श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “ही लढाई अनिवार्य!” भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
कॅप्टन राकेश वालिया
साडेनऊ वगैरे वय असताना या पोराचे आई-वडील रस्ते अपघातात जातात. हे पोर मग नातेवाईकाच्या आश्रयाला जातं. आई-बाप नावाची सावली सरल्यावर डोईवर ऊन-पावसाचा खेळ नित्याचा होतो. परिस्थिती याला बाल-कामगार बनवते. पोरगं कारखान्यात तुटपुंज्या रोजंदारीवर राबत राबत मोठं होत राहतं. इतरांच्या सायकली दुरुस्ती करत करत आपल्या आयुष्याचा मार्ग आक्रमत राहतं. कृश शरीरयष्टी त्यात अन्नाची आबाळ. खाली धरती आणि उशाशी आभाळ.
डिसेंबर, १९७१. भारतीय सैन्य पाकिस्तानशी लढायला निघालं आहे. दिल्ली रेल्वे स्टेशनवर सीमेवर निघालेली ट्रेन भरगच्च भरून तयार आहे. सैनिकांना जेवण पुरवण्यासाठी नेमलेला ठेकेदार त्याच्याकडच्या पोरांना घेऊन स्टेशनवर पोहोचला आहे. पोरं पटापटा प्रत्येक डब्यात आलू-पुरीचे डबे सैनिकांच्या हाती सोपवत आहेत. या पोरांची सुद्धा ही जगण्याची लढाईच की. हा लहानगा गडी सुद्धा त्याच लगबगीत आहे. गाडी हलली… हळूहळू पुढे जाऊ लागली. डब्याच्या खिडकीतून पाण्याची एक खास लष्करी बाटली डोकावली… पानी… पानी चाहिदा! कुण्या सैनिकाला पाणी भरून पाहिजे होतं. या पोराने ती हाक ऐकली… खिडकीपाशी धाव घेतली… फलाटावर ठेवलेल्या पाण्याच्या पिंपातलं पाणी बाटलीत शिगोशीग भरलं… आणि वेग घेत असलेल्या गाडीपेक्षा जास्त वेग धारण करीत त्या सैनिकाच्या हाती ती बाटली दिली!
“बेटे, फौज में भर्ती हो जाना… ” पोराच्या खांद्यावर थोपटत तो सैनिक म्हणाला… आणि गाडी पुढे निघून गेली… या पोराच्या डोक्यात एक विचार रुजवून.
त्या सैनिकाच्या डोईवर त्याने परिधान केलेल्या मोठ्या तिरकस, रुबाबदार टोपीने त्याच्या मनात घर केले. असा गणवेश पाहिजे आयुष्यात! नंतर समजले… पाणी मागणारी व्यक्ती सामान्य जवान नव्हते… अधिकारी होते त्यांच्यातले. काय लागतं सैनिक अधिकारी व्हायला? किमान माध्यमिक शिक्षण तर पाहिजेच. तोवर आठवीपर्यंत मजल गेली होती… शाळेत जाता कधी न जाताही. दहावीची परीक्षा दिली… उत्तीर्ण होणे अनिवार्य ठरले होते… Passed शेरा प्रमाणपत्रावर उमटलेला पाहून मन भारावून गेलं. सेनेत जाण्याचा मार्ग माहीत नव्हता तोवर. ग्वालियर येथे कारपेट कारखान्यात काम मिळाले. त्याच शहरात सेनेची भरती निघाली.
तोवर पोरानं धावण्याचा सराव, व्यायाम करून ठेवला होताच. प्राथमिक शारीरिक परीक्षेत निवड झाली… आता लष्करी वर्दी दूर नव्हती. पण समजलं की या भरतीमध्ये ती तिरकी टोपी नाही मिळणार घालायला… मन खट्टू झालं. डोक्यावर गोरखा बटालियनची, पूर्ण डोकं झाकणारी, हनुवटीवर घट्ट दोरी बांधलेली टोपी घालून एक भरती अधिकारी झाडाच्या सावलीत खुर्चीवर बसलेले दिसले. “त्यांच्यासारखी टोपी पाहिजे! ” हा तरुण म्हणाला. उत्तर मिळालं… ”त्यासाठी वेगळी परीक्षा असते.. आधी पदवीधर व्हावे लागते! ” पोराने मनाशी काही विचार केला… आणि त्या रांगेतून काढता पाय घेतला!
पडत-धडपडत बी. ए. ची पदवी पदरात पडली… पण नशिबाने पुढे मुंबईला पोहोचवलं… तारुण्यसुलभ मनाला सिनेमा नावाची जादूसुद्धा भावली होतीच तोवर. मायानगरीत एका फुटकळ प्रवासी एजन्सीत काम लागलं. कामानिमित्त कुलाब्याच्या नेव्ही नगरमध्ये मित्रासोबत जाणं व्हायचं… तिथे पांढ-या शुभ्र, रुबाबदार गणवेशात येणारे-जाणारे अधिकारी दिसायचे. त्यांपैकी एका साहेबांच्या दृष्टीस प्रवेशद्वाराजवळ नेहमी दिसणारा हा तरुण पडला. त्यांनी याची चौकशी केली आणि “माझ्यासारखे अधिकारी व्हायचं असेल तर स्पर्धा आहे… परीक्षा द्यावी लागेल” हे सांगून मार्ग सांगितला. त्या मार्गावर चालत हे महाशय ती परीक्षा देते झाले. एक-दोनदा आपटी खाल्ल्यानंतर एकदा उत्तीर्ण झाले. इतर कुणाचेही मार्गदर्शन नसल्याने ब-याच गोष्टी ठाऊकच नव्हत्या. वाटलं आता मिळेल युनिफॉर्म. मग समजलं आता एस. एस. बी. मुलाखत द्यावी लागेल… त्यातून सुटला की मग मिळेल वर्दी! मुलाखतीत अपयश आलं आणि या माणसाने रेल्वे रूळाकडे धाव घेतली. जीवन संपवून टाकलेले बरं. रेल्वे गाडी काही फुटांवर आल्यावर मनातला लढवय्या जागा झाला… कुणीतरी आपली परीक्षा घेतं आहे… ज्या अर्थी संकटे मोठी त्या अर्थी इनामही मोठेच असणार! गडी चपळाईने बाजूला झाला… मोठा आवाज करीत, धुरळा उधळीत ट्रेन निघून गेली… इथेही आणखी एक प्रयत्न करावा लागला. पण अलाहाबादमध्ये हेही दिव्य पार झालं. पण पुढे वैद्यकीय चाचणी असते… त्यात नापास म्हणजे थेट घरी परत जाणे. आयुष्यात तोवर कधी डॉक्टरांकडे जाण्याचा प्रसंग अनुभवला नव्हता. त्यावेळी पैसेच नसायचे. कामाच्या धावपळीत किरकोळ आजार दुर्लक्षित रहायचे. पायांत चप्पल नसायची बहुतेकवेळा. कधी काही जखम झाली की औषधी मलम म्हणून चक्क टूथपेस्ट लावायची जखमेवर… आग व्हायची… पण हेच औषध… जखम यथावकाश बरी व्हायची.
वैद्यकीय तपासणीत सारं काही आलबेल… पण दृष्टी थोडी दोषपूर्ण. पण ते चालून गेलं त्यावेळी नशिबानं. अजूनही वर्दी मिळायला अवकाश होता. दिल्लीतून निजामुद्दीन स्टेशनवरून त्यावेळच्या मद्रास म्हणजे आताच्या चेन्नईकडे स्वारी निघाली. तमिल, मद्रासी भाषा येत नाही… स्टेशनचं नाव समजत नाही पटकन… चोवीस तास सलग प्रवास करून प्रशिक्षण संस्था गाठली. तिथं दैनंदिन वापरासाठीच्या वस्तूंचे कीट विकत घ्यावं लागतं हे ठाऊक नव्हतं. किंमत होती चौदाशे. खिशात सातशे. दोनदा रांगेतून बाहेर पडले साहेब. तिथल्या एका अनुभवी माणसाने हे ओळखले… सातशे रुपये उसने दिले.
प्रशिक्षण जड जाऊ लागले… घरी जावे आता… विचार आला. कारण प्रकृती धडधाकट नव्हती. खाण्याची आबाळ झालेली आयुष्यात. पण अशाच एका माणसाने धीर दिला… ही संधी पुन्हा मिळणार नाही! मनातला सैनिक आता पुन्हा उठून उभा ठाकला… प्रशिक्षण संपले! गुरखा पलटण हट्टाने मागून घेतली… आणि नशिबाने तीच मिळालीही… तीच तिरकी टोपी… हनुवटीवर बंद् घट्ट बांधलेली!
साडेनऊ वर्षे सेवा झाली… उत्तम सेवा झाली. ३५० ब्रिगेड मध्ये सारं काही उत्तम सुरु होतं. लग्न झालं. मुलगा झाला. आणि पत्नीला असाध्य व्याधीने घेरलं. कुटुंब फार मोठं नव्हतं. गरजेच्या वेळी पाठ फिरवलेल्या नातेवाईकांशी पुन्हा धागे जोडलेले नव्हतेच. कौटुंबिक परिस्थिती अगदीच हाताबाहेर जाऊ लागल्यावर स्वेच्छानिवृत्ती मागावी लागली. वैद्यकीय कारण म्हणून अनुग्रहाच्या तत्वावर सेवेतून निवृत्ती मिळाली. फारशी रक्कम हाताशी नव्हती. स्वत:चे घरही झालेले नव्हते. मुलगा अजून हाताशी यायचा होता. एक मारुती गाडी चालवायला घेतली. पुढे प्रवासी व्यवसायात उडी घेतली. पुढे नागरी विमान वाहतूक क्षेत्रात संधी मिळवली… आणि यश मिळायला आरंभ झाला.
– क्रमशः भाग पहिला
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






