मराठी साहित्य – विविधा ☆ काय हवे? विद्वत्ता की चातुर्य? ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ काय हवे? विद्वत्ता की चातुर्य? ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

काय हवे:विद्वत्ता की चातुर्य?

*

​माझे एक मित्र आहेत, नाव त्यांचे पंडित.

आणि या पंडित नावाच्या मित्राचा जेव्हा जेव्हा फोन येतो, तेव्हा तेव्हा माझ्या मनात एक विचार येतो आणि लगेच कविवर्य मोरोपंतांच्या एका सुभाषितातल्या ओळींची आठवण होते:

​”केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार।

शास्त्रग्रंथविलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार।।”

मी स्वतःशीच हसतो, कारण मोरोपंतांनी ‘पंडित मैत्री’तून मनुष्याला चातुर्य येतं असं सांगितलं आहे. गंमत थोडा वेळ बाजूला राहू देऊ पण माझ्या मनात एक प्रश्न नेहमी घोळत राहतो. तो हा की. मोरोपंत हे स्वतः इतके मोठे विद्वान असूनही त्यांनी या चार मार्गातून मिळणाऱ्या अंतिम फळाला ‘विद्वत्ता’ न म्हणता, ‘चातुर्य’ (Practical Wisdom) असे का म्हटले असेल बरं? त्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षाही काहीतरी अधिक महत्त्वाचे सांगायचे आहे, हे निश्चित!

​येथेच विद्वत्ता आणि चातुर्य यातील सूक्ष्म पण महत्त्वाचा फरक स्पष्ट होतो, जो जीवनातील यशाची गुरुकिल्ली आहे. विद्वत्ता आणि व्यावहारिक चातुर्य यातील फरक स्पष्ट करण्यासाठी एक गोष्ट बऱ्याच वेळा सांगितली जाते. आपल्यापैकी बहुतेकांनी ती वाचलीही असेल. एक अत्यंत विद्वान गृहस्थ होते. अनेक शास्त्र आणि ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला होता. एकदा ते नदी ओलांडण्यासाठी एका नावाड्याच्या बोटीत बसले.

नावेत बसल्यावर पंडितजींनी नावाड्याला विचारले, “अरे, तू कधी व्याकरण, तत्त्वज्ञान किंवा धर्मशास्त्र वाचले आहेस का? “

नावाड्याने नम्रपणे उत्तर दिले, “महाराज, मला हे काहीच माहीत नाही. “

पंडितजी उपहासाने म्हणाले, “तुझ्या आयुष्यातील पाव भाग तर व्यर्थ गेला! “

​थोडे पुढे गेल्यावर नदीत अचानक वादळ आले आणि बोट डळमळू लागली.

घाबरलेल्या नावाड्याने पंडितजींना विचारले, “महाराज, तुम्हाला पोहता येते का? “

पंडितजी घाम पुसत म्हणाले, “मी फक्त शास्त्रे वाचली आहेत; मला पोहता येत नाही! “

यावर नावाड्याने शांतपणे उत्तर दिले, “महाराज, तुमचे तर पूर्ण आयुष्यच व्यर्थ गेले! कारण ही बोट बुडणार आहे. “

​ही कथा आपल्याला सांगते की, केवळ ‘ज्ञान’ (विद्वत्ता) पुरेसे नसते, तर ते ज्ञान आणि त्यासोबत जगण्याचे ‘व्यवहारिक शहाणपण’ (चातुर्य) असणे अधिक महत्त्वाचे आहे. विद्वान माणूस आपल्या विषयात पारंगत असतो, पण अनेकदा तो जगापासून, व्यवहारापासून आणि ‘लोकांच्या स्वभावा’पासून अनभिज्ञ असतो. तो आपल्या ग्रंथसिद्ध भूमिकेवर किंवा नियमांवर ठाम असतो. तो ‘जे योग्य आहे’ तेच करायचा हट्ट धरतो.

​याउलट, चतुर माणूस लवचिक भूमिका घेतो. चतुर माणूस आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता परिस्थितीनुसार, वेळेनुसार आणि समोरच्या व्यक्तीनुसार आपली रणनीती बदलतो. ही लवचिकता म्हणजे नैतिकतेचा त्याग नव्हे, तर उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करण्याचे व्यावहारिक ज्ञान आहे. तो ‘काय करायचे आहे’ (Aim) यावर लक्ष केंद्रित करतो, तर विद्वान ‘कसे करायचे’ (Process/Rule) यावर ठाम राहतो. विद्वत्ता आपल्याला ज्ञान देते, पण चातुर्य आपल्याला ते ज्ञान वापरण्याची कला शिकवते.

​मोरोपंत वरील श्लोकात चातुर्य मिळवण्यासाठी चार मार्ग सांगतात, आणि ते सर्व केवळ ग्रंथपठणाचे मार्ग नाहीत, तर प्रत्यक्ष जीवनातील अनुभवाचे मार्ग आहेत: देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार आणि शास्त्रग्रंथविलोकन. या चार क्रियांमध्ये मोरोपंत केवळ शास्त्रग्रंथ वाचून पांडित्य मिळवण्याऐवजी, देशाटन, मैत्री आणि सभेतला संचार यांसारख्या प्रत्यक्ष कृतीतून व्यवहारी चातुर्य प्राप्त करण्यावर भर देतात. ​

चांगदेव महाराजांनी तब्बल १४०० वर्षे तपश्चर्या केली. त्यांची प्रचंड विद्वत्ता आणि कठोर साधना यामुळे लक्षात येते. मात्र, ज्ञानेश्वरांना पाठवलेल्या पत्रात मायना काय लिहावा हे एवढ्या मोठ्या विद्वान संताला कळू शकले नाही. जेव्हा ते संत ज्ञानेश्वरांना भेटायला वाघावर बसून आले, तेव्हा ज्ञानेश्वरांनी त्यांना चक्क भिंत चालवून प्रती-उत्तर दिले. १४०० वर्षांच्या तपश्चर्येनंतरही त्यांना व्यावहारिक शहाणपण (चातुर्य) आले नव्हते, हे या प्रसंगातून स्पष्ट होते.

बिरबल हा अकबराच्या दरबारातील ‘विद्वान’ असण्यापेक्षा ‘चतुर’ (Wise) म्हणून अधिक प्रसिद्ध होता. त्याने दरबारातील गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी मानवी स्वभावाचे अचूक निरीक्षण केले आणि हजरजबाबीपणा वापरला. मानवी मनाचा त्याचा अभ्यास उत्तम होता. त्याचा वापर करण्यातून त्याचे चातुर्य दिसून येते.

श्रीकृष्णाचे जीवन म्हणजे चातुर्याचा आदर्श नमुना आहे, कारण त्यांनी वेळप्रसंगी घेतलेली लवचिक भूमिका. जेव्हा त्यांना जाणवले की बलवान अशा जरासंधासमोर उघडपणे टिकाव लागणे शक्य नाही, तेव्हा त्यांनी आपल्या प्रजेच्या रक्षणासाठी मथुरेहून द्वारकेला स्थलांतर केले. त्याचप्रमाणे, कालयवनापासून बचाव करण्यासाठी त्यांनी रणांगणातून पळ काढला आणि प्रसंगी ‘रणछोड’ हे नाव आनंदाने स्वीकारले. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने ‘युद्ध करणे हा क्षत्रियाचा धर्म’ म्हणून लढून प्राण दिला असता; पण श्रीकृष्णाने तत्त्वांची तडजोड न करता धर्माचे रक्षण करण्यासाठी रणनीतीत लवचिकता आणली. अशा प्रकारची लवचिकता छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा अनेक प्रसंगात दाखवली. परंतु महाभारत युद्धात भीष्माचार्य, द्रोणाचार्य किंवा कृपाचार्य यांना ती दाखवता आली नाही. आपल्या तत्त्वांना किंवा प्रतिज्ञाला थोडी मुरड घालून त्यांनी अधर्माची बाजू सोडली असती तर त्यांच्यासारखे महान कोणी ठरले नसते. परंतु तसे न केल्यामुळे त्यांचा रणांगणामध्ये अंत झाला. अगदी रामायणातील हनुमान सुद्धा चातुर्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. ही सांगितलेली सगळी माणसे विद्वान, बुद्धिमान तर होतीच परंतु विद्वत्ता आणि चातुर्य त्यांच्या व्यक्तिमत्वात हातात हात घालून चालत होते. आणि नेमके हेच आपल्या शिक्षण पद्धतीने करणे अपेक्षित आहे.

आजच्या शिक्षण पद्धतीकडे पाहता अनेकदा असे जाणवते की, आजची शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांना ज्ञान देते, पण त्यांच्यात व्यावहारिक शहाणपण निर्माण करण्यात कमी पडते. (Knowledge comes but wisdom lingers) अशी परिस्थिती निर्माण होत आहे. पुस्तकी ज्ञान (विद्वत्ता) मिळते, पदवी मिळते पण मिळालेले ज्ञान कसे वापरावे याचे व्यावहारिक शहाणपण (चातुर्य) येण्यास वेळ लागतो.

​मोरोपंतांनी याच व्यावहारिक चातुर्यावर भर दिला. म्हणूनच, ते आपल्याला ‘विद्वान’ होण्यापेक्षा ‘चतुर’ (Wise) होण्याचा संदेश देतात. जीवनात पुढे जाण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी, आणि आनंदी राहण्यासाठी ही व्यावहारिक बुद्धिमत्ता किंवा चातुर्यच खरे उपयुक्त ठरते.

आज आपल्या हातात माहितीचा अपार साठा आहे, ज्ञानाचे दरवाजे उघडे आहेत; पण जीवन जगताना, निर्णय घेताना, नाती सांभाळताना, आणि संकटांचा सामना करताना आपल्याला मदत करते ते चातुर्य, म्हणजेच व्यावहारिक शहाणपण. मोरोपंतांनी शतकांपूर्वी दिलेला संदेश आजही तितकाच लागू आहे — विद्वत्ता महत्त्वाची आहेच, पण चातुर्य त्याहूनही महत्त्वाचे!

म्हणूनच,

चला, फक्त जाणकार न बनता, जाणिवेने वागणारे बनूया!

फक्त माहिती गोळा न करता, त्या माहितीचे जीवनात रूपांतर करू या!

फक्त शहाणे न बनता, शहाणपणाने चालणारे बनूया!

 

विद्वत्तेची कास धरत, चातुर्याचा दीप पेटवू या!

आणि जीवन अधिक सुंदर, सुकर आणि सुजाण बनवू या.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आठवडी बाजार…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? मनमंजुषेतून ?

☆ “आठवडी बाजार…” ☆ प्रा. भरत खैरकर 

गावाला प्रायमरी शाळेत असताना बुधवारची आम्ही वाट बघत असायचो, कारण ह्या दिवशी आठवडी बाजार असायचा. दर बुधवारी आमची सकाळची शाळा असायची. आणि ती सकाळी दहाला संपायची.. त्यामुळे बुधवार हा आमच्यासाठी भारी असायचा. आमचं गाव परिसरात मोठं असल्याने आजूबाजूच्या पंचवीस तीस खेड्यातून या ठिकाणी बाजारासाठी लोक यायचे. हा काळ साधारण ९० च्या दरम्यानचा आहे. तेव्हा बरेचसे लोक बैलगाडी.. रेंग्या.. दमणी.. सायकलने.. पैदल.. असे ह्या बाजारात दाखल व्हायचे.

बैलगाड्यांनी येणारा शेतकरी वर्ग गावाच्या बाहेर असलेल्या एका पटांगणामध्ये आपापल्या बैलगाड्या ‘पार्क’ करायचा. तिथे बैलांना चारापाणी घालून.. ते कासऱ्याच्या साह्याने चाकालाच बैलांना बांधून ठेवायचे. मग आपापल्या पिशव्या.. पोते.. विकायला आणलेलं जे काय सामान.. असेल ते घेवून ही मंडळी आठवडी बाजारात पोहोचायची.. काहीजण आपल्या सोबत तंबू किंवा राहूट्या आणायचे.. ऊन पावसापासून वाचण्यासाठी तसेच मालाचे रक्षण करण्यासाठी या तब्बूंचा.. राहूट्यांचा उपयोग व्हायचा.. काहीजण मात्र बाजाराच्या साथीमध्ये खाली पोतं टाकूनच आपलं दुकान थाटायचे!

इकडे बसस्टॉपवर मात्र खचाखच भरून आलेल्या गाड्या.. जिपा.. मेटॉडोर.. ट्रक आणि बसेस ह्यामुळे ट्रॅफिक जाम झालेलं असायचं. प्रत्येकाची सामान खाली उतरवण्याची घाई असायची.. ह्या दिवशी हमाल कमी पडायचे.. गावातील ठरलेले मुलं दोन-तीन चा ग्रुप करून भरपूर कमाई करायचे.. तालुक्याच्या ठिकाणाहून आलेले व्यापारी अशा मुलांना पकडून आपापला विक्रीचा माल ठरलेल्या बाजारओट्यापर्यंत पोहोचवून घ्यायचे.. त्यासाठी मुलं मागील तेवढी रक्कम व्यापारी देत असतं. विशेषता ‘झाडी’तून म्हणजे भिशी, चिमूर, नांद इथून येणारा तांदूळ हा मोठ्या प्रमाणात मेटॅाडोर मधून यायचा.. तो तंबूमध्ये थप्पी थप्पी ने लावण्यासाठी खूप दणकट असे हमाल लागायचे.. त्यासाठी ह्या मुलांना मोबदलाही भरपूर मिळायचा.

बाजाराची सुरुवातच मुख्यतः देशी दारूच्या दुकानापासून व्हायची.. त्यामुळे हौसे, नवसे, गवसे, आठवडी बाजारासाठी आणलेला पैसा बऱ्याचदा तिथेच खर्च करून दिवसभर बाजारात बोंबलत फिरायचे. काहीजण सट्टापट्टीच्या नादी लागून नंबरगेम मध्ये अडकायचे.. तर काही मित्रासोबत शेवचिवडा, आलूबोंडे, भजे खात हॉटेलिंग करायचे..

तिथून पुढे कपडे वाल्यांची रांग सुरू व्हायची.. त्या ठिकाणी गरीब, मजूर लोकं आपल्या मुलांसाठी आंगळ टोपडं खरेदी करायचे. सोबत आलेली पोरं आई-वडिलांकडे आईसप्रोटसाठी हट्ट धरायचे.. आंगळ टोपडं आणि सोबत आईसप्रोट मिळाल्यामुळे मुलांचा बाजार मस्त झालेला असायचा.. ते दिवसभर मग आईच्या मागे मागे बाजार भर फिरायचे. काही फुगेवाले, खेळणीवाले दुकानदार सायकलवर आपला व्यवसाय करायचे.. त्यांच्या सायकलला लावलेले भोपू वाजल्यावर मुलं फुगे किंवा खेळणीसाठी रडारड करायचे.

पुढे भुसार मालाची म्हणजे धान्य, डाळी, गहू, ज्वारी इत्यादींची ओळ होती.. त्या ठिकाणी शेतकरी बायका घमेल्यामध्ये किंवा एखादं दुसऱ्या पोत्यामध्ये आपल्या शेतात पिकलेलं वरील प्रकारचे कोणतेही धान्य घेऊन बसायच्या.. एक दोन तासात ते सर्व धान्य विकल्यावर मिळालेल्या पैशांमध्ये आपला आठवडी बाजार करायच्या!

अजून थोडं पुढे गेल्यावर मात्र ठोक व्यापारी व त्यांची दुकाने असायची.. त्यामध्ये तेलाचे व्यापारी, गुळाचे व्यापारी, चिकन सुपारी व्यापारी, सोन्या चांदीचे व्यापारी, आपापल्या दुकानात नोकर चाकरासह बसलेले असायचे.. ह्या ठिकाणचा मोठा व्यापार.. मोठी उलाढाल व त्यातील ग्राहक सुद्धा ठरलेले होते.. गरीब, मजूर ह्या मोठ्या दुकानांमध्ये जायची हिंमत करायचा नाही..

पुढे गेल्यावर बांबू पासून तयार केलेल्या टोपल्या.. तट्टे.. चटया.. ढोल्या.. इत्यादीसह त्या ठिकाणी लाकडाचे मोठमोठे फाटे.. वासे.. मयाली.. दरवाजे.. खिडक्या.. विकायला ठेवलेल्या असायच्या.. ज्याच्या कुणाच्या घराचे बांधकाम चालू आहे, असे लोक या ठिकाणी येऊन सौदेबाजी करून हा फौजफाटा घेऊन जायचे..

बाजारातला मुख्य रस्ता दुतर्फा हॉटेल.. पानठेले.. कृषी केंद्र. सायकल मार्ट.. किराणा.. कापडाचे मोठे व्यापारी. मिठाईची दुकाने.. फरसाण.. मुरमुरे फुटाणे.. गळ्यातलं नाकातलं विकणारे.. सलूनवाले.. प्रेसवाले.. टेलरिंग कामवाले.. मोटर रिवाइंडिंगवाले.. इलेक्ट्रिकल दुकान.. हार्डवेअर इत्यादींनी सजलेला होता. ही गावची आणि बाजारातली मुख्य लाईन होती. ह्याच ओळीमध्ये जर्मन पितळेची भांडे विकणारे व्यापारी तसेच शेवटी शेवटी कुंभाराची रांजण, गाडगे, मडके विकण्याची जागाही होती..

 मासे, मटण, डुक्कर, भाजल्या मासळ्या, झिंगे, इत्यादी मांसाहारी पदार्थासाठी बाजारात एक कोपरा ठरवून दिला होता.. त्या ठिकाणी लाकडाच्या तीपाईवर लटकवलेल्या बोकडाची.. डुकराची.. उलटी टांगलेली शरीरे.. तसेच खाली घमेल्यामध्ये जमा केलेल्या रक्ताची.. शिवाय माशांची.. खेकड्यांची.. मिळून एक अजब प्रकारची दुर्गंधी वजा हवीहवीशी वाटणारी बाजाराची खास ओळखही होती.

तिथून पुढे लागूनच गरम मसाल्याची दुकाने यात मीरे, दालचिनी, लवंग, तिखट, मीठ, हळद, घरचे कुटलेले मसाले, अद्रक, लसूणासह अनेकानेक जिभेचे चोचले पुरवणाऱ्या वस्तू मिळायच्या.. त्याला लागूनच पुढे शाकाहारी म्हणजे शेतकऱ्यांचा भाजीपाला वांगे, टोमॅटो, कोबी, गवार, फुलकोबी, पालक, मेथी, इत्यादीसह कांदे, बटाटे विकणाऱ्यांची पालं किंवा तंबू होते. उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या मोसमात या ठिकाणी दूरवरून येणारे सर्व प्रकारचे आंबे मिळायचे.. त्यानंतर उंदीर मारण्याचं औषध विकणारे.. जडीबुटीवाले.. तवा, कढई, तलवार, चाकू, पोळपाट, लाटणं, इत्यादी तयार करणारे शीख म्हणजे सरदार लोकांचे तंबू असायचे.

नदीच्या पलीकडे पारध्यांनी आणलेल्या लावा, तीतरं, कबूतरं, इतर पक्षी, हरीण, ससे, ईत्यादी ह्या बाजारात मिळायचे.

बाजारात फक्त उलाढाल.. व्यापार.. पैशाची देवाणघेवाण.. एवढेच होत नव्हते तर ह्या ठिकाणी वीस-पंचवीस गावातला संवाद.. भेटीगाठी.. नातेसंबंध.. सुखदुःखाच्या बाता.. निरोप.. विरह.. देवाणघेवाण.. इत्यादींचाही ऊहापोह व्हायचा.

सायंकाळच्या वेळी उरलीसुरली दारू पिऊन एखादं दुसरे भांडण.. किंवा मारामारी हा ठरलेला कार्यक्रम असायचा! सगळ्यांची घरी परतण्याची घाई असायची.. गावातलं कोणी मागे राहिला कां? ठरल्यानुसार सगळ्या वस्तू खरेदी केल्या कां? किती नफा किती तोटा झाला? इत्यादींच्या चर्चा.. गप्पा मारत दहा-बारा किलोमीटर वरून आलेली मंडळी भरभर पैदल.. बैलगाडीने.. नाही तर कुणी आणलेल्या वाहनाने.. आपापल्या गावी परतायची, ती आठवडाभरानंतर पुन्हा एकत्र येण्यासाठी..

आता आठवडी बाजाराची वाट पहावी लागत नाही.. सगळं काही ऑनलाईन झालेलं आहे.. स्वीगी.. झोमॅटो.. ॲमेझॉन रिलायन्स बाजार.. आपल्या घराच्या आत घुसलेला आहे.. आठवडाभर थांबायला कुणाला फुरसत नाही वेळ नाही.. एकमेकांशी बोलायला तर मुळीच नाही.. गाडीघोडा सगळ्यांकडे उपलब्ध आहे.. त्यामुळे आठवडी बाजाराची वाट पाहायची गरज नाही.. त्यामुळे संवाद नाही.. भेटणं नाही.. विरह नाही.. सुख दुःख नाही.. कुणाचचं कुणाला घेणंदेणं नाही.. त्यामुळे केवळ दोन दशकात बदललेल्या आठवडी बाजाराच्या ह्या स्वरूपाचं आणि अशा कित्येक नामशेष होत चाललेल्या चांगल्या परंपरांचा -हास होताना बघून मन भरून येतं.. गदगदून जातं..

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ३० ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ३० ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नारद भक्ती सूत्र क्र. ३०.

स्वयंफलरूपतेति ब्रह्मकुमाराः ॥ ३० ॥

अर्थ : ब्रह्मदेवाचे पुत्र (सनकादिक तसेच नारद) भक्ती स्वयंफलरूप आहे असे म्हणतात.

विवेचन : भक्ती ही साधन मानली तर तिचे महत्त्व राहणार नाही. तसेच तिला ज्ञानादिकाचे साध्य मानले तरी पारतंत्र्य प्राप्त होते किंवा अन्योन्याश्रयत्व दोष प्राप्त होतो हे पूर्वीच्या सूत्रावरील विवरणात सांगितले आहे. ही दोन्ही मते नारदांना मान्य नसावीत म्हणून या सूत्रात नारद म्हणतात, ती स्वयंफलस्वरूप आहे.

भक्तीची स्वयंफलरूपता नारदांनी सूत्र सव्विसाव्यात ‘फलरूपत्वात्’ म्हणून सांगितलीच आहे. सनकादिक व नारद या उभय ब्रह्मकुमारांच्या मते भक्ती ही कोणाचे साध्य नाही व कोणाचे साधन नाही; ती स्वतःच फलस्वरूप आहे, तीच साध्य व तीच साधन आहे. ज्ञानाने भक्ती किंवा भक्तीने ज्ञान हे मत त्यांना मान्य नाही. ती स्वयंफलस्वरूपा कशी आहे याचे विस्तारपूर्वक विवरण, सव्विसाव्या सूत्रावर केले गेलेच आहे. कोणी म्हणेल की कोणते तरी साधन केल्याविना भक्ती तरी कशी प्राप्त होणार? कोणत्याही गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय त्याबद्दल मत प्रगट करणे अन्यायकारक होऊ शकते. आपण नामस्मरण भक्तीचे उदाहरण पाहू. कोणतेही नाम घेताना, कोणालाही सुरुवातीला त्याचा कंटाळाच येतो, हा जवळजवळ सर्वांचा अनुभव असेल. पण श्रीयुत तुकाराम आंबिले यांना त्यांच्या गुरूंनी स्वप्नात नाम दिले. त्यांनी त्या नामाचा घोषा लावला….! न कंटाळता, न थकता, प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करीत, अगदी भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन नाम घेतले…..! शेवटी एक वेळ अशी आली की श्री. तुकाराम आंबिले यांचे #”आकाशा एवढ्या तुक्यात”# रुपांतरण झाले….! हे सर्व परिवर्तन निव्वळ नामस्मरणाने झाले असे संत तुकाराम महाराज यांचे चरित्र वाचले की लक्षात येईल.

सामान्य मनुष्याच्या अंगी असलेल्या उपजत *गुणां*मुळे त्याच्यात भगवद्विमुखता, विषयवासना, अश्रद्धा हे असे अनेक रोग असतात, त्यामुळे त्याला भक्तीमार्ग गोड लागत नाही. पूजेत, भजनात, ध्यानात आनंद होत नाही; रुची निर्माण होत नाही. याचे औषधही हेच आहे की नामस्मरण सतत करीत राहणे. ते नाम ते सर्व विकार दूर करते, हृदयशुद्धी होते. मग संत तुकाराम महाराज म्हणतात,

नाम घेतां मन निवे । जिव्हे अमृतचि स्रवे *होताती बरवे । ऐसे शकुन लाभाचे ॥०१॥ मन रंगलें रंगलें । तुझ्या चरणीं स्थिरावलें । केलिया विठ्ठलें । ऐसी कृपा जाणावी ॥०२॥ जालें भोजनसें दिसे । चिरा पडोनि ठेला इच्छे । धालियाच्या ऐसें । अंगा येती उद्गार ॥०३॥ सुख भेटों आलें सुखा । निध सांपडला मुखा तुका म्हणे ||०४||”

संदर्भ: अभंग क्रमांक ८८४, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)

तुकाराममहाराजांनी प्रथम आपल्या वाणीस नाम घेण्याची प्रेरणा दिली.

“घेई घेई माझे वाचे | गोड नाम विठोबाचे || १ || 

डोळे तुम्ही घ्यारे सुख | पाहा विठोबाचे मुख || २ || 

तुम्ही आइका रे कान | माझ्या विठोबाचे गुण || ३ || 

मन तेथे धाव घेई | राही विठोबाचे पायी || ४ || 

तुका म्हणे जीवा | नको सोडू या केशवा || ५ ||”

– – संत तुकाराम महाराज सतत नामाच्या मागे लागले, मनात असेल किंवा नसेल पण वाचेवर नाम वसोदे, असा नामजप, भजन चालू झाले. मग त्यांना पुढील प्रमाणे अनुभव आला… 

“विषयीं विसर पडिला निःशेष । अंगीं ब्रम्हरस ठसावला ॥१॥ 

माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ॥२॥ 

लाभाचिया सोसें पुढें चाली मना । धनाचा कृपणा लोभ जैसा ॥३॥ 

तुका म्हणे गंगासागरसंगमीं । अवघ्या जाल्या ऊर्मी एकमय ॥४॥”

(संदर्भ: अभंग क्रमांक १०३५, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)

– – नामस्मरण भक्ति करता करता श्री. तुकाराम आंबिले ते संत तुकाराम महाराज हा प्रवास सुलभतेने घडून आला……!

… “स्वयंफलरूपता“ म्हणतात ती हीच एक अलौकिक अवस्था आहे.

!! जय जय रघुवीर समर्थ !!

!! नारद महाराज की जय!!!

– क्रमशः लेख क्र. ६ 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “नाझ -ए -हिंद! अभिमान आहे!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “नाझ -ए -हिंद! 🇮🇳 अभिमान आहे!” ☆ श्री संभाजी बबन गायके

नाझ-ए-हिंद! अभिमान आहे!

जगात आणि त्यातल्या त्यात भारतात सर्वाधिक धर्मनिरपेक्ष जर कुणी असेल तर ती भारतीय सेना. सेनेत जणू सबंध भारत नांदत असतो. एक सैनिक, एक सैन्याधिकारी त्याच्या कार्यकाळात भारताच्या जवळजवळ सर्वच राज्यांत, सीमांवर विविध राज्यांतून आलेल्या विविध अधिका-यांच्या नेतृत्वात सेवा बजावून निवृत्त होतो.

नेतृ या संस्कृत शब्दापासून तयार झालेल्या नेता या शब्दाचा एक अर्थ ‘धोका पत्करणारा’ असाही सांगितला जातो… अर्थात समूहाच्या अग्रभागी राहून, समुहावर येऊ घातलेले संकट जो प्रथम आपल्या शिरावर घेतो.. तो खरा नेता… नायक!

“शत्रूला माझ्या सैनिकांना इजा पोहोचवायचीच झाल्यास.. त्यांना प्रथम माझ्याशी दोन हात करावे लागतील… त्यात मी मरण पावलो तरच त्यांना माझ्या सैनिकांपर्यंत पोहोचता येईल! आणि मी माझ्या जवानांसाठी काहीही करू शकतो.. नव्हे करेन” असं छातीठोकपणे सांगणारा आणखी एक सेनानी भारतीय सेनेने अनुभवला… त्याची ही कथा! भारतीय सैन्याधिकारी त्यांच्या हाताखाली काम करणा-या जवानांना my boys म्हणतात… ते केवळ औपचारीकता म्हणून नव्हे… तर खरोखरीच संकटाच्या परिस्थितीत त्यांच्या मागे संरक्षक म्हणून उभे राहतात… हे सिद्ध करणारी!

बावीस ऑगस्ट, दोन हजार आठ… पहाटेचे साडेतीन वाजलेले आहेत… या दिवसाच्या सायंकाळी जम्मू-काश्मीरमध्ये तैनात ४५, राष्ट्रीय रायफल्सच्या अधिका-यांना एक पक्की खबर मिळाली आहे… पाकिस्तानी अतिरेक्यांचा एक मोठा गट सीमा ओलांडून भारतात प्रवेश करणार आहे! Insurgent म्हणजे प्रस्थापित सत्तेस धुडकावून त्या सत्तेविरुद्ध शस्त्र हाती घेतलेली व्यक्ती. या Insurgent विरुद्ध कारवाई करून त्याला नेस्तनाबूद करणे गरजेचे ठरते.. अन्यथा सत्ता धुळीस मिळायला वेळ लागत नाही. भारतात भारताची, भारतातल्या सर्वच्या सर्व भूभागावर एकछत्री सत्ता आहे.. आणि असेल. या सत्तेला कुणी आव्हान दिले तर ते आव्हान मोडून काढण्याच्या अखंडित मोहिमेला Counter-Insurgency अशी संज्ञा आहे.

अतिरेकी आपल्या सीमेच्या आत खोलवर येण्याआधीच त्यांना रस्त्यातच गाठायला त्यांना सामोरे जायचे आणि त्यांचा खात्मा करायचा… अशी सर्वसाधारण पद्धत असते. हे जणू एकप्रकारे मरणावर चालून जाण्यासारखेच. पण ही अशी चाल करून जाणेच भारतीय सैनिकांच्या अंगवळणी पडले आहे.

४५, राष्ट्रीय रायफल्सच्या अधिका-यांना या येऊ घातलेल्या अतिरेक्यांविरोधात मच्च्छल गावाजवळ, कुपवाडा सेक्टरमध्ये ‘नाव-नार’ नावाने एक मोहिम आखली. आपल्या कुटुंबियांसमवेत एक दीर्घ सुट्टी उपभोगून सैन्य तुकडीत नुकतेच परतलेले अनुभवी कमांडिंग ऑफिसर या मोहिमेत अग्रभागी राहून निघाले. साहेबांना प्रत्यक्ष सैनिकी कारवायांचा थोडाथोडका नव्हे तर तब्बल वीस वर्षांचा अनुभव होता. आपल्या नेतृत्वातील सैनिकांना स्वत:चे पुत्र मानणारे अधिकारी म्हणून या साहेबांची ख्याती होती. त्यांचे पिताजी सेनेत Honorary Captain होते. त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकीत हे साहेब सेनेत अधिकारी म्हणून दाखल झाले होते… आणि त्यांच्या दोन भावांनी सुद्धा त्यांचाच कित्ता गिरवला होता… एकच कुटुंबातील चौघे पुरुष भारताच्या संरक्षण सेवेत होते!

त्या पहाटेचा अंधार अधिकच गडद होता. सावध पावले टाकीत आपली तुकडी पुढे पुढे सरकत राहिली… कर्नल साहेब त्यांच्यापुढे कुणालाही जाऊ देत नव्हते… इतक्यात समोरच्या झाडीत काही हालचाल दिसली… आणि एके-४७ मधून निघणा-या गोळ्यांचा चकचकाट त्या अंधाराला भेदून येऊ लागला… आपल्या सैनिकांनी प्रशिक्षणात शिकवल्यानुसार त्वरीत आपापल्या जागा घेतल्या… कर्नल साहेबांनी थेट पुढे घुसत त्यांची रायफल अचूक चालवली… दोन अतिरेकी त्यांच्या वर्षावात त्वरीत ठार झाले खरे… पण त्या अतिरेक्यांनी झाडलेल्या फैरीमध्ये (फैर=fire) साहेबांच्या शरीरात अनेक गोळ्या घुसल्या! साहेब जबर जखमी झाले… आणि कोसळले…. पण कोसळताना त्यांनी आणखी एक अतिरेकी पाहिला…. आधीच्या दोन अतिरेक्यांचे मुडदे पाहून त्या अतिरेक्याने डोंगर उतारावरील एका चिंचोळ्या जागेत आसरा घेतला आणि त्या सुरक्षित जागेवरून तो भारतीय सैनिकांवर जबरदस्त गोळीबार करु लागला! आपल्या सैनिकांना पुढे जाता येईना…. कर्नल साहेबांनी ही आणीबाणीची परिस्थिती जाणली…. प्रचंड जखमी अवस्थेत, एखादा जखमी वाघ चवताळून उठावा तसे साहेब उठले… तो अतिरेकी लपला होता त्या छोट्या डोंगराच्या दुस-याबाजूने वर चढले… आणि त्यांनी स्वत:ला त्या अतिरेक्याच्या दिशेने खाली लोटून दिले…. अगदी त्याच्या पुढ्यात जाऊन थांबले कर्नलसाहेब… त्या अतिरेक्याच्या समोर त्याचा मृत्यू साक्षात उभा होता….. कर्नल जोजन थॉमस साहेबांच्या रुपात! जोजन साहेब केरळमधील थिरुवला जिल्ह्यातील एका खेड्यात, कुट्टूर गावात २२ जुलै, १९६५ रोजी जन्मले होते. JOJAN हे JOHAN (जोहान) या शब्दाचे एक रूप आहे. जोहान चा अर्थ आहे देव दयाळू आहे! आणि Thomos हे प्रभू येशूच्या बारा शिष्यांपैकी एका शिष्याचे नाव होते. Jojan Thomos हे नाव धारण करणारा एक बहादूर सैनिक अधिकारी भारतीय सैन्याला लाभला, ही सुद्धा ईश्वरी कृपाच म्हणावी लागेल.

जोजन यांनी पदवी शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी प्रवेश परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आणि चेन्नईच्या सैन्य अधिकारी प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणार्थी म्हणून ते रुजू झाले. आणि मार्च १९८६ मध्ये त्यांनी देशसेवेत प्रथम पग.. पहिले पाऊल ठेवले!

 जोजन साहेबांना रेजिमेंट मिळाली ती ११, जाट रेजिमेंट. एक केरळी माणूस हरियाणवी सैनिकांच्या सोबत काम करू लागला… जगातल्या इतर कोणत्याही सैन्यात असे वैविध्य आढळत नाही सहसा. सेनेत जणू सारा भारत एकवटलेला असतो. एकेक पायरी पार करीत करीत जोजन साहेब आता कर्नल बनले होते… त्यांची कार्यशैली, उत्साह आणि कार्यक्षमता लक्षात घेऊन वरिष्ठांनी त्यांना 45 राष्ट्रीय रायफल्समध्ये डेप्युटेशनवर पाठवलं…. राष्ट्रीय रायफल्समध्ये देशाच्या विविध भागातील उत्तमोत्तम सैनिक, अधिकारी हेरून त्यांना कर्तव्यावर विशेष कामगिरीसाठी बोलावून घेतले जाते… आणि यासाठी अनेक सैनिक, अधिकारी उत्सुक असतात… कारण राष्ट्रीय रायफल्स जम्मू-कश्मीरमध्ये तैनात असल्याने इथे नेहमी शौर्य गाजवण्याची संधी असतेच! जोजन साहेबांनी मोठ्या उत्साहाने काश्मिरात पदार्पण केले!

काश्मीर म्हणजे काही एखाद्या हाऊसिंग सोसायटी नव्हे… सिमेंटची संरक्षक भिंत असलेली. प्रवेशद्वारावर एखाद-दोन रखवालदार नेमले की झाले! प्रचंड लांबीची भारत-पाक सीमा… घनदाट जंगल… लहरी हवामान… पाकिस्तानी लष्कराकडून प्रशिक्षण दिले गेलेले, अत्याधुनिक शस्त्रसज्ज आणि भारतद्वेषाने पेटून उठलेले माथेफिरू अतिरेकी, त्यात काही स्थानिकांचा पाठिंबा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कायदे, संघटना, जनता यांच्यामुळे सैन्यबलाचा थेट वापर करण्यावर असलेल्या मर्यादा….. एक ना अनेक कारणे आहेत. इथे प्रत्येक फुटावर सैनिक उभे करणे अशक्य आहे… पण तरीही भारतीय सैनिक असेल त्या स्थितीत पाय रोवून उभे असतात… एखादा सैनिक धारातीर्थी पडला की दुस-याच क्षणी दुसरा सैनिक त्याची जागा घेत असतो…. माघार नाही घेत…. म्हणून कश्मीर आणि पर्यायाने भारत आपला आहे!

 २२ ऑगस्ट, २००८ रोजी जोजन साहेबांचे वय होते ४३ वर्षे १ महिना. पोटी दोन मुले होती.. एक मुलगी मेघना आणि चिरंजीव फिलेमॉन. पत्नी गृहिणी बीना. बेचाळीस वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अनेक मित्र जोडले आणि अनेक विषयांमध्ये कसब प्राप्त केले. एखाद्या वाघासारखी शरीरयष्टी लाभलेल्या जोजन साहेबांचे मन मात्र खूप हळवे होते. पत्नी आणि दोन मुले, आई, वडील यांच्यावर त्यांचे जिवापाड प्रेम होते. सैनिकी जीवनातील अनिश्चितता त्यांना ठाऊक असल्याने प्रत्येक क्षण पुरेपूर आनंदाने जगण्याचा त्यांचा प्रयत्न असत. त्यांनी हेलिकॉप्टरचालक प्रशिक्षण घेतले आणि भारताच्या सीमांवर तैनात असलेल्या शीघ्र कृती दलाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून सहा वर्षे प्रभावी कामगिरी करून नाव कमावले… त्यांच्या गणवेशावर आर्मी एविएशन कोअरचे पंख सन्मानाने मिरवत राहिले.

कर्नल जोजन साहेब त्या अतिरेक्याच्या अगदी समोर उभे होते… इतक्या जवळून रायफल झाडता येत नाही… थेट भिडायला लागते… जोजन साहेबांनी त्या अतिरेक्यावर झडप घातली… त्याला जणू मरणमिठीच मारली…. जोरदार संघर्ष झाला…. आणि शेवटी वाघाने तो पिसाळलेला कुत्रा मारला! पण साहेब पुन्हा उठून उभे राहू शकले नाहीत. आपल्या इतर सैनिकांनी तोवर इतर तीन जनावरे यमसदनी धाडून दिली होती… एकूण सहा शिकारी झाल्या होत्या! अतिरेक्यांना टिपताना नाईक नीरज आणि शिपाई सुलतान सिंग हे दोघे जखमी होऊन हुतात्मा झाले होते! या दोघांना मरणोत्तर सेना मेडल जाहीर झाले.

प्रत्येक मोहिमेत वैद्यकीय साहाय्य दल सोबत घेऊन जाता येतेच असे नाही… डोंगर, रस्ते, अंधार, अंतर या अडचणी असतात… त्यातून जखमींना अतित्वरीत वैद्यकीय मदत देता येतेच असे होत नाही, गरज पडली आणि शक्य झाल्यास हेलीकॉप्टरमधून जखमींना लष्करी रुग्णालयात नेले जाते. पण त्यादिवशी एवढे सर्व करूनही जोजन साहेबांचे प्राण वाचू शकले नाहीत! पण त्यांनी त्यांचे शब्द खरे करून दाखवले…. अतिरेक्यांना माझ्या सैनिकांपर्यंत पोहोचायचे झाल्यास… त्यांना माझ्या मृतदेहावरूनच पुढे जावे लागेल!

‘अशोक चक्र’ हा शांतता काळात सैनिकांना प्रदान केला जाणारा सर्वोच्च सैनिक सन्मान मानला जातो. त्याचे मानकरी ठरले कर्नल जोजन… मरणोत्तर अशोक चक्र विजेते! हुतात्मा कर्नल जोजन थॉमस यांच्या धीरोदात्त पत्नी बीना यांनी तत्कालीन महामहीम राष्ट्रपती महोदया श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राजधानी दिल्लीमध्ये २००९ मधील प्रजासत्ताक दिनी हा पुरस्कार स्वीकारला! पती गमावल्यानंतर बीनाताई यांनी अगदी कमी कालावधीत स्वत:ला सावरले… कारण त्यांच्या पदरात दोन मुले होती… मुलगी मेघना आणि मुलगा फिलेमॉन. बीनाताई यांनी कर्नल जोजन साहेबांच्या स्मृति कायम राहाव्यात यासाठी विशेष उपक्रम हाती घेतले. साहेबांची जीवनकहाणी सांगणारी चित्र-पुस्तिका त्यांनी प्रसिद्ध केली. साहेबांचे स्मारक उभारले.

भारतास धुळीस मिळवण्याचे स्वप्न पाहणा-या शत्रूला प्रत्युत्तर म्हणून, जिथे कर्नल जोजन साहेब आणि अन्य सैनिकांनी देह ठेवले, त्या स्थळी भारतीय सेनेने नाझ-ए-हिंद अर्थात हिंदुस्थानाचा अभिमान नावाने एक मोठे स्मृतिस्थळ उभारले गेले आहे. इथे शंभर फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर तिरंगा डौलाने फडकत असतो. इथे कर्नल साहेबांची शौर्यगाथा प्रकाशित केलेली आहे. इथल्या द-या-खो-यात केरळमधून काश्मिरात आलेल्या आणि देशाचे शत्रू असलेल्या अतिरेक्यांची शिकार केलेल्या वाघाची डरकाळी कायम घुमत असते… या वाघाचे नाव जोजन! हम रहे या न रहे… यह देश रहना चाहिये…. यासाठी असे अनेक वाघ आपले प्राण देत असतात! देशाने त्यांच्या प्रती कृतज्ञ रहायला हवे…. त्यांच्या कथा पुढच्या पिढीला सांगत राहायला हव्यात…. कारण पुढच्या पिढ्यांना त्यांचा वारसा घ्यावा लागणार आहे! जयहिंद!

कर्नल जोजन साहेबांची कहाणी तुम्हाला इतरांना सांगावी वाटली तर जरूर सांगा. जिन्हे नाझ है हिंद पर वह कहां है? .. या प्रश्नाचे उत्तर देणे गरजेचे आहे!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ १४० वर्षे कसे जगावे? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

सौ. दीप्ती गौतम

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ १४० वर्षे कसे जगावे? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

एखाद्या वापरकर्त्याने ChatGPT ला विचारले— “मी १४० वर्षे कसे जगू शकतो?”

उत्तर साधे होते आणि अनपेक्षितही.

ChatGPT ने “ब्लू झोन्स” मधील दीर्घायुषी लोकांचा डेटा विश्लेषित केला आणि स्पष्ट निष्कर्ष मांडला:

मुद्दा आहाराचा नाही,

मुद्दा व्यायामाचा नाही,

मुद्दा अनुवंशिकतेचाही (genetics) नाही.

दीर्घायुष्याचा सर्वात महत्त्वाचा घटक: कमी प्रमाणातील दीर्घकालीन ताण (chronic stress).

उर्वरित सर्व गोष्टी दुय्यम!

तुम्ही कितीही चांगलं खाल्लं, व्यायाम केला, धूम्रपान टाळलं तरी —

जर तुम्ही सतत तणावाखाली जगत असाल, तर अकाली मृत्यू निश्चित आहे.

क्रॉनिक स्ट्रेस म्हणजे फक्त कामाचा ताण नाही.

तो तुमच्या खऱ्या व्यक्तिमत्त्व आणि तुम्ही जगाला दाखवता त्या “आवृत्ती” यांच्यातील अंतर्गत संघर्ष आहे.

तुम्ही आपल्या मनासारखे न जगता जबरदस्तीचे जीवन जगलात तर शरीर २४ तास “survival mode” मध्ये राहते.

वाढलेला कॉर्टिसोल शरीरातील रक्तवाहिन्या, रोगप्रतिकारक शक्ती आणि मेंदू — सर्व नाश करतो.

ओकिनावा, सार्डिनिया आणि इतर ब्लू झोन्समधील लोक जास्त जगतात कारण ते मासे खातात म्हणून नव्हे—

तर ते स्वतःशी शांततेत, समतोलात, समाधानी राहतात म्हणून.

 

दीर्घायुष्याचा पहिला नियम:

“ज्या गोष्टी तुमच्या अंतरात्म्याला विरोध निर्माण करतात, त्या करू नका. ”

नको असलेली नोकरी फक्त पैशासाठी करताय? → −१५ वर्षे

ज्याच्यावर प्रेम नाही अशा व्यक्तीसोबत भीतीपोटी राहात आहात? → −१० वर्षे

तुमची ऊर्जा शोषून घेणाऱ्या लोकांसोबत राहता? → −८ वर्षे

दररोज विषारी वातावरणात राहणे = पेशींचे झपाट्याने वृद्धत्व.

 

दुसरा नियम:

“जीवन पुढे ढकलणे थांबवा. ”

बहुतेक लोक असे म्हणतात— “निवृत्त झाल्यावर जगू…”

पण तेव्हा शरीर थकलेले, आजारी आणि ऊर्जाहीन असते.

ChatGPT च्या विश्लेषणानुसार—

४३% लोक निवृत्तीनंतरच्या पहिल्या ५ वर्षांतच मृत्यू पावतात.

का?

कारण शरीराने आयुष्यभर ‘जगण्याची परवानगी’ मिळण्याची वाट पाहिली… आणि जेव्हा ती मिळाली, तेव्हा खूप उशीर झाला होता.

 

तिसरा नियम: सामाजिक नाती — जीवनवर्धक औषध

एकटेपणा = दररोज १५ सिगारेट ओढण्याइतका घातक.

मजबूत सामाजिक नातेसंबंध असलेले लोक ५०% अधिक जगतात.

येथे मित्रांची संख्या नव्हे— नात्यांची गुणवत्ता महत्त्वाची.

 

चौथा नियम: स्वतःपेक्षा मोठा उद्देश शोधा.

जपानमध्ये याला इकिगाई म्हणतात —

“दर सकाळी उठण्याचे कारण. ”

स्पष्ट उद्देश असलेल्या लोकांचे आयुष्य सरासरी ७ वर्षांनी वाढते.

हा ‘मोठा सामाजिक मिशन’ असायलाच हवा असे नाही—

तो बागकाम, नातवंडे, कला, सेवा, कोणालातरी मदत करणे… काहीही असू शकते.

महत्त्वाचे म्हणजे —

‘मी इथे एका कारणासाठी आहे, माझी गरज आहे, ‘ असे वाटणे.

 

पाचवा नियम: आरोग्याच्या “over-optimization” चा अतिरेक टाळा.

फिटनेसचे अति वेड असलेले लोकही कधी कधी कमी जगतात.

कारण: अति नियंत्रण = अति ताण = वाढलेला कॉर्टिसोल.

कॅलरी मोजणे, ‘वाईट अन्न’ याची भीती, प्रत्येक पावलावर लक्ष…

हे जीवन नाही— ही कैद आहे.

 

सहावा नियम: व्यायाम नव्हे— नैसर्गिक हालचाल.

ब्लू झोन्समधील लोक जिमला जात नाहीत.

ते चालतात, बाग सांभाळतात, शिड्या चढतात.

हालचाल त्यांच्या जीवनाचा भाग आहे, ‘वेगळा तासभराचा व्यायाम’ नाही.

 

निष्कर्ष: दीर्घायुष्याचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे —

ताणमुक्त, नैसर्गिक, स्वतःशी प्रामाणिक जीवन.

कवी:अज्ञात

प्रस्तुती : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – विटाळ तो परद्रव्य परनारी… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – विटाळ तो परद्रव्य परनारी… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

*

विटाळ तो परद्रव्य परनारी/

येथुनि जो दुरी तो सोंवळा//१//

 *

गद्य पद्य काहीं न धरावी उपाधी/

स्वाधिनची बुद्धि करुनी ठेवा//२//

 *

विचारांचे काही करा रे स्वहित/

पापपुण्यातीत भांडवल//३//

 *

तुका म्हणे न लगे जावें वनांतरा/

विश्व विश्वंभरा सारिखेचि//४//

– संत तुकाराम.

 *

तुका म्हणे

समाज सुसंस्कृत, नीतीमान, आणि परस्पराचे हीत जोपासणारा असायला हवा. त्यासाठी आपल्या आचारविचारावर आणि वर्तनावर आपलेच नियंत्रण असायला हवे. योग्य वर्तनाने आपण आपली आणि आपल्या समाजाची प्रगती करू शकतो. समाजाला शांतता व स्थिरता देवू शकतो. यासाठी तुकाराम महाराजांनी आपले वर्तन कसे असावे हे सांगताना महत्वाचे मार्गदर्शन केले आहे.

ते म्हणतात. परनारी आणि परद्रव्य यांना विटाळ समजून आपण आपले शुद्ध चारित्र्य सांभाळले पाहिजे. या बाबतीत तुम्हाला कुठल्याही ग्रंथातिल किंवा पोथ्यातील लिखीत मार्ग दर्शनाची गरज नाही. तुमच्या जवळ तुमची स्वतःची बुद्धी आहे. म्हणून तुम्हीच सारासार विचार करून योग्य निर्णय घ्यावयाचा आहे. याच विचाराने आपले हीत कशात आहे हे ठरवायचे आहे. तुमचे हीत आणि तुमचे पापपुण्य कशात आहे हे ठरवण्यासाठी तुमच्या बुद्धीचे महत्वाचे भांडवल तुमच्या जवळच आहे. त्याच्या योग्य वापराने तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवावे. आणि आपले हीत साधावे. परमेश्वर प्राप्ती साठी रानावनात भटकण्याची गरज नाही. कारण हे जग म्हणजेच परमेश्वर आहे. दुस-याचे धन, दुस-याची पत्नी याना विटाळ माणने हाच देवाजवळ जाण्याचा साधा सोपा सरळ मार्ग आहे. त्यासाठी कोणत्याही पुराण श्रुती स्मृती यातील पुराव्यांची जरुरी नाही. तुमची बुद्धी जागृत ठेवा. हे सगळे विश्वच परमेश्वर आहे. कारण ते परमेश्वरानेच निर्माण केले आहे.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ८१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ८१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- दुसऱ्या दिवशी सकाळी मी सहस्त्रबुद्धे आजोबांच्या दारावरची बेल वाजवली तेव्हा मनात विचार होते ते आता त्यांच्याशी काय बोलायचं याचेच. मनातली हतबलता कधीच विरून गेली होती. अनिश्चिततेचा तर लवलेशही नव्हता. हीच पुढे घडू पहाणाऱ्या चमत्काराची सुरूवात आहे याची मात्र मला त्याक्षणी कल्पनाही नव्हती!)

सहस्त्रबुद्धे आजोबांनीच दार उघडलं. ‘या’ म्हणाले आणि लगबगीने आत गेले. वेळेचा अंदाज घ्यायला मी माझ्या हातातल्या घड्याळकडं पाहिलं त्याच वेळी पाण्याचं तांब्या-भांडं घेऊन बाहेर आलेल्या आजोबांच्या ते नेमकं लक्षात आलं.

“गेले तीन दिवस अशीच वेळेची सर्कस चाललेय तुमची. मी फार त्रास देत नाहीय ना तुम्हाला?”

“अजिबातच नाही. उलट खूप वेळ घेऊन येता आलं असतं तर तेच मला जास्त आवडलं असतं. ” मी मनापासून म्हणालो. आणि ते खरंही होतं. केवळ बँक स्टाफच्या आत्मकेंद्री विचारांमुळे ग्राहक कसे दुखावले जातात आणि बॅंक-व्यवस्थापनालाही त्याचा किती मनस्ताप होत असतो याचा खूप काही शिकवून जाणारा अनुभव बँकिंग क्षेत्रामधल्या माझ्या तोवरच्या दीर्घ वाटचालीत मी प्रथमच घेत होतो. त्यामुळेच त्यादिवशीच्या कटू घटनेमुळे दुखावल्या गेलेल्या सहस्त्रबुद्धे आजोबांना समजून घेणंही आवश्यक आहे असंच मला वाटत होतं.

सहस्त्रबुद्धे आजोबांबद्दल मला कितीही सहानुभूती वाटत असली तरी केवळ त्यांच्या समाधानासाठी मी प्रभूदेसाईंना अतिशय कठोर शिक्षा करू शकणार नव्हतो आणि म्हणूनच आजोबांना अपेक्षित असणारा न्यायही मला देता येणार नव्हता. कारण प्रभूदेसाईंना शिक्षा करायची तर बँकेच्या नियमाप्रमाणे त्यांच्यावर आरोप ठेवून तो पुराव्यानिशी सिद्ध करण्याची जबाबदारी व्यवस्थापनाचाच एक भाग म्हणून माझ्यावरच येणार होती. त्यामुळे सहस्त्रबुद्धे आजोबांचं समाधान करायचं तर त्यांना प्रोसेसमधील या अडथळ्यांची जाणीव करून देणं जेवढं आवश्यक होतं तेवढंच अडचणीचंही ठरू शकणार होतं. कारण आजोबा ते ऐकून दुखावले, अस्वस्थ झाले, चिडले तर सगळ्याच प्रकरणाला नकारात्मक कलाटणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. ज्या उद्देशाने हे सगळंच प्रकरण आम्ही धसाला लावलं होतं तो उद्देशही पूर्ण झाला नसता ते वेगळंच. त्यामुळे परिस्थिती अतिशय नाजूकपणे हाताळणं आवश्यक होतं. बोलण्यातल्या कौशल्यापेक्षा आजोबांच्याशी प्रामाणिकपणे संवाद साधणं गरजेचं आहे असा विचार मी केला. गेल्या तीन दिवसात वेळोवेळी या प्रकरणाबद्दल माझ्या मनात जे जे विचार येऊन गेले ते सगळे अतिशय निखळ स्वरूपात आजोबांपुढे व्यक्त करून त्या पार्श्वभूमीवर यापुढे त्यांनी काय करणं आपल्याला अपेक्षित आहे हेही अतिशय स्पष्ट शब्दात त्यांना सूचवणं हाच एकमेव मार्ग मला योग्य वाटला. याच्या परिणामतः येणारं यशापयश ‘त्या’च्यावर सोपवून मी बोलायला सुरूवात केली.

“आजोबा, खरं सांगायचं तर या सगळ्या प्रकरणाबद्दलचेच विचार गेले तीन दिवस माझ्या मनात ठाण मांडून बसलेले आहेत. तुमच्या दुखावलेल्या भावना, तुम्हाला झालेला मनस्ताप, आणि त्यामुळे तुमच्यासारख्या वयोवृध्द ग्राहकाच्या मनातली बॅंकेची प्रतिमा डागाळली गेल्याच्या विचाराचाच मला खूप त्रास होतोय. खरंतर ग्राहकाला बॅंकेत तत्पर आणि चांगली सेवा मिळावी यासाठी सर्वच बॅंकांमधे काटेकोर नियम आहेत. एखाद्या ग्राहकाने तक्रार केली तर त्याचं तत्परतेने निराकरण होतेय कीं नाही हे पहाण्यासाठी आवश्यक ती यंत्रणाही कार्यरत आहे. खरं सांगायचं तर यामुळेच निर्माण होऊ पहाणारी तक्रार शक्यतो ब्रॅंचपातळीवरच योग्य पध्दतीने हाताळून त्याचं निराकरण करण्याचाच प्रयत्न बहुतेक ब्रॅंचमॅनेजर्स करीत असल्याने स्थानिक पातळीवरच त्याची दखल घेतली जाते.

प्रभूदेसाईंच्या बाबतीत मात्र जे घडलं ते खरंच त्यांच्यासारख्या सूज्ञ माणसांकडून कधीच अपेक्षित नाहीय. ही नकळत झालेली चूक नाहीये. आमच्या साहेबांशी बोलतानाही मी त्यांना जे सांगितलं होतं तेच आज तुम्हालाही सांगतो. ब्रॅंच मॅनेजरच्या दृष्टीने मोठ्या रकमांची डिपॉझिट्स बँकेत ठेवणारे खातेदार हेच महत्त्वपूर्ण ग्राहक असा अपवादात्मक कां असेना पण कांही मॅनेजर्सचा चुकीचा समज असतो. कदाचित त्या दिवशी समोर बसलेल्या अशाच एका कस्टमरला तत्पर सेवा देताना कोणताही अडथळा मधे येऊ नये असा प्रयत्न करत असतानाच प्रभूदेसाईंनी दुसऱ्या ग्राहकावर आपल्याकडून अन्याय होऊ नये याचीही काळजी, केवळ ते ब्रॅंच मॅनेजर होते म्हणूनच नव्हे तर एक माणूस म्हणूनही घ्यायला हवी होती असंच मला वाटतं. विशेषतः तुम्ही बराच वेळ बाहेर ताटकळत बसलाय हे त्यांच्या लक्षातही न येणं हेच चुकीचं होतं. तुम्ही आपणहोऊन पुन्हा दुसऱ्यांदा जेव्हा केबिनमधे गेलात तेव्हा निदान तिथेच बसलेल्या दुसऱ्या ग्राहकासमोर तरी त्यांनी तुमचं हसतमुखानं स्वागत करून नेमकं काय काम आहे हे विचारून घ्यायला हवंच होतं. एरवी इंटरकाॅमवरून अकाऊंटंना पूर्वकल्पना देऊन तुम्हाला त्यांच्याकडेही ते पाठवू शकले असते. तुमचं एक अगदी साधं काम हातावेगळं करण्यासाठी फक्त दोन मिनिटंही पुरेशी ठरली असती. असं असताना त्यांना ते करावंसं न वाटणं हेच आक्षेपार्ह आहे.

ज्या मन:स्थितीत तुम्ही बॅंकेत आला होतात त्याचा विचार करता प्रभूदेसाईंच्या वागण्या-बोलण्यावरील तुमच्या प्रतिक्रिया कितीही टोकाच्या असल्या तरी त्या नैसर्गिक आणि अपरिहार्य अशाच होत्या… “

ते लक्षपूर्वक ऐकत होते. मी बोलायचं थांबलो तसं भानावर येत त्यांनी चमकून माझ्याकडं पाहिलं. त्यांची ओलसर नजर पाहून मला पुढं काय बोलावं सुचेचना.

“… हे सगळं पुन्हा आठवताना, ऐकताना तुम्हालाही खूप त्रास होतोय हे समजतंय मला आजोबा. पण असं असूनही तुमच्यावर झालेल्या अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी तुमचं पूर्ण समाधान होईल असं मी काय करायला हवं तेच मला समजत नाहीय ” मी म्हणालो.

” म्हणजे?”

“प्रभूदेसाईंना जास्तीत जास्त कठोर शिक्षा करून तुम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी तुमची अपेक्षा आहे. असं वाटणं यात गैर कांहीच नाही. पण तुम्ही थोडं समजूतीनं घेतलंत तर तुमच्या दृष्टीनं यातून समाधानकारक मार्ग कसा निघेल याचा विचार आपण करू शकू असं मला वाटतं. “

“सबुरीनं घ्यायचं म्हणजे काय करायचं?”

“कोणत्याही कर्मचाऱ्यांने नकळत किंवा जाणीवपूर्वक केलेल्या कुठल्याही चुकीची त्याला काय शिक्षा करायची याचे बँकांचे काही नियम आहेत आणि त्यासाठीची ठराविक प्रोसेसही. त्या बाहेर न जाता प्रभूदेसाईंना त्यांच्याकडून झालेल्या चुकीची स्पष्ट शब्दात कल्पना देऊन त्यांच्या बाबतीत नेमकी काय ॲक्शन घ्यायची हे ठरवावं लागेल. हे सगळं शक्यतो झोनल ऑफिसच्या पातळीवरच झालं तर लगेच अंमलात आणता येऊ शकेल. सर्व अहवाल सेंट्रल ऑफिसला पाठवून त्यांची अनुमती घ्यायची तर त्या प्रोसेसला बराच वेळही लागू शकेल. या दोन्हीपैकी जे करायचं ते तुमचं समाधान होईल असं व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. पण जे कांही ठरेल त्याचा अंतिम निर्णय अर्थातच आमच्या डी. जी. एम्. साहेबांचाच असेल. तरीही त्याची पूर्वकल्पना तुम्हाला देऊन तुमची संमती घेण्याचं आश्वासन मी तुम्हाला देतो. “

“ठीक आहे. जे ठरेल ते सांगा मला. त्यानंतर काय करायचं ते मी पाहिन. ” आजोबा कांहीशा नाराजीने म्हणाले.

मी त्यांचा निरोप घेऊन जायला निघालो. पण ही अनिश्चितता अशीच सोबत घेऊन जाणं मला नको होतं. विषय पूर्णतः संपायला हवा होता आणि या क्षणापर्यंत तरी आजोबांचा अॅप्रोच मला निश्चिंत करणारा वाटत नव्हता. मी जाता जाता क्षणभर थबकलो. आजोबा माझ्याकडेच पहात होते.

“जाण्यापूर्वी एकच सांगायचंय. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. अनुभवी आहात. खरंतर मी तुम्हाला कांही सांगणं योग्य आहे की नाही मला माहित नाही. तुम्ही भाविक आहात, दत्त महाराजांच्यावर तुमची श्रद्धा आहे याची मला कल्पना असल्यानेच हे सांगावंसं वाटतंय म्हणून सांगतो.. “

त्यांनी मला आत येऊन बसायची खूण केली. निसटू पहाणारा क्षण जणू अकल्पितपणे क्षणभर थबकला होता. तो घट्ट धरून ठेवत मी ‘त्या’नेच प्रेरणा द्यावी तसं बोलू लागलो….

“कोण चूक कोण बरोबर हे ठरवण्याचा, चुकीबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार केवळ व्यवस्थेचा एक भाग म्हणून माणसाने स्वतःकडे घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे नियम ठरवलेले आहेत. त्या नियमांप्रमाणे घेतलेला निर्णय सर्वार्थाने न्याय देणारा असतोच असं नाही. पण या सर्व व्यवस्थेवरही सर्वाधिकार असलेली एक अदृश्य यंत्रणा ‘वर’ कार्यरत असते. सोप्या भाषेत आपण ज्याला ‘देव’ म्हणतो त्या देवाची यंत्रणा. तो पहात असतो सगळं. आणि प्रत्येक क्षणी घडणाऱ्या घटनांचा साक्षीदारही तोच असतो. न्याय देणारा जसा तो तसाच अन्यायाचं निवारण करणाराही तोच. त्या देवाच्या काठीला आवाज नसतो. पण अतिशय योग्य पद्धतीने, कुणाच्याही नकळत, कसलाही गाजावाजा न करता, त्या काठीने होणारा न्यायनिवाडा हा अन्यायचं निराकरण करणारा, अन्याय झालेल्याला खऱ्या अर्थाने न्याय देणाराच असतो. एकच सांगावंसं वाटतं, प्रभूदेसाईंना काय शिक्षा करायची हेही आपण ‘त्या’च्यावर सोपवूया. जे होईल ते योग्यच असेल हा विश्वास असू दे. मी आमच्याकडून जे करणं आवश्यक आणि शक्य असेल ते सगळं करीन. उद्याची आपली भेट असेल ती या विषयापुरती शेवटची असेल हे नक्की. येतो मी… “

त्यांचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो तेव्हा माझ्या मनात झिरपणारं समाधान मला दिलासा देत होतं. यापुढं जे घडेल ते ‘तो म्हणेल तसं’ ! तिकडं सहस्त्रबुद्धे आजोबाही असाच विचार करत असतील याची मला खात्री होती.

तरीही त्याची प्रचिती दुसऱ्या दिवशीच मला येणाराय यांची मात्र मला कल्पना नव्हती!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्त्री जन्मा, तुझी कहाणी… लेख क्र. २३ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆

सौ. गीता वासुदेव नलावडे

? मनमंजुषेतून ?

☆ स्त्री जन्मा, तुझी कहाणी… लेख क्र. २३ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे

स्त्री जन्मा, तुझी कहाणी!

xxx बाईंच्या वर्गातली (पहिलीतली) एक मुलगी मी त्यांच्या वर्गात गेल्यावर नेहमी माझ्याजवळ यायची. तिच्या डोळ्यावर मोठ्ठं उबाळू आलं होतं, तिचा डोळा जवळजवळ मिटला होता. तिला जवळ घेत म्हटलं, “काय ग, एकटीने आंबे खाल्लेस ना?मला एकही दिला नाहीस ना?”

“बाई, आंबे नाही खाल्ले, असाच आला फोड. पण खूप दुखत नाही, होईल बरा लवकर, ” ती. आपल्या आजाराबद्दल सकारात्मक बोलणारी ही गोड छोकरी मला खूप आवडायची. नेहमी प्रसन्न हसणारी, गप्पा मारायला उत्सुक असणारी ही मुलगी – अभ्यासातही हुशार होती.

तिची फी बाकी होती, म्हणून मी तिच्या वर्गशिक्षिकेकडे चौकशी केली, “हिची आई काय करते?” त्यांनी सविस्तर माहिती घेऊन मला सांगितलं.

“आई चांगली शिकलेली दिसते. हुशार वाटते. मग घरकाम का करते बरं?” माझ्या मनात विचार आला.

काही उलगडा होईना. शेवटी त्यांना भेटायला बोलावलं.

छान हसरा प्रसन्न चेहरा. चेहऱ्यावरून तरी सुशिक्षित वाटत होत्या. विचारलं, “किती शिक्षण झालंय?”

म्हणाल्या, “दहावी. ७८% मिळाले होते, गावी होते तेव्हा. ” 

“गावी असूनही, स्वतःच्या मेहनतीने एवढे मार्क्स मिळवलेत. मग पुढे का शिकला नाहीत?निदान एखादा कोर्सतरी का केला नाहीत?” मी म्हणाले.

त्यांचे डोळे भरून आले. “बाई, घरची गरीबी. माझ्या मागची भावंडं शिकणारी. कॉलेज तालुक्याच्या गावी. रोजचं जायचं यायचं भाडं कसं परवडणार?म्हणून शिक्षण सोडावं लागलं.

नात्यातलाच एक मुलगा स्थळ म्हणून सांगून आला. फारशी चौकशी न करताच वडिलांनी लग्न लावून दिलं. ते दारू पितात हे लग्नानंतर कळलं. खूप वाईट वाटलं. पण माझं हे दुःख वडिलांना सांगून त्यांना कशाला दुःखी करू?

पदरात ही मुलगी, त्यामुळं ठरवलं, आपला संसार आपणच सांभाळायचा. मग दोन पैसे मिळवण्यासाठी कामं करायला सुरुवात केली, ” त्या सांगत होत्या, आणि डोळ्यावाटे अश्रूधारा झरत होत्या.

त्यांना म्हटलं, “तुमच्या आवडीचं क्षेत्र निवडून एखादा छोटासा कोर्स करा, त्या कोर्सचा सगळा खर्च मी करेन. तुमच्यासारख्या हुशार बाईने काहीतरी वेगळं करावं असं मला वाटतं. “

माझ्या या वाक्यानंतर त्यांनी झटकन मान वर करून माझ्याकडे पाहिलं, “बाई, पाचव महिना आहे. हे बाळंतपण झाल्यावर मी नक्की येईन. “

म्हटलं, “तुमची तब्येत जपा. तुमची मुलगी खूप हुशार आहे. मुलगाच हवा म्हणून उगाचच वाट पाहू नका. महागाई वाढते आहे. एका मुलाला वाढवणंच किती कठीण आहे! तेव्हा आता दोन बस्स. मग मुलगी झाली तरी चालेल. “

त्या गेल्यावर मी विचारात पडले. आपल्याकडे अजूनही मुलग्यालाच वंशाचा दिवा का मानतात?असा कोणता उजेड पाडतात ही मुलं?खरंच हुशारी असूनही निव्वळ गरिबीमुळे आणि त्यातही मुलगी असल्यामुळे यांचे शिक्षण थांबले. त्यात नवऱ्याचे व्यसन.

– – यात काही सकारात्मक बदल होणे आवश्यक आहे. बघू या आपल्याला काय जमते आहे ते.

क्रमशः दर गुरुवारी… 

© सौ गीता वासुदेव नलावडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘नामलिंगानुशासनम् – अमरकोश…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘नामलिंगानुशासनम् – अमरकोश…’ ☆ श्री दिवाकर बुरसे

अमरकोश” हा संस्कृत भाषेतील सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध नामकोश (शब्दकोश) आहे. याची रचना अमर सिंह या विद्वानांनी केली आहे. खाली अमरकोश आणि त्याचे रचनाकार, रचना, महत्व, अभ्यासपद्धती व त्यावर झालेल्या टीकांचा संक्षिप्त आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.

१. रचनाकार – अमर सिंह

काल: अदमासे चौथ्या-पाचव्या शतकात (गुप्तकालात)

राजाश्रय: काही विद्वानांच्या मते अमर सिंह हे विक्रमादित्य (बहुधा चंद्रगुप्त विक्रमादित्य) यांच्या नवरत्नांपैकी एक होते.

व्यक्तिमत्व: संस्कृत भाषेतील शब्दविज्ञान, व्याकरण आणि काव्यशास्त्र यांचा गाढ अभ्यास असलेले पंडित. त्यांनी भाषेतील सर्व नामशब्द एकत्र करून त्यांची अर्थवर्गवारी केली.

२. अमरकोशाची रचना

अमरकोशाचे मूळ नाव आहे “नामलिंगानुशासनम्” (नाम आणि लिंग यांचे अनुशासन). त्यात तीन ‘निघंटु’ (भाग) आहेत, ज्यांना “काण्ड” असेही म्हणतात.

३. विभागणी

प्रथमकाण्डम् /स्वर्गादिकाण्डम्

यामध्ये आकारा वर्ग आहेत (स्वर्ग, देव, ब्रह्मांड इत्यादी विषय)

१ स्वर्गवर्गः २ व्योमवर्गः ३ दिग्वर्गः ४ कालवर्गः ५ धीवर्गः ६ वाग्वर्गः७ शब्दादिवर्गः ८ नाट्यवर्गः ९ पातालभोगवर्गः १० नरकवर्गः ११ वारिवर्गः

द्वितीयकाण्डम्/भूवर्गादिकाण्डम्

(पृथ्वी, देश, पर्वत, वनस्पती, प्राणी, मानव इ. विषय)

या कांडमध्ये दहा वर्ग आहेत:

१ भूमिवर्गः २ पुरवर्गः ३ शैलवर्गः ४ वनौषधिवर्गः ५ सिंहादिवर्गः ६ मनुष्यवर्गः७ ब्रह्मवर्गः ८ क्षत्रियवर्गः ९ वैश्यवर्गः १० शूद्रवर्गः

तृतीयकाण्डम्/सामान्यादिकाण्डम्

समानार्थक व विपर्ययार्थक शब्दकांड (गुण, दोष, मनोवृत्ती, काल, क्रिया इत्यादी)

या कांडामध्ये सहा वर्ग आहेत:

१ विशेष्यनिघ्नवर्गः २ संकीर्णवर्गः ३ नानार्थवर्गः४ नानार्थाव्यवर्गः ५ अव्ययवर्गः ६ लिंगादिसांगवर्गः

४. अमरकोशाचे महत्व

संस्कृतमधील सर्वात जुना आणि अधिकृत समानार्थी शब्दकोश. संस्कृत, प्राकृत, पाली, तसेच मराठी, हिंदी, गुजराती इ. भाषांमधील शब्दनिर्मिती, व्युत्पत्ती व समानार्थक शब्दांची परंपरा हाच कोश दर्शवतो. विद्यार्थ्यांना संस्कृत शब्दसंपदा वाढविण्यास आणि कविंना योग्य शब्द योजण्यास सहाय्य करणारा. नंतरच्या काळातील सर्व शब्दकोशांचा उदा. हेमकोश, विश्वकोश, राजतरंगिणीतील संदर्भ इ. आधारभूत ग्रंथ.

५. या कोशाचे वेगळेपण

अर्थवर्गांनुसार विभागणी केली आहे. उदा. देववर्ग, पाताळवर्ग, वनस्पतीवर्ग इ. समानार्थी शब्द एकत्र देऊन त्यांच्या लिंगनिर्देशासह -पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग उल्लेख केला आहे. छंदबद्ध शैलीमुळे तो इतर गद्य कोशांपेक्षा काव्यात्मक व स्मरणीय आहे. ही मोठी वैशिष्ट्ये आहेत अमरकाशाची. अमरकोशात व्याकरण, व्युत्पत्ती, लिंगशास्त्र आणि शब्दशास्त्र यांचा सुंदर संगम दिसतो.

६. अमरकोश कसा पहायचा, अभ्यासायचा?

अमरकोश छंदबद्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांनी तो कंठस्थ करून अभ्यासावा. प्रत्येक वर्गात येणाऱ्या शब्दांचा अर्थ, लिंग आणि उपयोग जाणून घेणे आवश्यक आहे. अमरकोशावरील टीका आणि भाष्यांसह त्याचा अभ्यास केल्यास अर्थ अधिक स्पष्ट होतो. उदा. “अमरकोशभाष्य”, “अमरटीका”, “रामाश्रयी टीका” इ. उपयुक्त आहेत. आधुनिक अभ्यासात “अमरकोशसंहिता”, “अमरकोशसोपान” अशी मराठी स्पष्टीकरणेही वापरली जातात.

७. प्रमुख टीकाग्रंथ

अमरकोशावर आज पर्यंत ४० पेक्षा अधिक टीकाकारांनी टीकाग्रंथ लिहिले आहेत. त्यातील काही प्रमुख टीका खालील प्रमाणे –

१. क्षीरस्वामीची टीका: सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध भाष्य.

२. ललितादित्य, रघुनाथ, भानुकीर्ति, भट्टोजी दीक्षित इत्यादी विद्वानांची भाष्ये.

३. मराठीतही काही टीका व अर्थसंग्रह झाले आहेत, उदा. “अमरकोशार्थदीपिका”, “अमरकोशसार” इ. महान अर्थशास्त्री आणि संस्कृत विद्वान स्व. चिंतामणराव देशमुखांना अमरकोश अत्यंत प्रिय होता. त्यांनीही अलिकडच्या काळात निवृत्तीनंतर, निधनापूर्वी काहीच वर्षे अमरकोशावर टीका लिहून प्रकाशित केल्याचे केवळ ऐकून आहे. प्रत्यक्ष वाचायला मात्र अजून उपलब्ध होऊ शकलेली नाही.

८. मराठीसाठी अमरकोशाचे महत्व

मराठीतील समानार्थी शब्द, लिंगभेद, आणि व्याकरण परंपरेवर अमरकोशाचा प्रभाव आहे. जुन्या मराठी कवींनी (ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, मोरोपंत, वामनपंडित इ.) जी संस्कृत शब्दसंपदा आपल्या रचनात उपयोजली तिचा पाया अमरकोश आहे. संस्कृत शिक्षणात अमरकोश अभ्यासक्रमाचा आवश्यक भाग म्हणून आजही आहे. पूर्वी विद्यार्थ्यांकडून तो मुखोद्गत करून घेतला जात असे

९. वागनीसाठी काही श्लोक*

 वानगीप्रीत्यर्थ प्रत्येक कांडातील दोन – दोन श्लोक त्यांच्या अर्थासह पुढे देत आहे –

१. स्वर्गादिकाण्डातील दोन श्लोक

(१) स्वर्गः त्रिदिवमाकाशं नभो व्योमान्तरीक्षदम् ।

द्यौर्द्यावा गगनं वियद् अन्तरिक्षं नभः नभः ॥

अर्थः 

‘स्वर्ग’, ‘त्रिदिव’, ‘आकाश’, ‘नभ’, ‘व्योम’, ‘अन्तरिक्ष’, ‘द्यौः’, ‘द्यावा’, ‘गगन’, ‘वियत्’ हे सर्व शब्द आकाश किंवा स्वर्ग या अर्थी वापरले जातात. म्हणजे या सर्वांचा अर्थ “आकाश / स्वर्ग” असा आहे.

(२) इन्द्रः शक्रः पुरन्दरः कोषिकः पाकशासनः।

मेघवाहनवज्री च देवराजो वज्रभृत् ॥

अर्थः 

‘इन्द्र’, ‘शक्र’, ‘पुरन्दर’, ‘कोषिक’, ‘पाकशासन’, ‘मेघवाहन’, ‘वज्री’, ‘देवराज’, ‘वज्रभृत्’ — हे सर्व शब्द देवांचा राजा ‘इंद्र’ याचे समानार्थक शब्द आहेत.

२. भूम्यादिकाण्डातील दोन श्लोक

(१) भूमिर्मेदा क्ष्मा वसुधा वसुन्धरा क्षोणिः क्षोणी वसुमती धरणी धरित्री ॥

अर्थः 

‘भूमी’, ‘मेदा’, ‘क्ष्मा’, ‘वसुधा’, ‘वसुन्धरा’, ‘क्षोणि’, ‘वसुमती’, ‘धरणी’, ‘धरित्री’ — हे सर्व पृथ्वीचे समानार्थक शब्द आहेत.

(२) नदी सरित् सरस्वती तोया आपोऽम्बु वारि सलिलम् ॥

अर्थः 

‘नदी’, ‘सरित्’, ‘सरस्वती’, ‘तोय’, ‘आपः’, ‘अम्बु’, ‘वारि’, ‘सलिल’ — हे सर्व शब्द ‘पाणी’ (जल) या अर्थाने वापरले जातात.

३. समान्यादिकाण्डातील दोन श्लोक

(१) वाचा गिरिर्वाग् गिरा गिरा गीः शब्दो ध्वनिः स्वरः ।

निःस्वनः स्फोट उच्छ्वासो नादो रावो रवः स्वनः ॥

अर्थः 

‘वाच्’, ‘गिरि’, ‘वाक्’, ‘गीः’, ‘शब्द’, ‘ध्वनि’, ‘स्वर’, ‘निःस्वन’, ‘स्फोट’, ‘उच्छ्वास’, ‘नाद’, ‘राव’, ‘रव’, ‘स्वन’ हे सर्व शब्द ‘ध्वनी’ (आवाज / शब्द) या अर्थाने वापरले जातात.

(२) ज्ञानं बुद्धिर्मतिर्धीः प्रज्ञा संवित्स्मृतिः स्मृति: ।

मेधा मनिश्च चेतश्च संज्ञा सञ्ज्ञेति चोच्यते ॥

अर्थः

‘ज्ञान’, ‘बुद्धि’, ‘मति’, ‘धी’, ‘प्रज्ञा’, ‘संवित्’, ‘स्मृति’, ‘मेधा’, ‘मनस्’, ‘चेतस्’, ‘संज्ञा’. हे सर्व शब्द ज्ञान, विचारशक्ती किंवा बुद्धी या अर्थाने वापरले जातात.

१०. सारांश

माहितीग्रंथाचे नाव ‘नामलिंगानुशासनम्’ अर्थात् ‘अमरकोश’ आहे. याचे रचनाकार : अमर सिंह. यांचा काल इ. स. चौथ्या–पाचव्या शतकातला. ग्रंथाची भागसंख्या: ३ – स्वर्गादिकांड, भूम्यादिकांड, सामान्यादिकांड. शब्दसंख्या अदमासे ३, ०००. शैली: छंदबद्ध. अनुष्टुभ्. महत्व: पहिला संस्कृत समानार्थी शब्दकोश. टीका: क्षीरस्वामी, ललितादित्य, भानुकीर्ति इ. मराठीभाषेवर गाढ प्रभाव, भाषिक परंपरेचा पाया, शब्दसंपदेचा आधार.

आपली भाषा संपन्न व्हावी, आपल्याकडे विस्तृत शब्दसंग्रह असावा, नवनवीन शब्द निर्माण करण्याची क्षमता असावी अशी इच्छा मनी बाळगणाऱ्या लेखक, कवीं, पत्रकारांनी अमरकोश अवश्य अभ्यासावा असे स्वानुभवाधारे आग्रहाचे सांगणे.

© श्री  दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “निरपेक्ष दान…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “निरपेक्ष दान…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक 

शाळेत एके दिवशी शिक्षिकेने मुलांना सांगितलं, “आज आपण एका मुलाला नवीन बूट देणार आहोत. पण कोणाला द्यायचे हे ठरवणं माझ्यासाठी कठीण आहे. म्हणून आपण लॉटरी काढूया. ज्याचं नाव येईल त्याला हे बूट मिळतील. ”

सर्व मुलांनी आनंदाने आपल्या-आपल्या नावाचे छोटे कागद लिहून डब्यात टाकले.

शिक्षिकेने त्या कागदांचे तुकडे व्यवस्थित मिसळले आणि सगळ्या मुलांसमोर एक कागद उचलला.

कागद उघडताच त्यावर लिहिलं होतं, “अजय”.

सर्व मुलांनी टाळ्या वाजवल्या.

अजय हळूच उठला. त्याच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले.

जुन्या, फाटलेल्या बुटांमुळे तो किती दिवस लाजिरवाणा होत होता, हे फक्त त्यालाच ठाऊक होतं.

वडिलांचं छत्र हरपलेलं, आई असहाय असायची … अशा परिस्थितीत नवीन बुटांचं हे बक्षीस त्याच्यासाठी सोन्यासारखं अमूल्य होतं.

त्या क्षणी वर्गात जणू सगळ्या मुलांच्याही डोळ्यात चमक दिसली.

पण शिक्षिकेला घरी गेल्यावर पतीसमोर ही गोष्ट सांगताना अश्रू थांबले नाहीत.

पतीने विचारलं – “अगं, आनंदाची गोष्ट आहे, मग रडतेस का?”

शिक्षिका हुंदके देत म्हणाल्या –

“मला अजयचे बूट पाहून नाही, तर बाकी मुलांच्या हृदयातलं ममत्व पाहून रडावंसं वाटतंय.

कारण जेव्हा मी डब्यातील उरलेले कागद उघडले…

त्यावर सगळीकडे फक्त एकच नाव होतं – अजय.

त्या लहानग्या मुलांनी अजयच्या चेहऱ्यावरचं दुःख, त्याची असहायता ओळखली आणि त्याच्या वाट्याला आनंद यावा म्हणून स्वतःचं नाव न लिहिता त्याचं नाव लिहिलं.

ती निरागस मुलं त्याच्या वेदना जाणून घेऊ शकली, पण मी त्याच्या डोळ्यांतील ती व्यथा ओळखू शकले नाही… याचं मला आयुष्यभर दुःख राहील! “

मित्रांनो, शिक्षणाची ताकद फक्त पुस्तकात किंवा वर्गात नसते,

ती मुलांच्या निर्मळ मनात आणि करुणेत दडलेली असते.

त्या निरागस मुलांनी जे शिकवलं, ते कदाचित कुठल्याही पाठ्यपुस्तकात सापडणार नाही –

खरा आनंद आपल्याला मिळालेल्या गोष्टींमध्ये नसतो, तर इतरांच्या चेहऱ्यावर आणलेल्या हास्यात असतो.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares