श्री दिवाकर बुरसे

??

☆ शब्द, श्रद्धा, आणि शोक… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

शब्द, श्रद्धा आणि शोक – – 

 – – – मृत्यू, संदेश आणि आपण!

परवा सकाळी अचानक मोबाईल वाजला.

पटलावर एकच अभद्र ओळ…

“आपल्या सोसायटीतील ज्येष्ठ सभासद श्री ××××× यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ”

बस्स…

त्या एका ओळीत त्यांचे अख्खे आयुष्य थांबले होते.

क्षणभर शांतता.

मग व्हॉट्सॲप समूह हलला… जागा झाला…

आणि पटलावर भावनांचा पूर उसळला.

 

हात जोडले गेले 

अश्रू वाहू लागले 

फुले अर्पण झाली 

दिवे पेटले आणि क्षणात विझले 

 

शब्द कमीच…

भावचिन्हेच जास्त.

RIP…

ॐ शांती…

ईश्वराची इच्छा…

अरेरे…

 

प्रत्येक जण आपापल्या श्रद्धेच्या चौकटीतून…

दुःखाला आकार देत होता.

व्यक्ती तितक्या अभिव्यक्ती.

 

शोक सगळ्यांचाच;

पण त्याची मांडणी मात्र

व्यक्तिमत्त्वानुसार—

कुणी कृपण,

कुणी रुक्ष,

कुणी सवंग,

कुणी उथळ;

कुणी शिष्ट, संयमित,

कुणी दयार्द्र,

कुणी प्रगल्भ

*मृत्यूनंतर व्यक्तीला*

*त्याच्या धार्मिक श्रद्धेनुसार*

*आदरांजली वाहिली जावी, *

*तो त्याचा अधिकार आहे. *

हिंदू मन मृत्यूला पूर्णविराम मानत नाही.

इथे शरीर पडते; आत्मा नाही.

तो अजर, अमर, अविनाशी, नित्य.

तो पुढच्या—अनंताच्या प्रवासाला निघतो.

म्हणूनच अशा वेळी ओठांवर सहज उमटते—

“मृतात्म्यास सद्गती लाभो, ”

“आत्म्यास मोक्ष मिळो. ”

हे शब्द मृत्यूनंतरच्या प्रवासावर

अढळ विश्वास ठेवणाऱ्यांचे.

इस्लाम आणि ख्रिश्चन परंपरेत

जीवन एकदाच मिळते.

मृत्यूनंतर शरीर मातीच्या कुशीत विसावते,

आणि आत्मा अंतिम दिवसाची वाट पाहतो.

म्हणून तिथे सद्गती नसते,

तिथे असते चिरशांती…

चिरनिद्रा…

Rest in Peace.

किंवा अल्लाहकडे केलेली क्षमायाचना.

त्या शब्दांत आक्रोश नसतो,

असतो शांत स्वीकार.

बौद्ध विचार मृत्यूकडे

‘थांबा’ म्हणून पाहतो—

कर्मांच्या प्रवाहातून

मुक्त होण्याची एक शक्यता.

म्हणून “निर्वाणाची प्राप्ती होवो”

असे म्हणताना शब्द हलके होतात…

श्वासासारखे.

शीख धर्मश्रद्धेत

आत्मा ईश्वरात विलीन होतो.

“वाहेगुरूच्या इच्छेत सर्व आहे”

हे वाक्य दुःखाला तर्क देत नाही,

ते फक्त त्याला धरून ठेवते.

प्रत्येक श्रद्धा मृत्यूला वेगळा अर्थ देते,

आणि…

तोच अर्थ

शोकसंदेशात उतरतो.

म्हणून शोक व्यक्त करताना

आपले शब्द आपल्यासाठी नसतात.

ते त्या गेलेल्या माणसासाठी असतात –

आणि उरलेल्यांच्या मनासाठी.

धर्म माहीत नसेल,

तर मौन…

किंवा मोघम, मृदु शब्द—

“त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली, ”

“या दुःखात आम्ही तुमच्यासोबत आहोत, ”

“माणसं जातात… आठवणी राहतात. ”

 

शोक मिरवायचा नसतो,

तो जपून ठेवायचा असतो—

योग्य शब्दांत.

कारण

अचूक, समर्पक शब्दयोजना

हीच खरी श्रद्धांजली असते.

 

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments