प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १२ – यमुनाबाई ऊर्फ माई सावरकर. ☆ प्रा.भारती जोगी ☆

यमुनाबाई ऊर्फ माई सावरकर 

तीस वर्षांचा नवरा तुरुंगाच्या पलीकडे आत उभा… जो कदाचित आता पुढच्या जन्मीच भेटणार. आणि अलीकडे उभी आहे सव्वीस वर्षांची त्याची पत्नी, जिने नुकताच पुत्र वियोग साहिला आहे.

निरोप देण्यातल्या आणि घेण्यातली ताकद बघा… नवरा सांगतोयं, ” माई, स्वतंत्र झालेल्या भारताच्या प्रत्येक घरातून आपल्याला सोन्याचा धूर बघायचा असेल तर आपल्या घराचा धूर नको कां करायला? पुन्हा या जन्मी शक्य झालं तर भेटू, नाहीतर इथेच निरोप! “

… हे शब्द कानी पडताच त्या पत्नीनं पटकन जाळीतून हात आत घालून त्याच्या पायाला हात लावला, ती धूळ आपल्या मस्तकी लावली आणि म्हणाली, ” हे पाय बघून ठेवते पुढच्या जन्मी चुकायला नकोत म्हणून! “

निरोप घेणा-या या होत्या यमुनाबाई उर्फ माई सावरकर!

आणि निरोप देणारे होते विनायक सावरकर उर्फ तात्यासाहेब!

यमुनाबाई जव्हार संस्थानचे तत्कालीन दिवाण भाऊसाहेब चिपळूणकर यांच्या ज्येष्ठ कन्या. देशसेवेचे व्रत घेतलेल्या, धाडसी, कणखर आणि परिश्रमी!

सावरकर आणि चिपळूणकर घराण्यांत आधीपासूनच घरोबा होता. त्यामुळे यमुनाबाईंना सावरकरांच्या कुटुंबातील देशभक्ती विषयी, त्यांच्या क्रांतिकारक विचारांविषयी पूर्वकल्पना होतीच. विनायकांशी विवाहबद्ध होतांनाच यमुनाबाईंनी देशसेवेचे व्रत अगदी ” की घेतले न व्रत हे आम्हीं अंधतेने”… अशाच बाण्याने अंगिकारले. त्या सावरकरांच्या संपूर्ण कुटुंबाशी अगदी एकरूप झाल्या.

पती बॅरिस्टर होण्याचं स्वप्न बघणा-या यमुनाबाईंना जेव्हा त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा झाल्याचे कळले तेव्हापासूनच यमुनाबाईंनी आपल्या पतीच्या समाजसुधारणेच्या कार्यात लक्ष घालायला सुरुवात केली. कारण सावरकरांच्या अर्धांगिनीला हे चांगलेच ठाऊक होते की, स्वातंत्र्याचा लढा हे त्यांचं अविभाज्य अंग आहे. त्यामुळेच पतीला खंबीर साथ देत राहिल्या.

तात्यासाहेबांनी रचलेले पोवाडे, देशभक्ती ची पदे, रचलेल्या आर्या… हे सगळं काव्य यमुनाबाई आपल्या मोठ्या जाऊबाईंबरोबर त्यांनी स्थापन केलेल्या *आत्मनिष्ठ युवती समाज* या संस्थेच्या बैठकीत करत.

स्त्रियांसाठी सहभोजन, हळदीकुंकू समारंभ घडवून आणत. मुलांची मुंज, लग्न ही लावून देत. स्त्रियांना धीट होण्याचा उपदेश करत.

भगूर येथील पैतृक वाड्यावर जप्ती आली, घरातील स्त्रिया रस्त्यावर आल्या, हालाखीची परिस्थिती… पण तरीही ही यमुना वहायची थांबली नाही. न डगमगता आल्या संकटाला हिंमतीने तोंड देत राहिली. स्वाभिमानी यमुनाबाईंनी माहेरचा ही आधार घेतला नाही. कारण त्यांनी लग्न लागल्या क्षणापासूनच जणू निश्चयच केला होता…

घातले गळा मी मंगळसूत्र पवित्र

तेव्हाच गुंफिले त्यागाचे ही सूत्र

पदरात दडविल्या अपमानाच्या ज्वाळा

स्वातंत्र्यवीराचे कुंकू लावूनी भाळा

– – अशी ही स्वातंत्र्य लढ्यातील एक अदृश्य नायिका… जिच्या जीवनाची सुरुवातच पतीपासून वेगळं होण्याने झाली… शेकडो मैलांवर, समुद्रापलीकडे अंधा-या कोठडीत पती, पत्नी प्रकाशमय खोलीत पण अंधारलेल्या आयुष्यात एकटी! सगळं आयुष्य वेदना, संघर्ष, सामाजिक बहिष्कार… यांनी व्यापलेलं… पण ही समिधा स्वातंत्र्य होम कुंडात समर्पित होतच राहिली,

आदरणीय श्री. बाजपेयीजीं नी सावरकरांबद्दल काढलेले गौरवोद्गार… यमुनाबाईंनाही लागू व्हावेत असंच त्यांचं कर्तृत्व! त्यासुद्धा होत्या…

तेज, तप, तितीक्षा!!

… सावरकरांची सावली बनल्या, आपल्या जाऊबाईंची ही सावली बनल्या. निर्माल्य बनून समर्पित झाल्या.

… म्हणूनच म्हंटलयं… *दिव्यत्वाच्या स्पर्शानं उजळून निघालेला तेजस्वितेचा अंश म्हणजे माई! त्यागाचा अबोल आदर्श म्हणजे माई! *

– लेख क्र. १२ .

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted