श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “‘मैं और मेरी ख्वाहिश!!” ☆ श्री संभाजी बबन गायके

(महिला दिन विशेष)

“हाय, अबला!  तेरी यही कहानी… आंचल में है दूध और आँखों में पानी!” प्रियाने शाळा-कॉलेजात असताना ह्या ओळी कधीतरी वाचल्या असतील. पण प्रत्यक्ष आपल्या आयुष्यात आपण कधी ‘अबला’, ‘बिचारी’ म्हणवल्या जाऊ, असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं.

देहरादून सारख्या शहरात परंतू सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली प्रिया अभ्यासात अव्वल होती. वडिलांचे छत्र हरपले होते. बारावी शास्त्र शाखेत शिकत असतानाच तिच्या लग्नाच्या गोष्टी घरात सुरु झाल्या. पालकांनीच हे निर्णय घ्यायचे असतात अशा वातावरणात वाढलेली प्रिया कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असतानाच विवाहबद्ध झाली.

१४, राजपूत रायफल्स या भारतीय सैन्याच्या रेजिमेंटमध्ये शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या सैनिकाशी प्रियाची लग्नगाठ बांधली गेली. अमित शर्मा काहीच दिवसांनी नाईक पदावर पदोन्नत झाले. भारतीय सैन्यात हे पद Other Rank अर्थात कनिष्ठ पातळीवरील म्हणून ओळखले जाते. एखादा तरुण सैन्यात ‘जवान’ म्हणून दाखल होतो त्यावेळी त्याचे वय सुमारे सतरा-साडेसतरा वर्षे असते आणि शिक्षण फारतर दहावी-बारावी. अमित कमी शिकलेले असले तरी त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजलेले होते. त्यांनी प्रियाला पुढे शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. यामुळेच प्रिया गणित विषय घेऊन पदवीधर (बी. एस्सी.) आणि पुढे याच विषयात पदव्युत्तर पदवी (एम. एस्सी.) मिळवू शकली. संसारामध्ये ख्वाहिश अर्थात ‘आशा’ नावाचे सुंदर फूल उमलले होते. प्रियाने पुढे शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम (बी. एड.) पूर्ण केला आणि शिक्षक पात्रता परीक्षाही तिने उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली! संसाराला हातभार म्हणून प्रिया देहरादूनमधील एका खाजगी शिकवणी वर्गात शिक्षिका म्हणून नोकरी करीत होत्या.

सैनिक जेंव्हा प्रत्यक्षात विवाह करतो तेंव्हा तो त्याचा एका अर्थी पुनर्विवाहच असतो. कारण सैन्यातील नोकरी ही त्याची ‘पहली पसंद’ मानली जाते. आणि सैनिक पत्नींना या नोकरीत त्यांच्या कुंकवाला असलेल्या धोक्याची जाणीव असतेच असते!

९ जून, २०१२चा दिवस प्रिया यांच्यासाठी एक अशुभ बातमी घेऊन आला. दोनच दिवसांपूर्वी अमित सुट्टीवरून परत त्यांच्या पलटणमध्ये परतले होते. त्यावेळी १४, राजपूत अरुणाचल प्रदेशातल्या उत्तर-पूर्व प्रदेशात तिथल्या देशविघातक शक्तींच्या विरोधात युद्धात होती. १७ जून रोजी कर्तव्यावर पोहोचलेले नाईक अमित शर्मा त्यांच्या कामाच्या ठिकाणी वाहनाने निघालेले असताना त्यांचे वाहन दरीत कोसळून त्यांना वीरगती प्राप्त झाली!

 पदरात लहान मुलगी असलेल्या प्रिया यांच्यासमोर आयुष्य आ वासून उभे होते. सैन्याकडून वीरपत्नींना, कुटुंबाला आर्थिक नुकसान भरपाई उत्तम दिली जाते. पण पुढे काय करायचे हा प्रश्नच असतो. शिवाय शैक्षणिकदृष्ट्या कमी शिकू शकलेल्या जवानांच्या पत्नी सुद्धा साधारणपणे अल्पशिक्षितच असतात. त्यामुळे त्यांना पुढे फार मोठी झेप घेता येत नाही… मात्र प्रिया यांच्याकडे उत्तम शैक्षणिक योग्यता होती. आणि हीच बाब हुतात्मा अमित शर्मा यांचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अरुण पी. आगरवाल साहेब यांनी हेरली! कारण अमित शर्मा त्यांच्या हाताखाली काम करीत असताना त्यांनी कित्येकवेळा प्रिया यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत साहेबांना सांगितले होते… आणि एक अल्पशिक्षित जवान आपल्या पत्नीला एवढे उच्च शिक्षित करतो आहे, याचे त्यांना कौतुकही होते!

 कर्नल साहेबांनी प्रिया यांच्या कुटुंबियांपुढे एक प्रस्ताव मांडला… प्रिया सैन्याधिकारी बनू शकतात! अर्थातच एवढ्या मोठ्या दु;खाच्या ओझ्याखाली दबून गेलेल्या त्या कुटुंबास हे पचनी पडणे अवघड होतेच. प्रिया यांच्या बंधूने तर हा प्रस्ताव एकदम धुडकावून लावला… अबला, बिचारी म्हणवून घेण्याची अजिबात इच्छा नसलेल्या प्रिया यांच्या हृदयात मात्र एक ख्वाहिश जन्म घेत होती… आपल्या नव-याचा गणवेश परिधान करण्याची इच्छा… केवळ सैनिकाचा नव्हे तर सैनिक अधिका-याचा गणवेश. त्यांनी हे शिवधनुष्य पेलण्याची तयारी दाखवली… आणि पती-निधनाला काही दिवस उलटले असतानाच त्या दिशेने प्रयत्न सुरु केले. मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय सैन्यातील सहृदय अधिकारी होतेच… त्यात कर्नल आगरवाल साहेब आघाडीवर होते. शालेय जीवनात खेळांत प्रवीण असलेल्या प्रिया यांना शारीरिक चाचणी आणि अभ्यासात हुशार असल्याने बौद्धिक चाचणी अजिबात कठीण नव्हती.

परंतू, लष्करात भरती होण्यासाठी अत्यंत काटेकोर शारीरिक तपासण्या केल्या जातात. खूप वर्षांपूर्वी प्रिया यांना किडनी स्टोन झाला होता आणि त्यासाठी सर्जरी करून घेतली गेली होती. यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी नियमांनुसार प्रिया यांना बाद केले! प्रिया अर्थातच प्रचंड निराश झाल्या. त्यांचा भाऊ प्रवेश तर त्या अधिका-यासमोर धाय मोकलून रडला… पण नियमापुढे काहीही होणार नव्हते!

 परंतु कर्नल आगरवाल साहेबांनी विशेष प्रयत्न करण्याचे ठरवून प्रिया यांना धीर दिला. त्यांनी तिला कमांडंट साहेबांची भेट घेण्याची सूचना केली. विशेष बाब म्हणून प्रिया यांना कार्यालयीन नोकरी देऊ केली गेली! यावर प्रिया यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्या निर्णायक ठरल्या. त्या म्हणाल्या, “नोकरी मिळावी म्हणून मी एवढा आटापिटा करत नाहीये… मी उच्च शिक्षित आहे. माझे पती हुतात्मा झाले आहेत, त्या आधारावरही मला शिक्षिकेची नोकरी किंवा दुसरी एखादी शासकीय सहज मिळू शकेल. पण मला माझ्या दिवंगत पतीच्या स्मृती चिरंतन जपून ठेवायच्या आहेत… त्यांच्या सारखीच वर्दीमध्ये देशसेवा करायची आहे… आणि त्यासाठी सर्वकाही करण्याची माझी शारीरीक आणि मानसिक तयारीही आहे… मला संधी मिळावी! ” 

 आणि एका जवानाच्या पत्नीची सैन्यात अधिकारी होण्याची वाटचाल सुरु झाली… एक इतिहास घडू पहात होता. कारण सैन्यात अधिकारी असलेल्या व हुतात्मा झालेल्या अधिका-यांच्या पत्नींपैकी काही शूर महिलांनी ही वाट यशस्वीपणे चोखाळली होती तोपर्यंत… पण जवानाची पत्नी अधिकारी होऊ पाहते आहे हे प्रथमत:च घडू पहात होते!

 अंगभूत हुशारी, कष्ट करण्याची जिद्द, वैय्यक्तिक दु:ख बाजूला ठेवून कर्तव्यपथावर दमदार पावले टाकण्याची जबरदस्त इच्छाशक्ती, त्यासाठी लहान मुलीपासून कित्येक महिने दूर राहण्याचा ताण सहन करण्याची तयारी… या सा-या बाबी प्रिया सेमवाल-शर्मा यांना लेफ्टनंट पदापर्यंत घेऊन जाण्यात साहाय्यक ठरल्या. प्रशिक्षणादरम्यान प्रिया यांनी अनेक पारितोषिके पटकावली… एक कार्यक्षम सैन्याधिकारी आकार घेत होता! प्रशिक्षणाच्या एका टप्प्यावर त्यांनी कंपनी सार्जन्ट मेजर (Coy Sergeant Major) हे प्रतिष्ठेची जबाबदारीही मिळवली होती!

 Officers’ Training Academy, Chennai या लष्करी अधिकारी प्रशिक्षण केंद्रामध्ये Commandant Lieutenant General एस. एस. जोग साहेबांच्या मार्गदर्शनात त्यावर्षी ६२ महिला आणि १९४ पुरुष सैन्याधिकारी भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून दाखल झाले… यांत प्रिया सेमवालसुद्धा होत्या!

 लेफ्टनंट प्रिया सेमवाल यांना आरंभी Corps of the Electrical and Mechanical Engineering (EME) मध्ये रुजू करून घेण्यात आले. या विभागातील कामासाठी गरजेची असलेली B. Tech. ही पदवीही आपली इतर कामी करीत असताना प्रिया यांनी प्राप्त केली! पुढे त्या मेजर बनल्या.

२०२२ मध्ये भारतीय नौसेनेने President’s Fleet Review अंतर्गत भारतीय नौसेनेचे सामर्थ्य दर्शवणारे एक विशेष अभियान योजले होते. म्हादेई, तरिणी, हरियाल, कदलपुरा, आणि नीलकंठ या नौकांसमवेत आय. एन. एस. बुलबुल नावाची नौका गोवा, कारवार, मुंबई ते कोच्ची १६६७ किलोमीटर्स हे समुद्री अंतर विशिष्ट वेगाने आणि आखलेल्या योजनेनुसार पार करणार होत्या… या मोहिमेत मेजर प्रिया सेमवाल यांनीही सहभाग घेतला होता… आणि आपल्या नेतृत्वगुणांची चमक दाखवली होती!

 पुढे संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांति-सेनेत लेबानन-इस्रायल सीमेवर मेजर प्रिया सेमवाल यांनी अतिशय प्रभावी कामगिरी करून दाखवली. पूर्वी महिलांना भारतीय सैन्यात ‘पर्मनंट कमिशन’ अर्थात कायम नेमणूक मिळत नसे. महिलांना Short Service Commission दिले जाई, त्याचा कार्यकाळ दहा ते चौदा वर्षे असू शकतो. मात्र ‘पर्मनंट कमिशन’ मध्ये अधिकारी अधिक दीर्घकाळ आणि सेवानिवृत्तीपर्यंत कार्यरत राहू शकतात. मेजर प्रिया सेमवाल यांनी हे कमिशन प्राप्त केले आहे!

 महिलांना समान न्याय देण्याच्या बाबतीत भारतीय सैन्य, भारतीय न्यायव्यवस्था यांचा नेहमीच पुढाकार असतो. महिलाही सर्वच क्षेत्रांत प्रभावी काम करू शकतात, हे मेजर प्रिया सेमवाल-शर्मा यांनी पुन्हा सिद्ध केले आहे. कर्नल अरुण पी. आगरवाल साहेबांनी एका सामान्य सैनिकाच्या वीरपत्नीला दिलेले प्रोत्साहन सुद्धा प्रशंसनीय आहे. येणा-या महिला दिनानिमित्त मेजर प्रिया सेमवाल आणि कर्नल अरुण पी. आगरवाल यांना कडक अभिवादन. जय हिंद!

(पहिले छायाचित्र कर्नल अरुण पी. आगरवाल साहेबांचे आहे. दुसऱ्या छायाचित्रात हुतात्मा नाईक अमित शर्मा, प्रिया सेमवाल-शर्मा आणि त्यांची कन्या ख्वाहिश, हे आहेत.) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments