श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “श्रीमद् भागवतातील भारत” – लेखक : डॉ. विद्यासागर पाटंगणकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : श्रीमद् भागवतातील भारत

लेखक: विद्यासागर पाटंगणकर

पृष्ठ: १६४

मूल्य : २५०₹ 

श्रीमद् भागवत हा एक अपूर्व ग्रंथ आहे. महर्षी वेदव्यास रचित हा ग्रंथ प्रासादिक तर आहेच, तसाच तो प्रसन्न शैलीतून प्रसाद, माधुर्य, ओज आदी गुणांसह निर्वेद स्थितिप्रत नेणारा व मानवी जीवनाच्या कल्याण, साफल्य व अंतिम उद्देशाचे भान देणारा ग्रंथ आहे. श्रीमद् भागवतात मूळ अध्यात्म ज्ञानाचे चिंतन व विवरण असले, तरी भौतिक सृष्टीतील सर्व विषय त्यात सहज ओघात येऊन गेलेले आहेत. भारतीय ऋषिमुनींची जीवनदृष्टी, त्यांची मूल्यदृष्टी, त्यांची जीवनधारणा व जीवनप्रेरणा या सर्वांचे त्यात सखोल व सूक्ष्म दर्शन घडते. त्यात मानवी जीवनातील सर्वच विषयांचे, शास्त्र विचारांचे दिग्दर्शन घडते. भूगोल, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र यांप्रमाणेच गणित, भौतिकशास्त्र, वास्तुशास्त्र, आरोग्यशास्त्र, स्त्रीरोग विज्ञान, विविध कला, साहित्य, नाट्य, धर्म, तत्त्वज्ञान, विविध कालगती, कालमान व कालभान यांचेही दर्शन घडते. व्यासनिर्मित हे भागवत म्हणजे खरोखरच त्यांनी प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे,

निगमकल्पतरोर्गलितं फलम् (वेदरूपी वृक्षाला आलेले व पिकलेले रसमय फलच आहे! )

देवर्षी नारदांच्या अनुग्रहाने या ग्रंथाची निर्मिती महर्षी व्यासांनी केली व त्यांना मनःशांती मिळाली, हीच संहिता त्यांनी शुकमुनींना शिकवली व तेच त्यांनी राजा परीक्षितास कथन केले.

श्रीमद् भागवत हे एक दिव्यपुराण आहे. त्याला ‘महापुराण’ अशी संज्ञा आहे. सामान्य पुराणे पंचलक्षणयुक्त असतात, तर भागवत दशलक्षण युक्त आहे.

‘अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः । मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः ।।’

पुराणांच्या माध्यमातून द्रष्ट्या ऋषी-महर्षीनी बहुसंख्य लोकांना ज्ञान देण्याचाच शुद्ध विचार केलेला आहे. बहुजन समाजाला, स्त्रिया व शूद्रांना वेदाचा अधिकार नसल्याने, त्यांना पुराणांच्या माध्यमातून वेदज्ञान त्यांनी सांगितले. हे ज्ञान निर्दोष आणि निष्कपट होते. त्यांनीच म्हटले आहे की,

धर्मः प्रोज्झित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतां । वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं

महर्षी वेदव्यासांनी ‘स्त्रीशूद्र द्विजबंधूनाम् त्रयीन श्रुतिगोचरा’ ही भूमिका ठेवून हे ज्ञान पुराणात ग्रंथित केले म्हणून ‘पुराणातील वांगी पुराणात ठेवा, ‘ असे उपरोधाने – उपहासाने म्हणणे म्हणजे त्या द्रष्ट्या महर्षीचा केवळ अपमान आपण करतो! केवळ अज्ञानाने किंवा पुराणांचा नव्या दृष्टीने शोध न घेतल्याने आपणास पुराण / पोथी गतार्थ वाटते; पण हे चुकीचे आहे. पोथी-पुराण हा विषय उपहासाचा परिहासाचा – टिंगलटवाळीचा नसून, खरे शास्त्रज्ञान, त्रिकालज्ञान देणारे ते प्रकाशगर्भ आहेत. म्हणून, पुराण वेद उपनिषद भारतीय परंपरेचे एकूणच ग्रंथ नव्याने, नव्या संदर्भात नवा अन्वयार्थ देऊन तपासणे, ही काळाची गरज ठरते. भागवत पुराणाकडे त्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे.

या भारताबद्दलचे निरतिशय, प्रगाढ प्रेम, राष्ट्रनिष्ठा व भारतीय जीवनाबद्दलची नितांत ओढ व्यास महर्षीच्या वाणीतून प्रकट झाली आहे. आज ज्याला राष्ट्रप्रेम, देशनिष्ठा (Patriotism, Nationality) म्हणतात, ती फार पूर्वीच ५००० वर्षांपूर्वीच ऋषिमुनींनी प्रकट केली आहे. ती पाहण्यासारखी आहे. या भारतात एक क्षणभर जरी जन्म मिळाला तरी मी धन्य होईन. हे ऋषींचे उद्गार काय सांगतात?

श्रीमद् भागवतातील भारत’ या ग्रंथाचे लेखक विद्यासागर पाटंगणकर यांनी भागवतातील देशभक्तीकडे सर्वांचे लक्ष वेधले, ही अत्यंत अभिनंदनीय व स्तुत्य बाब होय. श्रीमद् भागवतातील ‘भारतवर्षा’चा शोध घेताना व माहिती सांगताना लेखक केवळ भारताच्या भौगोलिक सीमा व तीर्थस्थळे यांच्यात न रमता भारतीय संस्कृतीचे ज्ञानात्मक व भावात्मक हृदय त्यांनी यात उलगडून दाखविले आहे. प्राचीन भारतीयांची जीवनदृष्टी, कालगणना, पर्यावरणविचार, वैज्ञानिक प्रगती, वर्णाश्रम धर्म, स्थापत्य विज्ञान, राष्ट्र विकास, समन्वयाचा संदेश, आध्यात्मिक उपदेश, कथारूपकांचा उलगडा, विश्वकल्याणाची आकांक्षा अशा अनेक विषयांचे सादर व सकस, पण सुलभ व प्रांजळ प्रतिपादन करून लेखकाने भारतीय संस्कृतीचे अंतर्बाह्य मनोज्ञ दर्शन घडवले आहे.

मूळ ग्रंथाच्या वाचन-परिशीलनाने अभ्यासक व वाचक सुखावतील!

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments