उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ वाटणी – भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ उज्ज्वला केळकर ☆
डॉ. हंसा दीप
आज आईच्या संपत्तीची वाटणी झाली.
जमीन-जुमला याची नेहमीच वाटणी होते. त्यात नवीन काही नाही. नवीन गोष्ट ही आहे की वाटणी चौघांच्यात नाही, तिघांच्यात झाली. आईच्या चार मुलांच्या यादीतून माझं नाव कमी करण्यात आलं. कदाचित, जेव्हा मी देश सोडून गेलो, तेव्हाच ते कमी करण्यात आलं असेल, फरक इतकाच की ते मला आज कळलं. विदेशात वास्तव्य असल्याने मी त्या मृत्युपत्रात कुठेच नव्हतो. कदाचित देश सोडल्यानंतर मी आईचा मुलगाच राहिलो नाही. आई असताना मी त्या तिघांपेक्षा अधीक लाडका होतो. ती तिघं माझ्यानंतर जन्माला आली होती. मी लवकरच आकाशात उडी मारली. उडताना आपली मुळं उपटून बरोबर घेऊन आलो होतो. मी माझ्या मुळांशी जोडलेला राहिलो खरा, पण त्या जमिनीपासून मात्र उखडला गेलो, जिथे ती मुळे रूजली होती. तिथे मुळंच जर उरली नाहीत, तर कुठला मुलगा, कुठला भाऊ आणि कुठलं मृत्यूपत्र? म्हणून माझं नाव काढून टाकण्यात आलं होतं॰
खरं तर या बातमीमुळे मला दु:ख व्हायला नको होतं पण खूप दु:ख झालं. पैशासाठी दु:ख झालं की नाही, हा भाग वेगळा! दु:ख यासाठी होतं की आईच्या मुलांच्या यादीतून माझं नाव काढून टाकण्यात आलं होतं. रक्ताचं नातं, दोघांच्यातील अंतराने गिळून टाकलं होतं. आकाशातील उड्डाणानंतर रक्ताचा लाल रंग अशा तर्हेने धूसर झाला की आपला रंगच नाही, तर अस्तित्वच हरवून बसला. आपल्या देशातून विदेशात येताना कितीदा तरी डोळे पाणावले असतील पण आज ते भिजले, त्याची जखम आतपर्यंत सलत राहिलीय. ही बातमी मला वेदनादायी व्हायला नको होती पण खूप वेदना झाली.
माझ्या हिश्श्याची वाटणी कशी करायची, याबद्दल माझी काही योजना होती. भाऊ आणि त्यांची मुले यात किती वाटायचे, आईच्या नावाने कुठल्या कुठल्या हॉस्पिटलना देणगी द्यायची, गरिबांसाठी कुठे, किती मदत करायची याचा मी विचार करून ठेवला होता पण धाकट्या भावंडांनी ही जबाबदारी उचलण्याची संधीच मला दिली नाही. त्यांना माहीत असणार, हा लोकांच्यात वाटून दानशूर बनणार. गरिबांचे आशीर्वाद हा एकटाच घेणार, त्यापेक्षा आमचेच आशीर्वाद लाभणं बरं. आम्ही पण गरीबच आहोत की!
माझे विचार एका दिशेकडून द्सर्या दिशेकडे लंबकाप्रमाणे फिरत होते. आपल्या लोकांचा परकेपणा दु:ख देतोय. एकाच्या तीन वाटण्या. तीन हा आकडा मला दंशाप्रमाणे टोचतोय. एक कोटी पन्नास लाखाचं घर. सरळ सरळ प्रत्येक भावाच्या खात्यात पन्नास लाख. सरळ साधं गणित.
आईला जाऊन आता सहा महिनेच झालेत. 30 मार्च 2020. कोविदचा काळ. सगळी उड्डाणे रद्द केली होती. भारतात लॉकडाउनचं पालन कुणीच करत नव्हतं. आई गेल्यावर नातेवाईकांची थोडी गर्दी झाली. सगळ्यात मोठा मुलगा दूर विदेशात बसून, आपल्या आईला ऑनलाइन निरोप देत होता. आई इतक्या वर्षात गेली नाही पण करोना येताच निघून गेली. कदाचित तिला माहीत असावं, आणखी काही दिवस थांबली, तर तिच्याजवळ येऊन कुणी उभंही रहाणार नाही. आत्ता कमीत कमी चार खांदे तरी मिळतील. मी जाऊ शकलो नाही. जी आई माझं गुणगान करताना थकत नसे, त्या आईला मी आकाशातील तरंगाद्वारे निरोप दिला. माझ्या आत उठलेले तरंग. ते अग्नीच्या ज्वालेशी एकरूप होऊन गेले आणि त्यांनी आईशी माझा संवाद करून दिला.
आवाज आला, ‘न… न… दु:खी होऊ नकोस बेटा. तू दूर असूनही माझ्या खूप जवळ आहेस. ’ आणि आईच्या या अथांग प्रेमाची खोली लक्षात घेऊन मी स्वत:ची समजूत घालीत असे. माझा नाईलाज असल्याचं संगत असे. आणि ती समजून घेई… नेहमीसारखंच… पुढे जाण्यासाठी काही गोष्टी सोडाव्या लागतात. तू पुढे जा. आपल्या घराण्याचं नाव उज्ज्वल कर. तुझी कधी चिंता वाटली नाही मला. चिंता म्हणशील तर या नालयकांची वाटते. ‘
‘तू माझी आजिबात काळजी करू नको. मी इथे मजेत आहे. ’
आपल्या लायक आसलेल्या मुलाच्या लायकीचा तिला अभिमान होता. ‘ज्या कुशीतून तुझ्यासारख्या हिर्याला जन्म दिला, त्याच कुशीतून या नालायकांनीसुद्धा जन्म घेतला. ’ या शब्दांची ताकद एवढी होती की मी कधी आईची चिंता केली नाही की भावांची. मी जर कशाची चिंता केली असेल, तर माझ्या करिअरची. पुढे पुढे जात चाललो. घरी येणं कमी होत गेलं. आईला दिलासा देत राहीलो. आईच्या आशीर्वादांचा वर्षाव होताना बघून माझ्या जीवनात रमून गेलो.
धाकट्या भावाच्या जन्मानंतर बाबा आम्हाला सोडून साधू बनले. म्हणाले, ‘मी वैराग्य घेतोय. आत्म्याचं कल्याण करायचय. ’
बोलणारे दहा तोंडांनी बोलले. ‘इतके दिवस पोरांना जन्माला घालताना कधी वैराग्य आड नाही आले. ’
‘चार लहान मुलांना बघून लोकांना वैराग्य आलेलं असलं, तरी पळून जातं. या महाशयांना आता आलय.
वैराग्याच्या नादात कुठे निघून गेले, कुणालाच कळले नाही. आई काय करणार? ती जशी काही जे घडेल त्याला तोंड देण्यासाठीच जन्मली होती. आपल्या विवशतेला स्वीकारलं तिने. तक्रार करायची तरी कुणाकडे? जो साधू बनला त्याच्याकडे, की जो विवाह करून घेऊन आला त्याच्याकडे, की जो चार मुलांची भेट देऊन एकटाच निघून गेला, त्याच्याकडे? एकटा कसा आत्म्याचं कल्याण करेल? साधूंच्या मध्ये राहून काय भूतकाळ विसरू शकेल?
जितकी तोंडे तितकी बोलणी. ‘कुणी तरी काही तरी केलं बहुतेक. ’
‘वरची हवा लागली. त्यामुळेच एकाएकी वैराग्य आलं. ’
वरच्या हवेत अनेक आत्मा दिसायचे. ते बाबांना आपल्याकडे ओढायचे. ‘वाटतय मृत आत्मा बाबूजींना खेचून घेऊन गेले. आम्ही चार मुले आणि त्यांची पत्नी यांना नाही खेचू शकले. बाबांवरील चर्चेच्या शर्यतीत आम्ही हरलो. आई रडत, नशिबाला बोल लावत नाही बसली. स्थिर राहून ठामपणे सामना केला. सगळं सांभाळून मुलांचं पालन – पोषण केलं. मला शिकवलं. सवरलं. माझ्या धाकट्या भावंडांनाही ती शिकवू इछित होती. पण ती नाहीच शिकली. नववी-दहावीपर्यंत कशीबशी कॉपी करून पास झाली. मग त्यांनी शिक्षणच सोडून दिलं. आम्ही सगळे मोठे होत गेलो. आई-बाप नसलेली मुलेही मोठी होतात. आम्हाला निदान आई होती. ती बाप बनून डोक्यावर सावली धरत होती आणि आई बनून पदराची ऊब देत होती.
आमची आर्थिक स्थिती काही वाईट नव्हती. ठीक – ठाक होती. नसती तरी, आईनं स्वत: भुकेलं राहून आम्हाला घास भरवला असता. सुरूवातीला तीन-चार महीने जमा-पुंजीतून काम भागत राहिलं. नंतर तिने मेहेनत करून आमचं दुकान संभाळलं. दुकान पाहिल्यापेक्षा जास्त चांगलं चालू लागलं. रहाण्यासाठी आमच्या पूर्वजांनी बांधलेली हवेली होतीच. रोजच्या खर्चाचीच फक्त व्यवस्था करायला हवी होती.
एक काळ असा होता, की आम्हा चार धडधाकट मुलांना बघून आई खूश होऊन जायची. येणार्या भविष्याच्या कल्पनेवर झुलत रहायची. तिला दिसायचं, मुलं, सुना, नातवंडं तिला झुलवताहेत. आसपास नोकर – चाकर आहेत.. शेठाणी झालेल्या आईची सेवा करायला तत्पर असलेले. त्यावेळी मुलांचे पाय पाळण्यात होते. पाळण्यातून काढल्यावर मुले आपआपल्या पायांवर उभी राहिली. डोळे आपली स्वप्ने बघू लागली. त्या स्वप्नात आई कुठेच नव्हती. जर काही असेल, तर आईचं मोठं घर होतं. त्याच्या चार तुकड्यात एक तुकडा खूप आवडायचा. तो आपला वाटायचा. आपलं स्वप्न वाटायचा.
ते जुनं, जर्जर घर गावाचं नागरीकरण होताच, करोडोच्या संपत्तीत बदललं. खरं तर घर नव्हतंच ते. अडगळीची खोली होती. किती वर्षापासूनच्या जुन्या जुन्या बिनकामाच्या वस्तू पडून होत्या. वस्तू एकदा घरात आली, की आली. बस! पडून राहिली. ती टाकून देण्याची किंवा धूळ झाडण्याची गरज नाही वाटली कुणाला. जसं काही वस्तूने एकदा घरात प्रवेश केला, की ती घराचाच हिस्सा बनून राहिली. घरातून बाहेर नाही जाऊ शकणार. न बोलणार्या वस्तू घरात राहिल्या पण बोलणारे घर सोडून निघून गेले. ज्यांच्या असण्यामुळे घर, घर होतं, ते बाबा मागेच निघून गेले होते. घरातील मुलेही एक एक करत निघून गेली. त्यांना आई काही रोखू शकत नव्हती, नाही रोखलं. पण वस्तूंना घरात रोखून ठेवलं.
कधी निवांतपणे ती त्यांना कुरवाळत असेल. त्यांच्याशी बोलत असेल. जेव्हा घर समृद्ध होतं, त्या दिवसांची आठवण करत असेल. त्यावेळी वस्तू नाही, घरात माणसं बोलत असतील. आता ती जबाबदारी या वस्तूंनी घेतली आहे. आईच्या आठवणी या वस्तू जाग्या करायच्या. या मोठ्या घरात, छोट्याशा बांध्याच्या आईची एकही खोली नव्हती. जिथे वाटेल तिथे बसायची॰ मनाला वाटेल तिथे दुपारची डुलकी घ्यायची. घरात खोल्या नव्हत्याच. मोठे मोठे हॉल होते. तेव्हा छोट्या छोट्या खोल्यांची बहुदा पद्धत नव्हती. घरात जितके मोठे मोठे हॉल असतील, तितकं घर चांगलं मानलं जायचं. त्या मोठ्या हॉलवजा खोल्यातून अनेक वस्तू अव्यवस्थितपणे ठेवलेल्या असायच्या. म्हणजे, ज्या गोष्टीची गरज भासेल, ती डोळे उघडताच समोर दिसावी. कुणी ते काही बदलण्याचा प्रयत्न केला नाही. आपल्या गरजेची वस्तू दिसली, आईला विचारून घेतली.
वर्षं उलटली. घराची देखभाल होत नव्हती. पांढर्या चुन्याने लिंपलेल्या भिंतीचे पोपडे पडत होते. खिर… खिर… खिरत होते. जिथे तिथे पालींची डाट वस्ती दिसत होती. कधी कधी उंदीर दिसायचे. इतक्या वेगाने ते पळत, तरी खोलीची लांबी इतकी होती की, एका कोपर्यातून दुसर्या कोपर्यात पोचेपर्यंत, उंदरांचा आकार-प्रकार सगळं दिसत होतं. वरचं छत इतकं कमकुवत झालं होतं, की कधीही खाली पडलं असतं. प्रत्येक करकरणार्या भीतीमागे आईची मजबूत नजर होती. त्याच्यावर आजपर्यंत कुणी दृष्टी टाकू शकलं नाही. तिच्या नालायक मुलांनाही ते जमलं नाही. किती वर्षांपासून आईच्या जाण्याची वाट पाहत होते, कुणास ठाऊक? जितकी त्यांची बेचैनी वाढायची, तितकी आईची जीवनेच्छा वाढायची.
— क्रमशः भाग पहिला
मूळ लेखिका : डॉ. हंसा दीप, कॅनडा
संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada
दूरभाष – 001 + 647 213 1817 ईमेल – hansadeep8@gmail.com
मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





