल तर एक सांगायचं होतं. ”

“बोल ना, काय झालंय?”

“उदयदादाचा काल कोल्हापूरहून फोन आला होता. पुष्पाआत्याबद्दल”

“तिचं काय?”मी मनोमन चरकलो होतोच. माझ्या आवाजातली थरथर त्यालाही जाणवली असणाराच. . .

ती माझी मोठी बहीण. आम्हा लहान भावंडांसाठी तिने खाल्लेल्या खस्तांवरच तर आमचं स्थैर्य उभं राहू शकलं होतं. तरीही स्वत: कांही केल्याचा टेंभा कधी मिरवला नाहीन. उलट आमच्या लहानसहान गोष्टींचंही कौतुक मात्र उदंड. अतिशय मितभाषी, हसतमुख. माझ्या तर विशेष जवळची. तिला कांही झालं असल्याच्या कल्पनेनेच मी कासावीस झालो.

“तुम्ही ट्रीपला गेला होतात.  तुम्ही तिकडे काळजी करीत रहाल म्हणून तुम्हाला फोन न

करता त्याने काल मला कळवलं होतं. ”

“झालंय काय पण?”

“आत्याच्या डाव्या हाताचं बोट खूप दिवसांपासून दुखत होतं म्हणे. आधी तिने फार लक्ष दिलं नव्हतं. बोटाला थोडी सूज जाणवली तेव्हा मग डाॅ. ना दाखवलं. बरेच दिवस औषध घेऊनही फरक पडेना म्हणून आर्थोपेडिकना दाखवलं.  एक्सरेमधे बोटाच्या हाडाला इन्फेक्शन झाल्याचं दिसून झा्

आलं. आठ दिवसांच्या अॅंटिबायोटीक्सनंतरही सूज वाढलीच. आता बोटाच्या हाडाचा भूगा होऊन इन्फेक्शन वाढत चालल्याने इतर बोटाना त्रास नको म्हणून बोट कापायचं ठरलंय.  दादाने दुसर्या आर्थोपेडिकचं सेकंड ओपिनीयनही घेतलंय आणि दोन दिवसानी सोमवारी आॅपरेशन करायचं ठरलंय. “ऐकता ऐकता मी गंभीर झाल्याचं पाहून सलिल बोलायचं थांबला क्षणभर.

“बाबा, आत्ता नऊच तर वाजलेत.  तुम्ही फोन करता का आत्याला? बोला तिच्याशी. म्हणजे तिला न् तुम्हाला दोघानाही बरं वाटेल. “मी मानेनेच नको म्हंटलं.  “मी उद्या कोल्हापूरला जाऊन येतो. समक्षच भेटतो. त्याशिवाय मलाच चैन पडणार नाही. . “मी शांतपणे सांगितलं खरं, पण ती शांतता वरवरचीच होती. आतून मात्र मी तिळतिळ तुटत होतो. रात्रभर डोळ्याला डोळा नव्हता.  माझ्यासाठी खस्ता खाल्लेल्या,  माझ्यावर उदंड प्रेम करणार्या माझ्या ताईचं माझ्या आयुष्यातल़ं नेमकं स्थान ती संकटात असल्याचं कळल्यानंतर असं

जाणवलं आणि हतबल मी कासावीस होत कूस बदलत राहिलो. तिचं हे दुखणं काय किंवा आॅपरेशनचा निर्णय काय, तिने नेहमीच्याच सहनशीलतेने आणि धिरोदात्तपणे स्विकारला असेलही कदाचित, पण मलाच ते स्विकारता येईना. ट्रीप अर्धवट सोडून यावं लागल्याने मला आधी समजलं तरी. आणखी दोन आठवड्यांनी आलो असतो तर तिचा बोट कापलेला हातच पहावा लागला असता. नुसत्या कल्पनेनेच अंगावर सरसरुन काटाच आला. पण मला आधी समजून तरी उपयोग काय?तिचं बोट मी वाचवू शकणाराय थोडाच?माझ्या हतबलतेने मी अधिकच अस्वस्थ झालो. उलटसुलट विचारांच्या ग्लानीत तरंगत असतानाच माझ्या

मिटू लागलेल्या नजरेसमोर

सांगलीच्याच डाॅ. परांजपेंचा मला आश्वस्त करणारा चेहरा तरळून गेल्याचा भास मला झाला आणि त्याच ग्लानीत झोप कधी लागली समजलंच नाही. सकाळी उशीरा जाग येत असतानाच नजरेसमोर तरळून गेलेला तो चेहरा आठवला न् मी कांहीतरी सापडल्याच्या आनंदाने  ताडकन् उठून बसलो.  मी सावरलोय हे पाहूनसलिललाही बरं वाटलं.

“लगेच चहा घेऊन आवरताय का?कोल्हापूरला जाऊन येऊ लगेच. “ही म्हणाली.

“नाही. . नको. दुपारनंतरच निघू म्हणजे तिचाही आराम होईल. “मी म्हणालो. सकाळी लवकरची अपाॅईंटमेंट घेऊन डाॅ. परांजपेना भेटलो. ताईच्या तक्रारीबद्दल सविस्तर कल्पना दिली.

“मला जखम बघावी लागेल. सगळे रिपोर्टसुध्दा. मगच कांही सांगता येईल. “डाॅ. म्हणाले आणि ते योग्यही होतंच.

“पण आज शनिवार. मी दुपारनंतर तिला भेटायला जाणाराय. तिला आणायचं म्हंटल़ं तर उद्या रविवार. सोमवारी तर ऑपरेशन होणाराय. ”

डाॅ. आमच्या घराजवळच रहातात. त्यामुळे त्यानी रविवारी घरी आलात तरी चालेल असं सांगितलं. मला तर तो शुभशकुनच वाटला.

दुपारच्या कोल्हापूरच्या भेटीत सविस्तर चर्चा झाली. माझ्या आग्रहाखातर त्यांनी डाॅ. परांजपेना भेटायची तयारी दाखवली. दुसर्या दिवशी माझा भाचा न् सून ताईला कारने घेऊन आले. जखम पाहून त्यानी सगळे रिपोर्टस् नजरेखालून घातले. ते काय बोलणार याची जीवाचे कान करुन वाट मी पहात राहिलो.

“बोट वाचेल. पण आत्ता १००% खात्री देत नाही. आत्ता फक्त ८०%. बाकी २०% माझी औषधं सुरू झाल्यानंतर मिळणार्या प्रतिसादावर अवलंबून असेल. तरीही तुमच्या आर्थोपेडिकना विश्वासात घेऊन हे सगळं सांगा. मला खात्री आहे, आॅपरेशन पुढे ढकलायला ते विरोध नाही करायचे. ”

डाॅ. परांजपेनी स्वत: तयार केलेलं एक विशिष्ठ तेल रोज बोटाला मसाज करण्यासाठी दिलं. ड्रेसिंग करायची न् मसाज करायची पध्दत, औषधाच्या गोळ्या घ्यायच्या वेळा, सगळं समजावून सांगितलं. ताईच्या सूनेनं ती सगळी जबाबदारी मनापासून स्विकारली आणि पारही पाडली. पुढे जवळजवळ सहा महिने हे प्रोसेस सुरु होतं. कणाकणानं सुधारणा होत अखेर बोट वाचलं. . !

त्यानंतरच्या प्रत्येक राखीपौर्णिमेला आणि भाऊबिजेला जेव्हा ताई मला ओवाळते तेव्हा त्या निरांजनांच्या प्रकाशात माझ्याही नकळत माझी नजर तिच्या हातातल्या तबकाखाली लपलेल्या त्या बोटाचा वेध घेत रहाते. . !

या घटनेनंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय पण ही आठवण मात्र वाहून नाही गेली. जाणं शक्यही नाही. ट्रीप अर्धवट राहून परत यावं लागण्यात माझ्या न् ताईच्या लागाबांध्यातला एक हळवा धागा नियतीने असा अलगद गु़ंफलेला होता या  जाणिवेच्या दिलासा देणार्या गारव्याने मनाला मिळणारं अनोखं समाधान कधीच न विरणारं आहे. . . !

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जेष्ठ नागरिक दिन ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

☆ मनमंजुषेतून ☆ जेष्ठ नागरिक दिन ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

(काही तांत्रिक अडचणीमुळे  ‘जेष्ठ नागरिक दिन,’ हा  लेख काल लागू शकला नाही. तो आज लावत आहोत. –  ब्लॉग संपादक)

आयुष्यात घडलेल्या घटनांच्या माध्यमातून मला जे काही शिकायला मिळाले किंवा समाजात इतर ठिकाणी पाहावयास मिळाले त्याचेच हे सार. .

एक पिढी आणि दुसरी पिढी. . .  दरम्यान कोसळून पडलेल्या पुलाप्रमाणे घडलेल्या घटनांवर आधारित. .

वार्धक्याने वाकलेल्या खांद्याविषयी. . ज्यावर बसून आपण अनेक गोष्टींचा मनमुराद आनंद लुटला. . कंपवायूने थरथरत असलेल्या हातांनी कधी काळी मुलांना हाताला धरून चालायला शिकविले पडता पडता सावरले त्या हातांनी. . . मुलांना शांत झोप लागावी म्हणून ज्या ओठांनी अंगाई गीत म्हटले. . . त्याच ओठांना आपल्या मुलांकडून “गप्प बसा,  एक शब्दही बोलू नका ” असा धमकीवजा आदेश मिळतो.  हे सत्य आहे. . .  पण जमाना बदलला आहे.  त्याच बरोबर जीवनही बदलले आहे. . .

आमच्या वयाच्या लोकांनी आठवावे? कसे आपण नात्यांमध्ये एकमेकांच्या बंधनात गुरफटलेलो होतो.  आई वडिलांच्या हसर्‍या चेहर्‍यात साक्षात ईश्वराचे रूप बघत होतो.  त्यांच्या चरणी स्वर्ग दिसत होता. . पण आताची पिढी जरा जास्तच हुशार झाली आहे.  आणि खरं सांगायचे झाले तर अगदी प्रॅक्टिकल झाली आहेत. . . आजकालची पिढी (मात्रं काही अपवाद आहे हं बरं ) आई वडिलांना शिडीसमान मानते.  शिडीचा उपयोग फक्त वर जाण्यासाठीच असतो असा त्यांचा झालेला गोड गैरसमज. . . शिडी जुनी झाली की इतर अडगळीच्या वस्तूंबरोबर ती सुद्धा अडगळीत जाते किंवा कधी जाईल याचा भरवसा देता येत नाही. . आपल्या संसाराच्या ह्या रहाटगाडयात मुलांना योग्य संस्कार देण्यात कुठे कमी पडलो की काय? असा प्रश्न उपस्थित राहतो किंवा कळत देखील नाही. .  असो. . . .

जीवन हे एखाद्या वृक्षासारखे असते.  आई- वडील हे काही कुठल्या शिडीच्या पायर्‍या नव्हेत.  तर ते जीवनाच्या वृक्षांचे मूळ आहेत.  झाड कितीही मोठे होऊ दे हिरवेगार राहू दे. . परंतू त्याचे मूळच कापून टाकले तर ते हिरवेगारपणाचच काय ?मग ते समूळ झाडचं नष्ट होईल.

मुलांच्या जीवनातील पहिले पाऊल उचलण्या मध्ये ते मदत करू शकतात तर तीच मुलं आपल्या वृद्ध आई वडिलांच्या लडखणार्‍या पावलांना सावरण्याचा प्रयत्न का करू शकत नाही?  आयुष्यभर आपल्या मुलांच्या सुखाची,  त्यांच्या आरोग्याची कामना करणारे,  त्यांच्या साठी कष्ट करणारे आई वडील या जगात कमी आहेत का? ज्यांच्यासाठी आपल्या आवडीनिवडीला तिलांजली देऊन त्यांना मोठे करणाऱ्या,  समाजात त्यांना मानाचे स्थान प्राप्त करून देणाऱ्या या आई वडिलांना आजच्या पिढीकडून किती उपेक्षा सहन करावी लागते/होते. त्यांना किती कष्टमय जीवन जगावे लागते.  आधार असूनही निराधार अवस्थेत रहावे लागत आहे.  आजकाल तर  असे चित्र पाहावयास मिळत आहे आणि पाहण्यातही आले आहे.  परंतू आजची ही पिढी हे विसरू पहात आहे कि आज ही स्थिती त्यांची झाली आहे तीच परिस्थिती उदया तुम्ही जेंव्हा वृद्ध व्हाल त्यावेळी तुमच्यावरही येणार आहे.

आपण देखील उद्या वृद्ध होणार आहोत.  आपल्यालाही प्रेमाची,  शारिरीक व मानसिक आधाराची गरज भासणार आहे. . . .  म्हणूनच म्हणते वेळीच सावध व्हा. . .

आपल्या वृद्धपकाळासाठी शक्यतो आधीपासूनच तरतूद करून ठेवा. . . जर आपण मुलांचे पालनपोषण करू शकतो तर स्वतःचे पालनपोषण शेवटपर्यंत नाही का करू शकणार?

असा मी मनाला विचारलेला प्रश्न. . . . पण त्याचे उत्तर मात्र अनुत्तरीतच. . .

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

9870451020

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गरज ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी

☆ विविधा ☆ गरज ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆ 

जगण्यासाठी ‘ प्राणवायूची’ गरज! जीवनासाठी ‘जीवनाची’ (पाण्याची) गरज! तसेच उदर भरणासाठी ‘अन्नाचीही’ गरज! लज्जारक्षणासाठी ‘कापडाची’ गरज!

विश्रांतीला ‘रात्रीची’ गरज! नव्या दिवसाच्या सुरुवातीला ‘रवीराजाची’ गरज! एवढ्या मोठ्या ‘संसाराला’ ‘पृथ्वीची’ गरज!

पृथ्वीवरील मानव जात ह्या अस्तित्वासाठी ‘कळात-नकळत सर्व वायू, खनिजे,धातू’ आदींची गरज!

मानवी गरजांसाठी ‘झाडे,पशु,पक्षी ‘ व ‘निसर्गाची’ आदींची हि गरज!

मानव, पशू , पक्षी, जलचर,उभयचर याना वंशवृद्धी साठी ‘प्रजननाची’ गरज!

जन्म दिलेल्या वंशाला कर्तव्य रुपी ‘सांभाळण्याची,घडवण्याची ‘ गरज!

अर्भकाला ‘पान्हयाची’ गरज! ‘वात्सल्याची’ गरज! प्रेमाच्या ‘कुशीची’ व ‘उबेची’ गरज!

कालपरत्वे, ‘शिक्षणाची’ गरज!

हे शिक्षण फक्त पुस्तकीच नव्हे, तर ‘संस्कार, धर्म, नीतिमत्ता, माणुसकी, सामाजिक बांधिलकी, थोर मोठ्यांचा आदर, सर्वांशी नम्रता, प्रेमभाव, सहनशीलता, त्याग वृत्ती, जबाबदारीची जाण, मर्यादा आदीं शिकण्याची गरज! काही वेळेस हे शिक्षण आपोआप मिळत असते–अनुकर्णातून, अनुभवातून। पण एक माणूस म्हणून ह्या सर्व गोष्टी मिळवाण्याची गरज!

नियम व शिस्तीची गरज! मग ती स्वतापूर्ती नसून प्रत्येकाशी संबधीत जोडली जाते!

ह्या सर्व जीवनाचे ‘ रहाट गाडगे! चालवण्यासाठी मुख्यत्वे ‘चलनाची’ गरज!

‘चलन’ मिळवण्यासाठी, ज्ञान, हुशारी, चतुराई, दिवसरात्र धावपळ व कष्टाची गरज!

आपल्याकडचे ज्ञान दुसर्यांना देण्याचीही गरज! शिकण्याबरोबर शिकवण्याचीही गरज!

कचेरीत व इतर कामाच्या ठिकाणी नीटनेटकेपणा, कर्तव्यदक्षता, व्यवहार व शिष्टयाचाराची गरज!

स्वतःच्या आवडी, छंद जोपासणे व त्यातून आनंद मिळवण्याचीही गरज!

मग काहीजण संगीत म्हणतील, ऐकतील, काहीजण काव्य करतील, काही वाद्य वाजवतील, काही चित्रकार होतील,काही जण स्वैर गार झुळूक घेऊनही सुखवतील।  — जीवनाचे अवघड समीकरण सोडवताना , काही turning पॉईंट येतील. त्यावेळी कुठेतरी शांत प्रसन्न संगीत, छंदजोपासणे, समाज कल्याण आवड असणे, व करणे, ह्यातून नव्याने आपण पुन्हा घडत असतो, त्यामुळे हे छंद जोपासणे हि सुद्धा ‘गरजच’!

दैनंदिन जीवनाच्या रेलचालीत, अगदी लहान गोष्टी, वस्तू, माणसे सर्वांची आपल्याला पर्यायाने गरज लागते, भासते।

एकमेकांवर अवलंबून असलेल्या गोष्टी तर ‘गरजे’ शिवाय पूर्ण होऊच शकत नाहीत!

आणि आज प्रत्येक व्यक्ती,नाती,कचेरीत कर्मचारी, कितीही बुद्धिजीवी असुदेत एकमेकांवर, अस्तित्वावर अवलंबून असतो.

सगळं ‘मीच’ करू म्हटलं तर काहीच धड होत नाही. आणि ‘मला कोणाची गरजच नाही’ हे विधान ‘अहं’  पणाने परिपूर्ण असते. हा अहं सोडनेही ‘हितावह’ व गरजेचे असते.

आयुष्यात चालताना पडणे, धडणे, जखम होणे,चटके बसने, हेलकावे खाणे असे विविध  परवानगी आपण विविध कसोट्यातून उतरत असतो, तीही एक ‘गरजच’ त्यातून धडे घेणेही गरजेचे असते ।त्यातून खूप काही शिकत असतो आपण.

मनुष्य योनीत जन्माला येऊन जीवयातील मखमल, हिरवळ टिकवण्यासाठी काही तडजोडी कराव्यात, काही झटकून टाकावे, काही वगळावे, काही स्वीकारावे, मनाला व दुसर्यांना आनंद मिळवा म्हणून कुठलाही राग न ठेवता ‘माफ’ करावे, हि सुद्धा ‘गरज’ क्लेश तुन क्लेश व इतर वृत्ती वाढतात, त्याला वेळीच समजून आळा घालण्याची ‘गरज’.

दुसर्यांचे हित करताना, चिंताताना, आनंद द्यावा व आनंद मिळवावा. हि सुद्धा ‘गरजच’ मारून मुटकून काहीच मिळत नसते, ‘प्रेमानेच प्रेम मिळते’ , ‘प्रेमानेच प्रेम टिकते’ हे प्रेम टिवण्याचीही ‘गरजच’.

© सौ अश्विनी कुलकर्णी

सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दानयज्ञ ☆ सौ. वीणा रारावीकर

☆ विविधा ☆ दानयज्ञ ☆ सौ. वीणा रारावीकर ☆ 

अधिक “अश्विन” सुरू झाला आहे. अधिक महिन्यात दानधर्म करावा असे सांगितले जाते. इतकेच नव्हे, तर अधिक महिन्यातील कोणत्या तिथीला काय दान करावे, याचे नियमही असल्याचे सांगितले जाते. या कालावधीत दान केलेल्या एका रुपायाचे पुण्यफळ दसपटीने मिळते, असेही सांगितले जाते.

संस्कृतमधील एक श्लोक सर्वांनाच परिचित आहे.

शतेषु जायते शूरः सहस्त्रेषु च पण्डितः ।

वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवति वा न वा ॥

शूर माणूस शंभरात एक, पण्डित हजार मध्ये एक, वक्ता दहा हजार मध्ये एक परंतु दाता मिळणे मुश्किल असते.

भारतीय संस्कृती, परंपरा, संस्कार यांमध्ये दानाला अधिक महत्त्व आहे. अगदी रामायण, महाभारत काळापासून दानाचे महत्त्व अधोरेखित झालेले आहे. आजही आपण “दानशूर असावे ते  कर्णासारखे” असेच म्हणत असतो.

दान हे सत्पात्री सुध्दा असले पाहिजे. सत्पात्री दान म्हणजे जे दान आपण देत आहोत ते योग्य व्यक्तीला दिले गेले पाहिजे. जी गोष्ट देत आहोत ती गोष्ट घेण्याची त्याची पात्रता पाहिजे. ज्या वस्तूची ज्या माणसाला गरज आहे, त्याचवेळी ती दिली गेली पाहिजे.

म्हणून दान म्हणजे धन किंवा संपत्ती या स्वरुपातच दिले गेले पाहिजे असे काही नाही. श्रीमंतांकडे देण्यासाठी धनदौलत असेल, तर एखाद्या कलाकाराकडे त्याची कला तर गरीब शिक्षकाकडे त्याचे ज्ञान. रुग्णसेवेला समर्पित डाॅक्टर आणि देशसेवेला अर्पण झालेला सैनिक आपल्या जीवाची आहुती या “दान” यज्ञात करतच असतात. सध्याच्या कोव्हीडच्या महामारीत अनेक लोक आपापल्या परिने दान करत आहेत. एकमेकांना मदत करत आहेत.

आपल्यासारखे सामान्य लोक रक्तदान करतात. मरणोत्तर नेत्रदान करतात. यापेक्षा पुढे जाऊन काही लोक अवयवदान किंवा देहदान करतात. देहदान आपल्याकडे सर्वात प्रथम कोणी केले असेल तर दधीची ऋषींनी. गीतेतील श्लोकाप्रमाणे आत्मा अमर, अविनाशी  असतो.

“नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।

न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।। ”

आत्म्याचे कोणत्याही शस्त्राने टुकडे करता येत नाहीत. अग्निने तो जळत नाही किंवा पाणी त्याला ओला करू शकत नाही. वायू त्याला शोषून घेऊ शकत नाही. माणसाचा मृत्यू झाला की आत्मा एक शरिर सोडून दुसऱ्या शरिरात प्रवेश करतो. मग हे मृत शरिर सुध्दा कोणाच्यातरी उपयोगी पडलं तर किती चांगली गोष्ट आहे.

आपले लाडके कवीवर्य विं.दा. करंदीकर यांनी दानाचे महत्व सांगणारी कविता लिहिली.

“देणार्‍याने देत जावे

घेणाऱ्याने घेत जावे

घेता घेता एक दिवस

देणार्‍याचे हात घ्यावे”

त्यांनी स्वतःसुध्दा देहदान करून समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे. नवीन चांगले डाॅक्टर आपल्याला हवे असतील तर त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक अशी ही गोष्ट आहे. तसेच अवयवदान, त्वचादान यांनी आपण एखाद्याचे प्राण वाचवू शकतो.

आपल्याकडे धार्मिक कार्यातदेखील दान करतात. स्वतःच्या लग्नाच्या पत्रिकेत “अवयवदान, नेत्रदान फाॅर्म भरा, हाच तुमचा आहेर” असे एक-दोन लोकांनी छापले होते. आणि त्याप्रमाणे लग्नसमांरभात संध्याकाळी येणाऱ्या मंडळींना फाॅर्म भरण्यासाठी सोय केली केली होती.

अशा दानयज्ञात आपण आपले नेत्रदान, देहदान, अवयवदान याचे फाॅर्म भरून आहुती टाकली, तर याचे पुण्यफळ हजार पटींनी जास्त मिळेल, असे मला वाटते.

 

© सौ. वीणा आशुतोष रारावीकर

लोअर परेल, मुंबई

(ता.क. – माझ्या आई-वडील दोघांचेही २०१२ साली देहदान केले आहे.)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अब्राहम लिंकन ना पत्र ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ विविधा ☆ अब्राहम लिंकन ना पत्र ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

‘लिंकन साहेब, बऱ्याच वर्षापूर्वी तुम्ही माझ्या सारख्या एका सामान्य शिक्षकाला अतिशय मनापासून जबाबदारी चे पत्र लिहिले होते. तुमच्या गोंडस गोड मुलाला घडविण्याचे काम सोपविताना त्या शिक्षकाला मानाचे स्थान दिले होतेत.

लिंकन साहेब एका कायम स्वरूपी विनाअनुदानीत शिक्षकाचे तळमळीने लिहिलेले हे पत्र वाचाल ना?

तुमचे ते पत्र, तरुणपणी वाचूनच मी मोठ्या ध्येयाने प्रेरीत होवून , जिद्दीने, कष्टाने, एक नाही, दोन नाही, तीन पदव्या मिळविल्या. त्या मिळवताना झालेल्या माझ्या कष्टाची मला फिकिर नाही . पण लिंकन साहेब, त्यासाठी माझ्या आईच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या कधी काढल्या गेल्या, मला समजले नाही . त्या पदव्या मिळवत असताना, माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावरील काळजीचे जाळे मी कधीच विसरू शकत नाही. त्यांना निर्मळ आनंद मी कधी आणि कसा देऊ शकेन याचाच विचार माझ्या मनामध्ये कायम पिंगा घालत असतो.

मात्र लिंकन साहेब, माझ्या या त्रासाचा परिणाम मी माझ्या विद्यार्थ्यावर कधीच होवू देणार नाही . जो थोडा वेळ मला, त्यांना ज्ञानदान करायला मिळतो, तो मी सार्थकी लावतो . त्यांना मनापासून शिकवतो . मला ज्या काही चांगल्या गोष्टी माहिती आहेत, त्या त्यांना समजावून देण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो. त्यांच्या समवेत मला थोडाच वेळ मिळतो, कारण कायम स्वरूपी विना अनुदानीत शाळेत तासिका तत्वावर मीकाम करतो . खरच सांगतो, लिंकन साहेब , माझ्या कामावर मी मनापासून प्रेम करतो.

त्या प्रेमाचा मोबदला, माझ्या आईवडिलांना समाधान देण्यात मला उपयोगी पडत नाही, हीगोष्ट माझ्या मनाला खूप सलते , यातना देते . मात्र यावरती मी विचार करून मार्ग शोधलाय . शाळेमध्ये शिकवून झाल्यावर, माझ्या एका विद्यार्थ्याच्या शेतामध्ये मजूरी करून मिळकत वाढवायचे मी ठरवले आहे. परिश्रम, कष्ट, आणि मेहनत याच्या जोरावर मी आई वडिलांना समाधान देणार आहे . त्यांच्या चेहऱ्यावरील हसू मला पहायचे आहे.

मी एक हाडाचा शिक्षक आहे आणि माझ्या विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर मी कार्यरत रहाणार आहे.

न हरणारा कायम

स्वरूपी

विनाअनुदानीत

शाळेतला एक

शिक्षक.

© सौ.अंजली दिलिप गोखले

मिरज

फोन नंबर ८४८२९३९०११

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares