सौ राधिका भांडारकर

??

☆ खिडकीतून दिसलं… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

दोघेही तावातावाने गाडी जवळ आले. त्याने उजवीकडचे आणि तिने डावीकडचे दार जोरात उघडले. दोघेही एकमेकांशी रागारागाने बोलत होते. घरातून निघतानाच त्यांच्यात कुठल्यातरी कारणाने प्रचंड मतभेद होऊन वाद झालेला असणार. कोणीही मागे हटायला तयार नव्हतं. दोघांनीही सीट बेल्ट खसाखसा लावले. त्याने गाडी सुरू केली. त्याच्या मनातल्या रागामुळे गाडीही ‘घूमघूम” आवाज करतच सुरू झाली. अत्यंत वेगाने पार्किंग मधले वळण पार करून गाडी फाटकाबाहेर पडली.

खिडकीतून हे सारं पहात असताना माझा जीव कमालीचा धडधडत होता. इच्छित स्थळी पोहोचेपर्यंत गाडीत सुद्धा ही दोघं भांडतच राहतील का? त्यांचं भांडण विकोपाला गेले तर? त्याचा स्टीअरींग वरचा कंट्रोल गेला तर? समोरून येणारा एखादा जड ट्रक त्याला दिसला नाही तर? काय होईल या विचाराने मी मात्र घामाघूम झाले.

का भांडली असतील ही दोघं? काय बिनसलं असेल असं त्यांच्यात?

दोघेही करिअर माइंडेड तसेच आपापल्या क्षेत्रात यशस्वी. आर्थिक दृष्ट्या संपन्न. इतक्या लहान वयात या क्लास्ड सोसायटीत तीन बीएचकेचा त्यांचा फ्लॅट, गाडी, हाय फाय जगणं. यश, कीर्ती पैसा सारं काही. भांडणाचा नक्की विषय काय असेल? त्याला मुल हवं असेल. हिला नको असेल. जबाबदारी कोणी निभावायची? वेळ कोणाकडेच नाही मग “मीच का? ” असा प्रश्न उपस्थित झाला असेल मग त्यातून दोघांचे पराकोटीचे इगोज!

किंवा तिला प्रमोशन मिळालं असेल, नव्या संधी तिच्यापुढे आरतीचं ताट घेऊन उभ्या असतील. पुन्हा एकदा अंतस्थ धुमसणारा द्वेष, मत्सर, चढाओढ. जोडीदाराचे यश पचवण्यासाठीचं मानसिक औदार्य नसणं वगैरे वगैरे किंवा असं असेल का? त्याचे वृद्ध आई-वडील, ती एकुलती एक म्हणून तिच्यावर असलेली तिच्या आई-वडिलांची नैतिक जबाबदारी, शिवाय तिच्याकडून अपेक्षित असलेल्या सामाजिक रीती परंपरेचं ओझं? मग त्यात पुन्हा “मीच का? ” या प्रश्नानं डोकं बाहेर काढणं?

दिवसभर खिडकीतून पाहिलेल्या भांडत जाणाऱ्या या सुंदर तरुण जोडप्याचा विचार मी करत बसले. स्वतःला त्यांच्या वादांची कारण शोधण्यात गुंतवून घेतलं आणि शिणवूनही घेतलं. लगेच मला माझ्या ज्येष्ठ असण्याचा अधिकार वाटू लागला. आज कालची पिढी म्हणजे अक्रस्ताळीच, डोक्यात राग घालणारीच. “एक घाव दोन तुकडे” नात्यांची तोडमोड क्षणात करणारे. यांना कुणीतरी मोठेपणाच्या नात्याने समजावले पाहिजे, “अरे! संसार म्हणजे तडजोड. एकमेकांना समजून घेणं. घ्यावी लागते माघार कधीतरी आणि घ्यावी की, थोडी वाट पाहावी, शब्दांचे विखारी बाण एकमेकांवर त्वरित सोडण्यापेक्षा मौन बाळगावं, थंडपणे समस्येची उकल करावी. ” बोलेन मी त्यांच्याशी.

संध्याकाळपर्यंत हीच टकटक माझ्या डोक्यात.

मोकळी हवा येण्यासाठी पुन्हा बंद खिडकी उघडली. तिन्ही सांजा उतरल्या होत्या. लोक घराकडे परतत होते आणि मी चकित होऊन पहातच राहिले. सकाळची ती भांडणारी दोघं आता मात्र हसत खेळत गाडीतून उतरली. भरपूर शॉपिंग केलेलं असावं. एकमेकांच्या हातातलं सामान दिलं घेतलं आणि हातात हात घालून, हवेचे मंद झोके अनुभवत थट्टा मस्करी करत ते लिफ्टपाशी गेले.

माझ्या मात्र दिवस विनाकारण खराब गेला होता पण आता या क्षणी मनातून मीही विसावलेच होते की! मनातल्या मनात त्यांच्या सुखी सहजीवनासाठी मी प्रार्थनाही करून टाकली.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
4 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments