श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “ऑपरेशन ‘लोकटक विजय’” – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
ब्रिगेडीअर श्री. सौरभ सिंग शेखावत (Retd.)
(मग पुढील काही दिवस canoe चालवून सराव केला गेला… यात हलत्या नावांत उभे राहून गोळीबार करण्याच्या सरावाचाही समावेश होताच. गरज पडेल तेंव्हा या canoe पाण्यात पालथ्या करून त्या पालथ्या झालेल्या canoeवर बंदुका टेकवून, पाण्यात तरंगत राहातही निशाणेबाजीचा सराव झाला! या प्रयत्नांत हत्यारे पाण्यात पडत, बुडून तळाशी जात. मग आपले पाणबुडे सैनिक ही हत्यारे शोधून परत आणीत. असे वीस पंचवीस दिवस झाल्यावर एकेदिवशी ‘टार्गेट’ (लक्ष्य)च्या किती जवळ जाता येईल याची चाचणी झाली… यशस्वी चाचणी झाली! )
इथून पुढे – –
दिवस… नव्हे रात्र निश्चित झाली… हल्ला करण्याची! केवळ बारा सैनिक, तीन नावा… एका नावेत मोहिमेचे नेतृत्व करणारे अधिकारी आणि इतर दोन नावांत सहा-सहा सैनिक. सैनिकांना बुलेट प्रुफ जाकेटस घालून चालणार नव्हते… कारण जर पाण्यात पडावे लागले तर वजनाने बुडण्याची शक्यता अधिक होती. अतिरेकी असलेल्या फुमदीपासून अगदी सुरक्षित अंतरावर आणखी नावांनी वेढा घातला… अतिरेकी तेथून निसटले तर ते तावडीत सापडावेत म्हणून ही योजना होती. पण यामध्ये काही झाले असते तर वेढा गोलाकार असल्याने आपला गोळीबार आपल्याच सैनिकांसाठी धोकादायक ठरू शकला असता. पण हा धोका पत्करण्याशिवाय गत्यंतर नव्हतेच. अर्थात याचाही सराव झाला होताच!
जे टार्गेट होते, त्याच्या अगदी समोर गवताचे एक छोटे बेट होते. तिथे पोहोचायचे आणि तिथून गोळीबार करावा, अशी योजना होती. त्यानुसार तीनही नावा निघाल्या आणि टार्गेटपासून सुमारे एक किलोमीटरभर अंतरावर पोहोचल्या… पाहतात तो काय? ज्या बेटावर चढून गोळीबार करायचा होता ते बेटच नाहीसे झालेले होते! गवताचा तो मोठा पुंजका वा-याने कित्येक मीटर्स दूर वाहून निघून गेलेला होता!
आता? आधी सराव झालेला असल्याने त्या नावा पलटी करणे आणि त्यांवर बंदुका ठेवून गोळीबार करणे अशी योजना झाली! पण ही बाब सोपी नव्हती… पाण्यात पोहोताना शरीर कितीतरी हलते, नाव तर हलणारच… अशा स्थितीत अचूक निशाणा कसा लागणार? अंधार तर होताच… मध्यरात्र उलटून गेलेली होती. चांदणरात्र होती म्हणून थोडं दिसत होतं. मागील नावा आणि किना-यावरून नाईट विजन यंत्रणा वापरून मोहिमेच्या प्रमुख अधिका-यांना इत्यंभूत माहिती दिली जात होती.
परंतू ते गवताचे बेटच नाहीसे झाल्याने थोडी अडचण झाली होती. म्हणून मोहिमेच्या प्रमुखांनी canoeवर उभे राहून अंदाज घेण्याचा प्रयत्न केला… पण त्यामुळे canoe कलंडली आणि साहेबांच्या सोबत त्या नावेत असलेले सर्वजण पाण्यात पडले… परंतु हत्यार हवाबंद प्लास्टिक पिशव्यांत आणलेली असल्याने बचावली! Canoe सरळ केली, तिच्यातलं पाणी काढलं… आणि मोहीम पुन्हा सुरु झाली!
ज्याने तिथली खबर आणली होती, त्या माणसाचं Code Name ठेवलं होतं… James Bond! मोहिमेचे नेतृत्व करणारे अधिकारी ज्या बोटीत बसले होते, त्या बोटीच्या पुढच्या भागात हा जेम्स बसला होता. आता तिन्ही नावा त्या अंधारातून हळूहळू मार्ग काढीत लक्ष्य जवळ करीत निघाल्या… वल्ह्यांचा (चप्पू) मात्र आवाज टाळता येत नव्हता. तेवढ्यात साहेबांच्या मानेला थंड हवेचा स्पर्श होऊ लागला… साहेब सावध झाले. त्यांच्या मागून वाहणारी हवा लक्ष्याच्या दिशेने वाहात होती… याचा अर्थ पहा-यावर असलेल्या अतिरेक्याला आवाज तर निश्चित येईल. साहेबांनी जेम्सला वल्ह्याने टोचलं! तो बिचारा.. त्याला वाटलं हे सर्व कमांडो आहेत म्हणजे काहीही करू शकतात… थेट जायचं आणि अतिरेक्यांना गोळ्या घालायच्या! पण तसं शक्य नव्हतं… काहीच वेळात या तिन्ही नावा अतिरेक्यांच्या गोळीबाराच्या टप्प्यात येणार होत्या… आणि लपायाला कुठेही संधी नव्हती… कारण आजूबाजूला फक्त पाणी!
साहेबांनी नावा तिथून मागे घेण्याचा आदेश दिला. आणि सुमारे चार किलोमीटर्सचा वळसा घ्यायला लावला… जेणेकरून वल्ह्यांचा आवाज अतिरेक्यांना ऐकू जाणार नाही! या कामाला आणखी दीड दोन तास लागणार होते… पण त्याला इलाज नव्हता!
दूरवर अंधारातही पाहू शकणा-या दुर्बिणीतून टेहळणी करणारे पथक साहेबांना संदेश वहन उपकरणाच्या साहाय्याने प्रत्येक गोष्ट सांगत होते… एक अतिरेकी पहा-यावर होता… त्याने त्या झोपडीशेजारी एक उंच मचाण बांधले होते… आणि तो जागा होता… हातातली विजेरी अधून मधून इकडे तिकडे फिरवत सावधपणे पहारा देत होता!
आता नशीब आपल्या सैनिकांच्या बाजूने फिरले. आधी मार्गातून वाहून गेलेली फुमदी नेमकी सैनिक ज्या बाजूने त्या बेटावर जाण्याचा प्रयत्न करणार होते… त्याच बाजूला येऊन स्थिरावली होती. तिच्यावर चढून सैनिकांनी आपापल्या शस्त्रांसाठी भक्कम जागा तयार केली! आता अतिरेक्यांना पुरते घेरले गेले होते… अकरा अतिरेकी तावडीत सापडले होते… त्यातील दहा झोपलेले होते. एक पहा-यावर होता!
ठरलेल्या बाजूने न आल्याने नेमक्या झोपड्या कोणत्या याबाबत थोडा संभ्रम निर्माण झाला होता. पण साहेबांनी किना-यावर असलेल्या पथकाकडून पुन:पुन्हा खात्री करून घेतली… कारण कोणत्याही परिस्थितीत निष्पाप सामान्य नागरीकांवर गोळीबार होऊ द्यायचा नव्हता. किना-यावरून दिसणारे दृश्य आणि आता दुस-या बाजूने आल्याने दिसणारे दृश्य यात फरक असू शकत होता. शिवाय सतत जागा बदलणारी गवताची बेटं होतीच. बेटाला वेढा घालून थांबलेल्या काही पथकांचा गोंधळ उडाला होता… त्यांना योग्य मार्गदर्शन केले गेले… आणि नक्की कोणत्या झोपड्यांवर हल्ला चढवायचा हे निश्चित झाले! अन्यथा त्या अंधारात स्थानिक गरीब मच्छीमार लोक मारले गेले असते! सतत केलेला सराव, आणि योग्य पद्धतीने योजना आखलेली असल्याने हे करणे सोपे झाले!
पहाटेचे साडेतीन वाजले होते. मचाण सुमारे १५ मीटर्स अंतरावर होतं. तेवढ्यात तो अतिरेकी पहारेकरी मचाण उतरून खाली येऊ लागला… आणि त्याच बरोबर अतिरेक्यांच्या झोपड्यांमधून चार पाच जण बाहेर पडले. त्यांचा तो नेहमीचा शिरस्ता असावा. त्यांपैकी काही जण प्रात:विधीसाठी निघाले असावेत.
मचाणावरचा पहारेकरी खाली उतरल्याची संधी साधत साहेबांनी आणि त्यांच्या सहका-याने त्यांची नाव गवताच्या फुमदीवर चढवली… गोळीबार करण्यासाठी स्थिर जागा तयार करून घेतली… दृष्टीपथात येणारे गवत थोडे थोडे करीत तोडून टाकले… जेणेकरून अचूक नेम साधता येईल!
नेमबाजीत माहीर असलेल्या साहेबांनी नेम धरला… एवढ्यात किना-यावरून संदेश आला… साहेब… आणखी एक अतिरेकी मचाण चढतो आहे. तर खरंच एक अतिरेकी मचाणावर चढताना दिसला अंधुकसा. तो वर आला आणि त्याने तिथेच आळोखे-पिळोखे देत व्यायाम करायला सुरुवात केली. आता दोन नेम धरले गेले… आपल्या आधुनिक रायफल्समधून दोन गोळ्या निघाल्या… आणि ते दोघेही अतिरेकी खाली कोसळले! काही क्षण शांततेत गेले आणि… त्या चारही झोपड्यांमधून आपल्या सैनिकांच्या दिशेने तुफान गोळीबार सुरु झाला. आपल्या सैनिकांनी केलेला सराव यावेळी कामाला आला. अवघ्या चारच मिनिटांत अकरा पैकी नऊ अतिरेकी ठार केले गेले. एक महिला अतिरेकी जखमी अवस्थेत सापडली… तिला वैद्यकीय उपचारांचे आश्वासन देऊन ताब्यात घेण्यात आले… एक अतिरेकी मात्र कट्टर निघाला… सात गोळ्या लागूनही तो जिवंत राहू शकला… त्याने फुमदी वरून खाली उडी मारून पाण्यात बुडी मारली… हलकेच डोके वर काढून गवताला धरून तो तरंगत राहिला आणि आपले सैनिक तिथून मागे फिरल्यावर एका मच्छीमाराच्या मदतीने तो किना-यावर गेला… स्थानिक डॉक्टरकडून उपचार मिळवले आणि तो घरी गेला. पण काही तासांतच त्याला पोलिसांनी अटक केली… त्याचा पाय कापावा लागला! मात्र त्याला जिवंत पकडले गेल्याने त्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळाली!
४५ दिवसांचा सराव, योजना, योजनेत वेळोवेळी केले गेलेले बदल यांमुळे मुख्य कारवाई केवळ चार मिनिटांत आटोपली… आणि आपले सर्व सैनिक सहीसलामत परतले! ज्या अधिका-याच्या नेतृत्वाखाली हे रोमांचक ऑपरेशन पार पडले… त्यांची ही ख्यातीच होती… त्यांनी ज्या ज्या सैनिकाला सोबत मोहिमेवर नेले… ते ते सर्व सैनिक सुरक्षित परत येत असत… कामगिरी फत्ते करूनच!
पुढील सहा दिवस या सर्व सरोवराची भारतीय लष्कराने काटेकोर तपासणी केली. अनेक हत्यारे जप्त केली… ज्यांत rocket launchers सुद्धा होते… अतिरेक्यांची तयारी पुरेपूर होती. त्यांना नेस्तनाबूद केल्यामुळे पुढील अनेक अतिरेकी कारवायांना लगाम तर बसलाच शिवाय अतिरेक्यांच्या मनात भारतीय लष्कराची भीती अधिक गडद झाली!
या मोहिमेचे नेतृत्व अगदी स्वत: आघाडीवर राहून करणारे ब्रिगेडीअर श्री. सौरभ सिंग शेखावत (Retd.) यांची माहिती आणि महती सांगण्यासाठी खरं तर दोन स्वतंत्र लेख लागतील. ब्रिगेडीअर साहेब आता सेवानिवृत्त असून त्यांची खूप प्रेरणादायी जीवन कहाणी विविध मुलाखती, लेख आणि बातम्यांतून मी समजावून घेतो आहे.
– समाप्त –
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






