श्रीमती उज्ज्वला केळकर
वाचताना वेचलेले
☆ “चिपाड…” लेखिका: सौ. संगीता चव्हाण ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆
☆
— अस्तित्वाचा गहिरा क्षण
पानगळ आणि चिपाड — दोघंही जमिनीवर येतात. पण दोघांची कथा मात्र वेगळी असते.
पानगळीच्या पानाला कोणी हात लावलेला नसतो. त्याच्या आत एक ऋतू उतरतो, एक वेळ येते. ते आपली चक्रपूर्ती करून हळूहळू गळून पडतं. कुणी ते फेकलेलं मानत नाही. ते जमिनीशी एकरूप होतं.
पण चिपाड… ही गोष्ट वेगळी आहे. त्याला जाणीवपूर्वक हात लावून, आतला सारांश काढून घेतला जातो. रस उपसून घेतला जातो. मग उरलेलं निरुपयोगी मानून फेकलं जातं. चिपाड हे नैसर्गिक चक्राने पडलेलं नसतं — ते फेकलं गेलेलं असतं.
माणसाच्या आयुष्यात, समाजाच्या रचनेत, अगदी आपल्या नात्यांतसुद्धा अशी चिपाडं तयार होत असतात. उपयोग होईपर्यंत गोडगोड बोलणं, जवळ घेणं — आणि ज्या क्षणी उपयोग संपतो, तेव्हा बाजूला सारून टाकणं. हाच आहे चिपाड होण्याचा दुःखद, बोचरा अर्थ.
घराबाहेर पडल्यावर अशा कितीतरी कहाण्या कानावर पडतात. वर्षानुवर्षं संसार हाकलेली एखादी स्त्री — कधी सासरच्या घरात, कधी स्वतःच्या मुलांत, वापरली जाते. तिचं प्रेम, तिची सहनशक्ती, तिची निरपेक्षता — सगळं उपसून घेतलं जातं. आणि नंतर एखाद्या वळणावर तिचं अस्तित्वच विसरलं जातं. जणू काही उपयुक्तता संपली म्हणून तिला कोपऱ्यात ढकललं जातं. त्या क्षणी ती स्त्री मनाने, आत्म्याने चिपाड झालेली असते.
किंवा एखादा कर्मचारी — तीस चाळीस वर्षं एका कंपनीत प्रामाणिकपणे काम केलेला. ज्याच्यावर विभाग चालत होता, जो विश्वासाचं प्रतीक होता — त्याच्यावर एके दिवशी बदलाची गदा येते. ‘नवीन माणूस हवा आहे’, ‘सिस्टम नवी करतोय’, ‘आता वेळ झालीय’ — या वाक्यांच्या आडून त्याला एक दिवस बाहेरचं दार दाखवलं जातं. आणि तो मनात एकच प्रश्न घेऊन उरतो — मी इतकी वर्षं इथे कोण होतो? केवळ एक उपयोगी माणूस? की जिवंत माणूस?
अगदी नात्यांतसुद्धा ही गोष्ट दिसते. प्रेमाच्या सुरुवातीला एखादा माणूस दुसऱ्याला हवाहवासा वाटतो. त्याच्या शब्दांचा, त्याच्या सहवासाचा गोडवा घेतला जातो. पण हळूहळू जेव्हा त्या व्यक्तीकडून नवं काही मिळणार नाही, असं वाटतं, तेव्हा त्याचं अस्तित्वच बोथट केलं जातं. मनातून, आठवणीतून, संवादातून. त्या माणसाच्या आत एक गुपित वेदना तयार होते — ‘मी फक्त उपयोगासाठी होतो का? ‘
चिपाड होण्यामागे हीच खरी वेदना आहे — वापरल्याचं भान. मी माझं सर्वस्व दिलं आणि शेवटी फक्त रिकामं शरीर, रिकामं मन उरलं — हा भाव किती खोलवर जखम करतो, हे केवळ त्या अवस्थेत गेलेल्या माणसालाच कळतं.
आता प्रश्न उरतो — आपण चिपाड का होतो? आणि हे टाळता येत नाही का?
हो — टाळता येतं. पण त्यासाठी एक अंतर्बाह्य जागरूकता लागते. आपलं मूल्यमापन दुसऱ्यांच्या वापरावर आधारित ठेवायचं नाही. स्वतःच्या गरजांना, भावनांना, स्वत्वाला अधोरेखित करायचं. ‘मी कोण आहे’ हे रोज नव्यानं आठवत राहायचं. आणि सर्वात महत्त्वाचं — आपल्या रसाचा झरा केवळ इतरांसाठी वाहू न देता, स्वतःसाठी राखून ठेवायचा.
कारण जेव्हा आपल्याकडे स्वतःसाठी काही उरतं, तेव्हा आपल्याला कोणीच चिपाड करू शकत नाही.
म्हणूनच — स्वतःला चिपाड होऊ देऊ नका. आणि कोणालाही चिपाड करून फेकूही नका. हेच एक मोठं माणूसपण असेल.
पण ज्या वेळेस असं वाटतं की आपण आधीच चिपाड झालोय — वापरून, झिजून, टाकून दिल्यासारखं वाटतं — त्या वेळी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते : राखेतूनही नवे अंकुर फुटतात.
चिपाड झालेल्या अवस्थेला आपण अंतिम सत्य मानून बसलो, तर तोच आपला शेवट ठरतो. पण जर त्या अवस्थेकडे पाहताना आपण स्वतःला विचारलं — “माझ्यात अजून काय उरलं आहे? ” — तर नकळत आपण एक नवीन उगम शोधू लागतो.
कधी तो उगम एका छोट्या छंदातून उगमतो,
कधी निसर्गाच्या कुशीत नव्याने रुजतो,
कधी अपूर्व अशा पुस्तकाच्या पानातून जागा मिळतो,
कधी अंतर्मनाच्या खोल ध्यानातून आपल्याला नव्याने गंध सापडतो.
कारण कोणत्याही चिपाडाच्या आत एक बियाणं दडलेलं असतं. फक्त त्याला थोडासा स्नेह, थोडीशी ऊब, थोडासा आत्मविश्वास देणं आवश्यक असतं.
आपणच आपल्याला ही ऊब देऊ शकतो.
कोणीतरी बाहेरचं देईल, ह्या आशेवर जगणं म्हणजे पुन्हा वापरून घेण्याचा खेळ सुरु करणं.
आपण ठरवलं, की “माझं अस्तित्व केवळ इतरांच्या उपयोगासाठी नाही — मी माझ्या आनंदासाठी, माझ्या उत्कर्षासाठी आहे” — तर त्या क्षणापासून चिपाड होण्याचा खेळ संपतो. आणि त्या जागेवर एक नवा रस तयार होतो — फक्त स्वतःसाठी वाहणारा.
हा प्रवास फार हळू आहे, फार अंतर्मुख आहे — पण एकदा का सुरू झाला, की तो आयुष्याला एक नवा वास देतो.
म्हणूनच —
तुम्हाला जर आज चिपाड झाल्यासारखं वाटत असेल, तर थांबा.
थोडा श्वास घ्या.
मनाच्या गाभ्यात पहा — अजून काही उरलंच आहे.
तिथूनच एक नवा अंकुर फुटेल — जो या वेळेस स्वतःच्या मातीवर उगम घेईल.
त्याला कोणी वापरू शकणार नाही.
कारण या वेळेस तो स्वतःसाठी उमललेला असेल.
लेखिका : सौ. संगीता चव्हाण
प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈






उज्ज्वला ताई खूप सुंदर लेख प्रस्तुत केलात.