सौ. सुनिता जोशी
कवितेचा उत्सव
☆ तुळस म्हणे… ☆ सौ. सुनिता जोशी ☆
☆
तुळस एकदा कधीतरी, नक्कीच रुसली असेल
म्हणूनच विठोबाने तिला, वारी घडवली असेल. . .
शोभा होऊन वृंदावनाची, सोसला ऊन-पाऊस, वारा
सोबत देऊन सुखदुःखाची, झिजवला हा देह सारा. . .
हितगुजाची भेट एकची, घरची स्त्री हा वसे वारसा
ओढ सदैव प्रपंचाची, मनाचा दिसे मंजिरी आरसा. . .
बंडखोरी त्या तनामनाची, मिळावा हा क्षणिक विसावा
साथ घेऊनी तुळशीची, पंढरीचा तो कळस दिसावा. . .
चालता वाट मग वारीची, आत्मसुखाचा शोध लागावा
आस लागता अशी भेटीची, जागोजागी विठ्ठल भेटावा. . .
सोडुनी चिंता घरादाराची, भक्तीचा हा सोहळा पहावा
पाहून नयनी विठू सावळा, संसाराचा विसर पडावा. . .
तुळशीला मिरवत अंगावरी, विठ्ठल मनीच सुखावला
जरा विसावा घे पंढरी, राजा कानडा म्हणू लागला. . .
भेट होता उठाउठी अशी, परत पावलं वळू लागली
तुळशी म्हणे, बा विठ्ठला घरची ओढ या मनी दाटली. . .
रमावे मी असेच संसारी, परी आठव तुझा सदैव चित्ती
पुन्हा भेटण्या तुजला पंढरी, विरहातून जडावी प्रिती. . .
☆
© सौ. सुनिता जोशी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





