श्री अनिल वामोरकर
📖 वाचताना वेचलेले 📖
☆ “मनाच्या सवयी” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆
Instant Gratification – संयम हरवलेल मन
काल एका देवळाच्या रांगेत दर्शनाला भाविक उभे होते, तेव्हा एक माणूस रांगेत पुढे उभारण्यासाठी व लगेच दर्शन घेण्यासाठी वाद घालत होता, हे पाहून हे लक्षात आले की आपल्या सगळ्यांना सगळ्या गोष्टी लगेच हव्या असतात.
आज, आता, ताबडतोब!
जेवण हवं तर instant noodles.
मनोरंजन हवं तर ३० सेकंदाची reel.
खरेदी हवी तर one day delivery.
खेळ हवा आहे तर झटपट निकाल.
आणि यशही हवं ते overnight success!
थांबणं, वाट पाहणं, एखादी गोष्ट हळूहळू घडू देणं —
ही सवय जणू आपल्या सर्वांच्या आयुष्यातून हरवत चालली आहे.
मानसशास्त्रात यालाच म्हणतात Instant Gratification —
म्हणजे ताबडतोब सुख मिळवण्याची सवय.
रस्त्यावर सिग्नल लागतो. तीस सेकंदही झाले नसतात आणि मागून हॉर्न वाजायला सुरुवात होते. जणू त्या तीस सेकंदांवरच आयुष्याचं भविष्य ठरणार आहे.
इंटरनेट थोडं slow झालं की चिडचिड. फूड डिलिव्हरी दहा मिनिटं उशिरा आली की राग.
आजचं मन जणू एका विचित्र मोडमध्ये जगत आहे —
“आत्ता… लगेच… instant. ”
या सवयीचा परिणाम फक्त आपल्या वागण्यात दिसतो, पण तो आपल्या मेंदूतुन आणि मनातून तयार होतो.
जेव्हा आपल्याला लगेच आनंद मिळतो — मोबाईल notification, reel, likes, instant fast food — तेव्हा मेंदूमध्ये dopamine नावाचं रसायन वाढतं. हे dopamine मेंदूला सांगतं — “हे पुन्हा कर… यात मजा आहे. ” म्हणून आपण पुन्हा मोबाईल उघडतो, पुन्हा reels पाहतो, पुन्हा पटकन आनंद देणाऱ्या गोष्टी करतो.
हळूहळू मेंदूला सवय लागते जलद आनंदाची.
मग जे काम वेळ घेणारं आहे — अभ्यास, व्यायाम, नातं टिकवणं, करिअर घडवणं — त्यात मन टिकत नाही. कारण तिथे instant reward नसतो.
एका अर्थाने आजचा मेंदू जणू reel-training सारखा क्षणिक आनंदाचा गुलाम झाला आहे.
३० सेकंदात excitement.
पण आयुष्य reel नसतं…
तो full चित्रपट असतो.
आणि समजायला, जगायला, अनुभवायला
फक्त संयम लागतो.
मनशांतीचा उगमही संयमातून होतो.
अधीर मन धारदार असतं. टोचणारं, बोचणारं आणि मानसिक समाधानाचे तुकडे करणारं.
एका रोपट्याला झाड व्हायला वर्षं लागतात. पण आपण रोज मुळं उपटून पाहिलं — “वाढलं का? ” तर ते झाड कधीच वाढणार नाही.
पण आज आपण आयुष्याबरोबरही हेच करत आहोत.
थोडा संघर्ष आला की हार.
थोडं नातं कठीण झालं की दूर.
थोडा वेळ लागला की निराशा.
कारण मनाला संयमाची सवय उरलेली नाही.
खरं तर आयुष्यातील मोठ्या गोष्टी instant मिळत नाहीत. विश्वास तयार व्हायला वेळ लागतो. नातं मजबूत व्हायला वेळ लागतो. यश घडायला वर्षं लागतात.
आजच्या जगात वेग सगळ्यांकडे आहे. पण संयम फार थोड्यांकडे आहे. जग फास्ट झालंय, असं सर्वांना वाटतंय, पण पृथ्वी त्याच संयमी वेगाने फिरतेय. निसर्गचक्र तसेच आहे. माणसाने मोहाच्या पाठी गती बदलली आहे बस!
संयमी राहणं ही अचानक येणारी गोष्ट नाही; ती हळूहळू तयार होणारी सवय आहे. कधी कधी उतावळेपणा वाटला तर थोडा विराम घ्यायला शिका. लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी काही क्षण शांत राहा. प्रक्रियेवर विश्वास ठेवा — कारण मोठ्या गोष्टींना वेळ लागतो. मोबाईलपासून कधी कधी थोडं अंतर ठेवा — कारण instant आनंदाची सर्वात मोठी सवय आज मोबाईल लावतो.
कारण संयम म्हणजे फक्त थांबणं नाही…
तर योग्य वेळी गोष्टी होतील यावर विश्वास ठेवून थांबणं आहे.
संत होणं कदाचित कठीण असेल…
पण संयमाने शांत राहणं ही प्रत्येकाला शिकता येणारी कला आहे.
कारण आयुष्यात झाडावरील आनंदाची फुलं instant फुलत नाहीत तर ती
संयमानेच फुलतात आणि समाधान, आत्मशांतीचा सुगंध सर्वत्र वाटतात.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



