श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “सर्वोच्च अपवाद!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
गाभाऱ्यातील मूर्ती प्राणप्रतिष्ठित असतात आणि त्यांचे केवळ डोळ्यांनी दर्शन घेणे अपेक्षित असते, असे मानले जाते. बाकी, सुरक्षितता हा मुद्दा आहेच. आणि शिवाय संबंधित धार्मिक संस्था त्या देवतांची अधिकृत छायाचित्रे प्रसिद्ध करून विक्रीस उपलब्धही करून देत असतात. पण तरीही लोक प्रत्यक्ष त्या धार्मिक स्थळी अगदी आत जाऊन त्या देवतांचे फोटो, विडीओ करण्याचा प्रयत्न का करीत असतात, हे समजण्याच्या पलीकडे आहे. बहुतांश सर्वच मंदिरांत फोटो काढण्यास मनाई असे फलक असतातच. शिवाय तिथले सेवेकरी तशा सूचनाही सातत्याने देत असतात.
– – शेगावही याला अपवाद नाही. फक्त इथे सूचना देण्यासाठी लाऊड स्पीकरचा वापर अजिबात केला जात नाही. केवळ संबंधित माणसाच्या समोर सूचनांचा फलक धरला जातो. तरीही अतिउत्साही लोक मोबाईलमध्ये चोरून चित्रण करताना सापडतात. सुरक्षा रक्षकांच्या लक्षात ही बाब येतेच, मग ते संबंधित मोबाईल ताब्यात घेऊन ते चित्रण पुसून टाकतात. प्रदक्षिणा मार्गावर इतर भाविकांना अडथळा होऊ नये म्हणून तिथे उभे राहून फोटो घेऊ दिले जात नाहीत, त्याऐवजी पर्यायी ठिकाण सुचवले जाते. पण या सा-या कामांत सेवेक-यांचा बराच वेळ जातो, हे लोकांच्या ध्यानात येत नाही. रील बनवून पैसे कमवण्याचा उद्योग तर हल्ली सर्रास दिसतो. मग त्यासाठी आपण पवित्र स्थळांचे पावित्र्य धोक्यात आणतो आहोत, हे लोक विसरतात. श्री गजानन महाराज संस्थानने श्री गजानन महाराजांचे अतिशय उत्तम दर्जाचे फोटो उपलब्ध करून दिलेले असताना आपल्याच मोबाईलमध्ये फोटो घेण्याचा अट्टहास लोक करीत राहतात. असो.
– – – भारताच्या सन्मानीय राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच शेगांव मंदिरास भेट दिली. विशेष अपवाद आणि कार्यालयीन संदर्भ या कारणांनी, मा. राष्ट्रपती महोदया प्रत्यक्ष गाभा-यासमोर उभ्या असतानाचे एकच छायाचित्र प्रसिद्ध केले गेले आहे. या छायाचित्रात श्री गजानन महाराज यांची मूर्ती दिसते आहे. मंदिराच्या आतल्या भागातील कोणतीही छायाचित्रे किंवा चित्रफिती प्रसिद्ध केल्या गेल्या नाहीत.
सामान्य लोकांना फोटो काढू देत नाहीत, मग राष्ट्रपती दौ-यात ही परवानगी कशी, असा प्रश्न काही स्वयंघोषित फेसबुक पेजवाल्यांनी उपस्थित केले आहेत. त्यावर उतावळ्या वाचकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेत विविध प्रकाराच्या comments केलेल्या आढळतात. भारताच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर असलेल्या मा. राष्ट्रपती महोदयांची प्रत्येक भेट ही अधिकृत/आधिकारिक/official मानली जाते. यावेळी प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगांची छायाचित्रे घेतली जातात. श्री गजानन महाराज संस्थानने याबाबत one time exception म्हणून कदाचित त्यांच्या अधिकारात ही परवानगी दिलेली असावी, आणि यात काहीही गैर दिसत नाही.
भारतातील एकूण परिस्थिती लक्षात घेता अतिमहत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणे अपरिहार्य आहे. यासाठी विहित नियमावली तयार केली गेलेली आहे. अर्थात याचा त्रास सर्वसामान्य जनतेस होणे साहजिकच आहे. परंतू अशा भेटींची पुरेशी आगाऊ सूचना दिलेली असते, हे ध्यानात घेतले पाहिजे. संतांपेक्षा, देवापेक्षा कुणीही मोठे नाही, हे जरी खरे असले तरी ज्या वेळी देशाचे सर्वोच्च नेतृत्व मोठ्या भक्तिभावाने एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देते, त्यावेळी काही गोष्टी काही काळापुरत्या सहन करणे गरजेचे असते. या संपूर्ण भेटीदरम्यान संस्थान आणि प्रशासनाने जनतेला होऊ शकणारा त्रास कमीत कमी कसा राखता येईल, या गोष्टीला प्राधान्य दिलेले दिसले. गावापासून ब-याच अंतरावर मुख्य कार्यक्रम स्थळ असल्याने गावात फारशी अडचण झाली नाही. आनंद विहार मध्येच मा. राष्ट्रपती महोदयांची विश्रांती-अल्पोपहार इत्यादीची व्यवस्था आनंद विहार या भक्त निवास संकुलात अत्यंत देखणी व शिस्तबद्ध केलेली होती. तसेच बंदोबस्तासाठी तैनात पोलिस इत्यादी व्यक्तींची निवास व्यवस्थाही याच ठिकाणी होती. परंतु याच संकुलात निवासासाठी येणा-या भाविकांची गैरसोय होऊ नये याची पुरेपूर दक्षता घेतली गेली. दौऱ्यादरम्यान उपद्रव होऊ नये म्हणून परिसरातील भटक्या श्वानांना पकडून सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्राणी कल्याण संस्थेला दिली गेली होती आणि या श्वानांची योग्य ती काळजी घेतली गेल्याचे दिसले.
– – या व इतर सर्वच गोष्टींसाठी श्री गजानन महाराज संस्थान तसेच स्थानिक प्रशासन आणि पोलिस दल कौतुकास पात्र आहे, असे मला वाटते. जय गजानन.
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







छान लेख!