सुश्री वर्षा बालगोपाल
कवितेचा उत्सव
☆ पाऊस – – – ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
सांगेल मला का कोणी आता पाउस येतो का खाली
काय घडूनी आकाशी या सर जोमाने सरसरली||
*
भगिरथ यत्ने करता आली स्वर्गाची गंगा खाली
देवांनाही पाणी नुरले तृष्णा त्यांची ना शमली
भू मातेला विनवूनी मग पाणी नेले आकाशी
देवांसाठी भू माता आनंदे उधळे जलराशी||
*
देवांचीही झाली सुविधा नुरली पाणी कमतरता
ऋण धात्रीचे देण्या त्यांच्या कंठी दाटे भावुकता
धात्रीचे देणे धात्रीला देण्या अर्घ्य तिला दिधले
कलशामधले पाणी भूवर पाउस होउन बघ आले||
*
देवांची ही करणी सुंदर भूलोकी शिकवण ठरली
तेव्हा पासुन भूलोकी पण अर्घ्य रूढी ही आली||
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




