श्री सुधीर करंदीकर
मनमंजुषेतून
☆ “जागतिक जल दिन – २२ मार्च…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
जागतिक जल दिन हा २२ मार्चला असतो. हे निमित्त साधून आपल्याला हा दिवस अगदी रोज म्हणजे रोज साजरा करायचा आहे.
जलदेवता प्रसन्न असेल तर शरीर आणि मन स्वच्छ राहतं आणि रोग आणि आजार हे कायम लांब राहतात. जलदेवतेला प्रसन्न करण्याचा सोपा मार्ग म्हणजे पाणी वाया न घालवणे आणि पाण्याचा योग्य उपयोग करणे.
——–
सर्व सजीवांच्या अस्तित्वाचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. पाण्याचे महत्व आणि त्याची उपयुक्तता याविषयी जागरूक करण्याकरता जगभरात दरवर्षी २२ मार्च हा जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो.
जगप्रसिद्ध जलतज्ञ डॉक्टर माधवराव चितळे यांनी जागतिक जल दिन साजरा करण्याची संकल्पना सर्वप्रथम जागतिक मंचासमोर मांडली आणि यूएनओ च्या सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला वर्ल्ड वॉटर डे साजरा केला.
आपण पाणी वाया घालवणं म्हणजे कुणालातरी तहानलेले ठेवणं, इतका सोपा आणि साधा विचार जर आपण प्रत्येकाने केला, तर कुठल्याही खेड्यात / गावात / शहरात पाणीटंचाईवर मात नक्कीच होऊ शकते. म्हणूनच म्हणतात पाणी वाया न घालवणे हे एक सोपं आणि साधं पुण्य मिळवण्याचं साधन आहे.
सर्वसाधारणपणे घराघरांमध्ये पाण्याचा वापर असा होतो – आंघोळ, टॉयलेट, भांडी घासणे, कपडे धुणे, वॉश बेसिन चा वापर, बाल्कनी मधल्या कुंड्यांना पाणी, बाल्कनी धुणे, कार स्कूटर धुणे, घराभोवती असलेल्या झाडांना पाणी घालणे, घरा भोवतीची फरशी धुणे, वगैरे वगैरे.
या प्रत्येक हालचालीचा प्रत्येकाने एक त्रयस्थ म्हणून जर आढावा घेतला, आणि सगळ्यांच्या आढाव्यांची गोळाबेरीज केली तर लक्षात येईल की आपण घरातला प्रत्येक जण जेवढे पाणी वापरतो त्यापैकी ८० ते ८५ टक्के पाणी हे वाया जात असते आणि फक्त १५ ते २० टक्के पाण्याचा खरा आणि आवश्यक वापर होत असतो. हे कसं काय ते आता बघू –
घरामध्ये काहीही वाया जाऊ नये याबद्दल घरातल्या स्त्रिया नेहमीच सजग असतात.
म्हणून विचार केला, घराघरांमध्ये पाणी कसे वाया जाते आणि ते कसे वाचवता येईल, याबद्दल मैत्रिणींना फोन करून त्यांचे विचार / अनुभव विचारावे.
काल दिवसभरात शाळेतल्या मैत्रिणी /कॉलेजमधल्या मैत्रिणी/ वाचक मैत्रिणी यांना भरपूर फोन केले.
त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीची गोळा बेरीज ही अशी –
१) आंघोळ / शॉवर – बहुतेक घरांमध्ये आंघोळ पूर्ण होईपर्यंत शॉवर सुरूच असतो. अंगाला साबण लावताना किंवा शरीर स्वच्छ करताना शॉवर नक्कीच बंद करू शकतो. किती पाणी वाया जात असते याचा अंदाज घ्या.
२) टॉयलेट – टॉयलेटला गेल्यानंतर फ्लश करणे नक्कीच गरजेचे असते. पण लघवीला गेल्यानंतर पूर्ण फ्लश टॅंक एवढ्या पाण्याची गरज नसते. आपण बाजूला नळाखाली छोटी बादली ठेवू शकतो आणि ते पाणी ओतू शकतो. किंवा ड्युएल सेटिंग चा फ्लश टॅंक घेऊ शकतो. एकदा थोडा खर्च होईल पण पाणी वाचवण्याचे पुण्य मिळेल. यामुळे जे पाणी वाचेल ते कल्पनेच्या बाहेरचे असणार आहे.
३) भांडी घासणे – भांडी घासताना नळ सुरूच असतो आणि पाणी वाहत असते. नको असेल तेव्हा नळ नक्कीच बंद करता येतो. भांडी धुताना मोठ्या भांड्यात जे पाणी जमा होते ते झाडाच्या कुंड्यांना नक्कीच घालता येते.
४) वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुणे – आपण ऑटो सायकल सिलेक्ट करतो, कपडे टाकतो आणि मशीन सुरू करतो. कपडे थोडे असले तरी मशीन भरपूर पाणी घेते आणि ते सगळे गरजेचे नसते. कपडे बघून आपण low, minimum, medium वगैरे नक्कीच सिलेक्ट करू शकतो आणि पाणी वाचवू शकतो.
५) वॉश बेसिन चा वापर – सकाळी उठल्यावर दात घासण्याकरता, काही खाल्ल्या नंतर तोंड धुण्याकरता, चेहरा धुण्याकरता बहुतेक सगळ्याच घरांमध्ये बेसिन वापरले जाते. आपण बेसिन पाशी जातो नळ पूर्ण उघडतो आणि नंतर मग दात घासणे /चुळा भरणे / नाक स्वच्छ करणे/ घसा स्वच्छ करणे, हे सगळे आपण करतो आणि नंतर शेवटी नळ बंद करतो. आणि नळाची धार पूर्ण वेळ मोठी असते. म्हणजे ५ टक्क्याचा खरा वापर होतो आणि ९५ टक्के पाणी वाया जाते.
पाणी कसं वाचवता येईल – बेसिनच्या खाली एक कॉक असतो. तो पूर्ण बंद करायचा आणि अगदी थोडासा उघडायचा. आता बघा बेसनची धार अगदी बारीक होईल. हातावर पाणी घेऊन सगळ्या क्रिया करण्याकरता ही धार अगदी पुरेशी असते. बेसिन जवळ असताना डावा हात नळावर ठेवायचा, जेव्हा पाहिजे तेव्हा नळ सुरु आणि इतर वेळा बंद. बघा किती पाणी वाचेल. पाणी वाचवायचं म्हणून काहीही खाल्ल्यानंतर ८ – १० चूळा भरण्याचं मात्र टाळू नका.
(चुळा का भरायच्या याकरता माझा लेख वाचा – चूळा भरूया आणि निरोगी राहूया)
६) बाल्कनीतल्या कुंड्यांना पाणी- बाल्कनी मध्ये छोटी छोटी फुल झाडं, तुळस, गवती चहा, वगैरे लावण्याची बहुतेकांना आवड असते आणि ती छानच आहे. कुंडीतल्या झाडांना अगदी थोडं थोडं पाणी लागतं. बहुतेक जण आतल्या नळापासून एक पाईप आणतात आणि तो एका कुंडीत सोडतात. कुंडी भरून वाहायला लागली की दुसऱ्या कुंडीत..
ओव्हर फ्लो झालेले पाणी बऱ्याच सोसायटींमध्ये ग्राउंड लेव्हल ला चालण्याच्या पॅसेज मध्ये वाहतांना दिसते. आणि हे सगळे पाणी वाया जात असते.
७) बंगले वजा सोसायट्यांमध्ये झाडांना पाणी – बहुतेक जण पाईपनी सगळ्या झाडांना भरभरून पाणी देत असतात. आणि नंतर ते पाणी इतके जास्त होते की गेटमधून बाहेर पडून ते पाणी रस्त्यावर वाहायला लागते. काहीजण पाण्याच्या फवाऱ्याने आपल्या कंपाउंडचं गेट पण धुतात. काहीजण घरासमोरचा संपूर्ण रस्ता त्यावर पाणी मारून गारवा येण्याकरता पाण्याने ओला करतात.
८) कार / स्कूटर धुणे – बऱ्याच घरांमध्ये कार स्कूटर धुताना, पाण्याचा नळ पूर्ण उघडा असतो, आणि कार स्कूटर ची अक्षरशः धुलाई होत असते. पाण्याचा पाईप पंधरा एक मिनिट तरी सुरू असतो. जमिनीवर पाण्याचे लोट वाहत असतात. खरंतर कायमस्वरूपीच हे धुणे आपण टाळू शकतो किंवा अगदी प्रमाणात अधून मधून करू शकतो. गाडीची काच ओल्या फडक्याने पुसता येते आणि इतर भाग कोरड्या फडक्याने पण पुसता येतो.
९) घराभोवतीची फरशी धुणे – बहुतेक बंगल्यांमध्ये भोवतालची फरशी भरपूर पाण्याने धुणे हा रोजचा कार्यक्रम असतो. काही ठिकाणी फरशी वरचा पालापाचोळा पाण्याच्या प्रेशरने ढकलत ढकलत गेटच्या बाहेर ढकलतात. खरंतर फरशांची अशी धुलाई नक्कीच टाळायला पाहिजे. खराट्याने फरशी झाडली तरी स्वच्छ दिसते. आणि कचरा पण गोळा करता येतो
१०) आजकाल सगळीकडेच उंच उंच इमारती होत आहेत आणि छतावरती सोलर वॉटर हिटर असतात. खालच्या कुठल्याही मजल्यावरच्या लोकांनी जर बाथरूम मध्ये गरम पाण्याचा नळ सोडला तर आधी उभ्या पाईपलाईन मधे असलेले एक ते दीड बादली गार पाणी येते आणि नंतर गरम पाणी यायला सुरुवात होते. आधी आलेले गार पाणी बाथरूम मध्ये ओतले जाते. यावर काहीतरी टेक्निकल सोल्युशन काढणे नक्कीच गरजेचे आहे पाणी वाचवण्याकरता.
११) एका मैत्रिणी नी तिचा एक अनुभव सांगितला –
मैत्रीण : अरे, काल मी चक्क पाण्याशी बोलले.
मला काही अर्थ लागेना, म्हणून मी म्हणालो, बाईसाहेब सगळं ठीक आहे ना!
मैत्रीण : अरे खरं तेच सांगतेय. त्यादिवशी मी संध्याकाळी फिरायला वेगळ्या रस्त्याने गेले होते. दोन्ही बाजूला बंगले आणि मधून रस्ता. थोडं पुढे गेले आणि रस्त्यावर पाणी वाहत होतं. आपण पाण्याला जल देवता म्हणतो. त्यामुळे पाण्यावर पाय देऊन पलीकडे जाणे मनाला पटत नव्हते. म्हणून मी कुठे कोरडा भाग आहे का ते बघत होते. तेवढ्यात मला एक वेगळ्याच टोन मध्ये आवाज ऐकायला आला. मी इकडे तिकडे बघितले पण कोणीच नव्हतं. आणि लक्षात आलं की पाण्यामध्येच काहीतरी चेहरा दिसतोय आणि तिथून आवाज येतोय.
पाणी : मी पाणीच बोलतोय. तू या भागात पहिल्यांदाच आलेली दिसतेयस. पाण्यावर पाय देऊन जा काही हरकत नाही. आणि पुढे चालताना तुला बऱ्याच ठिकाणी पाण्यावर पाय ठेवून जावे लागणार आहे, कारण खूप ठिकाणी रस्त्यावर पाणी वाहत असणार. आणि हे रोजचेच आहे.
मैत्रीण : मी मागे फिरते आणि दुसरीकडून जाते
पाणी : अगं रस्त्यावर असे वाहायला आणि वाया जायला मला पण आवडत नाही. पावसाळ्यामध्ये सगळीकडे पाणीच पाणी असते त्यामुळे पर्यायच नसतो. आम्हाला तेव्हा रस्त्यावरून वाहावेच लागते. पण इतर वेळा गरजूंच्या तोंडचे पाणी काढून रस्त्यावर वाहणे मला पण पटत नाही. बट नो चॉईस.
मैत्रिणीने खाली वाकून पाण्याला नमस्कार केला आणि ती पुढे गेली.
पाणी कुठे कुठे वाया जाऊ शकते आणि ते कसे वाचवता येईल, याबद्दल मैत्रिणींनी त्यांची छान छान ऑब्झर्वेशन्स आणि उपाय मला कळवले त्याबद्दल त्यांना धन्यवाद. त्यांचे संकलन मी या लेखात केले आहे. हेतू हाच की सगळ्यांनी जर विचारपूर्वक पाण्याचा वापर केला तर पाणीटंचाई कुणालाही जाणवणार नाही, तहानलेले कोणीही राहणार नाही.
जागतिक जलदिन हा आपण सगळ्यांनी खरंतर रोजच अमलात आणायचा आहे. पावसाळा असो, हिवाळा असो किंवा उन्हाळा असो.
पाण्याला आपण जलदेवता म्हटलं तर आपण नक्कीच पाणी कुठेही आणि कधीही वाया घालवणार नाही. आणि पाण्याची टंचाई कधीच भासणार नाही.
डॉक्टर माधवराव चितळे यांच्या या संकल्पने करता त्यांचे खूप खूप आभार आपण सगळेजण मानूया.
पाण्याच्या पंपाचा ज्यांनी शोध लावला त्यांचे पण आपण आज आभार मानूया. त्यांच्या शोधामुळेच आज आपल्या घराघरात, उंच उंच मजल्यांवर लांब लांब अंतरावरून पाणी येत आहे. शोधणारे जनक आहेत –
French born inventor – Denis Papin.
ब्रह्मदेवांना पण आपण आजच्या दिवशी एक प्रार्थना नक्कीच करूया – कलियुग संपल्यानंतर तुम्ही जेव्हा नवीन सृष्टीची निर्मिती कराल तेव्हा समुद्राचे पाणी पण नदीच्या पाण्याप्रमाणेच गोड करावे. म्हणजे सगळीकडे भरपूर पाणी राहील. टंचाई कधीच भासणार नाही.
रोज सकाळी उठल्यानंतर पाणी पिताना जलदेवतेला नमस्कार करायचा, आणि मनात मनन करायचं की मी आज कुठल्याही प्रकारे पाणी वाया घालवणार नाही.
ll जय जलदेवता ll
© श्री सुधीर करंदीकर
मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




