सौ. स्मिता सुहास पंडित
वाचताना वेचलेले
☆ “मुलं खरंच बदललीत का???” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆
☆
“मुलं खरंच बदललीत का??? ”
“मुलं बदललीत… आजकालच्या पिढीला आई-वडिलांची किंमत राहिली नाही” — असं म्हणणं आपण वारंवार ऐकतो. पण खरंच मुलं बदललीत का? की त्यांच्या आयुष्याची परिस्थिती इतकी बदलली आहे, की त्यांना बदलणं भागच पडलं आहे?
पूर्वीचं जीवन निराळं होतं. घर मोठं होतं, शेती हा मुख्य व्यवसाय होता, सर्वजण एका छताखाली राहत होते. घरातली वयोवृद्ध आई-वडील एक कोपऱ्यात असायचे, तरी त्यांचं अस्तित्व घरातल्या प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचं असायचं. पण आज?
शहरातल्या छोट्या फ्लॅटमध्ये, तीन खोल्यांतच सगळी कोंडी. ऑफिस, मुलांचं शिक्षण, गृहिणींचं काम, आणि आई-वडिलांची सेवा — सगळं एका साच्यात बसवायचं म्हटलं की खरच शक्य होत का. त्यात च आईवडिलांना गावी राहायची सवय असेल तर त्यांना इकडे करमत ही नाही.
आजचं युग तंत्रज्ञानाचं आहे. सगळं काही झपाट्याने बदलतंय — महागाई, स्पर्धा, अपार खर्च. वयोमानानुसार औषधांची गरज वाढते, पण त्या औषधांचा खर्च आणि दवाखान्यांची फी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. सरकारी रुग्णालयात सोयी नाहीत, आणि खासगी दवाखान्यात उपचार अतिशय महाग झाले आहेत. ब्लड टेस्ट, एक्सरे एमआर आय हे सगळ करायचं असेल तर ते सर्व खूप च खर्चिक आहे. कुठून आणणार ही मुलं. त्यातल्या त्यात ज्यांना पेन्शन आहे त्यांचं ठीक आहे. पण पेन्शन नसेल तर….
लोक म्हणतात आईवडिलांनी नाही का चार मूल सांभाळली. खरे आहे ते. पण लहान मुलांना एव्हढा दवाखाना लागत नाही.
या सगळ्यातून एक मुलगा किंवा सून, खऱ्या अर्थानं हतबल होतात. त्यांच्यात भावना आहेत, त्यांनाही वाटतं की आईवडिलांचं योग्य सांभाळ करावा, त्यांना आधार द्यावा. पण वास्तव ही वेगळीच कहाणी सांगतं.
कामाच्या वेळा, आर्थिक अडचणी, जागेची कमी, आणि वाढती जबाबदारी यामुळं त्यांचीही चिडचिड होते. ते अपयशी नाहीत, पण परिस्थितीमुळे थकलेले असतात.
म्हणून, याआधारे विचार केल्यास, मुलं बदलली आहेत असं म्हणण्याऐवजी,
“परिस्थिती बदलली आहे, आणि त्यात सगळ्यांनाच जुळवून घ्यावं लागतंय, ”
असं म्हणणं जास्त योग्य ठरेल.
माणूस वयाने मोठा झाला की त्याला औषधापेक्षा माणसांची साथ हवी असते. घर छोटं असलं तरी मन मोठं असेल, तर आईवडील त्यातही मावत असतात. आणि मुलं अपुरी असतात असं नाही — त्यांना फक्त समजून घ्यायला हवं.
शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं:
“नात्यांना दोष देण्यापेक्षा, परिस्थिती समजून घ्या… माणूस मनाने जवळ आला, की जागेचा प्रश्नच उरत नाही!”
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





