सौ. मीनल केळकर

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ झणझणीत मिसळ… – लेखिका : सौ. भारती भाईक ☆ प्रस्तुती – सौ. मीनल केळकर ☆

संपली दिवाळी…. आता मात्र ऐरणीवरचा प्रश्न…. उरलेले फराळाचे सुयोग्य समापन कसे करावे…कोण सायास घेऊन तयार केलेली. ती समस्त अंग बांध्याची शेव.. ती खारी बुंदी… ती खारी शंकरपाळी…. चिवडा… यांचं करावं काय?… नव्याची नवलाई संपलेली असते…. दिलेली डिश साभार परतत असते…. मग या अती मेहनत घेऊन केलेल्या जिन्नसांना योग्य पध्दतीने मार्गी लावणं यायला हवंच…… मग काय.. ?… मिसळ आहे ना…. सर्वांवर रामबाण उपाय…. रविवार एखादा उमलून यावा… नि अवचित बेत मिसळीचा ठरावा… असं अजिबात नाही हं… पूर्वतयारी लागतेच.. मिसळ म्हणजे उचलली जीभ लावली टाळूला… तसला झटपट अंगलट… मुखलट म्हणूया …. येणारा प्रकार नाही. तर जोजवून जोजवून शिजवून सामोरा येणारा प्रकार. बेत ठरायचा आदल्या दिवशी आणि मग मात्र पूर्वतयारी ला लागावं लागत ….. सर्व प्रथम कडधान्याला डब्यातून जागं करुन त्यांना “चला वीर जवानांनो…. कर्तव्यपूर्तीची वेळा आली…”म्हणत पाण्यात डुंबविणे ओघाने आलंच. रात्रीच घट्ट सायीखाली निवांत निजलेल्या दूधाला दह्याचं नैमित्तिक मिलन घडवून आणत विरजायला ठेवावं लागतं. विरजतांनाच अर्धा चमचा माधुर्य घातलं तर क्या कहने… । सकाळी घट्ट, गोडूलं, सायीचं दही तयार. वास्तविक याची डीशमध्ये सर्वात शेवटी वर्णी लागते…. पण तयारी सर्वात आधी करावी लागते.

पहाटे पहाटे उठायची काही गरज नसते. अंमळशाने उठुन मिसळीच्या तयारीला लागता येतं… इथे बहुतेक सुगरणींनी निःश्वास सोडला असेल. खमंग फोडणीसाठी लागणारं शस्त्रसाहित्य पुरेसं गोळा करावं… नि गँसवर पातेलं चढवावं…. गरम तेलात झणझणीत फोडणी देऊन कडधान्य टाकावं… मीठ पेरीत आमचूराचा स्वाद घालावा.. नि कुकरला दणदणीत पाच सहा शिट्ट्या कराव्या.

आता तुम्ही म्हणाल.. यात काय विशेष? हे तर आम्ही नित्य करतोच… पण थांबा हं… इथवर लीलया पाकसिध्दी करणाऱ्या ललनांनो… खरी लढाई यानंतरच बरं… म्हणजे चवीने रसनेवर चढाई करावी असं वाटत असेल… तर ही लढाई लढावीच वागते. उसळ नीट बोटचेपी शिजली तरी पातेल गँसच्या डोईवरुन काढू नये…तसंही गँसला सवयच असते हो याला त्याला डोक्यावर घेऊन मिरवायची….. तर तसंच राहू द्यावं…. एकीकडे खास कच्च्या मसाल्याचं वाटण घालून झणझणीत रस्सा फोडणीस घालावा… इथे चवीढवीचं गणित मात्र चपखल जमावयास हवे…. न कम न जादा… हो तडके का इरादा….. चटकदार मिसळ सर्वस्वी या रश्श्यावरच अवलंबून असते.

आता मात्र तुमचा रसिक पदर कंबरेला खोचायलाच हवा… चला…. एक एक जिन्नस जमवायला घ्या… अंमळशाने उठल्याची अर्धी कैफ तर ही तयारीच घालवते… कांदे मध्यमपेक्षा जरा बारीक कापून घ्यावे…. खूप बारीक कापलेले असतील… तर ते रश्श्यात नेस्तनाबूत होऊन हवी ती कचर कचर चव चाखता येत नाही हो…. … तर साधारण चार कांदे कापावेत…. कांद्याने शंभरी ओलांडली तरही आपण चवीपर्यंत मजल मारण्यासाठी… अशा नाही तर तशा कारणाने नयनी नीरेस येऊ द्यावे…. भले हो जादा दाम…. पूरा करेंगे तडके का काम…. … अशा बाणेदारपणे कांदे कापून हातावेगळी करावी… त्यानंतर हिरवीगार कोथिंबीरीचे पाय कडाकडा मोडून तिला मात्र बारीक कापावी…. दोन तीन प्रकारच्या चिवड्यांचे, घरच्या चिवड्याशी भरत मिलाप घडवून आणत, त्यांची गळाभेट मोठ्या डब्यात ठेवावी…. सडपातळ, मध्यम, मोठी… अशा….. सर्वच कँटेगिरीच्या शेवेला समान योग्य मान देत बाऊलमध्ये काढावेत… उगाचच बारीक शेव जाड शेवेकडे तिरपा कटाक्ष टाकीत हसली… नि पुटपुटली…”काय बाई जाड ध्यान.. “तरीही जाड्या शेवेसह आपणही दुर्लक्ष करावे……. फ्रिजमध्ये पहाटेसच ठेवलेलं नि तिथे ते निवांत AC मध्ये नीजलेलं गोडुलं दही काढून घ्यावं… त्याला अजिबात कल्पना नसते…. आपला आता लवकरच कडेलोट होऊन उकळत्या रश्श्यावर घालणार याची…. अज्ञानातलं सुख तयाला जरा लाटू द्यावं…. त्याला थोडं तसंच सुस्ताऊ द्यावं….

मिसळीची डिश तयार करायला घ्यावी.. भैय्या स्टाईलने प्लेटमध्ये मुबलक मोठ्या हाताने उसळ घालावी. ती तिच्या मनाविरुद्ध पातेल्यातून काढल्यामुळे अद्याप धुसफुसत असेल… आपण लक्ष देऊ नये…… मग चिवड्यांचे सर्व प्रकार हसत खेळत तयावर सोडावीत…….. मग सर्वसमभाव दर्शक सर्वच प्रकारच्या शेवेस… सेवेत घेत आनंदाने समोर सरकत मिसळीवर पहुडावी…पिवळीधम्म खारी बुंदी शिंपडावी….. मग मात्र सर्वांच्या भेटीस उत्सुक असलेल्या, आणि म्हणून अत्यानंदाने आनंदाच्या उकळ्या फुटणाऱ्या रश्श्याची अखेर भेट घडवून आणावी…. नीजलेलं, आळसावलेलं दही आता पुरेसं जागं झालं असेल… त्याला पाचारण करुन प्लेटमध्ये घालावं… ते कुरबुरेल.. पण गय न करता… लगेचच कांदे घालून त्याचं तोंड चूप करावं…. त्याच्या जोडीला हिरवीगार कोथिंबीर घालून लगेचच खवैय्यांच्या हवाली प्लेट करावी… ।…..

… आता… खाणा-याला पहिल्या घासातच जबरदस्त ठसका लागला तर समजावं.. मिशन फत्ते…”कुणीतरी आठवण काढली असेल.. “अशा फडतूस गोष्टींवर त्यांचा विश्वास बसू न देता…”मिसळ सही झाली य…” यावर पक्का विश्वास बसू द्यावा…. म्हणजे जमली तुमची झणझणीत मिसळ…!!!… लागलेला ठसका आवरता आवरता त्याला पुरेवाट झाली तरी आपण पुरे न करता उकळता रस्सा आणखीच घालीत जावे…म्हणजे प्लेटमध्ये हं…. जराही उसंत न घेऊ देता मिसळीचा समाचार घ्यावयास हवा.. न थांबता.. मिसळीसवे एकमत व्हावयास हवे…. फक्त मिसळीची वाफाळती डीश….. आणि ती वेडी तंद्री …. बस… जग इथेच सुरु होऊन इथेच संपावं……”Don’t disturb me…”अशी अलिखित सूचना आपल्या अंगप्रत्यांगातून प्रकट व्हावयास हवी…. गरम गरम रश्श्याने ओतप्रोत साकळलेला चमचा अंतर कापीत अधीर ओष्ठद्वयींपर्यंत येता येता, कुणी भोचकपणा करीत उगाचच अधेमधे काही विचारायला कडमडलंच…. तर तिकडे लक्षही न देता.. “ऊ.. हू हू हू…”असे काहीसे उद्गार काढून “नंतर बोल.. “सुचवावं…. जेणे करुन रसास्वाद घेण्याची समाधी भंग होणार नाही…… तेव्हा मिसळीस समाधान प्राप्त होतं…. खाणा-यासही… नि आपणासही…!!!

लेखिका : सौ. भारती भाईक

प्रस्तुती: सौ. मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments