श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “‘बीज’ पेरून गेलेले तुकोबाराय!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज
जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांनी या जगास ‘आमुचा राम राम घ्यावा’ म्हणत दिलेल्या निरोपाच्या दिवसाचे स्मरण म्हणजे ‘श्री तुकाराम महाराज बीज’!
तुकोबारायांच्या संदर्भात ‘बीज’ म्हणजे द्वितीया तिथी. यावर्षी हा दिवस ५ मार्च, २०२६ आहे. महाराष्ट्र वाड्मय हे अभंग आहे. कारण ते केवळ शाब्दिक रचनेपुरते जुळवलेले शब्द नसून प्रत्यक्ष जीवनाच्या अनुभवातून उमटलेले उदगार आहेत. कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव श्री माऊली ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी, जगदगुरू श्री संत तुकोबारायांचा गाथा, समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांचा दासबोध, भक्त शिरोमणी श्री नामदेव रायांचा गाथा, किंवा संत श्री एकनाथ महाराजांचे भागवत… किंवा अगदी अलीकडचे श्री गजानन विजय यांसारखे ग्रंथ शोधू पाहता असे कळते की… प्रत्येक वाचनाच्या वेळी वाचकांस काही तरी नवीन गवसत जाते… म्हणूनच पारायणाचे महत्त्व आहे! वर्तमानपत्रासारखे एकदा वाचले आणि झाले असे नाही… हे तर आपले भविष्यपत्रच आहे. जीवनातील प्रत्येक क्षणासाठी या वाड्मयात काही न काही आहे… अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत!
श्री तुकोबारायांनी रचलेल्या हजारो रचनांपैकी आता केवळ ४४०० उपलब्ध आहेत, असे दिसते. यातही काही क्षेपक (म्हणजे इतरांनी आपल्या रचना श्री तुकोबारायांच्या म्हणून प्रचारात आणलेल्या) आहेत, असे अभ्यासक सांगतात. जवळपास प्रत्येक अभंगात आपणांस एखादा तरी नवा शब्द, नवा विचार आढळून येईल!
सहज गंमत म्हणून सांगतो, एका व्यक्तीला एका व्यक्तीने श्री ज्ञानेश्वरी वाचावयास दिली. ती व्यक्ती त्या दिवसाचे वाचन संपले की पुढील वेळेस कुठून सुरुवात करावी हे लक्षात येण्यासाठी ग्रंथात बुक मार्क (दोरा) ठेवत. परंतु त्यांचा नातू ते घरात नसताना तो बुक मार्क अनावधानाने आधीच्या पानांत ठेवी. हे गृहस्थ तिथून वाचनास सुरुवात करीत. असे सलग काही दिवस झाले! ते एकेदिवशी म्हणाले… ओव्या छान आहेत… पण ज्ञानेश्वर महाराजांनी तेच तेच पुन्हा पुन्हा लिहिले आहे! असो.
हे वाड्मय चिंतन करण्यासाठी असल्याने सतत नजरेखालून घालणे श्रेयस्कर असते. कुणी कितीही विद्वान असले तरी त्यांना वक्तृत्वात या संतांनी लिहून ठेवलेल्या ओव्यांचा, अभंगांचा, पदांचा, समासांचा संदर्भ, दाखला द्यावाच लागतो. ‘तुका म्हणे’ हे शब्द तर जणू एखाद्या विचाराला दिलेला भक्कम पुरावाच जणू. माउलींच्या ओव्या, समर्थांचे समास ज्याला अर्थासह तोंडपाठ असतील, त्याच्या मुखातून प्रत्यक्ष सरस्वतीच प्रवाहित होत राहते! महाराष्ट्रात होऊन गेलेले सर्व वक्ते याच अमोघ भांडवलाच्या आधारे श्रीमंत होऊ शकले. आचार्य प्र. के. अत्रे यांचा श्री तुकोबारायांच्या अभंगांचा गाढा व्यासंग होता. प्राचार्य राम शेवाळकर यांच्या वाणीत माऊली विराजमान असत. भारतरत्न लतादीदी, भारतरत्न भीमसेनजी जोशी, वाड्मय- ‘पुरुषोत्तम’ पु. ल. देशपांडे यांनी संतांचे शब्द मनापासून जनापर्यंत पोहोचवले… ते केवळ या शब्दांत सामर्थ्य होते म्हणूनच.
ज्ञानोबारायांनी आईसारखे कोमल शब्द लिहावेत आणि तुकोबारायांनी वरपांगी कडक बापासारखे शब्दांचे प्रहार करावेत… पण या मायबापांची माया एकाच जातीची! तुकोबाराय हाती वाग्बाण अर्थात शब्दांचे बाण घेऊनच फिरत तर कधी काठी पण ते केवळ ज्ञानदीप लावू जगी या विचाराने! स्वत: घेत असलेला आनंद इतरांनीही घ्यावा यासाठी तुकोबाराय… तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू… नका चरफडू घ्या रे तुम्ही! असे ज्यावेळी म्हणतात त्यावेळी हा आनंद इतरांनी घ्यावा असे त्यांना किती प्रकर्षाने वाटते, हे दिसून येते.
ज्ञानदेव पाया आणि तुकोबाराय कळस असं संत बहिणाबाईंनी प्रतिकात्मक म्हणून ठेवलेलं असलं तरी पाया दुय्यम आणि कळस सर्वोत्तम असा त्याचा अर्थ नाही. एखाद्या नदीचा उगम आणि तिचा प्रत्यक्ष विस्तार हे एकमेकांपासून वेगवेगळे करता येत नाहीत, किंवा त्यांची क्रमवारी लावता येत नाही.
श्रीमद भगवद्गीता नावाची सोन्याची जाडजूड वीट, तिच्यापासून घडवलेले देखणे अलंकार म्हणजे ज्ञानेश्वरी… गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी! तसं श्री संत तुकोबारायांचा गाथा म्हणजे श्रीमद भगवद्गीता आणि श्री ज्ञानेश्वरी यांतील अर्थांचा परिपाक. आणि तुकोबाराय याचे सारे श्रेय माऊलींना देतात! तुका म्हणे नेणो युक्तीचिया खोली… म्हणोनि ठेविली पायी डोई! तुकोबाराय स्वत:ला ‘पामर’ म्हणवून घेतात ते माऊलींच्या तुलनेमध्ये… इतरांच्या नव्हे. इतरांसाठी ते तुकोबाराय… तुकाराम महाराजच होते आणि आहेत. तुकोबा आणि भगवान विष्णू हे एकच आहेत, असे रामेश्वर भट यांनी म्हणले आहे… आणि हे रामेश्वर भटांसारख्या अधिकारी पुरुषाने म्हणले आहे, हे ध्यानात घेण्यासारखे आहे!
इंद्रायणी देहूतून पुढे येते आणि माऊलींचे चरण स्पर्शून पुढे जाते. तुकोबाराय देहूतून पुढे वहात आले… ज्ञानोबारायांच्या चरणाशी नतमस्तक झाले आणि पुढे स्वत: प्रवाह बनून पुढे जात राहिले. जसं आपण पत्रावळीचा गठ्ठा उचलताना एक हात खालच्या पत्रावळीला आणि दुसरा हात वरच्या पत्रावळीला लावतो, तसंच ज्ञानेश्वरी आणि गाथा या अक्षर वाड्मयाबाबत म्हणता येईल. याचा अर्थ या गठ्ठ्यातील कोणतीही पत्रावळ दुय्यम आहे, असे मात्र अजिबात नाही. या गठ्ठ्यात असलेली प्रत्येक पत्रावळ ही ज्ञानाच्या, भक्तीच्या पदार्थांना योग्य ती जागा देत अभ्यासक, भाविकांस तृप्त करण्याचे सामर्थ्य अंगी बाळगते.
संत देहाने जगातून गेले आहेत… पण जाताना विचारांचा वारसा देऊन गेले आहेत! जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांना त्यांच्या ३७७व्या बीजोस्त्वानिमित्त वंदन. त्यांनी पेरलेल्या बीजातून भक्तीचा, सदसदविवेकबुद्धीचा मळा फुलला आहे… आणि हीच महाराष्ट्राची खरी दौलत आहे! राम कृष्ण हरी!
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







खूप छान लिहिलंय संभाजी सर!