श्री जगदीश काबरे

☆ “आपण असे का वागतो?☆ श्री जगदीश काबरे ☆

माणसाचे सामाजिक वर्तन हे त्याच्या संस्कारांचे, परंपरांचे, भीतीच्या आणि स्वीकाराच्या अपेक्षांचे मिश्रण असते. अनेकदा आपण अनुभवतो की आपल्या आसपास असे मित्र, सहकारी किंवा नातेवाईक असतात की जे स्पष्ट बोलायला घाबरतात. त्यांना एखादे काम सांगितले असता ते आवर्जून “हो बघतो”, “हो करतो”, “नक्की करतो”, असे शब्द उच्चारतात; पण प्रत्यक्षात ते काम करतच नाहीत. ही घटना अनेकांच्या जीवनात इतकी वारंवार घडते की ती एक सामान्य ’सामाजिक पॅटर्न’ बनली आहे. या पॅटर्नचा अभ्यास केला तर त्यामागे केवळ व्यक्तीगत स्वभाव नसून खोल सांस्कृतिक आणि मानसिक संरचना दिसते. “सत्यम् ब्रूयात् प्रियं ब्रूयात्” या संस्कारांनी हीच मानसिकता बळकट केली आहे. सत्य बोला, पण तेही प्रिय असले पाहिजे, ही अपेक्षा चांगली असली तरी तिचा अनपेक्षित परिणाम असा होतो की माणूस अप्रिय सत्य टाळायला लागतो आणि अखेरीस बोटचेपणा किंवा लोकांना न दुखावण्याच्या वर्तनाची एक प्रमुख खूण बनते.

भारतीय संस्कृतीत सहिष्णुता, नम्रता, इतरांना न दुखावणे, सुसंवाद राखणे यांना प्रचंड महत्त्व दिले गेले आहे. हे मूल्य समाज टिकवण्यासाठी नक्कीच आवश्यक असले तरी त्यांचा अतिरेक झाल्यास माणूस स्वतःची भूमिका, मत किंवा नकार व्यक्त करताना त्याला असुरक्षित वाटायला लागते. “नाही” म्हणणे म्हणजे उद्धटपणा, रूक्षपणा, अनादर किंवा असामाजिकता, अशी एक समजूत पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनात बसवली गेली आहे. त्यामुळे लोक “नाही” म्हणण्यापेक्षा “हो” म्हणतात आणि नंतर दुर्लक्ष करतात. हा प्रकार केवळ व्यक्तीगत संबंधांमध्येच नाही, तर कार्यालयीन कामकाजात, सार्वजनिक ठिकाणी, प्रशासनात आणि राजकीय जीवनातही दिसतो. वरवर पाहता सौम्य वाटणारी ही मानसिकता प्रत्यक्षात मोठ्या सामाजिक समस्यांना जन्म देते. जे करायचे नाही, तेही “हो” म्हणणे म्हणजे गैरसमज, चुकीची अपेक्षा वाढवणे आणि परस्पर अविश्वास निर्माण करणे. हीच परिस्थिती पुढे नात्यातील ताण, मित्रांमधील नाराजी किंवा कार्यक्षेत्रातील काम प्रभावीपणे न करण्यात परिवर्तित होते.

बोटचेपणा म्हणजे व्यक्तीचे स्वतःचे मत, निर्णय किंवा स्वभाव लपवत, फक्त समोरच्याला भावेल असेच बोलणे. यातून खरी संवाद प्रक्रिया अगदी बिघडण्याचा सांभाव असतो. समाजशास्त्र सांगते की संवाद जितका अस्पष्ट तितका गैरसमज निर्माण होण्याची शक्यता अधिक. आपण एखाद्याला काम सांगतो तेव्हा आपल्याला हवे असते उत्तर –ते काम शक्य आहे की नाही. परंतु समोरचा माणूस स्पष्टपणे नकार देत नाही, कारण त्याच्या मते नकार देणे म्हणजे संबंध बिघडवणे. म्हणून तो “करतो”, “बघतो”, “थोडा वेळ दे” असे शब्द वापरून दुसऱ्याच्या अपेक्षा जिवंत ठेवतो. हे उत्तर ऐकणाऱ्याला सुखकारक वाटले तरी नंतर काम न केल्यामुळे गैरसमज वाढण्याची शक्यता असते. परिणामी, काम न झाल्यावर निराशा आणि नाराजी वाढते आणि त्या व्यक्तीला पुन्हा काम न सांगण्याचा सांगण्याचा निर्णय घेतला जातो. विश्वास तुटणे हे बोटचेपणाच्या सर्वात गंभीर परिणामांपैकी एक आहे.

या मानसिकतेच्या सामाजिक मूळांचा अभ्यास केला तर सर्वप्रथम लक्ष जाते ते संस्कारांकडे. भारतात घरात, शाळेत आणि समाजात ज्या प्रकारे मुलांचे संस्कार होतात त्यात “नकार देणे चुकीचे आहे” असा भाव अगदी खोल रुजवला जातो. मुलांनी मोठ्यांना “हो” म्हटले पाहिजे, शिक्षकांनी सांगितले तसे वागले पाहिजे, घरी पालकांच्या निर्णयांवर प्रश्न विचारू नये, नम्रता दाखवावी, रागावू नये, गैरसोय होईल असे काही बोलू नये, अशा अनेक सूक्ष्म अपेक्षा त्यामागे असतात. या प्रक्रियेतून वाढणारे मूल आत्मविश्वासाने “हे मला जमत नाही”, “हे मी करू शकत नाही”, किंवा “हे मला मान्य नाही” असे बोलण्याची हिम्मत दाखवूच शकत नाही. भीडस्त स्वभाव वाढल्यामुळे मोठेपणी एखाद्या कामाला नकार द्यायचा असेल तरी त्याला ते कठीण जाते. तो विषम परिस्थितीला सामोरे जाण्यापेक्षा बोटचेपणा स्वीकारतो, कारण त्याच्या मते ते अधिक सुरक्षित असते.

समाजशास्त्रात ’संघर्ष टाळण्याची संस्कृती’ अशी एक संकल्पना आहे. भारतीय सामूहिक जीवन हा या संस्कृतीचा एक प्रमुख नमुना म्हणायला हवा. कारण आपल्यात उघड संघर्ष टाळण्याची प्रवृत्ती इतकी प्रबळ आहे की लोक सत्य बोलण्यापेक्षा शांत राहणे किंवा आनंददायी प्रतिसाद देणे पसंत करतात. एखाद्याने सांगितलेले काम नक्कीच नकोसे असू शकते, वेळ नसेल, कौशल्य कमी असेल, किंवा मनात इच्छा नसेल पण या सगळ्यांपेक्षा संघर्ष नको हा भाव जास्त महत्त्वाचा ठरतो. मैत्री, नातेसंबंध किंवा सहकार्यातील सौहार्द टिकवण्याची भीती वाटणाऱ्या व्यक्तीचा खोटे आश्वासन देण्याकडे कल वाढतो. परंतु या संस्कृतीचे दुष्परिणाम बहुआयामी आहेत. सर्वप्रथम, व्यक्ती स्वतःच्या मर्यादा मान्य करण्याची सवय गमावते. ती स्वतःच्या क्षमता, वेळ, प्राधान्ये किंवा आवडीनिवडींचा विचार न करता प्रत्येक गोष्टीला “हो” म्हणते. त्यामुळे तिच्यावर अनावश्यक भार वाढतो. ती दिलेल्या शब्दांवर ती ठाम राहू शकत नाही, कारण सुरुवातीपासूनच ते शब्द वास्तविकतेवर आधारलेले नसतात. दुसरे म्हणजे, इतरांच्या दृष्टीने तिची प्रतिमा हळूहळू अविश्वसनीय, ढिसाळ, किंवा दुटप्पी बनते. जेव्हा एखादा माणूस वारंवार “हो” सांगून काम करत नाही तेव्हा लोक त्याला गंभीरपणे घेत नाहीत. त्याचे वचन, आश्वासन किंवा बोलणे यांचे मूल्य कमी होते. कार्यक्षेत्रात ही मानसिकता अधिक गंभीर बनते. भारतीय कार्यालयीन संस्कृतीत सांगितलेली कामे स्वीकारण्याचा दबाव असतो. येथेही सरळ “हे माझ्याकडून होणार नाही” असे सांगितले जात नाही. कारण करिअर वर डाग लागण्याची भीती असते. म्हणून कोणीही नकार देत नाही, पण कार्याची गती मंदावते, जबाबदाऱ्या ढकलल्या जातात, शेवटच्या क्षणी सबबी दिल्या जातात. यामुळे कार्यक्षमतेवर परिणाम होतो. व्यवस्थित संवादाअभावी प्रकल्प अर्धवट राहतात आणि संस्थेत इतरांना दोष देण्याची प्रवृत्ती वाढते. सामूहिक कामकाजासाठी स्पष्ट संवाद ही पहिली अट असते; बोटचेपणा हा संवादाचा सर्वात मोठा शत्रू असतो.

मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर “नाही” म्हणू न शकणाऱ्या लोकांमध्ये अपराधगंड प्रबळ असतो. नकार दिल्यास समोरचा दुखावेल, रागावेल किंवा आपल्याबद्दल नकारात्मक विचार करेल अशी भीती वाटते. ही भीती त्यांना स्वतःच्या प्रतिमेबद्दल अतिसंवेदनशील बनवते. ते “चांगले व्यक्ती” दिसण्याची इच्छा ठेवतात. त्यांच्या मते जे लोक स्पष्टपणे नकार देतात ते उद्धट, हट्टी किंवा कठोर असतात. त्यामुळे ते कोणत्याही नात्यात स्वतःची जागा स्पष्टपणे व्यक्त करत नाहीत. परंतु दीर्घकाळात हीच प्रवृत्ती मानसिक ताण वाढवते. सतत लोकांशी गोड बोलत राहणे म्हणजे स्वतःची इच्छा, वेळ आणि ऊर्जेचा अपव्य करणे होय. त्यामुळे अशा लोकांत चिंता, निराशा निर्माण होताना दिसते.

सामाजिक पातळीवर बघितले तर “अप्रिय सत्य” बोलण्याची भीती आपल्याला आपली संस्कृती व्यक्तीगत स्वातंत्र्याला प्रोत्साहन देते की दडपते, या प्रश्नाचे द्वंद्व आपल्या मनात उभे करते. स्पष्टपणा, प्रामाणिक संवाद, आणि नकार देण्याची क्षमता या गोष्टी कोणत्याही निरोगी समाजासाठी अत्यावश्यक असतात. परंतु जिथे कधीही नकार देऊ नये, तडजोड करावीच, सौहार्द राखणेच महत्वाचे अशी मानसिकता असते तिथे समाज बाहेरून शांत वाटला तरी आतून अस्वस्थ असतो. असा समाज दुटप्पी, दाम्भीक बनतो. संबंधांमध्ये आंतरिक प्रामाणिकता नसते. लोक एकमेकांना खरेपणे ओळखू शकत नाहीत, कारण ते मुखवटे धारण करून खऱ्या भावना लपवून ठेवत असतात. परिणामी, संबंध वरवरचेच राहतात. जर आपल्याला सामाजिकदृष्ट्या प्रामाणिकपणा वाढवायचा असेल तर प्रथम “नाही” म्हणण्याच्या संस्कृतीला स्वीकारले पाहिजे. “नकार देणे म्हणजे नातं तोडणे नाही”, हे लोकांच्या मनात ठसवले पाहिजे. नकार देणारी व्यक्ती प्रामाणिक असते, कारण ती आपली क्षमता आणि मर्यादा स्पष्टपणे सांगते. यामुळे त्याचे शब्द विश्वासार्ह असतात. उलट, सतत “हो” म्हणणारी व्यक्तीच अविश्वसनीय ठरते. म्हणूनच, सामाजिक विश्वास टिकवण्यासाठी “नाही” हा शब्द आपल्याला अपमानित करणारा वाटता कामा नये. कारण “हो” आणि “नाही” या दोन शब्दांमध्येच संवादाची मूलभूत रचना असते. दोन्ही शब्द आवश्यक.

म्हणून “सत्यम् ब्रूयात् प्रियं ब्रूयात्” या वाक्याचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे. सत्य प्रिय असावे—होय. पण “प्रिय नसल्यास सत्य बोलू नये” हा अर्थ काढणे चुकीचे आहे. सत्याने प्रिय होणे म्हणजे सत्य सांगण्याची पद्धत विनम्र असावी. म्हणजेच सत्य लपवू नका, पण ते अप्रिय असले तरीही सत्य सांगायला कचरू नका. समाजात सत्य बोलण्याला प्रोत्साहन देताना त्याची पद्धत सौम्य ठेवणे हा मूळ उद्देश आहेच, परंतु याचा अर्थ असा नाही की अप्रिय सत्य सांगूच नये. पण संस्कृतीने प्रिय सत्यच सांगा असाच संस्कार रुजवला आणि व्यक्तीला सामाजिक दबाव सहन करावा लागला. म्हणून भारतीय समाजात “नकार” हा शब्द सामाजिक भीतीचा केंद्रबिंदू झाला आहे. कुणाला दुखावण्याची, कुणाकडून अवहेलना होण्याची, कुणीकडून नाते तुटण्याची किंवा स्वतःला वाईट ठरवले जाण्याची भीती लोकांना “हो” म्हटण्यास भाग पाडते. ही मानसिकता बदलायची असेल तर शैक्षणिक स्तरावर, कौटुंबिक स्तरावर आणि सामाजात संवाद कौशल्याची नव्याने मांडणी करणे गरजेचे आहे. मुलांना “हो” आणि “नाही” दोन्ही शब्द योग्य ठिकाणी कसे वापरायचे हे शिकवणे आवश्यक आहे. “नाही” म्हणणाऱ्या व्यक्तीला समाजाने दोष देणे बंद केले पाहिजे. उलट, त्याच्या प्रामाणिकतेचा सन्मान करायला हवा. याशिवाय, काम स्वीकारताना लोकांनी स्वतःच्या क्षमतांचा आणि वेळेचा तर्कसंगत विचार करणे आवश्यक आहे. नकार देणे कठीण वाटले तरी त्याचे दीर्घकालीन फायदे अधिक असतात. सामाजिक प्रामाणिकता वाढते, काम व्यवस्थित विभागले जाते, आणि अपेक्षा स्पष्ट राहतात. अशा संवादामुळे गैरसमज कमी होतात आणि नात्यांमध्ये पारदर्शकता वाढते.

शेवटी, “नाही” म्हणण्याची क्षमता असणे ही सामाज प्रगल्भ झाल्याची खूण आहे. जिथे लोक एकमेकांशी स्पष्टपणे व्यक्त होतात आणि तसे वागतात तिथे संबंध टिकाऊ बनतात, कामकाज अधिक परिणामकारक होते आणि व्यक्तीचा आत्मविश्वासही वाढतो. बोटचेपणा माणसाला वरवर चांगला वाटतो, पण वास्तवात तो स्वतःलाही आणि इतरांनाही हानीकारक असतो. एखाद्या कामाला नकार देणे हे चुकीचे नाही तर ते प्रामाणिकपणाचे धैर्य आहे. सत्य सांगणे आणि नको असलेले टाळणे यात संतुलन साधल्याशिवाय समाज निरोगी बनू शकत नाही. “प्रिय सत्य” ही संकल्पना योग्य आहे, पण “अप्रिय सत्य” टाळणे ही सामाजिक चूक आहे. म्हणूनच, स्पष्टपणे “नाही” म्हणणे ही परस्परातील संबंध पारदर्शक ठेवण्यासाठी आवश्यक असणारी कृती आहे.

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments