सौ. मंजुषा सुनीत मुळे
📚 वाचताना वेचलेले 📖
☆ “तुमची मैत्री कुठे होती?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
उद्धवाने कृष्णाला विचारलेला कठोर प्रश्न: “तुमची मैत्री कुठे होती? ”
महाभारत युद्धानंतर उद्धवाने श्रीकृष्णासमोर तो प्रश्न ठेवला, जो आजही आपल्या सर्वांच्या मनात उमटतो. हा संवाद केवळ एक कथा नसून, जीवन जगण्याचा एक अत्यंत गहन ‘मॅनेजमेंट लेसन’ आहे.
“हे माधवा! तुम्ही म्हणता, की खरा मित्र तोच, जो न मागता मदत करतो. मग पांडवांबरोबर असे का घडले?
युधिष्ठिरांना जुगार खेळण्यापासून तुम्ही का थांबवले नाही?
त्या फाशांना धर्मराजाच्या बाजूने का वळवले नाही?
आणि द्रौपदीचा सभेत अपमान होत असताना, तिच्या चीरहरणाची पराकाष्ठा होईपर्यंत तुम्ही वाट का पाहिली?
हीच का तुमच्या मैत्रीची व्याख्या? ”
भगवान मंद स्मित करून म्हणाले,
“उद्धवा, संसारात विजय त्याचाच होतो ज्याच्याकडे विवेक असतो.
दुर्योधनाकडे विवेक होता—त्याने स्वतः न खेळता शकुनीला पुढे केलं. युधिष्ठिरही विवेकाने वागून, स्वतःऐवजी मला खेळायला सांगू शकले असते. सांग, जर माझ्यात आणि शकुनीत खेळ झाला असता, तर विजय कुणाचा झाला असता?
धर्मराजांनी मला विनंती केली होती, की बोलावल्याशिवाय सभेत यायचे नाही.
त्यांना स्वतःचा पराभव माझ्यापासून लपवायचा होता. मी त्यांच्या त्या विनंतीच्या मर्यादेत बांधला गेलो आणि बाहेरच उभा राहिलो. ते हरत गेले, पण मला आठवण्याऐवजी फक्त आपल्या नशिबालाच दोष देत राहिले.
द्रौपदीला जेव्हा सभेत ओढून आणले गेले,
तेव्हाही तिचा स्वतःच्या शक्तीवर आणि पांडवांवर विश्वास होता. पण ज्या क्षणी तिने स्वतःवरील आधार सोडून, पूर्ण शरणागतीने हाक मारली—
‘हे हरि! अभय दे, कृष्णा! ’—
त्या क्षणीच मी प्रकट झालो. सांग उद्धवा, उशीर माझ्याकडून झाला होता की तिच्या पुकारण्यात? ”
उद्धवाने टोचून विचारले,
“म्हणजे तुम्ही फक्त बोलावल्यावरच येता? शांतपणे सगळं पाहत राहता? ”
कृष्ण म्हणाले,
“उद्धवा, सृष्टी कर्मफलाच्या नियमावर चालते.
मी हस्तक्षेप करत नाही; मी केवळ साक्षी आहे. प्रत्येक क्षणी तुमच्याजवळ उभा राहून तुम्हाला पाहतो—हाच माझे धर्म आहे. ”
उद्धवाने पुन्हा प्रश्न केला,
“वा! म्हणजे आम्ही पाप करत राहायचे आणि तुम्ही फक्त पाहत बसायचे? ”
तेव्हा भगवानांनी मर्म सांगितले:
“उद्धवा, ज्या क्षणी तुला हे जाणवेल की ‘मी’ तुला पाहतो आहे,
त्या क्षणी तू कोणतेही चुकीचे कृत्य करू शकशील का?
मनुष्य पाप तेव्हाच करतो, जेव्हा त्याला वाटते की त्याला कोणीही पाहत नाही.
युधिष्ठिरांची चूकही हीच होती. “
उद्धव निरुत्तर झाले.
हा संवाद आपल्याला हे शिकवतो की—
ईश्वराची अनुपस्थिती पाप नाही,
तर ईश्वराच्या उपस्थितीचे विस्मरण हेच पापाचा खरं मूळ आहे.
जर आपण प्रत्येक क्षणी त्याला आपल्या सोबत अनुभवले,
तर जीवन आपोआप दिव्य होऊन जाईल.
☆
लेखक: अज्ञात
प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






मंजूषा ताई! खूप सुंदर लेख!