अर्चना गादीकर निकारंगे

🌸 जीवनरंग 🌸

☆ माघारपण… ☆ अर्चना गादीकर निकारंगे 

आज अस्मी खूप खूश होती. कारण पण काही साधेसुधे नव्हते. आज जवळ जवळ सात ते आठ महिन्यांनी तिचे आई बाबा आपल्या लाडक्या लेकीकडे राहायला येणार होते. हल्ली वयाच्यामुळे तिच्या आई वडीलांच्या दुखण्यांना सुरूवात झाली होती. ते काय कोणाच्या हातात नसते असे अस्मी त्यांची समजूत घालण्यासाठी म्हणत असे. आज खूप दिवसांनी ते लेकीकडे येणार होते. मागील २-३ दिवस अस्मीचे ते दोघे आल्यावर काय काय करायचे, काय काय बनवायचे ह्याचा विचार करण्यातच गेले होते. अस्मी त्यांची वाट पाहत होती. अव्दैत तिचा नवरा थोड्या वेळापूर्वी कामावर गेला होता.

काही वेळातच बंगल्याच्या पोर्चमध्ये गाडी थांबल्याचा आवाज आला. आले वाटत आई बाबा असे म्हणत चार -पाच वर्षांच्या मुलीप्रमाणे धावत ती बाहेर आली. आई वडिलांना पाहून ती आनंदीत झाली. सगळे घरात आले. दोघांना फ्रेश व्हायला सांगून ती किचनमध्ये गेली. बाबांना आवडतात म्हणून तिने सोयाबीनचे कटलेट व गोडाचे आप्पे स्वयंपाक करायला येणार्‍या शालिनीबाईंना हाताशी घेऊन बनविले होते.

उकाड्याचे दिवस असल्याने तिने आवर्जून कैरी साखरेचे केशर घालून पन्हे बनविले होते. सर्व पदार्थ ट्रेमध्ये व्यवस्थित ठेवून ती ट्रे घेऊन हाँलमध्ये आली. आई बाबा फ्रेश होऊन सोफ्यावर येऊन बसले होते. लेकीने आपण येणार म्हणून ठरविलेला बेत पाहून ते खूश झाले. एकेका पदार्थाचा आस्वाद घेताना दोघेही तिच्या पाककलेची स्तुती करत होते. आपली लेक केवढी समजूतदार आहे या विचाराने ते थोडे गहिवरले. त्यांनी केलेल्या कौतुकाने तिला पण जरा भरून आले. मध्येच तिने अव्दैतला कामावर फोन करुन आई बाबांच्या घरी पोहचल्याची बातमी दिली. पलिकडून त्याने पण त्यांच्या येण्याचा झालेला आनंद बोलण्यातून दाखविला होता. तो सी. ए. होता. तिथे जवळच त्याची स्वतःची फर्म होती. मी आज लवकर येतो असे सांगून त्याने फोन ठेवला. सांगितल्याप्रमाणे अव्दैत संध्याकाळी नेहमीपेक्षा खूपच लवकर आला. फ्रेश होऊन तो पप्पांशी गप्पा मारायला तयार झाला. त्यांच्या गप्पा रंगात आल्यावर अस्मीची आई लेकीला मदत करायला किचनमध्ये गेली. बाबा व अव्दैत ह्यांचे विचार एकमेकांशी सुसंगत होते. त्यामुळे ते दोघे तासनतास गप्पांमध्ये रंगून जात असत. लेकीकडे आल्यावर जावयाशी गप्पा मारणे हा त्यांचा आवडीचा कार्यक्रम होता.

दुसर्‍या दिवशी कामावर जाताना संध्याकाळी लवकर येतो असे सांगून अव्दैत कामावर गेला. मी घरी येईपर्यंत संध्याकाळी तुम्ही तिघे निसर्ग तलावाच्या तिथे असलेल्या राधाकृष्णमध्ये जाऊन या, असे त्याने अस्मीला सांगितले. त्याला चांगलेच ठाऊक होते की तिथले दहीवडे हा बाबांचा विक पाॅइंट होता. अव्दैत घरी येईपर्यंत अस्मी व तिचे आई बाबा तिथे जाऊन आले.. अव्दैतने घरी येताना सर्वांसाठी नाटकाची तिकीटे आणली होती. नाटक पाहून झाल्यावर तिथे जवळच जेवण उरकून ते घरी परतले. बाबा व आई थोडे दमले होते तरी खूश दिसत होते. दुसर्‍या दिवशीच्या जेवणात अस्मीने शालिनीबाईंना सांगून चुलीवरच्या मटण व भाकरीचा बेत केला होता. त्यांच्याकडे किचनचा ताबा सोपवून अव्दैत बाहेर पडल्यावर अस्मी त्या दोघांना घेऊन त्यांच्या आवडीच्या ठिकाणी जाण्यासाठी बाहेर पडली. चांगले ३ ते ४ तास खरेदी करून ती दोघे मात्र दमली होती. पण खरेदी करण्याचा उत्साह त्यांना दमून देत नव्हता. घरी आल्यावर लेकीने केलेला जेवणाचा बेत पाहून दोघेही भारावून गेले. मनाची ती अवस्था बाजूला करून बाबांनी विचारले, ” अस्मी राणी! अजून काय काय करून खाऊ घालणार आहेस ह्या आई बाबाला? ” तिला आठवले की बाबा खूश झाले किंवा भावूक झाले की तिला नुसते अस्मी न म्हणता अस्मी राणी म्हणत असत.

लवकरच आई बाबांचा घरी जाण्याचा दिवस उजाडला. अव्दैत व अस्मीने मिळून त्या दोघांना आणखीन काही दिवस राहण्यासाठी खूप आग्रह केला. पण आई बाबांनी त्यांच्या आग्रहाला जास्त उचलून धरले नाही. त्यामुळे अस्मी थोडी नाराज झाली. अव्दैतने तिला समजावले. आपल्या खोलीत आई व बाबा आपल्या सामानाची बांधाबांध करू लागले. अस्मीला न सांगताच अव्दैतने आईसाठी उंची साडी तर बाबांसाठी एक सिल्कचा झब्बा आणला होता. दोघांच्या वयाला अनुरूप असे रंग त्याने त्यांच्यासाठी आणले होते. त्यांच्या खोलीत जाऊन त्याने त्यांच्यासाठी आणलेल्या भेटवस्तू त्यांना दिल्या आणि म्हणाला, ” पाहून सांगा जरा तुम्हाला आवडल्या का? “अस्मी आणि अव्दैत त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागले. दोघांनाही खरेदी खूप आवडली. ” ह्याची काय गरज आहे? ” अस म्हणायला मात्र ते विसरले नाहीत.

पुढल्या दिवशी सकाळी लवकर उठून दोघांनी आपले आवरले व अस्मीने बनविलेली इडली सांबार खाऊन दोघांनी आपापल्या बॅगा गाडीत नेऊन ठेवल्या. अव्दैत आज कामावर जरा उशीराच निघणार होता. आई बाबांच्या येण्याने आनंदी झालेली अस्मी आज कावरीबावरी झाली होती. गाडीपाशी थांबून सगळे एकमेकांना निरोप देत होते. झटकन पुढे होऊन अव्दैतने आई बाबांसाठी गाडीचा दरवाजा उघडला. दोघे गाडीत बसल्यावर त्याने तो हळूच बंद केला. बाबांनी त्यांच्या बाजूची काच खाली करून अस्मीला म्हटले, ” चल आता आम्ही निघतो. तुमच्याकडे येऊन खूप छान वाटले. चार दिवस कसे पटकन निघून गेले ते खरच कळलेसुद्धा नाही. पोरी किती केलेस तू आमच्यासाठी या चार दिवसांत. आमच्या दोघांचे तू आईच्या मायेने माघारपणच केलेस. ” त्यांच्या ह्या बोलण्याने अस्मीच्या नकळत तिच्या डोळ्यांतील अश्रू चटकन तिच्या गालावर उतरले. त्यांचे बोलणे तिला नकळत मोठेपणा देऊन गेले होते. बाबांच्या नजरेतून तिचे अश्रू लपले गेले कारण नेमकी त्याचवेळेस त्यांनी गाडीच्या खिडकीची काच वरती केली होती.

अव्दैतचे सहजच बाजूला उभ्या असलेल्या अस्मीकडे लक्ष जाताच तिला विचारले, ” काय ग, रडतेस की काय? ” तेव्हा तिने तेवढ्याच सहजपणे त्याला सांगितले, ” काही नाही रे काहीतरी डोळ्यात गेल्यासारखे झाले त्यामुळे डोळ्यात पाणी आले इतकेच. ” अव्दैत काय समजायचे ते समजला.

© अर्चना गादीकर निकारंगे 

मुंबई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सौ.ज्योती कुळकर्णी.
0

छान लेख.ठराविक वयानंतर लेकीकडेच माहेरपण होते.