सुश्री अरुणा मुल्हेरकर
विविधा
☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १३ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
गाथेतून उमजणारी गीता(३)
अर्जुनाला रणभूमीवर माझ्याच नातेवाईकांना मी कसे मारू असा जेव्हा भ्रम झाला त्यावेळी, माता, पिता, बहीण, बंधू, भार्या, अपत्ये ही सर्व नाती कशी असत् आहेत, आणि मी- कृष्ण हेच कसे परब्रह्म आहे याचा उपदेश श्रीकृष्णाने गीतेत केला. त्याच परमतत्वानुसार
तुकाराम महाराज सर्व मोह पाशातून मुक्त झाले आहेत. म्हणून ते म्हणतात,
बाप मेला न कळता/ नव्हती संसाराची चिंता/
विठू तुझे माझे राज्य/ नाही दुसऱ्याचे काज/
बाईल मेली मुक्त झाली/ देवे माया सोडविली/
पोर मेले बरे झाले/ देवे माय विरहित केली/
माता मेली मज देखता/ तुका म्हणे हरली चिंता/
ज्या ज्या गोष्टी असत् आहेत, त्याचा विनाश अटळ आहे हे सत्य स्वीकारण्याची शक्ती जेव्हा अंगी येते, तेव्हाच सत् ची, परमतत्वाची, परब्रम्हाची ओळख पटते. त्याचवेळी जिवा शिवाचे ऐक्य होऊ शकते.
जोपर्यंत माणूस संसार बंधनात अडकून पडलेला आहे, तोपर्यंत त्याला संसाराचे भय असते. एकदा का त्याला संसार हा भासच आहे याची खात्री पटली की तो भव भयापासून मुक्त होतो. महाराज आता संसारातून पूर्णपणे निवृत्त झाले आहेत. त्यांना कसल्याही भोगाची आसक्ती राहिली नाही. म्हणून ते देवाजवळ बोलतात,
भोगावरी आम्ही घातला पाषाण/ मरणा मरण आणियेले/
विश्व तू व्यापक काय मी निराळा/ कशासाठी बळा येऊ आता/
काम सारुनिया काढावे बाहेरी/ आणूनी भितरी काय ठेवू/
तुका म्हणे काही नेणे लाभ हानी/ असेल तो धनी राखो वाडा/
मी गुणातीत आत्मा आहे. मला देह दुःख नाही अशा भूमिकेचा दगड भोगांच्या डोक्यावर ठेवून मी मरणाचा अंत केला आहे. देवा तू जर विश्वव्यापक असशील, तर मी त्यापेक्षा निराळा नाही. अशा परिस्थितीत मला वेगळेपणाचा खटाटोप करण्याची काय जरूर आहे? तू आणि मी एकच आहोत. लाभ किंवा हानीची परवा तू असताना मी का करावी? मी काही लाभ हानी जाणत नाही, जो या देहाचा धनी असेल तोच त्याचे रक्षण करेल.
याचसाठी तुकाराम महाराज त्यांच्या गाथेतून साधकांना विठ्ठलाच्या चिंतनाचे महत्त्व सांगतात.
काय नोहे केले/ एका चिंतीता विठ्ठले/
सर्व साधनांचे सार/ भवसिंधू उतरी पार/
योगयागतपे/ केला त्याने अमुपे/*
तुका म्हणे जपा/ मंत्र त्रीअक्षरी सोपा/
एका विठ्ठलाच्या चिंतनाने काय मिळत नाही? हा भव सिंधू पार करण्यासाठी विठ्ठल हा त्रि अक्षरी मंत्र पुरेसा आहे. योग, याग, साधना वगैरे गोष्टींची काहीही आवश्यकता नाही.
सर्वतोपरी देहाभिमान शून्य होणे म्हणजेच योग आणि तप आहे. तोच परमार्थ आहे. ज्यावेळी देहाभिमान नाहीसा होईल त्याचवेळी जन्ममृत्युरूपी येरझार थांबेल.
योग तप याची नावे/ गणित व्हावे अभिमाने/७
करणे ते हेचि कर/ सत्य बरा व्यापार/
तरी खंडे येरझार/ निधे भार देहाचा/
जेव्हा विषयसुख गोड वाटते, तेव्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात सापडून किती यातना भोगाव्या लागतात याचे वर्णन महाराज त्यांच्या या अभंगात करतात.
विषयाचे सुख /येथे वाटे गोड/
पुढे अवघड/ यमदंड/
मारिती तोडिती/ जोडीतील निष्ठुर/
यमाचे किंकर/ बहु साल/
असिपत्र तरुवर/ खैराचे इंगळ/
निघतील ज्वाल/तैल पाकी/
तप्तभूमीवरी/ चालविती पायी/
अग्निस्तंभ बाही/ कवटाळविती/
म्हणूनी तुका येतो काकुळती/ पुरे यातायाती गर्भवास/
क्षणिक विषयसुखाचे भोगावे लागणारे परिणाम किती भयंकर आहेत याची कल्पना तुकारामांच्या या अभंगातून आपल्याला येते.
एका नामात हरी वसलेला आहे, परंतु आपल्यासारखी सामान्य माणसे देहातच सर्व सुख आहे असे मानतात व त्यामुळे परब्रम्हप्राप्ती आपल्यापासून दूर पळते.
देह हा सादर पहावा निश्चित/ सर्व सुख येथे नाम आहे.
आपल्याला मिळालेल्या देहाकडे आदराने जरूर पहावे, परंतु एक परब्रह्म, एक नामच सर्व सुखाचे साधन आहे.
लटक्या संसारात माणूस अडकतो. लोभ, मोह इत्यादी षड्रिपूंच्या जाळ्यात सापडतो. त्याला हरिनामाचा विसर पडतो. खूप पैसा जमवण्याची धडपड करतो. शेवटी या क्षणभंगुर देहाचा नाश होतो आणि बापाने ठेवलेल्या पैशांवरून दोन भावांचे आपसात भांडण लागते.
लटीकियाच्या आशा/ होतो पडिलो वळसा/
होऊनिया दोषा/ पात्र मिथ्या अभिमाने/
बारावी उघडली दृष्टी/ नाहीतरी होतो कष्टी/
आक्रंदते सृष्टी/ मात्र या चेष्टांनी/
मरणाची नाही शुद्धी/ लोभी प्रवर्तली बुद्धी/
परती तो कधी/ घोड्याची ना माघारी/
साचवुनी मरे धन/ लावी पोरांची भांडण/
नाही नारायण / तुका म्हणे स्मरला.
संसारी माणसाची अशी ही शोककथाच आहे.
आता हा पुढील अभंग पहा.
येथे नाही उरी आले अवतार/ येरे ते पामर जीव किती/
विषयाचे झणी व्हाल लोलिंगत/ जेवलीया अंत नलगे भंग/
वाहून या भार कुंथसील ओझे/ नवे तेचि माझे थीता त्याग/
तुका म्हणे कैसी नव्हे त्याची लाज/ संती केशी-राज साधियाला/
या अभंगात तुकाराम महाराज प्रापंचिकाला उपदेश करीत आहेत. या ठिकाणी अवतार हा शब्द नारायणाच्या मत्स्य, कुर्म आदी दशावतारांना उद्देशून आला आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की जिथे हे अवतार सुद्धा राहिले नाहीत तिथे सामान्यांची काय कथा? विषयाची आसक्ती माणसाला कुठे नेईल त्याचा काही नेम नाही. जे खरोखर आपले नाही, त्याचे ओझे खांद्यावरून विनाकारण वाहून हे माणसा तू स्वतःला कष्ट देऊ नकोस. त्यामुळे स्वहिताचा त्याग होईल. केशव हाच परमात्मा आहे, त्याला साध्य करण्यातच स्वहित आहे.
स्वतः तुकाराम महाराज निःसंग होऊन अहोरात्र गोविंदाचे पोवाडे गात होतेच आणि लोकांनाही भवभयापासून मुक्त व्हावे यासाठी ते सावध करीत होते. विठ्ठलाचे नाव वाचेत असल्यामुळे विषयात अडकलेल्या तुकारामांना योग्य मार्ग सापडला. कृष्णाने अर्जुनाला गीतेत हेच सांगितले होते की तू कृष्ण भावना भावित होणे जरुरीचे आहे.
क्रमशः… १३
© सुश्री अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈




