सुश्री मंजिरी येडूरकर
इंद्रधनुष्य
☆ मस्तानी… – लेख क्र. २ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆
(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)
मस्तानीचा एक दुर्मिळ फोटो
दिल्लीचा वजीर, मोहम्मद खान बंगेश, बुंदेल खंडावर चालून आला. छत्रसाल राजाला त्याच्यासमोर शरणागती पत्करावी लागली. त्याने छत्रसाल राजाला बंदिवान केले. धूर्त छत्रसालने हेराकरवी बाजीराव मराठ्याला पत्र पाठवले व त्याच्याकडे मदतीची याचना केली. दिल्लीलाही डोईजड झालेला तोच एक परम प्रतापी पुरुष भारतात होता. पत्र मिळायचा अवकाश ३० – ४० हजाराची फौज घेऊन खुद्द बाजीराव बंगेश वर चालून गेले. हे सगळं इतकं जलद घडलं की बंगेश खानाला काही समजलंच नाही. तो एका गढीत अडकला आणि त्याला पळून जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे खुश होऊन छत्रसालाने ३२ लाखाचे उत्पन्न असणारा मुलुख बाजीरावला नजर केला. त्याबरोबर बाजीरावला आपली मुलगी दिली. जिचं सौंदर्य आरस्पानी होतं. आई यवन होती पिता प्रणामी पंथाचा (सेक्युलर) त्यामुळे नृत्य, गायन कला आईकडून तर युद्ध कौशल्य, राज्यकारभाराची जाण पित्याकडून वारसा हक्काने मिळालेली. पित्याच्या मांडीला मांडी लावून ही युद्धात उतरायची. नमाज पढायची आणि कृष्णाची पूजा पण करायची. तिचा उर्दू साहित्य, कुराणाचा अभ्यास होता. तसंच संत कबीर, मीराबाई, केशवदास, तुलसीदास तिला मुखोद्गत होते. छत्रसाल राजा म्हणाला, “हा आमचा हिरा आहे, त्याला पैलू पडले आहेत. बाजीराव, आपल्या सारखा धाडसी, कर्तृत्ववान माणूसच हा हिरा सांभाळू शकेल. “
तीच आम्ही मस्तानी! पित्याकडून निघालो तेच मुळी रेशीमबंध गुंफून व परतीचे दोर कापून! पुण्याला आलो, कोथरूडच्या बागेत. त्यावेळी आमची ओळख सांगितली, एक कलावंतीण आणली आहे, जन्माष्टमीसारख्या दिवशी नाचगाण्याला उपयोगी पडेल. आणि आमच्या स्वप्नांचा इमला इथेच कोसळला. आम्ही धीर सोडला नाही. त्यांची कांहीतरी मजबुरी असेल, असा विचार केला.
एक दिवस बाजीराव आमच्याकडे आले, म्हणाले तुझ्या गाण्यात एवढी काय जादू आहे की हरणे सुद्धा मंत्रमुग्ध होतात. आम्हालाही ऐकायचं आहे. आम्ही ‘ निस दिन बरसत नैन हमारे ‘ गाण्याने सुरवात केली. मैफिल रंगली. आम्ही गात होतो नि ते ऐकत होते. रात्र सरली पण मन भरलं नाही. त्यानंतर यादगार झाला, जन्माष्टमीचा उत्सव! कीर्तनानंतर आमचा नाच होता. आम्ही बेभान होऊन नाचत होतो. वाहवा होत होती. नाच झाला, आम्ही माहुलीच्या वाड्यात येऊन सगळा साज उतरवत होतो. तेवढ्यात रेशमी पडदा सारून बाजीराव उभे! आम्ही गोठून गेलो, पायात पडलेली ओढणी उचलायचं भानच राहिलं नाही. पिस्वादीच्या गुंड्या काढलेल्या तशाच. थरथरत विचारलं, इतनी रात, नदीका ये पानी, आप कैसे आये? क्यूँ आये? “कां, आमचं चुकलं कां? ” “नहीं, नहीं! माफ करना, हमारा ये मतलब नहीं था! ” काहीही न बोलता त्यांनी मेणबत्ती विझवली. आणि आम्ही अनंत जन्मासाठी एकमेकाचे झालो. असाच दिवाळीचा पाडवा आला. आमच्यासाठी बाजीरावांनी खानदानी स्त्री सारखा सगळा साज, शृंगार पाठवून दिला. हिरवा गर्द शालू, खोपा, त्यावर मोत्यांच्या मुदी, कानात मोत्यांचे वेल, गळ्यात सुवर्णालंकार, कंबरपट्टा, गोट, तोडे, बाजुबंद, नाकात टपोऱ्या मोत्यांची नथ! बाजीराव पहातच राहिले. पर माॅं अल्ला! हमपे तो तोहमत आ गयी| बाजीरावांनी बसंतीला कुंकवाचा करंडा आणायला सांगितला. आणि ते कुंकू आमच्या कपाळावर रेखलं. म्हणाले, “एवढी एकच कमतरता होती, पूर्ण केली. ” हमने कितना समझाया| हुजुर ये नहीं हो सकता| ये एक नाचीज औरत है| वो नहीं माने| इस दासीने हुजुरके कदमोंपर अपना दिल रख दियाही था, आज जान भी रख दी|
बाजीराव आता आमच्या सन्मानासाठी, अस्तित्वासाठी घरच्यांशी लढत होते. पहिली गोष्ट केली, ती म्हणजे मस्तानी कधीही नाचणार नाही, हे सांगितले. आम्हीही आदबीनं पायातले चाळ श्रीमंतांसमोर ठेवले. दुसरी गोष्ट, आम्हाला रोज त्यांच्याबरोबर घोड्यावरून रपेट मारण्यासाठी नेत होते. एक दिवस आम्ही येण्यासाठी नाही म्हणून सांगितले. पण ऐकायलाच तयार नाहीत. आणि आम्हाला ते गुपित सांगावं लागलं. त्यादिवशी पहिल्यांदा आम्ही त्यांना ‘राऊ ‘ अशी हाक मारली. त्यांनीही पहिल्यांदाच आमच्या ताटात आमचं अन्न स्वीकारलं. असे मिळणारे एकेक सुखाचे क्षण मनाच्या कुपीत बंद करून ठेवत होतो, नजर लागू नये म्हणून!
पण, नजर लागलीच! राऊंचं आमच्याकडे येणं वाढलं ही गोष्ट सगळ्यांनाच खटकत होती. राऊ नाहीत असं बघून आम्हाला पुण्यातून हाकलून दिलं. जाणार कुठे? पोटातल्या बाळाची काळजी वाटायला लागली. पहिल्यांदाच इतकं निराधार वाटलं. राऊ आल्यावर आम्हाला शोधून पुन्हा पुण्याला घेऊन गेले. मग मात्र आम्ही आमच्या चोळी बांगडीचा हट्ट धरला. त्यामुळं आम्हाला दोन गावं इनाम मिळाली.
काशीबाईंना मुलगा झाला, तेव्हा आम्ही बाळंतविड्याचा थाट करून पाठवला. राऊ बरेच दिवस आले नाहीत. वाटायचं, काशीबाईंजवळ बसले असतील. बाळाकडे दोघे कौतुकानं पहात असतील. आपल्याला बाळ होईल तेंव्हा राऊ जवळ असतील? शंकेची पाल चुकचुकली. खरंच राऊ आले नाहीत. आम्ही एकटेच बाळाकडे बघत होतो, त्याच्या भविष्याच्या चिंतेनं. दहा दिवस झाल्यावर राऊ आले. नाव काय ठेवायचं, म्हणाले. आम्ही सांगितलं, आपली खरी भेट कृष्णाष्टमीला झाली म्हणून कृष्णसिंग ठेऊया. राऊ म्हणाले, आमचा मुलगा समशेर बहाद्दर होणार, तेच नाव ठेऊया.
काही दिवसांनी अचानक आले. शनिवार वाड्यात आमच्यासाठी महाल बांधला होता, तिथे नेण्यासाठी. लाख मनानेके बावजूद, एक यवनी, ब्राह्मण लोगोंके बीच लानेकी हिम्मत कर रहे थे| आम्हालाही वाटलं, सहवास वाढला की अपोआप प्रेम निर्माण होईल. पर नही, धर्मसे हम अछूत थे, अछूत ही रह गये| उलट चातुर्मासाचं निमित्त करून आमच्या पासून दूर राहण्याचं राऊंकडून वचन घेतलं. आम्ही चार दिवसातच बेचैन झालो. तिकडेही तशीच अवस्था होती. आणि कुणाला न सांगता, वचन मोडून, राऊ आले. काशीबाईंना वाटलं, यवनीच्या नादाला लागून आपल्याला विसरले, आणि त्यांनी राऊंना आपल्या महालाचे दरवाजे बंद केले. हा घाव त्यांना सोसला नाही. त्यांचं शराब पिणं वाढलं. खूप वाटत होतं, काशीबाईंना जाऊन सांगावं, ‘ ही मस्तानी असली तरी तुमचं त्यांच्या मनातलं स्थान अबाधित आहे. तुम्ही मंदिर आहात तर ही मस्तानी त्याची एक पायरी आहे. तुम्ही देवघरातील मंद तेवणारी ज्योत आहात तर मस्तानी त्याचा एक अंधारा कोपरा आहे. ‘ जन्माष्टमीला आम्हाला नाचण्याचं आमंत्रण दिलं, आमचा अपमान करण्यासाठी! आम्ही फक्त एक रखेल, नाचणारी आहोत आणि आता राऊ आमच्यापासून दूर गेले आहेत, याची जाणीवकरून देण्यासाठी! तरीही आम्ही ते स्विकारलं, काढून ठेवलेले चाळ पुन्हा बांधले, वाटलं या निमित्तानं राऊंना निदान पाहता येईल, व काशीबाई भेटतील, त्यांना मनातलं सगळं सांगता येईल. पण आमचा नाच पूर्ण होण्यापूर्वीच काशीबाई दरबारातून निघून गेल्या. आम्ही बिदागीचं ताट घेऊन मागे फिरलो.
दिवाळीच्या पाडव्याला काशीबाई ओवाळणार नाहीत हे कळल्यावर काशीबाईनी दिलेली नवग्रहाची अंगठी आम्हाला ओवाळणीत देऊन टाकली. म्हणाले, “आज बाजीरावाचा त्याच्या कुटुंबाशी उरला सुरला संबंध ही संपला. ” आम्ही खूप सांगितलं, आमच्याशी संबंध तोडा पण त्यांच्याशी नको. मानसिक ताण सगळ्यांचाच वाढला.. हे आमच्या मुळे झालं याचं वैषम्य कायम राहिलं. वाईट एवढंच वाटतं, आई यवन असली तरी पिता हिंदू होता तरीसुद्धा आम्ही यवन च राहिलो, तसाच आमचा मुलगाही पिता ब्राह्मण असूनही यवनच राहिला.
आम्हाला राऊंच्यापासून तोडण्यासाठी आमचा छळ सुरू झाला. काशीबाईंचा अबोला, आम्हाला दिल्या जाणाऱ्या त्रासाच्या बातम्या, सहन न झाल्यामुळं, राऊ मोहिमेवर मोहिमा करत राहिले. याचा फायदा घेऊन आम्ही घर, गाव सोडून जावे म्हणून त्रास देणं सुरू झालं. तवायफ म्हणून हिणवलं. आम्ही जात नाही हे पाहिल्यावर, राऊंना पुण्याचे रस्ते बंद केले. आम्हाला नजर कैदेत ठेवलं. आमचा गुन्हा काय होता तर आम्ही बाजीरावांवर जिवापाड प्रेम केलं. आणि बाजीरावांनी आमच्यावर! तरी आम्ही सगळे साखळदंड तोडून त्यांना भेटायला गेलोच. पण आमचं प्रेम त्यांना नाही तारु शकलं. आजार बळावला. शेवटी काशीबाईंना पाठवलं पण फार उशीर झाला होता.
राऊंच्या नंतर ह्या माणसांच्यात आम्ही जिवंत राहणंच शक्य नव्हतं. मान, सन्मान सोडाच, पण आमचं चारित्र्य तरी सांभाळू शकलो असतो का नाही कुणास ठाऊक! राऊंना भेटायला जाणं शक्य नव्हतं, पण आम्ही त्यांना सांगत होतो, तुमच्याबरोबर आम्हालाही घेऊन जावा. आमचं नशीब थोर, आमचा धावा त्यांनी ऐकला आणि आमचा हात धरून आम्हाला अंतिम प्रवासास घेऊन गेले.
ना आमच्या नृत्य कलेचा सन्मान झाला, ना आमच्या युद्धकलेचा! ना आमची बुद्धी उपयोगी पडली, ना आमचं प्रेम सांभाळू शकलो. ज्या भितीपोटी आमच्या पिताश्रींनी आम्हाला या शूर योद्ध्याबरोबर पाठवलं, ती भिती इथेही पोखरत राहिली. जे प्रेमाचे काही क्षण आमच्या वाट्याला आले, त्या क्षणांसाठी आम्ही राऊंचे अत्यंत ऋणी आहोत. व जो त्रास भोगावा लागला ते आमचे प्राक्तन होते. त्यासाठी कोणावरही आमचा राग नाही. राऊंचं काशीबाईंवरचं प्रेम पाहून आम्हाला त्यांच्याबद्दल कधीच असूया वाटली नाही तर त्यांच्याबद्दलचा आदरच वाढला! एकच सुख जे राऊंनी दिलं, त्यासाठी असे सात जन्म त्यांच्यावरून ओवाळून टाकू, ते म्हणजे अंतिम क्षणी त्यांनी दिलेली साथ!!
☆
© सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





