श्री विश्वास देशपांडे
विविधा
☆ काय हवे? विद्वत्ता की चातुर्य? ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
काय हवे:विद्वत्ता की चातुर्य?
*
माझे एक मित्र आहेत, नाव त्यांचे पंडित.
आणि या पंडित नावाच्या मित्राचा जेव्हा जेव्हा फोन येतो, तेव्हा तेव्हा माझ्या मनात एक विचार येतो आणि लगेच कविवर्य मोरोपंतांच्या एका सुभाषितातल्या ओळींची आठवण होते:
”केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार।
शास्त्रग्रंथविलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार।।”
मी स्वतःशीच हसतो, कारण मोरोपंतांनी ‘पंडित मैत्री’तून मनुष्याला चातुर्य येतं असं सांगितलं आहे. गंमत थोडा वेळ बाजूला राहू देऊ पण माझ्या मनात एक प्रश्न नेहमी घोळत राहतो. तो हा की. मोरोपंत हे स्वतः इतके मोठे विद्वान असूनही त्यांनी या चार मार्गातून मिळणाऱ्या अंतिम फळाला ‘विद्वत्ता’ न म्हणता, ‘चातुर्य’ (Practical Wisdom) असे का म्हटले असेल बरं? त्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षाही काहीतरी अधिक महत्त्वाचे सांगायचे आहे, हे निश्चित!
येथेच विद्वत्ता आणि चातुर्य यातील सूक्ष्म पण महत्त्वाचा फरक स्पष्ट होतो, जो जीवनातील यशाची गुरुकिल्ली आहे. विद्वत्ता आणि व्यावहारिक चातुर्य यातील फरक स्पष्ट करण्यासाठी एक गोष्ट बऱ्याच वेळा सांगितली जाते. आपल्यापैकी बहुतेकांनी ती वाचलीही असेल. एक अत्यंत विद्वान गृहस्थ होते. अनेक शास्त्र आणि ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला होता. एकदा ते नदी ओलांडण्यासाठी एका नावाड्याच्या बोटीत बसले.
नावेत बसल्यावर पंडितजींनी नावाड्याला विचारले, “अरे, तू कधी व्याकरण, तत्त्वज्ञान किंवा धर्मशास्त्र वाचले आहेस का? “
नावाड्याने नम्रपणे उत्तर दिले, “महाराज, मला हे काहीच माहीत नाही. “
पंडितजी उपहासाने म्हणाले, “तुझ्या आयुष्यातील पाव भाग तर व्यर्थ गेला! “
थोडे पुढे गेल्यावर नदीत अचानक वादळ आले आणि बोट डळमळू लागली.
घाबरलेल्या नावाड्याने पंडितजींना विचारले, “महाराज, तुम्हाला पोहता येते का? “
पंडितजी घाम पुसत म्हणाले, “मी फक्त शास्त्रे वाचली आहेत; मला पोहता येत नाही! “
यावर नावाड्याने शांतपणे उत्तर दिले, “महाराज, तुमचे तर पूर्ण आयुष्यच व्यर्थ गेले! कारण ही बोट बुडणार आहे. “
ही कथा आपल्याला सांगते की, केवळ ‘ज्ञान’ (विद्वत्ता) पुरेसे नसते, तर ते ज्ञान आणि त्यासोबत जगण्याचे ‘व्यवहारिक शहाणपण’ (चातुर्य) असणे अधिक महत्त्वाचे आहे. विद्वान माणूस आपल्या विषयात पारंगत असतो, पण अनेकदा तो जगापासून, व्यवहारापासून आणि ‘लोकांच्या स्वभावा’पासून अनभिज्ञ असतो. तो आपल्या ग्रंथसिद्ध भूमिकेवर किंवा नियमांवर ठाम असतो. तो ‘जे योग्य आहे’ तेच करायचा हट्ट धरतो.
याउलट, चतुर माणूस लवचिक भूमिका घेतो. चतुर माणूस आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता परिस्थितीनुसार, वेळेनुसार आणि समोरच्या व्यक्तीनुसार आपली रणनीती बदलतो. ही लवचिकता म्हणजे नैतिकतेचा त्याग नव्हे, तर उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करण्याचे व्यावहारिक ज्ञान आहे. तो ‘काय करायचे आहे’ (Aim) यावर लक्ष केंद्रित करतो, तर विद्वान ‘कसे करायचे’ (Process/Rule) यावर ठाम राहतो. विद्वत्ता आपल्याला ज्ञान देते, पण चातुर्य आपल्याला ते ज्ञान वापरण्याची कला शिकवते.
मोरोपंत वरील श्लोकात चातुर्य मिळवण्यासाठी चार मार्ग सांगतात, आणि ते सर्व केवळ ग्रंथपठणाचे मार्ग नाहीत, तर प्रत्यक्ष जीवनातील अनुभवाचे मार्ग आहेत: देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार आणि शास्त्रग्रंथविलोकन. या चार क्रियांमध्ये मोरोपंत केवळ शास्त्रग्रंथ वाचून पांडित्य मिळवण्याऐवजी, देशाटन, मैत्री आणि सभेतला संचार यांसारख्या प्रत्यक्ष कृतीतून व्यवहारी चातुर्य प्राप्त करण्यावर भर देतात.
चांगदेव महाराजांनी तब्बल १४०० वर्षे तपश्चर्या केली. त्यांची प्रचंड विद्वत्ता आणि कठोर साधना यामुळे लक्षात येते. मात्र, ज्ञानेश्वरांना पाठवलेल्या पत्रात मायना काय लिहावा हे एवढ्या मोठ्या विद्वान संताला कळू शकले नाही. जेव्हा ते संत ज्ञानेश्वरांना भेटायला वाघावर बसून आले, तेव्हा ज्ञानेश्वरांनी त्यांना चक्क भिंत चालवून प्रती-उत्तर दिले. १४०० वर्षांच्या तपश्चर्येनंतरही त्यांना व्यावहारिक शहाणपण (चातुर्य) आले नव्हते, हे या प्रसंगातून स्पष्ट होते.
बिरबल हा अकबराच्या दरबारातील ‘विद्वान’ असण्यापेक्षा ‘चतुर’ (Wise) म्हणून अधिक प्रसिद्ध होता. त्याने दरबारातील गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी मानवी स्वभावाचे अचूक निरीक्षण केले आणि हजरजबाबीपणा वापरला. मानवी मनाचा त्याचा अभ्यास उत्तम होता. त्याचा वापर करण्यातून त्याचे चातुर्य दिसून येते.
श्रीकृष्णाचे जीवन म्हणजे चातुर्याचा आदर्श नमुना आहे, कारण त्यांनी वेळप्रसंगी घेतलेली लवचिक भूमिका. जेव्हा त्यांना जाणवले की बलवान अशा जरासंधासमोर उघडपणे टिकाव लागणे शक्य नाही, तेव्हा त्यांनी आपल्या प्रजेच्या रक्षणासाठी मथुरेहून द्वारकेला स्थलांतर केले. त्याचप्रमाणे, कालयवनापासून बचाव करण्यासाठी त्यांनी रणांगणातून पळ काढला आणि प्रसंगी ‘रणछोड’ हे नाव आनंदाने स्वीकारले. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने ‘युद्ध करणे हा क्षत्रियाचा धर्म’ म्हणून लढून प्राण दिला असता; पण श्रीकृष्णाने तत्त्वांची तडजोड न करता धर्माचे रक्षण करण्यासाठी रणनीतीत लवचिकता आणली. अशा प्रकारची लवचिकता छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा अनेक प्रसंगात दाखवली. परंतु महाभारत युद्धात भीष्माचार्य, द्रोणाचार्य किंवा कृपाचार्य यांना ती दाखवता आली नाही. आपल्या तत्त्वांना किंवा प्रतिज्ञाला थोडी मुरड घालून त्यांनी अधर्माची बाजू सोडली असती तर त्यांच्यासारखे महान कोणी ठरले नसते. परंतु तसे न केल्यामुळे त्यांचा रणांगणामध्ये अंत झाला. अगदी रामायणातील हनुमान सुद्धा चातुर्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. ही सांगितलेली सगळी माणसे विद्वान, बुद्धिमान तर होतीच परंतु विद्वत्ता आणि चातुर्य त्यांच्या व्यक्तिमत्वात हातात हात घालून चालत होते. आणि नेमके हेच आपल्या शिक्षण पद्धतीने करणे अपेक्षित आहे.
आजच्या शिक्षण पद्धतीकडे पाहता अनेकदा असे जाणवते की, आजची शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांना ज्ञान देते, पण त्यांच्यात व्यावहारिक शहाणपण निर्माण करण्यात कमी पडते. (Knowledge comes but wisdom lingers) अशी परिस्थिती निर्माण होत आहे. पुस्तकी ज्ञान (विद्वत्ता) मिळते, पदवी मिळते पण मिळालेले ज्ञान कसे वापरावे याचे व्यावहारिक शहाणपण (चातुर्य) येण्यास वेळ लागतो.
मोरोपंतांनी याच व्यावहारिक चातुर्यावर भर दिला. म्हणूनच, ते आपल्याला ‘विद्वान’ होण्यापेक्षा ‘चतुर’ (Wise) होण्याचा संदेश देतात. जीवनात पुढे जाण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी, आणि आनंदी राहण्यासाठी ही व्यावहारिक बुद्धिमत्ता किंवा चातुर्यच खरे उपयुक्त ठरते.
आज आपल्या हातात माहितीचा अपार साठा आहे, ज्ञानाचे दरवाजे उघडे आहेत; पण जीवन जगताना, निर्णय घेताना, नाती सांभाळताना, आणि संकटांचा सामना करताना आपल्याला मदत करते ते चातुर्य, म्हणजेच व्यावहारिक शहाणपण. मोरोपंतांनी शतकांपूर्वी दिलेला संदेश आजही तितकाच लागू आहे — विद्वत्ता महत्त्वाची आहेच, पण चातुर्य त्याहूनही महत्त्वाचे!
म्हणूनच,
चला, फक्त जाणकार न बनता, जाणिवेने वागणारे बनूया!
फक्त माहिती गोळा न करता, त्या माहितीचे जीवनात रूपांतर करू या!
फक्त शहाणे न बनता, शहाणपणाने चालणारे बनूया!
विद्वत्तेची कास धरत, चातुर्याचा दीप पेटवू या!
आणि जीवन अधिक सुंदर, सुकर आणि सुजाण बनवू या.
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈


















