सौ राधिका भांडारकर
पुस्तकावर बोलू काही
☆ “उसवण ” – लेखक : श्री देविदास सौदागर ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆
पुस्तक : “ उसवण “.
लेखक : देविदास सौदागर.
प्रकाशक : देशपांडे आणि कंपनी पब्लीशर्स. पुणे
पहिली आवृत्ती :अॉगस्ट २०२२
दुसरी आवृत्ती:जून २०२४
पृष्ठे:११६
किंमत: १६० रु
देविदास सौदागर यांची युवा साहित्य पुरस्कार २०२४ ची विजेती कादंबरी वाचण्यात आली जी मनाला भिडली, डोक्यात रेंगाळत राहिली आणि म्हणूनच विचार करायला लावणाऱ्या या कादंबरी विषयी मला लिहावसं वाटलं. विशेष म्हणजे प्रस्तुत लेखकाची ही पहिलीच कादंबरी आहे.
संपूर्ण कादंबरीतले संवाद, पात्रांच्या मनातले विचार हे ग्रामीण भाषेत असले तरीही लेखकाच्या भाषाशैलीमुळे त्यातला गोडवा, गावरान भावना वाचकाच्या मनापर्यंत अलगद पोहोचतात. जो विषय या कादंबरीत हाताळला आहे त्या विषयातला सजीवपणा, ती संस्कृती टिकवण्यासाठी ही बोलीभाषा अत्यंत प्रभावी ठरलेली आहे. पुस्तक वाचताना झालेली माझी ही पहिली महत्त्वाची प्रतिक्रिया.
या कादंबरीतलं मुख्य नायक पात्र आहे “विठू”.
एका लहानशा गावात “विठू”चा शिवणकामाचा छोटासा अगदी पोटापुरताच दाम देणारा व्यवसाय आहे. संपूर्ण गावात कापडं शिवणारा शिंपी हीच विठूची ओळख आहे.
त्याची पत्नी “गंगी” ही त्याच्यावर जीवापाड प्रेम करत असते आणि त्याच्या प्रत्येक कामात, सुखात, दुःखात तिची अगदी “नाति चरामि” अशी समर्पित साथ असते. या पती-पत्नीचं प्रेमाचं नातं अतिशय विलोभनीय आणि मनाला भावविभोर करणारं आहे. त्यांच्या प्रेमविवाहाची कहाणीसुद्धा अतिशय गंमतीदार आणि लडिवाळपणे लेखकाने लिहिली आहे. या दांपत्यास दोन मुलं आहेत. मुलगी अतिशय हुशार आणि महत्त्वकांक्षी तर मुलगाही आईबापांवर माया करणारा, काळजी घेणारा, कर्तव्यदक्ष असाच आहे. एकंदर विठूचं दारिद्र्यातलं कौटुंबिक चित्र जिव्हाळ्याचं आहे. संकटात, गरिबीतही प्रेमभावाच्या अतूट धाग्याने बांधलेलं आहे.
गाव, गावातली माणसं, शिक्षक, विद्यार्थी, वेगवेगळ्या स्वभावाचे आणि मनोवृत्तीचे गावकरी आणि विठूचा शिवणकामाचा छोटासा धंदा– यांचे परस्परांशी असलेलं कधी स्नेहभावाचं, अप्रामाणिकपणाचं, फसवणुकीचं, गुंडगिरीचं, दादागिरीचं नातं आणि विठूचा जीवन प्रवास हे या कादंबरीतील कथानकाचे मुख्य सूत्र आहे.
लग्नसराई, सणवार याच दिवसात नवे कपडे शिवून वर्षभर पुरेल इतकी तुटपूंजी का होईना कमाई करणाऱ्या विठूच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या खडतर जीवनाविषयी वाचताना वाचकाच्या मनात करुणा, दया भावना, सहजपणे उत्पन्न होते तसेच फसव्या गोड बोलून काम करून घेऊन पैसे बुडवणाऱ्या धनदांडग्या लोकांची मनस्वी चीड येते. लेखकांनी कादंबरीत विखुरलेली पात्रं, त्यांच्या मनोवृत्ती, आपसातले संवाद, भांडणे अतिशय सरळ साध्या शब्दात पण रसाळपणे मांडले आहेत. वाचता वाचता आपणही त्या गावाचा एक भाग बनून जातो.
या कादंबरीत वेगवेगळ्या टप्प्यांवर सर्व भावभावनांचे स्त्रोत अनेक प्रसंगातून अनुभवायला मिळतात.
पती-पत्नीचं नातं, मुलांविषयीची जागृत कर्तव्य भावना, त्यासाठी मेहनत करण्याची तयारी, आईवडिलांच्या श्रमाची जाणीव ठेवणारी मुलं आणि दुसरीकडे धक्का देणार्या दुनियादारीचा मन कालवून टाकणारा अनुभव याचं एकत्रिकरण इतकं प्रभावी पद्धतीने लेखकाने केलं आहे की ही कादंबरी अक्षरशः वाचकाच्या मनावर गारुड करते.
प्रामाणिकपणे लोकांची गरज, नड जाणून, विश्वास ठेवून काम करणाऱ्या विठूवर, एका खून झालेल्या मृत व्यक्तिच्या अंगावर विठूने शिवलेले कपडे आढळल्यामुळे त्यालाही या गुन्हेगारी प्रकरणात विनाकारण गोवले जाण्याचा प्रसंग उद्भवतो. अनेकदा पोलीस चौकीवर चौकशीसाठी त्याला बोलावले जाते. या साऱ्या प्रकरणात विठू आणि त्याचे कुटुंब अगदी केविलवाणे होऊन भरडले जाते. या सर्व प्रसंगांची वर्णने वाचताना वाचकाला चीड, हळहळ, दया, करुणा, दुःख, सत्याचा वाली कुणीच नसतो वगैरे भावना ग्रासून टाकतात.
साध्या साध्या वाक्यातूनही खूप मोठ्या जीवनतत्त्वांना लेखकाने या कादंबरीतून स्पर्श केला आहे.
“अन्यायाची मांडणी करणारी सगळी सामग्री जाळून टाकली पाहिजे
उरलेल्या मजकुरावर राख उपटेपर्यंत आपणच डोळ्यात तेल घालून पेटवली
पाहिजे ही आग…”
किंवा,
“सरळसोट जगता आलं पाहिजे
रात्रीच्या उरावर बसलेले दिवस
ओळखता आले पाहिजे
बेवारस क्षणाच्या निर्मितीला
चाप लावता आला पाहिजे
डोक्यावर पाय देणारे लोक
कोलता आले पाहिजेत…”
ही एका वेडसर पण नैराश्य आलेल्या सुशिक्षित तरुणाच्या तोंडची सैरभैर वाक्ये काळीज चिरून टाकतात.
कालांतराने रेडीमेड कपड्यांचा नवीन जमाना येतो आणि विठूच्या हातात कामं उरतात ती फक्त उसवलेलं, फाटलेलं, विरलेलं, बिघडलेलं, शिवण्याचं. त्यावेळी विठूच्या मनात येणाऱ्या विचारांचं अगदी हृदयद्रावक शाब्दिक वर्णन लेखकाच्या लेखणीतून उतरलं आहे.
“आपलं आयुष्य चिंध्यासारखं झालय. धड जपता यिना ना धड फेकता यिना. अवघा देह म्हणजे चिंधी झालाय जणू! सगळ्या जगण्यावर ठिगळ लावलेलं ठळक दिसालय. ”
थोडक्यात “उसवण” ही एका शिंप्याच्या जीवनातली पराभवाची, दुःखाची कहाणी आहे. परिवर्तन काळात, लहानसहान जीवने सर्वांगाने उध्वस्त कशी होतात हे विदारक सत्य दर्शविणारं एक वास्तविक कथानक यात आहे. आजकालच्या अराजकतेच्या, अमानवीकरण्याच्या सीमेवर पोहोचलेले लोकजीवन, याचेही दर्शन या कादंबरीत घडते.
या कादंबरीचे “उसवण, हे शीर्षकही खूप अर्थपूर्ण आहे. “जेव्हा आभाळच फाटतं तेव्हा कुठे कुठे ठिगळं लावणार” असा एक असाहाय्य उसाचा या “उसवण” शब्दात जाणवतो. या कादंबरीतला नायक “विठू” तुटू पाहणाऱ्या, मोडकळीस आलेल्या त्याच्या व्यवसायाची भिस्त पुढच्या पिढीवर ठेवून एक सकारात्मक आशावाद बाळगतो. त्यामुळे वाचकाच्या मनातही नकारात्मक वास्तवाला सामोरे जाताना एक आशेचा किरण दिसतो. जिथे गोष्ट संपते तिथूनच ती पुन्हा अद्रुश्यपणे नव्याने सुरू झाल्याचाही भास होतो.
निरनिराळ्या क्लेषदायक प्रसंगातून उलगडणार्या आणि एका होरपळणाऱ्या मानवी जीवनाचं दर्शन देणारी ।उसवण” ही कादंबरी साहित्य प्रेमी लोकांनी जरूर वाचावी.
परिचय – सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७ मो. ९४२१५२३६६९ radhikabhandarkar@yahoo.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






