सौ. अर्चना सुरेश देशपांडे

? जीवनरंग ?

☆ “एक होती नलू…” ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

ही कथा आहे नलू परटिणीची. माझ्या लहानपणी आमच्या घरी नलू कपडे धुण्यासाठी यायची. नवी नवरी असताना ती आपला सासरा मारुती याच्या बरोबर यायची. मारुती न चुकता मंगळवारी भट्टीचे कपडे घेऊन यायचा, अगदी म्हातारा झाला तरी एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात भट्टीचे कपडे बांधलेले गाठोडे असायचे. या मारुतीची सून नलू. मारुतीला स्वतःची मुलगी नसल्यामुळे तो नलूची लेकी प्रमाणे काळजी घ्यायचा.

नऊवारी साडी, डोक्यावर भुरक्या रंगाचे केस, कपाळावर रुपया एवढे कुंकू आणि, हसतमुख चेहरा अशी नलू आमच्या घरी आली की आम्हाला खूप मजा वाटायची. माझं तर “ताई ताई “करून कौतुक करायची. अशी मनमिळावू नलू मला खूप आवडायची. पण बिचारीच्या नशिबाला फक्त कष्ट आणि कष्टच होते. तिचा दारुडा नवरा रोज संध्याकाळी दारू ढोसून यायचा आणि तिला बुकलायचा. या मुलीने काय काय सोचले! व्यसनाच्या काळात जे होते ते सर्व. मारहाण, शिवीगाळ, माहेरचा उद्धार. पण अपार कष्ट करूनही कायम हसतमुख असायची.

ती आमच्या घरी कपडे न्यायला आली की साबण चुरा घालून कपडे भिजवायची आणि नदीवर धुवायला जायची. नदीच्या खळखळत्या पाण्यात कपडे धुऊन, पांढऱ्या कपड्यांना नीळ घालून कपडे वाळवून संध्याकाळी घरी घेऊन यायची. सासरा असे पर्यंत तिला थोडीफार मदत व्हायची पण सासऱ्याच्या मृत्यूनंतर ती एकटी पडली. , पदरी एक पोर होतं. पोराला नदीच्या काठावर बसवून, कपडे स्वच्छ धुवायची आणि संध्याकाळी घरी आणायची.

नलू अतिशय प्रामाणिकपणे काम करायची. कपडा गहाळ झाला अशी कोणाची तक्रार नसायची. माझी आई तिच्या पोरावर माया करायची, आमच्या घासातला घास त्याला द्यायची. नलू पावसाळ्यात नदीवर कपडे धुऊन आणायचीआणि माजघरातल्या दांडीवर‌‌ निऱ्या करून काठीवर व्यवस्थित ठेवून, एकही सुरकुती‌‌ न पाडता दांडीवर टाकायची. ते पाहताना मला खूप गंमत वाटायची.

दिवाळीच्या पाडव्याला ती ओवाळायला यायची. दिवाळीची सुट्टी असल्यामुळे उशिरापर्यंत लोळायची इच्छा असायची पण वडिलांच्या धाकामुळे पाडव्याला लवकर उठायला लागायचे. पाडव्या दिवशी अगदी सातच्या ठोक्याला नलू तबक घेऊन हजर व्हायची. टोक पदरी साडी, नाकात नथ, कपाळावर रुपया एवढे लाल भडक कुंकू लक्ष्मी सारखी वाटायची. वडिलांसह आम्हा सर्व मुलांना ओवाळायची. ओवाळताना ‘”रुपयाची तबक सोन्याच्या वाती ओवाळते चंद्र ज्योती “असं काहीतरी म्हणायची. आम्ही सर्वजण एक एक बंदा रुपया ओवाळणी ठेवायचो. ओवाळणी पाहून तिचं मन हरखून जायचं. आई तिची साडीने ओटी भरायची. दुसऱ्या दिवशी न चुकता ती साडी नेसून यायची आणि माझ्या आई वडिलांच्या पाया पडायची असे बरेच वर्ष चालू होते.

तिचा मुलगा शाळा शिकत होता आणि तिचा पती बापूराव दारू प्यायचा. माझ्या वडिलांनी त्याला परोपरीने “दारूचे दुष्परिणाम” समजावून सांगितले. ” उद्यापासून नाही मालक”हे त्याचे उत्तर ठरलेले आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरूच.

मुलगा दहावी पास झाला. शहरात लॉन्ड्रीत कामाला लागला. आई बापाला घेऊन शहरात गेला. जरा बरे दिवस आल्यावर नलूने पोराचं लगीन लावून दिलं. , भावाची मुलगी सून म्हणून आणली. काही दिवस छान गेले मग सुनेने आपले गुण दाखवायला सुरुवात केली. कजाग बायको पुढं पोराचं काही चालेना. एक दिवस दारूच्या नशेत बापू गाडीखाली सापडून मेला. घरातील एकंदर परिस्थिती पाहून नलू परत गावाकडे आली, एकटीच खोपट्यात राहू लागली. जमेल तेवढी कामे करू लागली. जसे शरीर थकले तसे तिच्याकडून काम होईनाचे झाले. तिची बरीच कामे सुटली. आमच्याकडे मात्र कामाला यायची. आम्ही होईल तेवढी मदत करायचो. शेवटी तिने लेका कडे जाण्याचा निर्णय घेतला. तिचा मुलगा बापाच्या पावलावर पाऊल टाकून दारू पिऊन धिंगाणा घालत होता. नाही म्हणायला नातू व्यवस्थित काम धंदा करत होता. नलूच्या निर्णयानुसार आम्ही तिला कोल्हापूरचे तिकीट काढून दिले. गाठीला काही असू दे म्हणून पैसे दिले. नलू कोल्हापूरला पोहोचली. स्टैंड वर उतरून चालत महाद्वार रोडला लागली. रस्त्यावरील गर्दी वाहनांचे कर्कश्य आवाज यातून मार्ग काढत ती चालली होती. गर्दीतून एक भरधाव जीप आली आणि तिला जोरात धक्का देऊन निघून गेली. ड्रायव्हर मागं न पाहता फरार झाला.

… नलू रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. लोक “कोण म्हातारी? कुठली म्हातारी “?एवढी चौकशी करून काही न करता पुढे सरकत होती. त्यापैकी एका सद गृहस्थाला तिची दया आली. त्यांनी शेजारी पडलेल्या बोचक्यातून तिचा पत्ता शोधून काढला. तिला दवाखान्यात नेण्यासाठी सर्वा पुढे हात पसरले पण नसत्या फंडात कशाला पडा? असा विचार करत कोणीही त्यांना सहकार्य केले नाही. पोलीस येईपर्यंत नलूने प्राण सोडला. पोलिसांनी तिच्या पोराला बोलवून घेतले. अंगावर लक्तरे घातलेला तिचा पोरगा म्हणाला” मी तिचा पोरगा आहे हे खरं !पण मीच अन्नाला‌ मोताद आहे तर मी हिच क्रियाकर्म कसा करणार? माझ्या पोराला बोलवून घ्या”नातू आला. त्याने आजीच्या चेहऱ्याकडे तिऱ्हाईताप्रमाणे पाहिले आणि फिस्कारला”ही माझी आजी आहे, माझी आई थोडीच आहे? ज्याची आई आहे त्यांने क्रिया कर्म करणे हे त्याचे कर्तव्य आहे”. बापलेकात “तू तू मैं मैं”सुरू झाले. शेवटी हवालदारालाच दया आली. त्याने ‌नलूला‌ स्मशानात नेऊन अग्नी दिला. अशी बिचारी नलू जिवंतपणी मुलगा, नातू असूनही प्रेमाला पारखी झाली आणि मृत्यूनंतर बेवारशीच ठरली. ‘

‘मुले वाईट नसतात.. वाईट असतं आपलं म्हातारपण… , हे खरे!

प्रस्तुती – सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted