श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ संगीत देवबाभळी : एक थरारून सोडणारा नाट्यानुभव… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

देवबाभळी असे निरस नाव असलेलं एखादं नाटक असेल असं कधी वाटलं नव्हतं, त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते संगीत नाटक असेल आणि त्याच्याही पुढची गोष्ट म्हणजे तो एक थरारून टाकणारा नाट्यानुभव असेल असंही कधी वाटले नव्हते. पण म्हणतात ना Truth is stranger than fiction. तसंच काहीसं माझं या नाटकाच्या बाबतीत झालं आहे. पुण्यातील वास्तव्यात हे नाटक पाहण्याचा योग आला आणि जे पाहिले त्यामुळे भरून पावलो. हे नाटक पाहिलं नसतं तर एका चांगल्या आनंदाला निश्चितच मुकलो असतो.

खरं तर हे नाटक आहे संत तुकारामांची पत्नी आवली आणि विठूरायाची पत्नी देवी रुख्मिणी यांच्यावर. या नाटकात केवळ या दोघींच्याच भूमिका आहेत. तुकाराम महाराज आणि विठ्ठल यांचा उल्लेख वारंवार झाला तरी या नाटकात पात्र म्हणून प्रत्यक्षात रंगमंचावर ते कधीच येत नाहीत पण ते अवघे नाटक व्यापून उरले आहेत. त्यांचे अस्तित्व सतत जाणवत राहते. मग प्रश्न असा आहे की देवबाभळी हे नाव आले तरी कसे?

यासाठी नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक असलेल्या प्राजक्त देशमुख यांना त्याचे श्रेय द्यावे लागेल. तुकारामांची पत्नी आवली हिच्या पायात बाभळीचा काटा मोडतो. तो काटा काढण्यासाठी कोण मदत करतं तर प्रत्यक्ष विठुराया. विठुरायाने पायातला काटा काढला तरी पायातल्या वेदनेची आणि जखमेची ठसठस घेऊन आवली नाटकभर वावरते. विठुराया केवळ तेवढं करून थांबत नाही, तर तिच्या मदतीला आपली पत्नी रुख्मिणी हिला पाठवतो. त्यावेळी आवली पोटुशी असते. देवबाभळीचा काटा मोडणं हे खरं तर निमित्त! पण या निमित्ताने विठुरायाचे आपल्या भक्तांवरील प्रेम दिसते. या निमित्तानेच रुख्मिणी आवलीच्या घरी येते. या दोघींचंही दुःख कुठेतरी एकसमान आहेत. पण त्या दोघींच्या मनातील वेदना, स्त्री सुलभ भावना आणि आपल्या पतीबद्दल असलेलं प्रेमही यानिमित्ताने दिसून येतं. या सगळ्या गोष्टींना कारण ठरते ती देवबाभळी!

नाटकाचा पडदा उघडतो आणि शेणानं आपलं अंगण सारवणारी आवली दृष्टीस पडते. सारवताना ती गात असते. सकाळचे प्रसन्न वातावरण दृष्टीला पडते. स्वयंपाकघरातून डोकावणारी सूर्यकिरणे दिसतात. चुलीतला धूर दृष्टीस पडतो. आवली भाकऱ्या करते आणि भंडाऱ्याच्या डोंगरावर असणाऱ्या आपल्या पतीला म्हणजेच तुकाराम बुवांना त्या नेऊन देत असते. तुकारामबुवांना हाक मारताना ‘ आवो आवो… ‘ अशा तिच्या आर्त हाका हृदयाला स्पर्शून जातात. डोंगर उतरताना आवलीच्या पायात बाभळीचा काटा घुसतो आणि ती खाली कोसळते. पुढचं तिला आठवत नाही.

आवलीला शुद्ध येते तेव्हा ती आपल्या स्वयंपाकघरात पडलेली असते. चुलीजवळ कोणीतरी स्त्री भाकऱ्या करताना तिला दिसते. आपल्या घरात ही कोण नवीन बाई? तुकारामबुवांनी काही नवीन तर..? अशी शंका तिच्या मनात येते. ती त्या स्त्रीला विचारते, ‘ कोण ग तू? आणि माझ्या घरात कशी आलीस? ‘ तेव्हा ती सांगते, ‘ माझं नाव लखुबाई. मला तुमची काळजी घ्यायलाच पाठवलं आहे. ‘ ही लखुबाई म्हणजेच रुख्मिणी. प्रत्यक्ष विठ्ठलाच्या सांगण्यावरून ती इथं आली आहे. तशी आवली कजाग बाई. विठ्ठलाला चक्क शिव्या घालत असते. पण त्याचं कारणही तसंच असतं. तिचा पती म्हणजेच तुकाराम महाराज विठ्ठलाच्या नादी लागलेले असतात. आपल्या पत्नीकडे, घराकडे, संसाराकडे त्यांचे काडीमात्रही लक्ष नाही. त्यामुळे ती विठ्ठलाला शिव्या देते. आपल्या पतीला हे ‘ पंढरीचे भूत ‘ लागले आहे आणि त्याने आपल्या सगळ्या संसाराचे वाटोळे केले आहे अशी तिची भावना असते.

आवली विठ्ठलाला ‘ चिघळलेली जखम ‘ म्हणते. देवाच्या नादी लागण्याचा, नामस्मरणाचा काय उपयोग आहे असे म्हणते. पण आता घरात आलेल्या रुख्मिणीला मात्र तिचे हे विठ्ठलाला म्हणजे आपल्या पतीला शिव्या देणे आवडत नाही. अशी ही कजाग आवली असली तरी वरून काटेरी फणसासारखी दिसणारी आहे. अंतर्यामी मात्र फणसाचे गोड गरे आहेत. अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती ही की आवली विठ्ठलाला शिव्या देत असली तरी त्यानिमित्ताने का होईना पण ती घेते त्याचेच नाव! या अर्थाने आवलीही विठ्ठलभक्त आहेच!

रुख्मिणी तिचा पाय हातात घेते. त्याला मलमपट्टी करते. तिच्याच घरात तिच्यासाठी भाकऱ्या बडवून तिला मदत करते. तेव्हा रुख्मिणी विचारते, ‘ यातला मला एखादा तुकडा दिला तरी चालेल. ‘ तेव्हा आवली म्हणते, ‘ तुकडा कशापायी? पूर्ण भाकरीच देईन की तुला. ‘ यातून आवलीचा प्रेमळ स्वभावही दिसून येतो. रुख्मिणी चुलीजवळ बसून जेव्हा भाकरी करते, तेव्हा चुलीतल्या निखाऱ्याचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडतो. त्याने तिचा मुळातच तेजपुंज असलेला चेहरा उजळून निघतो. तिचं भाकरी करणं, भाकरी शेकणं हे कुठेही नाटकातलं वाटत नाही, इतकं ते जिवंत साकारण्यात ती आणि दिग्दर्शक दोघेही यशस्वी झाले आहेत. आवली जेव्हा घर सारवते, तेव्हाही ते नाटकातलं दृश्य वाटतच नाही.

घर सारवणं नाहीतरी आजकाल कोणाला माहिती आहे? पण आजच्या पिढीला ते यात माहिती होऊ शकेल.

आवलीचा तुकारामबुवांवर राग आहे तसाच रुख्मिणीचा सुद्धा विठ्ठलावर आहे. पंढरपुरात विठ्ठल आणि रुख्मिणीची देऊळं वेगवेगळी आहेत. विठ्ठल हा श्रीकृष्णाचाच अवतार आहे. श्रीकृष्ण जेव्हा द्वारकेला आला, तेव्हाही त्याने राधेशी असणारी प्रीती, स्नेहभाव कायमच ठेवला होता. त्यामुळे रुख्मिणी रागावून दिंडीर वनात निघून गेली होती. तोच संदर्भ इथे आहे. या कारणानेच रुख्मिणी विठ्ठलावर नाराज आहे. विठ्ठलाला आपल्यापेक्षा आपले भक्त अधिक प्रिय आहेत अशी तिची तक्रार आहे. विठ्ठलाने जेव्हा आवलीच्या पायातला काटा काढला, तेव्हा स्त्री सुलभ भावनेतून रुख्मिणी बघायला आली की कोण ही की जिच्या पायातला काटा आपला पती काढतो आहे. आवली त्याच्या भक्ताची पत्नी आहे. त्याची काळजी घेणारी ती आहे. ती गर्भार अवस्थेतही आपल्या पतीला जेवण घेऊन येते. म्हणून विठुराया रुख्मिणीला आवलीच्या घरी जाऊन तिची सेवा करायला सांगतो.

अशा या परिस्थितीत आवली आणि रुख्मिणी जवळ येतात. एकमेकींची दुःख समजून घेतात. त्यांच्यातील संवाद हृदयस्पर्शी तर आहेतच पण खूप काही सांगून जाणारे आहेत. तुकाराम बुवा घरात अजिबात लक्ष देत नाहीत. त्यांच्या स्वयंपाकघरातील डबे, भांडी रिकामी आहेत. खरं तर आवलीच माहेर श्रीमंत होतं. ती आपल्या माहेरी परत जाऊ शकली असती. रुख्मिणी तिला विचारते, ‘ मग काय आहे तुमच्याकडे? कसा चालतो तुमचा संसार? ‘ त्यावेळी आवली उपरोधिकपणे तुकारामबुवांचा अभंग वापरून उत्तर देते, ‘ आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने… ‘ त्यावेळी प्रेक्षक अंतर्मुख होतात.

रुख्मिणी विचारते, ‘ मग तू निघून का जात नाहीस? ‘ त्यावर आवलीने दिलेले उत्तर सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारे आहे. ती म्हणते, ‘ निघून जाऊन काय करू? मी आहे म्हणून त्यांना जेवण तरी मिळते. माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला रुसून निघून जाण्याचा अधिकार कुठे आहे? मी काही रुख्मिणी थोडीच आहे रुसून निघून जायला? आणि निघून गेल्यावर घरी परत यावंसं वाटलं तर आल्यावर घर तरी जागेवर असेल का? मग कुठे जायचं? ‘ यातून तिने रुख्मिणीला बोध तर केला आहेच पण आजकाल क्षुल्लक कारणावरून नवऱ्यावर चिडून घरातून निघून जाणाऱ्या मुली, काही झाले की लगेच घटस्फोट घेणाऱ्या मुली यांच्यासाठीही दोन मोलाचे शब्द यातून तिने सुनावले आहेत असे वाटते. एकदा का घर सोडून निघून गेल्या आणि नंतर परत यावेसे वाटले तरी घर (पती) जागेवर असेलच याची शाश्वती कोणी द्यावी?

रखुमाई म्हणते, ‘ मी आणि तू दोघं गाभाऱ्याच्या बाहेर आहोत, पण तू मात्र गाभाऱ्याबाहेर राहूनही गाभाऱ्याचा घुमारा झालीस. ‘ आवली जशी रुख्मिणीला तिची चूक दाखवून देते, तशीच रुख्मिणी सुद्धा आनंदाने जीवन जगण्याचा मार्ग आवलीला सांगते. ती पावसात आवलीला घेऊन जाते. हात पसरून सांगते, ‘ बघ पावसात असं मनसोक्त भिजायचं असतं सगळं विसरून. मुक्त, आनंदी व्हायचं असतं. ‘ या नाटकातील संवाद असेच हृदयाला हात घालणारे आहेत. नाटकाचा काळ प्राचीन असला तरी आजही हे संवाद स्त्री मनाची अवस्था स्पष्ट करतात. ‘ करपायच्या आत खरपूस झाल्या झाल्या उलथायची भाकरी, फोडणी तांबूस झाल्या झाल्या ओतायची भाजीत, उतू जायच्या आत उतरवायचं भांडं… का? कडेलोटाच्या क्षणापर्यंत पोहोचून पुन्हा माघारी का गं फिरायचं आपण बायकांनीच? ‘ आणखी एका संवादात म्हटलं आहे, रखुमाई आवलीला म्हणते, ‘ स्वतःसाठी जग. जगताना स्वतःसाठी काहीतरी जपून ठेव. ‘ ‘ प्रत्येकानं आपापल्या वाट्याचं शेत नांगरून ठेवायचं असतं. पाऊस पडेल किंवा नाही याची चिंता करायची नसते. ‘ ही वाक्यं कुठेतरी गीतेतल्या उपदेशाशी नातं सांगणारी आहेत असं मला वाटतं. आपलं कर्तव्य आपण प्रामाणिकपणे करावं. बाकी गोष्टी आपल्या हातात नसतात. पुढचं ईश्वरावर सोपवावं असंच गीतेत सांगितलं आहे ना!

एकंदरीत हे नाटक आपल्याला थेट विठ्ठलाशी जोडणारा सांगीतिक अनुभव देतं. या नाटकात एकाच रंगमंचावर जणू देहू नगरी अवतरली आहे. तुकारामबुवांचा वाडा, आवलीच स्वयंपाकघर, भंडाऱ्याचा डोंगर, इंद्रायणीचा घाट हे सगळे दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. यात प्रकाश योजना, नेपथ्य या साऱ्यांचा भाग आहेच. आवली किंवा रुख्मिणी कपडे धुताना, इंद्रायणीच्या पाण्यात हात घातल्यानंतर होणारा आवाज इतका हुबेहूब आहे की खरोखरच इंद्रायणी नदी तिथे असल्याचा भास होतो. यात पारंपरिक संगीत वाद्यांचा वापर केला आहे. तबला, पखवाज, संवादिनी, सतार आदी वाद्यांचे स्वर मन प्रसन्न करणारे आहेत. प्राजक्त देशमुख यांचे संवाद आणि अभंगरचना यांना शुभांगी सदावर्ते (आवली) आणि मानसी जोशी (रुख्मिणी /लखुबाई) यांनी न्याय दिला आहे असे म्हणण्यापेक्षा त्याचे सोने केले आहे असे म्हणणे योग्य ठरेल. आनंद भाटे यांचे तुकाराम महाराजांच्या अभंगांचे पार्श्वगायन भक्तिरसाचा अनुभव देणारे आहे.

शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी यांचा जिवंत अभिनय हे नाटकाचं वैशिष्ट्य. आवली जेव्हा तुकारामांना साद घालते तेव्हा तिचे, ‘ आवो आवो ‘ हे शब्द अक्षरशः काळजाचं पाणी पाणी करतात एवढी ताकद, एवढी आर्तता त्या स्वरात आहे. मानसी जोशी विठ्ठलाच्या मूर्तीशी संवाद करीत असताना ती केवळ मूर्तीशी बोलते आहे असे वाटतच नाही. प्रत्यक्ष विठ्ठलच समोर आहे असे वाटते. तुकाराम बुवांची गाथा वाचताना आवली आणि रुख्मिणी दाखवल्या आहेत. आवलीचे गूढ रम्य स्वप्न, वाऱ्याने उडणारी तुकोबांच्या गाथेची पाने, इंद्रायणीत पडून वाहून जाणारी गाथेची पाने हे सगळे प्रसंग कमालीचे जिवंत वाटतात. चित्रपटाच्या तुलनेत दृश्ये दाखवताना नाटकांना अनेक मर्यादा पडतात पण इथे त्या सगळ्या मर्यादा असूनही सगळं काही रंगमंचावर जिवंत करण्यात दिग्दर्शक, नेपथ्यकार आणि प्रकाश योजनाकार यशस्वी झाले आहेत. प्रेक्षकांना एक भव्यदिव्य अनुभव त्यांनी दिला आहे.

भद्रकाली प्रॉडक्शनने अनेक दर्जेदार नाटके दिली, त्याच परंपरेतील हे नाटक आहे. मच्छिंद्र कांबळी यांची दर्जेदार नाटकांची परंपरा प्रसाद कांबळी यांनी नुसतीच चालू ठेवली नसून आणखी पुढे नेली आहे. देवबाभळी हे संगीत नाटक असूनही इतर संगीत नाटकांपेक्षा आगळेवेगळे. प्रसाद कांबळी या नाटकाचे निर्माते आहेत. आनंद ओक यांचे संगीत आहे. विशेष म्हणजे या नाटकातील गीते शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी दर वेळी प्रत्यक्ष गातात. इतर नाटकांप्रमाणे त्या गीतांची रेकॉर्ड लावली जात नाही.

प्राजक्त देशमुख यांचे संवाद हृदयाला भिडणारे आहेत. लोकसंगीत, अभंग, ओवी इ. चा सुरेख वापर या नाटकात केला गेला आहे. संतपरंपरा, लोकपरंपरा आणि अस्सल मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन हे या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. या नाटकाला एकूण ४४ पारितोषिके मिळाली आहे. महाराष्ट्र शासन, साहित्य अकादमी इ. विविध पुरस्कार मिळाले आहेत. अनेक विक्रम या नाटकाने रचले आहेत. फोर्ब्स या जगप्रसिद्ध मासिकाने या नाटकाची सर्वाधिक लोकप्रिय नाटक म्हणून नोंद घेतली आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी हे नाटक गौरविले आहे.

केवळ दोनच स्त्री पात्रे एवढा सशक्त अभिनय करून दोघींच्या बळावर एखादे नाटक एवढे यशस्वी करू शकतात हे विस्मयचकित करणारे आहे. त्यासाठी शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी या दोघीना सलाम. या नाटकाची वाटचाल लवकरच पाचशेव्या प्रयोगापर्यंत होईल. ज्यांनी अजूनपर्यंत एकदाही हे नाटक पाहिले नसेल त्यांनी एकदा तरी ते जरूर पाहावे असे आहे.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
ज्योती कुळकर्णी अकोला
1

खूपच सुंदर विश्वास देशपांडे सर!