श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३ आणि ४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

– – श्लोक ३.

प्रभाते मनी राम चिंतीत जावा |

पुढे वैखरी राम आधी वदावा |

सदाचार हा थोर सांडू नये तो |

जगी तोचि तो मानवी धन्य होतो ||३||

अर्थ : पहाटेच्या वेळी मनात श्रीरामाचे चिंतन करावे. त्यानंतर वाणीने त्याचे नाम उच्चारावे. जगात सदाचाराला अत्यंत महत्त्व आहे; तो कधीही सोडू नये. सदाचाराने वागणारा मनुष्यच खऱ्या अर्थाने धन्य ठरतो.

पहाटेची वेळ किती रम्य आणि शांत असते! आपल्या संस्कृतीत तर या वेळेला “रामप्रहर” असे सुंदर नाव आहे. रात्रीच्या विश्रांतीनंतर पहाटे मन स्वच्छ, प्रसन्न आणि स्थिर असते—जणू एखाद्या शांत डोहातील निर्मळ पाणी. म्हणूनच दिवसाची सुरुवात भगवंताच्या चिंतनाने करावी, असे समर्थ सांगतात. चिंतन म्हणजे एखाद्या गोष्टीचा विचार.

प्रभाती मनात रामाचे स्मरण केले, त्याचे नाम घेतले, तर त्या नामाचा संस्कार दिवसभर मनावर राहतो. सकाळी ऐकलेले एखादे गाणे जसे दिवसभर ओठांवर रेंगाळते, तसेच पहाटे घेतलेले भगवन्नाम मनात गुंजत राहते. जसे एखादा रुग्ण सकाळी घेतलेल्या औषधामुळे दिवसभर सुदृढ राहतो, तसेच प्रभातीचे नामस्मरण मनाला अंतर्गत बळ देते.

समर्थ पुढे सांगतात—“पुढे वैखरी राम आधी वदावा”—म्हणजे कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी मुखाने, वाणीने रामनाम उच्चारावे. पूर्वी घराघरांत सकाळी स्तोत्रपठण, भजन, आरती यांची परंपरा होती. आजच्या वेगवान जीवनात ती कमी होत चालली आहे. अनेकदा प्रश्न विचारले जातात—याचा काय उपयोग? परंतु प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर मोजता येत नाही; तरीही ती निरर्थक ठरत नाही.

प्रभातीचे चिंतन मनावर सुसंस्कार घडवते. दिवसाची सुरुवात मोबाईलच्या पडद्याने नव्हे, तर भगवंताच्या नामाने झाली, तर एकाग्रता, सकारात्मकता आणि संयम यांची वाढ होते. वाईट विचारांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती मिळते.

“प्रभाते” या शब्दाचा आणखी एक अर्थ लावता येतो—जीवनाची पहाट, म्हणजेच बालपण. लहान वयातच चांगल्या विचारांचे, सद्गुणांचे सिंचन झाले, तर ती शिदोरी आयुष्यभर साथ देते. म्हणूनच बालसंस्कारांचे महत्त्व अधोरेखित होते.

समर्थ पुढे म्हणतात—“सदाचार हा थोर सांडू नये तो. ”

सदाचार म्हणजे शुद्ध, पवित्र आणि सुसंगत आचरण. सत्ता, संपत्ती किंवा पद यामुळे कोणी थोर होत नाही; तर ज्याच्या बोलण्यात आणि वागण्यात एकवाक्यता आहे, तो खरा थोर. तुकाराम महाराज म्हणतात—“बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. ” संतांचे आचरणच त्यांची खरी ओळख असते. अशा सदाचरणाचा अंगीकार करणारा मनुष्यच जगात खऱ्या अर्थाने धन्य ठरतो.

नामस्मरण, शुद्ध विचार आणि सदाचार—या त्रिसूत्रीने दिवसाची आणि जीवनाची पहाट उजळून निघते.

स्वसंवाद

  • मी माझ्या दिवसाची सुरुवात भगवंताच्या चिंतनाने करतो का?
  • मी करीत असलेले नामस्मरण ही केवळ सवय आहे की अंतर्मनाला बळ देणारी जाणीवपूर्वक कृती?
  • माझ्या बोलण्यात आणि वागण्यात एकवाक्यता राखण्याचा मी प्रयत्न करतो का? (क्रमशः)

– – – – – 

– – श्लोक ४.

मना वासना दुष्ट कामा नये रे |

मना सर्वथा पापबुद्धि नको रे |

मना धर्मता नीती सोडू नको हो |

मना अंतरी सार विचार राहो ||४||

अर्थ : हे मना, दुष्ट वासना, अहितकारक इच्छा मनात येऊ देऊ नकोस. पापबुद्धीला स्थान देऊ नकोस. धर्म आणि नीती कधीही सोडू नकोस. अंतर्यामी जे खरे, श्रेष्ठ आणि शाश्वत आहे त्याचाच विचार नांदू दे.

मनाच्या श्लोकांची एक साखळी आहे. मागील श्लोकात समर्थांनी सांगितले—“सदाचार हा थोर सांडू नये तो. ”या श्लोकात ते त्या सदाचाराची अंतर्गत पायाभरणी स्पष्ट करतात. सदाचार बाह्य वर्तनातून दिसतो खरा; पण त्याची सुरुवात मनातून होते. आधीच्या श्लोकात समर्थ म्हणतात, “गमू पंथ अनंत या राघवाचा. ” एक वेळ भ्रष्टाचार, अनितीने वागणे हे लौकिक व्यवहारात खपून जाईलही पण राघवाच्या पंथावर चालायचे तर मनामध्ये वाईट विचार आणि अनितीची वागणूक कशी बरं चालेल?

मन अत्यंत चंचल आहे. तेच आपले मित्र आणि तेच आपले शत्रू. म्हणूनच आपण म्हणतो “मन चिंती ते वैरी न चिंती. ” कधी कधी मनात येणारे विचार इतके तीव्र, भयंकर आणि नकारात्मक असतात की आपण स्वतःच दचकतो. पण असे विचार येणे ही मानवी प्रवृत्ती आहे; त्या विचारांना आपण पोषक खाद्य पुरवायचे की ते सोडून चांगले विचार जाणीवपूर्वक जोपासायचे हे आपल्या हातात आहे.

वाईट विचार मनात येण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. ते सहज येतात. दूरदर्शनवरील धारावाहिक, हिंसाचार आणि भडक प्रणयदृश्ये असलेले चित्रपट, समाजमाध्यमे अशा विचारांना हातभारच लावतात. परंतु चांगले, उन्नत, हितकारक विचार जाणीवपूर्वक जोपासावे लागतात. हीच साधना आहे. पूर्वी मोठी माणसे सांगत, “चांगले बोला. आपल्या भोवती देवतांचा वास असतो त्या देवता तथास्तु म्हणत असतात. ” दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर शब्दांनाही शक्ती असते. आपले विचार, शब्द आणि कृती यांचा परस्पर संबंध असतो. आपण जे वारंवार चिंततो, तेच आपण बोलतो; आणि जे बोलतो, ते आचरणात उतरते. म्हणूनच सद्विचारांचा जागर करणे ही सदाचाराची पहिली पायरी आहे.

आपल्यासमोर दोन वाटा असतात. त्या म्हणजे श्रेयस आणि प्रेयस. श्रेयस म्हणजे दीर्घकालीन हित आणि मूल्याधिष्ठित निवड असे म्हणता येईल. तर प्रेयस म्हणजे तात्कालिक सुख, आकर्षक वाटणारे पण शेवटी अहितकारक ठरणारी निवड.

तात्पुरत्या लाभासाठी अनैतिक मार्ग स्वीकारणे, सहजसोप्या सुखासाठी मूल्यांचा त्याग करणे ही प्रेयसाची उदाहरणे. पण कठीण असले तरी योग्य मार्ग स्वीकारणे, इतरांच्या आनंदात आनंद मानणे, मदतीचा हात पुढे करणे हे श्रेयसाचे लक्षण.

समर्थ म्हणतात, “मना धर्मता नीती सोडू नको हो. ” धर्मता म्हणजे धर्माचरण. पण धर्माचरण म्हणजे केवळ धार्मिक आचार नव्हे; तर न्याय, प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि संवेदनशीलता. नैतिकेने वागण्याची जबाबदारी. परस्त्रीला मातेसमान किंवा बहिणीसमान मानले पाहिजे असं काही कायदा सांगत नाही. परंतु भारतीय संस्कृतीने सांगितलेली नीतीमूल्ये आचरणात आणायची ठरवली तर आपल्याला सुरुवात तिथूनच करावी लागेल. असे झाले तर अनेक अनर्थ टळतील.

नीती म्हणजे आचरणातील सुसंगती. सज्जनांनी घालून दिलेल्या मार्गावर वाटचाल करणे. आजच्या काळात प्रसारमाध्यमे, सामाजिक वातावरण, स्पर्धेची धडपड या सर्वांचा परिणाम मनावर होत असतो. कधी कधी अनैतिक मार्गाने यश मिळताना दिसते. मग मन म्हणते, “ मीच कशाला चांगले वागू? माझ्यामुळे असा काय फरक पडणार आहे? ” पण समाजाचा पाया हा प्रत्येकाच्या व्यक्तिगत नीतीवर उभा असतो. आपला छोटा तडजोडीचा निर्णयही मोठ्या अध:पतनाची सुरुवात ठरू शकतो.

या श्लोकात समर्थ पुढे म्हणतात, “मना अंतरी सार विचार राहो. ” सार म्हणजे जे खरे, टिकाऊ, मूल्याधिष्ठित आहे ते.

.. क्षणिक लाभ, राग, द्वेष, मत्सर—हे असार.

.. प्रेम, करुणा, प्रामाणिकपणा, संयम—हे सार.

आपली वाटचाल प्रेयसकडून श्रेयसकडे व्हावी, हीच समर्थांची अपेक्षा आहे. मोठ्या प्रतिज्ञेपेक्षा छोटा पण सातत्यपूर्ण प्रयत्न अधिक प्रभावी असतो. मनावर कठोर बंधने लादण्यापेक्षा छोट्या, पाळता येतील अशा नियमांनी सुरुवात केली तर संस्कार हळूहळू दृढ होतात. श्रेयसाचा मार्ग हा टप्प्याटप्प्याने चालायचा असतो. मन जसे घडवू, तसे जीवन घडते. म्हणूनच समर्थांचे हे आवाहन केवळ उपदेश नाही; ती अंतःकरण शुद्धीची दिशा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतःशी थोडा संवाद साधू या.

स्वसंवाद

  • माझ्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना मी ओळखून त्यांच्यावर संयम ठेवतो का?
  • तात्कालिक फायद्यासाठी मी कधी माझ्या मूल्यांशी तडजोड करतो का?
  • माझ्या निर्णयांत श्रेयस अधिक आहे की प्रेयस?
  • ‘सार विचार’ मनात टिकून राहावेत यासाठी मी रोज काय करतो?

– – क्रमशः श्लोक ३ आणि ४. 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments