श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १७ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

कथादिष्विति गर्गः ॥ १७ ॥

अर्थ : भगवत कथा, भगवंताचे कीर्तन करणे म्हणजे भक्ती होय, असे गर्गाचार्य मानतात.

विवेचन: महर्षी व्यासांचे मत सांगितल्यावर नारद मुनी गर्गाचार्यांचे मत सांगतात. गर्गाचार्य हे गर्ग मुनी म्हणूनही प्रसिद्ध आहेत. मागील सूत्रात आपण विविध प्रकारचे पूजाविधी पाहिले. परंतु पूजाविधी करायला अनेक प्रकारचे साहित्य लागते, तसेच योग्य स्थलकालादिकाची आवश्यकता देखील असते. कीर्तन, श्रवणभक्तीकरिता विविध साधनाची अपेक्षा असतेच असे नाही. वीणा, मृदंग, तालादी वाद्ये उपलब्ध झाली तरी उत्तमच, पण ते नसेल तर काही अडत नाही.

संत एकनाथ महाराज सांगतात,

“कलियुगीं दोष बहुत ।

केवीं कीर्तनें होय स्वार्थ ।

तेथें दोषत्यागें जे गुण घेत ।

ते नित्यमुक्त हरिकीर्तनीं ॥ ४ ॥

*

हरिकीर्तनें शुध्द चित्त ।

दोषत्यागें गुण संग्रहीत ।

ऐसे सारभागी कलियुगांत ।

परममुक्त हरिकीर्तने ॥ ५ ॥

संत तुकाराम महाराज हे कथे विषयी अतिशय अनुराग ठेवणारे होते, ते देवाजवळ स्पष्ट म्हणतात –

*

“सांडुनि कीर्तन न करी आणीक काज ।

नाचेन निर्लज्ज तुझ्या रंगी ॥ १ ॥

*

(अभंग क्रमांक २२४७, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

स्वतः नारद महाराज हे कीर्तन भक्तीचे अध्वर्यू मानले जातात. सतत नारायण नारायण या नामाचे संकीर्तन करीत ते तिन्ही लोकांत फिरत असतात. कीर्तनाची सर्वात सोपी व्याख्या म्हणजे भगवत्कथा, भगवतांचे गुण प्रेमाने गाणे, प्रेमाने श्रवण करणे.

संतश्रेष्ठ श्रीएकनाथ महाराजांचा एक अभंग प्रसिद्ध आहे.

सगुणचरित्रे परमपवित्रे सादर वर्णावीं ।

सज्जनवृंदे मनोभावें आधी वंदावीं ॥ १ ॥

*

संतसंगें अंतररंगे नाम बोलावें ।

कीर्तनरंगी देवासन्निध सुखें डोलावें ॥ २ ॥

*

भक्तिज्ञानाविरहित गोष्टी इतरा न कराव्या ।

प्रेमभरें वैराग्याच्या युक्ति विवराव्या ॥ ३ ॥

*

जेणेंकरूनि मूर्ति ठसावी अंतरी श्रीहरीची ।

ऐशी कीर्तनमर्यादा आहे संतांच्या घरची ॥ ४ ॥

*

अद्वयभजनें अखंड स्मरणें वाजवी करताळी ।

एका जनार्दनी मीमुक्त होय तत्काळी ॥ ५ ॥

*

कीर्तन हे प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे. कीर्तनाला येणारे श्रोते आपल्याला काहितरी नवीन ऐकायला मिळेल या सुप्त हेतूने येत असतात. यासाठी किर्तनकार बहुश्रुत असणे अत्यावश्यक ठरते. बंध म्हणजे बंधन किंवा गाठ. श्रोता आणि वक्ता यात एक अनुबंध निर्माण व्हावा, जर हा बंध नसेल तर त्या कीर्तनात नियमाप्रमाणे सर्व काही होईल, पण त्याचा अपेक्षित प्रभाव जाणवेल असे म्हणता येणार नाही. त्या कीर्तनाची ‘कुडी आहे पण प्राण नाही’ अशी अवस्था होईल. वक्ता आणि श्रोता यांच्यामध्ये ‘बंध’ निर्माण होण्यासाठी ते एकरूप झाले पाहिजेत. म्हणून समर्थ संप्रदायात ‘श्रोता वक्ता श्रीराम समर्थ’ असे आवर्जून म्हटले जात असावे. संतांचे ग्रंथ उदात्त हेतूने लिहिलेले असतात, त्यात पांडित्य नसते असे म्हणणे धाडसाचे ठरेल, परंतु ते ग्रंथ साधे, सोपे, सरळ असतात. त्यांचा अभ्यास केला, त्यानुसार आचरण केले की ते ग्रंथ मनुष्याला थेट आत्मारामाची भेट घडवून देऊ शकतात. म्हणून समर्थ म्हणतात की संतांच्या ग्रंथांचा अभ्यास करावा. त्यातून सरळ अर्थ काढावा आणि तो समाजापर्यंत पोहोचवावा. त्या शब्दाचे स्लेष काढत बसू नये.

संवाद साधायचा असेल तर शब्दांशिवाय पर्याय नाही. म्हणून किर्तनातच नव्हे तर दैनंदिन व्यवहारात देखील प्रत्येक शब्द जपून वापरावा. आमची आज्जी सांगायची घरात प्रत्येकाने जपून बोलावे, शब्द काळजीपूर्वक योजावे, कारण वास्तूदेवता सतत ‘तथास्तु’ म्हणत असते. बोलण्याच्या आधी विचार केला की बोलल्यानंतर आपल्याला विचार करावा लागत नाही असेही म्हटले जाते, यामागे मोठा अर्थ आहे. आपण तो समजून घ्यावा. आपली वाणी शुद्ध, वाचा नम्र आणि शब्द मनोहर असावेत. ‘चिंच म्हटले की तोंडाला पाणी सुटत असेल’ तर प्रत्येक शब्दाला किती मूल्य आहे हे आपल्या लक्षात येईल. इथे माझी एक कविता देत आहे.

‘ शब्द ‘

बोलके करतात ‘शब्द’

अबोल करतात ‘शब्द’

*

शुद्ध करतात ‘शब्द’

अशुद्ध करतात ‘शब्द’

*

मने जोडतात ‘शब्द’

मने दुभंगतात ‘शब्द’ 

*

पवित्र करतात ‘शब्द’

अपवित्र करतात ‘शब्द’

*

सबळ करतात ‘शब्द’

दुर्बळ करतात ‘शब्द’

*

नाती जोडतात ‘शब्द’

नाती तोडतात ‘शब्द’

*

विजयी करतात ‘शब्द’

पराजयी करतात ‘शब्द’

*

शस्त्र होतात ‘शब्द’

निःशस्त्र करतात ‘शब्द’

*

आधार देतात ‘शब्द’

निराधार करतात ‘शब्द’

*

जीवन देतात ‘शब्द’

मरण देतात ‘शब्द’

*

शब्द-शब्दात अडकला ‘शब्द’

शब्दातून सुटका करील ‘शब्द’

*

शब्द-शब्दात जप तू अर्थ

शब्दाविना ‘शब्द’चि व्यर्थ

*

रे मनुष्या…..! पाळ तू ‘शब्द’!

राजा हरिश्चंद्रही पाळी शब्द’!!

*

शब्द-शब्द पाळता ‘राम’

‘मृदूल’ शब्दे होई काम.

*

जय जय रघुवीर समर्थ!!

श्रोता वक्ता श्रीराम समर्थ 

*

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः लेख क्र. १७

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments