सौ. सुनिता जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ तुळस म्हणे… ☆ सौ. सुनिता जोशी ☆

तुळस एकदा कधीतरी, नक्कीच रुसली असेल

म्हणूनच विठोबाने तिला, वारी घडवली असेल. . .

शोभा होऊन वृंदावनाची, सोसला ऊन-पाऊस, वारा

सोबत देऊन सुखदुःखाची, झिजवला हा देह सारा. . .

हितगुजाची भेट एकची, घरची स्त्री हा वसे वारसा

ओढ सदैव प्रपंचाची, मनाचा दिसे मंजिरी आरसा. . .

बंडखोरी त्या तनामनाची, मिळावा हा क्षणिक विसावा

साथ घेऊनी तुळशीची, पंढरीचा तो कळस दिसावा. . .

चालता वाट मग वारीची, आत्मसुखाचा शोध लागावा

आस लागता अशी भेटीची, जागोजागी विठ्ठल भेटावा. . .

सोडुनी चिंता घरादाराची, भक्तीचा हा सोहळा पहावा

पाहून नयनी विठू सावळा, संसाराचा विसर पडावा. . .

तुळशीला मिरवत अंगावरी, विठ्ठल मनीच सुखावला

जरा विसावा घे पंढरी, राजा कानडा म्हणू लागला. . .

भेट होता उठाउठी अशी, परत पावलं वळू लागली

तुळशी म्हणे, बा विठ्ठला घरची ओढ या मनी दाटली. . .

रमावे मी असेच संसारी, परी आठव तुझा सदैव चित्ती

पुन्हा भेटण्या तुजला पंढरी, विरहातून जडावी प्रिती. . .

© सौ. सुनिता जोशी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments