श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ बरसात ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

क्षितिजकरांनी शिंपित जीवन, गगन धरेवर झुकले रे

किती दिसांनी आभाळाला, फुटला ऐसा पाझर रे! ..

*

लोट धुळीचे आले उडवित, घोंघावत वादळवारे

बघता बघता होय नभांगण, काजळकाळे सारे रे

 वीजशलाका अजस्र कडकड, लखलख उजळत अंबर रे!

*

गगनघोष तो कृष्णघनांचा, दुमदुमतो दाहि दिशांना

पुण्यात्म्याच्या कंठामधली, दिव्यभव्यचि जणु प्रार्थना

 जीवनगाणे जयनादाचे, चराचरातुन झंकृत रे!

*

मुकुट धुक्याचे लेवुन सजली, उन्नत पर्वत शिखरे ती

दरीदरीतुन तुषार उडवित, निर्झर सारे झुळझुळती

 रुजला अंकुर नवसृजनाचा, उरी धरेच्या गंधित रे!

*

तुडुंब ओहळ, तुडुंब शेते, तुडुंब भरली तळी तळी

भरुन दूथडी नद्या वाहती, दिशान्त बुडले सर्व जळी

 येत दर्पणी जलाशयाच्या, इंद्रधनू सतरंगी रे!

*

सुदुर हासती प्रसन्न हिरवी, चिंब भिजूनी वने वने

प्राशून अमृत धारांमधले, झाली हिरवी रणे रणे

 अभिषेकामधि मम प्राणांचे, गोकुळ अवघे न्हाले रे!

 *

 (वृत्त : हरिभगिनी)

 (माझ्या ‘ऐलपैल’या कवितासंग्रहातून)

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈


Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted