प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. ४. ☆ प्रा.भारती जोगी ☆

एमिली शेंकल

समिधाच सख्या या!! …

सन १९४५, ऑगस्ट महिना, संध्याकाळ ची वेळ! ती स्वयंपाकघरात नेहमीसारखी कामात… आणि अचानक रेडिओ वर ऐकायला येते… ‘ सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू! ‘

 ती हळूच उठते, बेडरूममध्ये जाते, जिथे तिची जेमतेम ३ वर्षे वयाची मुलगी झोपलेली असते. बिछान्याजवळ गुढगे टेकून बसते आणि आयुष्यात पहिल्यांदाच मनाने कोसळते… अश्रूंचा बांध फुटतो, मनसोक्त रडते. जिच्या दृढतेसाठी, साहसी स्वभावासाठी तिचा पती बाघिन म्हणत असतो… ती रडत होती, शक्तीच संपल्या सारखी!!

 ती होती… एमिली शेंकलकॉंग्रेस योद्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पत्नी!!

 एमिली च्या डोळ्यांपुढून सगळा जीवनपट सरकू लागला. आठवला तिला तो दिवस… सुभाषबाबूंच्या परिचयाचा!

सविनय कायदेभंगाच्या चळवळीमुळे तुरूंगात गेलेल्या सुभाष बाबूंची तब्येत ढासळू लागली, ब्रिटिश सरकारने उपचारासाठी त्यांना व्हिएन्ना मध्ये ठेवले. हॉस्पिटलमध्ये सुद्धा देशाचाच विचार करणा-या सुभाष बाबूंनी, भारतीय युवकांना स्वातंत्र्य लढ्यासाठी एकत्रित करण्याचं ठरवलं. द इंडियन स्ट्रगल या नावाने पुस्तक लिहायला घेतलं. त्यासाठी टाइपिस्ट ची गरज भासली. आणि मुलाखतीत निवड होऊन एमिली शेंकल चा सुभाषबाबूंच्या आयुष्यात प्रवेश झाला. हळूहळू रोजच्या भेटीतून… सौम्य स्वभाव, हसतमुख, स्पष्टवक्ती, निस्वार्थी, कामाला वाघ… अशा एमिली कडे सुभाषबाबू आकर्षित झाले. देशप्रेम अग्रस्थानी असलेल्या मनात… एका उदात्त अशा प्रेमाने अलगद प्रवेश केला. आजपर्यंत घरच्यांना लग्नासाठी नेहमीच नकार देणारे दोघेही… नकळतपणे गुंतले.

२६ डिसेंबर १९३७ या दिवशी… एमिली च्या वाढदिवशी… दोघांनी अखेर गुप्त विवाह केला. आणि शेवटपर्यंत तो गुप्तच ठेवला. कारण सुभाष बाबूंसाठी देश सर्वोपरि होता. हे एमिली पूर्णपणे जाणून होती. म्हणूनच उदात्त हेतू आणि एक शोकांतिका असलेलं नातं तिने जोडलं. उदात्त हेतू ला उदात्त अशी साथ देऊन त्यांची खरी हमराज बनली. तिनं सुभाष बाबूंच्या संघर्षाला समजून घेतलं. त्या नात्यात एमिली ने अदम्य साहस, सर्वोच्च गरिमा आणि उच्च त्यागाची भावना… हे गुण पेरले, रूजवले.

लग्नबंधनात बांधल्या नंतरही तिने सुभाषचंद्र ना मात्र आपल्या प्रेमात बांधून न ठेवता… आजाद ठेवलं.

सुभाषचंद्र जरी एक सैनिक, एक योद्धा, एक कूटनीतिचा महारथी होते तरीही… या सगळ्याच्या आंत/आड आणखी एक सुभाष आहे… हे एमिली ने ओळखलं होतं. आणि फक्त त्या मौन स्नेहातलं एक आगळं-वेगळं प्रेम, ते जपणं तिनं ओळखलं. त्यामुळे च तर… १२ वर्षांच्या लग्नाच्या आयुष्यात फक्त ३ वर्षे सहवास लाभला तरीही एमिली ने हे… दुराव्यातलं दृढ नातं ही जपलं! कधीच दुरावू दिलं नाही. सुभाषबाबू आणि तिच्यातलं हे अनोखे, गुप्ततेतले पती-पत्नीचं नातं, हे स्नेहबंध… ख-या अर्थाने बद्ध झाले ते… सुभाषबाबूंनी विविध ठिकाणाहून एमिली ला पाठवलेल्या पत्रांमध्ये! ही पत्रे त्यांच्या मर्मबंधातली ठेव बनली.

पण ही पत्रे… प्रेम पत्रे होती कां? की दोन जीवांचं तादात्म्य पावणं? एकमेकांसाठी संबल… सहयोगी, आधार, ख-या अर्थाने, सहचर बनंत, दूर राहूनही एकमेकांना भेटणं, जपंत रहाणं होतं ते! नात्यातील संबोधने सुद्धा बघा… ते फ्राऊलिन शेंकल ने सुरूवात करीत, आणि तिच्या पत्राची सुरूवात असे.. श्री बोस!!

 त्यांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रात… राजनीती, विविध पुस्तके संगीत, विनोद, आध्यात्मिकता, आणि एकमेकांच्या नाजूक तब्येतीची चौकशी… हा असे… पत्रातल्या मायन्याचा आयना!!!

सुभाष बाबूंनी एकदा आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करणा-या… गोएथे या कवीच्या, कालिदासाच्या शाकुंतल मधल्या अनुवादित ओळी शोधायला सांगून… अप्रत्यक्षरित्या भावना प्रकट केल्या. त्या ओळी अशा…

क्या तुम युवा वर्ष के फूलों और उसके पतन के फूलोंको पसंद करोगे?

और वह सब जिससे आत्मा आनंदित हो, तृप्त हो…

 क्या तुम स्वर्ग और पृथ्वी को एक ही नाम से मिला दोगे?

 हे, शकुंतले, मैं तुम्हारा नाम लेता हूं!

बस्स्… हीच ती मनतळातली जाणीव… जिच्या बोधावर एमिली ने नंतरंचं संपूर्ण आयुष्य एक… समर्पित पत्नी, एक आदर्श माता, वृद्ध आईची काठी, लेक अनिता ची सखी, बनून स्वाभिमानाने, स्वबळावर व्यतित केलं.

एमिली ने आपल्या लेकीला… एक अतिशय बुद्धीमान आणि शैक्षणिक रूची असलेली स्त्री बनवलं. एक अर्थशास्त्रज्ञ बनली तिची लेक. विश्वविद्यालयात प्रोफेसर झाली. प्रोफेसर मार्टीन फाफ यांच्या शी विवाह बद्ध झाली.

एमिली… एक आदर्श पत्नी च नाही, तर एक आदर्श माता ही सिद्ध झाली. तिने आपल्या लेकीत… पित्याच्या नावाने मोठी न होता, स्व प्रयत्नाने आपलं आयुष्य उभं करण्याचे, आणि स्व कर्तृत्वाने मोठं होण्याचे, जगाला काहीतरी सकारात्मक देण्याचे संस्कार रूजवले!!!

अशी ही एमिली… जी एका महानायका च्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, त्याच्या नंतर ही तितक्याच खंबीरपणे, स्वाभिमानाने, पतीच्या परिवाराकडून भारतात येण्याचा आग्रह नाकारून, एका छोट्या टेलिग्राफ ऑफिस मध्ये, कमी पगारावर नोकरी करून, वृद्ध मातेचा सांभाळ करंत, लेकीला सत्याचा सामना करणारी लढवय्यी बनवंत… शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मनातल्या नायका ची आणि जनातल्या महानायका ची मूक नायिका बनून जगली.

या मौन, मूक संवेदनेला, देश प्रेमासाठी राखरांगोळी करणा-या त्या त्यागकुंडातील राखेच्या कणातला एक भाग बनणारी ही… समिधा च ना?

– लेख क्र. ४.

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments