श्री जगदीश काबरे
☆ क्षण सृजनाचा ☆
☆ हृदयस्पर्शी… ☆ श्री जगदीश काबरे ☆
आपली प्रिय व्यक्ती सोडून गेल्यावर तिचे स्मरण म्हणजे आठवणींचा गोफ असतो. पण आठवणींचा मामलाही वाटतो तेवढा सरळ नाही. कोणत्या आठवणी मनात जोजवायच्या आणि कोणत्या सोडून द्यायच्या हे आपल्या हाती कुठे असतं? कारण काही आठवणी कितीही विसरू म्हटलं तरी कायमचा पिच्छा पुरवत राहतात. कधी कधी एखादी छोटी गोष्ट मोठ्यातल्या मोठ्या स्मृतींची शृंखला मनात चालू करते. या आठवणीतलं बरं काय, वाईट काय यांची निवड मेंदूतील न्यूरॉन्सच्या चाळण्याच करत असतात.
हृदयस्पर्शी –जगदीश काबरे
*
एक दिवस येईल, आपल्याला अलग करेल
मग कोणीही कुणावर रागावणार नाही.
*
एके दिवशी आपण वेगळे होऊ,
कुठे हरवून जाऊ कोणास ठाऊक?
*
तू मला लाखो वेळा हाक मारशील
पण मी काही परत येणार नाही.
*
जेव्हा तू रात्री झोपायला जाशील,
माझ्या आठवणीने तळमळशील.
*
कारण मी कधीही डोळे उघडणार नाही
तुझ्याशी गुजगोष्टी करू शकणार नाही.
*
जेव्हा तू तुझा फोन पाहत असशील
तेव्हा तुला माझा मेसेज दिसणार नाही.
*
शेवटी, रडून रडून तुझी आसवे सुकतील
असवाच्या प्रत्येक थेंबात मला शोधशील.
*
आठवाच्या सागरी जेव्हा जेव्हा तू बुडून जाशील
माझ्या प्रिया, माझ्यातच तू सामावलेला असशील.
☆
© श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




