उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ ते लोक… (अनुवादित) – हिन्दी लेखक : सुशांत सुप्रिय ☆ उज्ज्वला केळकर ☆
रेल्वेच्या या डब्यात ते चौघे आहेत. मी मात्र एकटाच आहे. ते हट्टे -कट्टे आहेत. मी मात्र अशक्त, मरतुकडा आहे. ते उंच, तगडे आहेत, मी मात्र सर्वसामान्य आहे. घाईघाईत मी चुकीच्या डब्यात चढलो की काय? मी यावेळी त्या लोकांच्या मध्ये असायला नको आहे. माझ्या अंतरात कुणीतरी मला चेतावणी देत आहे.
देशातील अनेक भागात दंगे होताहेत. आमचा भाग त्यापासून अस्पर्शित आहे. पण केव्हा काय होईल, कुणास ठाऊक? पुढचा तासभर मला यांच्यापासून सावध राहायला हवं.. जपर्यंत माझं स्टेशन येत नाही, तोपर्यंत…
मी चोरट्या नजरेने त्यांच्याकडे बघतो. दोघांची लांब दाढी आहे. चौघांनी हिरवा कुडता आणि पायजमा घातलाय आणि पांढरी जाळीची गोल टोपी घातलीय. ते चौघे माझ्याकडे टवकारून का पहाताहेत? काही गडबड तर नाही. त्यांचे विचार धोकादायक तर नाहीत.?
भयाचा एक सूक्ष्म गंध हवेत मिसळला होता. मी तो वास घेऊ इच्छित नव्हतो, तरी तो माझ्या नाकात घुसत होता आणि डोक्यापर्यंत संदेश पोचवत होता, त्यामुळे मी अस्वस्थ होत होतो. कुठल्या तरी अघटिताची, अनिष्टाची अशुभ सावली माझ्यावर पडते आहे आणि बेचैनी माझ्या आत पंख फडफडू लागते आहे. देशातील अनेक भागात आतंकवाद्यांनी बॉम्ब -स्फोट केले आहेत. शेकडो लोक मारले गेले आहेत. त्यानंतर अनेक ठिकाणी दंगे सुरू झाले. दगडफेक, आगी लावणे, लूट-पाट होऊ लागली. त्यानंतर अनेक ठिकाणी कर्फ्यू लावावा लागला. मी शांतपणे जगू इच्छतो. पण शांतता आज एक दुर्मिळ गोष्ट झालीय. दुर्मिळ आणि अप्राप्य. नरभक्षी जनावरांसारख्या शंका मला चिरू -फाडू लागल्या आहेत.
एकदा माझे डोळे त्यांच्या डोळ्यांना भिडतात. त्यांच्या सावळ्या चेहऱ्यावर उगवलेले थंड डोळे माझ्याकडे बघताहेत. ते लोक आमच्यापेक्षा किती वेगळे आहेत. आम्ही सूर्याची पूजा करतो, तर त्यांचं चंद्रावर प्रेम आहे. आम्ही डावीकडून उजवीकडे लिहितो, तर ते अगदी उलट, उजवीकडून डावीकडे लिहितात. आमची सगळी पवित्र तीर्थस्थाने याच देशात आहेत, तर त्यांची या देशाच्या बाहेर आहेत. त्यांचं नाक, त्यांचे डोळे, त्यांचा बांधा, त्यांचं रूप-रंग सगळं आमच्यापेक्षा वेगळं आहे,
ते माझ्याकडे टक लावून का बघताहेत? ते आतंकवादी तर नसतील? त्यांच्या बॅगेत ए. के. 47 आणि बॉम्ब तर नसतील? बाहेर थंडी असूनही मला घाम येतोय. शरीर कापतय. जसं काही लाल तिखट डोळ्यात गेलय. तहानेनं माझा घसा कोरडा पडलाय. जीभ टाळूला चिकटलीय. मी ओरडू इच्छितोय, पण गळ्यातून आवाज बाहेर येत नाही. माझ्या खाका घामान भिजल्या आहेत. कपाळावरून गंगा, यमुना, सरस्वती वहातेय. आज मी बी. पी. ची गोळी खाल्ली नाही का? माझ्या डोक्यातील नसांमध्ये इतका तणाव का भरला गेलाय? माझ्या डोळ्यांपुढे अंधार पसरत चाललाय. मला चक्कर येतेय का? मला श्वास घ्यायला इतका त्रास का होतोय? माझ्या छातीवर इतका जड दगड कुणी ठेवलाय?
अरे, तो दाढीवाला माणूस उठून माझ्याकडे का येतोय? मला सुरा मारेल की काय तो… अरे देवा, डब्यात कोणी पोलिसवालाही नाही. आज काही मी वाचत नाही. त्याच्या गोळ्या आणि बॉम्बचा घास बनेन मी! नाही तर यांच्या सुऱ्याचा घास बनेन! भिंतीवर टांगलेल्या फ्रेममधील फोटो बनेन मी! भूतकाळ आणि इतिहास बनेन मी! असं मरायचं होतं तर मला! दंगेखोरांच्या हाताने… ऐन तारुण्यात. रेल्वेच्या रिकाम्या डब्यात. अकारण. पण आता माझं वय तरी काय आहे? माझ्यानंतर माझ्या बायको-मुलांचे काय होईल? नाही… नाही… थांबा थांबा. माझ्याजवळ येऊ नका. तुम्हाला तुमच्या देवाची शपथ. माझे प्राण वाचवा.
ओह! माझ्या मनात या माशा का भिणभिणताहेत?
‘भाईजान, आपली तब्बेत बिघडलीय का? इतक्या थंडीतही आपल्याला घाम आलाय. आपण कापत आहात. आपल्याला डॉक्टरांची गरज आहे, असं वाटतंय. आपण घाबरू नका. धीर धरा. आम्ही आपल्याबरोबर आहोत. अल्लाह सगळं ठीक करेल. ’
तो माझ्या चेतनेच्या मुखाशी टकटक करतोय. तो कुणी भला माणूस वाटतोय. आता त्याचा चेहरा १९६५च्या भारत-पाक युद्धाचा हिरो अब्दुल हमीदच्या चेहऱ्यात बदललाय. नाही… नाही… आता त्याचा चेहरा आपले भूतपूर्व राष्ट्रपती ए. पी. जे. अबुल कलामध्ये रूपांतरित झालाय…
आता त्याचा चेहरा सुप्रसिद्ध गझल गायक गुलाम अलीसाखा ओळखीचा वाटतोय. आता तो माणूस गुलाम अलीच्या अंदाजात गातोय,
ये बातें झूठी बातें हैं
ये लोगों नें फैलाई हैं… बातें
आह! … ही डोकेदुखी… हा अंधार.
गाडी थांबलीय. बहुतेक स्टेशन आलं वाटतं. ते लोक मला आधार देऊन गाडीतून उतरवताहेत. आता ते मला कुठे तरी घेऊन जाताहेत… आता मी हॉस्पिटलमधे आहे… त्यांनी माझ्याकडून फोन नंबर घेऊन सुमीला, माझ्या पत्नीला बोलावून घेतलय.
नाही… नाही ते वाईट लोक नाहीत. मी चुकलो होतो. ते चांगले लोक आहेत. माणुसकी अजून जिवंत आहे.
‘यांचं बी. पी. खूप हाय झालं होतं. या लोकांनी योग्य वेळी त्यांना इथे आणलं. मॅडम, तुम्ही या चौघांचे आभार माना. औषधांनी बी. पी. आता कमी झालाय. आपण यांना घरी घेऊन जाऊ शकता. यांना जास्तीत जास्त आराम करू द्या. ’ डॉक्टर सुमीला सांगत होते.
आता मी पहिल्यापेक्षा बरा आहे. माझी पत्नी आणि ते चौघे मला हॉस्पिटलच्या बाहेर घेऊन येत होते.
‘भाईसाहब मी आपल्या सगळ्यांची अत्यंत ऋणी आहे. मी आपले आभार कसे मानू? आपल्यामुळेच आज यांचे प्राण… ’ सुमीच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते.
‘कैसी बात करती हो बहन! आम्ही जे केलं, ते आमच्या भावासाठी केलं. अल्लाहची हीच मर्जी होती. ’
मी अतिशय शरमिंदा झालो. आपलं सारं कामकाज सोडून ते चौघे मला मदत करत होते. आम्ही सगळे एकाच आईची लेकरे आहोत. आम्ही एका माणसाचे दोन डोळे आहोत. आम्ही एकाच प्रदेशातील रहिवासी आहोत. आमचं रक्त आणि घाम एक आहे. ते परके नाहीत. आमच्यापैकीच आहेत.
” ख़ुदा हाफ़िज़, भाई. आपली काळजी घ्या. ’
” ख़ुदा हाफ़िज़! ’
टॅक्सी निघाली. दूर जाणार्या त्यांच्या पाठी खूप ओळखीच्या वाटू लागल्या. जशी त्यांची पाठ माझ्या वडलांची पाठ आहे. जशी त्यांची पाठ माझ्या भावाची पाठ आहे. असं वाटत होतं, मी त्यांना कित्येक वर्षे ओळखतो आहे.
टॅक्सी माझ्या घराकडे जात होती. बाहेर आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. उशिरा उगवणारा चंद्र्देखील आकाशात वर चढून तेजाने चमकत होता आणि माझा रस्ता प्रकाशित करत होता आणि सुमी माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणत होती, ‘ ती माणसं नव्हती, देवदूत होते. ‘
मूळ हिन्दी कथा- ‘वे’ –
मूळ लेखक – सुशांत सुप्रिय
मो. – 8512070086
मराठी अनुवाद – उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




