श्री नागेश शेवाळकर
मनमंजुषेतून
☆ म्हातारा नव्हे महातारा! ☆ श्री नागेश शेवाळकर ☆
वयाची पन्नाशी उलटली की मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे निवृत्तीनंतर काय करावे? वेळ कसा घालवावा? अनेक जण या विचाराने एवढे बेचैन, अस्वस्थ असतात की, निवृत्तीच्या दिवशी त्यांच्या डोळ्यात पाणी येते. नोकरी असताना वेळच नसतो आणि निवृत्तीनंतर वेळच वेळ असतो.
काही व्यक्ती अशाही असतात त्या निवृत्तीला विरक्ती समजतात! आपण सेवेतून निवृत्त होत आहोत म्हणजे आपण संसाराच्या मायाजालातून निवृत्त होत आहोत, असा विचार असतो. परंतु तसे नाही, संसार हे असे चक्रव्यूह आहे, त्यातून बाहेर पडणे भल्याभल्यांना जमत नाही. आजकाल बहुतेक कुटुंबातील मुलगा आणि सून दोघेही कामानिमित्त दिवसभर बाहेर असतात. त्यांच्या पश्चात नातवंडांची जवाबदारी साहजिकच कुटुंबातील ज्येष्ठांवर येऊन पडते. नातवांच्या बाललीला, त्यांची छोटी मोठी कामे करणे हा फार मोठा विरंगुळा असतो. नातवंडासोबत रमले की, सारे दुःख दूर पळून जातात.
निवृत्तीनंतर घरातील छोटी मोठी कामे करताना स्वतःच्या आवडीच्या छंदाकडे लक्ष दिले पाहिजे. अशा छंदामुळे आयुष्य सुसह्य होते, सकारात्मक होते. नोकरीमुळे आवडीच्या छंदाकडे दुर्लक्ष झालेले असते. भजनाची, लेखनाची, गायनाची, वाद्य वाजवण्याची, वाचनाची आवड अनेकांना असते. त्यामुळे निवृत्ती म्हणजे आपल्या आवडत्या छंदांना पुनरुज्जीवित करण्याची संधी सहर्ष स्वीकारली पाहिजे…
दुसरीकडे अनेक जण निवृत्ती ही आसक्ती समजून वाटचाल करतात. ‘मला हे हवं, ते हवं. मला हे मिळालेच पाहिजे… ‘ अशा हटवादी भूमिकेत वावरतात. निवृत्त होईपर्यंत असलेल्या ‘हम करे सो कायदा… ‘ ही सवय या वळणावर घातक ठरते. मुले मोठी झालेली असतात, कमावती असतात, त्यांचे अनुभव विश्व वेगळे असते त्यामुळे लहानसहान गोष्टींमध्ये वारंवार सल्ला द्यायलाच पाहिजे असे नसते. मुलांच्या चुका सातत्याने दाखवून दिल्याने मुले कंटाळतात. ते ज्येष्ठांपासून दुरावतात, संवाद कमी होतो. त्यामुळे ज्येष्ठांमध्ये आपण एकटे पडल्याची भावना बळावते. एकटेपणाची जाणीव होताच चिडचिड, संताप, अशा भावना बळावतात.
वयाची साठी गाठलेली व्यक्ती म्हणजे जणू छोट्या मोठ्या आजाराचे माहेरघर! गुरूवर्य प्राचार्य राम शेवाळकर यांनी असे म्हटले आहे की, साठीनंतर येणारा आजार कधी एकटा येत नाही तर सोबत अनेक आजारांना घेऊन येतो. एकदा का आजाराचा समूह मानवाच्या शरीरात शिरला की, हे आजार मानवाच्या अंतापर्यंत त्याच्या सोबतीला असतात. त्यामुळे प्रत्येकाने पन्नाशीनंतर असे कोणतेही आजार होऊ नयेत ही काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी निवृत्ती म्हणजे संसाराबाबतीत जशी विरक्ती नसावी तशीच संसाराबद्दल अतिरिक्त आसक्तीही नसावी.
प. पू. ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी एक छान मंत्र दिला आहे, ते म्हणतात, ‘स्वतः च्या मुलाकडे राहतानाही पाहुण्याप्रमाणे राहिले पाहिजे. ‘ वरवर पाहिले तर हे वाक्य अत्यंत साधे वाटत असले तरी आनंदी, समाधानी जीवन जगण्याचा तो एक साधा मार्ग आहे. सुखी जीवनाचे सार आहे…
त्यादिवशी नेहमीप्रमाणे आम्ही पाच-सहा ज्येष्ठ नागरिक एकत्र बसलो होतो. एकानंतर एक असे अनेक विषय चर्चेला येत होते. प्रत्येक जण, चर्चेत भाग घेऊन स्वतःचे मत मांडत होता. चर्चा सुरू असताना एक जण स्वतःचा उल्लेख ‘म्हातारा’ असा करत होता. ते ऐकून एक व्यक्ती म्हणाली,
“स्वतः ला म्हातारा समजू नका तर महातारा असे म्हणा. म्हातारा हा साडेतीन अक्षरांनी सुरू होणारा शब्द किती अर्थपूर्ण आहे ते लक्षात घ्या. म्हातारा या शब्दातील अर्धा ‘म’ आहे ना, त्याला आपण पूर्णत्व देऊ! म्हातारा या शब्दाचा झाला ‘महातारा’! महातारा किती छान संकल्पना आहे ना! आता या नवीन शब्दाचा थोडा वेगळा विचार करू या.
ग्रहमंडळातील महातारा म्हणजे प्रत्यक्ष सूर्यदेव! धरणीमातेला अंधारातून बाहेर काढून लख्ख प्रकाशमान करणारा महातारा म्हणजे भास्कर… रवी..! आपणही म्हातारे होऊन अडगळीत पडण्यापेक्षा महाताऱ्याप्रमाणे आपल्या गृहमंडळाला प्रकाशित करीत राहूया. मुलांच्या संसाराला, जमेल तसा प्रकाश देत राहू… अनुभवाची ऊर्जा देत राहू. म्हणजे मदत करीत राहू. “
त्या व्यक्तिने समोर ठेवलेली ही नवीन परिभाषा आणि ज्येष्ठांची थेट सूर्यासोबत केलेली तुलना ऐकून आम्ही सारे भारावून गेलो. त्याचवेळी आम्हाला आमच्याकडे असलेल्या एका अनोख्या तेजस्वी शक्तीची जाणीव झाली.
एका वेगळ्या स्फूर्तीदायक अवस्थेत निघताना वाटले, खरेच साठ वर्षाचे जीवन म्हणजे समृद्ध अनुभवाची शिदोरी गाठीशी असलेली एक नौका! सुख-दु:ख, संकटं, हाल अपेष्टा, अपेक्षा, समाधान, आनंद, यशापयश असे अनेक अनुभव असलेल्या महाताऱ्यांनी आपल्या समृध्द अनुभवाचे दालन हळूवार, सहजतेने खुले केले तर त्या लखलखीत प्रकाशात त्यांच्या घरातील ग्रहमंडळ तर प्रकाशित होईलच परंतु, आजूबाजूचे ‘ग्रह- उपग्रह’ यांच्याही जीवनात लख्ख प्रकाश पडेल. तेव्हा महाताऱ्यांनो, चला, उठा. पसरवा अनुभवाचा लख्ख प्रकाश! करा सारी सृष्टी प्रकाशमान! … अशा तेजोमय विचाराने प्रेरित होऊन मी घरी पोहोचलो. सौभाग्यवती वाहिनीवर एक नाटक बघत होती. मी महातारा या विचाराने एवढा प्रभावित झालो होतो की, मला त्या नाटकाचे नावही ‘म्हातारा नव्हे महातारा! ‘ असेच असल्याचे दिसत होते…
००००
© श्री नागेश शेवाळकर
पुणे
मोबा. ९४२३१३९०७१
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈




