श्री सुनील देशपांडे
🌸 जीवनरंग 🌸
☆ जलसाक्षर… भाग – २ ☆ श्री सुनील देशपांडे ☆
(22 मार्च रोजी जागतिक जलदिन साजरा केला जातो. या जलदिनाच्या निमित्ताने नाशिक येथील महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने एक कथा स्पर्धा आयोजित केली होती. त्या कथा स्पर्धेतील माझी पारितोषिक प्राप्त कथा. जलदिनानिमित्ताने रसिकांसमोर सादर.)
☆
(आणि या सर्व गोष्टी आपण उद्यापासून आपल्या घरात करायच्या असा त्यांने दीर्घ संकल्प केला. या संकल्पनेवर विचार करीतच वाचू रात्री शांत झोपी गेला.)
इथून पुढे – –
सकाळी ब्रेकफास्टच्या टेबलवर वाचून जाहीर केले की आपण आदर्श जलसाक्षर कुटुंब व्हायचे. आजपासून शॉवर बंद. फक्त एक बदली पाण्यातच अंघोळ करायची. वसू वसकन ओरडली “ते तुमचं जलसाक्षर वगैरे तुमचं तुम्ही बघा. मला मनसोक्त शॉवर घेतल्याशिवाय स्वच्छच वाटत नाही.शी! एक बादली म्हणे! आणि तुम्हाला काय ती थैरं करायची ना ती तुमच्यापुरती ठेवा. आम्ही निरझर ठीक आहोत” वासूने जलतज्ञाचे म्हणणे परोपरीने समजावून देण्याचा प्रयत्न केला, पण जलतज्ञा एवढी प्रतिभा शक्ती त्याच्याकडे नव्हती व मुळातच तो नवरा असल्याने साहजिकपणे वसूला आपलं म्हणणं पटवून देऊ शकला नाही. नेहमी प्रमाणेच सपशेल पराभव पत्करून गप्प बसण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय काय असणार होता? आता सू बरोबरच्या चर्चेचा निष्कर्ष काही वेगळा नसणार हे आमच्या चरणाक्ष वाचकांनी ओळखले असणारच. सासू म्हणजे प्रत्यक्ष बायकोची आई! तिच्यासमोर तोंड उघडणे त्याला आजपर्यंत जमले नव्हते ते आज कसे जमेल? त्यामुळे त्या आघाडीवर संपूर्ण शांतताच. पण सखू मोलकरीण जेव्हा धुणे भांडी होईपर्यंत नळ तसाच चालू ठेवून पाणी वाया घालवीत होती त्यावेळी मात्र वरील सर्व अपयशाचा राग एकवटून तो तिच्यावर ओरडला “आधी पाणी बंद कर. येथून पुढे असे पाणी वाया घालवलेले मला चालणार नाही.” असे काहीसे मोठ्या जोशात बोलून आपण निदान एक तरी शौर्यकृत्य करू शकतो याचे समाधान वाटून विजयी मुद्रेने तो ऑफिसला गेला. ऑफिसला गेल्यावर त्याने शिपायाला पंखा चालू करून पाणी आणायला सांगितले पाण्याचा ग्लास समोर आल्यावर त्याने शिपायाला सांगितले पाणी फक्त अर्धा ग्लास द्यावे शिपायाने लगेच अर्धा बेसिन मध्ये ओतला आणि त्याच्यासमोर ठेवला. वासू म्हणाला
“अरे ते पाणी वाया का घालवतोस? अनेक लोक अर्धा ग्लास पाणी पिऊन अर्धा वाया घालवतात. आपणाला पाणी वाचवले पाहिजे. जलसाक्षर झालं पाहिजे.”
“हे बगा सायेब, तुमाला अर्धा ग्लास पाणी पायजे होतं, ते मिळालं ना? उरलेल्याचं काय झालं तुमाला काय करायचंय? समजा कुणाला अर्धा ग्लास नाही, पूर्ण हवा तर मी काही येरझारे घालत बसू काय? ते जमायचं नाय! आणि माझं वागणं खटकत असंल तर तुमी सोत्ता पाणी घेत जावा आजपासून.”
पुन्हा दुपारी असाच ऑफिसमधील कलिग्ज कडूनही चेष्टाचा विषय बनलेला व जलसाक्षरतेच्या जागृती मध्ये सपशेल अपयशी ठरलेला आपला कथा नायक खिन्न मनाने घरी परतला. तिथेही वेगळंच संकट त्याची वाट बघत होतं.
दारातून आत आल्या आल्या चहा सुद्धा न देता वसू त्याच्यावर ओरडली “तुमचं ते जलसाक्षरता वगैरे बंद करा बघू आधी! साऱ्या शहराचा ठेका काय तुम्ही घेतलाय का? तुम्ही आज सकाळी सखूवर ओरडला. ती काम सोडून चालली होती. आता काय धुणं भांडी तुम्ही करणार का? त्या जलसाक्षरते साठी? एक तर कामाला बाई मिळत नाही. तुम्ही असलेल्या बायांना पळवून लावा. मी कशीबशी तिची समजूत घातली, पण घरच्या बाबतीत अक्कल पाजळू नका! काय कोणाला जलसाक्षर करायचं ना ते ऑफिसमध्ये करा. घरी नको.”
आपल्या जलसाक्षरता मोहीमे मध्ये असाच चारी मुंड्या चितपट झालेला वासू श्रांत व क्लांत मनाने झोपी गेला.
वासू सकाळी उठला कालच्या संपूर्ण दिवसाची नकारात्मकता त्याच्या मनात अजूनही भरून राहिली असल्याने त्याला निरुत्साही वाटत होते. अंगात थोडी कणकण असावी असेही त्याला वाटू लागले. कुणाशीही न बोलता चहा पिऊन तो आराम खुर्ची बाल्कनीत टाकून, आज फिरायला जाण्याचे रहित करून, आराम खुर्चीत विसावला. आज सिकलीव्ह टाकण्याचा निर्णय घेत डोळे मिटून शांत पडून राहिला. सखुबाई अजून आली नव्हती. आज ती आली नाही तर घडणाऱ्या महायुद्धाला कसं तोंड द्यायचं याचा तो विचार करू लागला आणि तो अधिकच अस्वस्थ होऊ लागला. घरातही सगळीकडे वादळापूर्वीची शांतता पसरली होती.
वासूला जरा डुलकी लागली आणि बेलच्या आवाजाने जाग आली. उशिरा का होईना सखुबाई आल्यामुळे त्याचा जीव भांड्यात किंवा अक्षरशः धुणंभांड्यात पडला असेही म्हणायला हरकत नाही. सखुबाईची तब्येत बरी नसावी. आल्या आल्या सासूने विचारले
“काय झालं? वसू ss जरा सखुबाई साठी चहा टाक आणि मलाही टाक घोटभर तिच्याबरोबर”
आणि संभाषण सुरू झालं
“अवो, काय सांगू? आज पयलं पाणी आलं उशिरा, ते सुदा थेंब थेंब, काल पाणीबंदीचा दिवस, त्यामुळं पाण्यापाई भांडाभांड सुरू, कसंतरी चार बादल्या पाणी मिळालं. ते सुदा मारामारी करून. जीव मेटाकुटीला आला बघा. त्यात एका बाईनं कळशी मारली फेकून, कंबर दुखायला लागली. आता असं रोजच झालं तर काय करायचं आजीबाई? ” “सखू अगं यंदा धरणातलं पाणी आता संपायला आलंय. नगरपालिकेनं तरी कुठून आणायचं पाणी? आता आमच्याकडे बोरिंग आहे म्हणून चाललंय. पण ते सुद्धा किती पुरेल उन्हाळ्यात कुणास ठाऊक? अगं, जावईबापू तुला काल बोलले ते का आमच्यासाठी बोलले? आम्हाला पाणी थेंबा थेंबानं किंवा टँकरनं भरावं लागतं का? ते लागतं तुम्हालाच! आमच्या लहानपणी गावाकडं हौदभर पाणी आम्ही मुली हसत मजेत विहिरीचं ओढून भरायचो. त्यामुळे मला पाण्याचे महत्व कळतं. मी अजूनही कधी शॉवर घेतला नाही. एका बादलीत अंघोळ करते आणि माझं लुगडं मी स्वतः अर्धी वारली पाण्यातच धुवून टाकते. होय की नाही? हे बघ आपल्या गावाची लोकसंख्या समज दहा लाख. एका कुटुंबात चार माणसे धरली तर अडीच लाख कुटुंबं. आमच्या सारखी फ्लॅट बंगल्यात राहणारी निदान एक लाख कुटुंब तरी असतील. त्यांच्या घरी तुझ्यासारख्या बाया काम करतात ना? ”
तेवढ्यात वसूनं चहा आणून ठेवला. आणि तीही आईच आईचं बोलणं ऐकू लागली.
*सखू घे, चहा घे आणि ही गोळीही घे, अंग दुखायचं कमी होईल. तर मी असं म्हणत होते, या एक लाख घरांमध्ये तुझ्यासारख्या बायांनी जर पाच बादल्या पाणी वाचवलं. फक्त त्रास काय तर सारखा नळ चालू बंद करायचा. तेवढाच ना? पण तुझ्या या दुखण्यापेक्षा कमीच नाही का? जर एका कुटुंबात पाच तर एक लाख कुटुंबात पाच लाख बादल्या पाणी वाचेल ना? आता जावईबापू रोज चार बादल्या पाणी वाचवतात. वसु आणि सू नं निदान तीन-तीन बादल्या पाणी वाचवलं तर आमच्या दहा बादल्या. अशा एका घरातून पंधरा बादल्या पाणी वाचलं, तर एकूण 15 लाख बादल्या पाणी वाचलं ना? म्हणजे जर तुमच्या घरी पाच बाटल्या पाणी लागत असेल, तर तुमच्यासारख्या तीन लाख कुटुंबाची सोय होईल की नाही? मग हा वैताग मारामाऱ्याच बंद नाही का होणार? मी बाई फार शिकले नाही. पण अजूनही पाणी वाचवायचे अनेक मार्ग या तज्ञ लोकांना माहीत असतात. जावईबापू हुशार आहेत. जास्त शिकलेले आहेत. ते अशा तज्ञांची भाषणे ऐकून आपल्याला जे सांगतात ते आपल्याच भल्यासाठी ना? उलट त्यांचे कडून अशी भाषणे आपण समजून घेतली आणि ते उपाय आचरणात आणले तर! आपलाच सगळ्यांचा सर्व शहरवासीयाचा फायदा होणार आहे, होय की नाही! ”
आजीबाई खरं आहे तुमचं म्हणणं, मला पटलं बर का! काल मला साहेबांच्या बोलण्याचं वाईट वाटलं, पण आता पटलं की त्यांचं बोलणं आमच्यासाठीच होतं. आम्ही जर हित पाणी वाचवलं, तर आमचाच फायदा होईल. मी चुकले आजीबाई. साहेबांना सांगा चुकी झाली म्हणून. मी आजपासून पाणी वाचवणार नक्की! ”
“आता कसं? आता तू हेच तुझ्या जवळच्या सर्व बायांना सांगायचं बरं का? आणि तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून पाण्याची बचत करायची, म्हणजे हा पाण्याचा प्रश्न सोपा होऊन जाईल”
वसू सुद्धा आईचं बोलणं ऐकून म्हणाली “आई माझं सुद्धा चुकलंच. मी सुद्धा हे म्हणाले तसेच वागीन! ” या सर्व जाणांमध्ये सू कशी मागे राहील?
“आजी मी तुझ्यासारखंच माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना सांगेन”
असं म्हणत क्लासला पळाली. बाल्कनी मध्ये हे ऐकणाऱ्या वासू च्या डोक्यात जलसाक्षरतेचा प्रकाश पडत होता आणि सासूच्या अभिमानाने त्याचा उर भरून आला होता! एवढ्यात वसु बाल्कनीत आली आणि वासूला बघताच
“आज असे का बसलात? बरं नाही का वाटंत? चला करू आत मध्ये बसा मी चहा आणते”
असं म्हणत चहा बेडरूम मध्ये घेऊन आली आणि म्हणाली
“अहो माझं चुकलं बरं! मला माफ करा ना प्लीज! ”
वसु म्हणाला “इतक्या दुरून माफी कशी करता येईल? त्यासाठी जवळ यावे लागेलच ना? ”
“चला चावट कुठले”
असं म्हणत असतानाच वाचू ने तिला माफ केले.
आता वासूने वसूला कसे माफ केले असेल हे आमच्या चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच!
वासू आणि वसू सारखे माफीनामे तुमच्या आमच्या ही घरात घडोत. अशी ही जलसाक्षरतेची साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!!!
– समाप्त –
© श्री सुनील देशपांडे
फोन :९६५७७०९६४०
ई मेल : sunil68deshpande@outlook.com
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈



