डॉ. मीना श्रीवास्तव
पुस्तकावर बोलू काही
☆ “आनंदयात्री रवींद्रनाथ” – लेखक : श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – डॉ. मीना श्रीवास्तव ☆
पुस्तक – आनंदयात्री रवींद्रनाथ
लेखक – विश्वास देशपांडे
प्रकाशक – सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन, पुणे
पृष्ठसंख्या – २१० पाने
पुस्तकाचे मूल्य – ३०० रुपये
‘आनंदयात्री रवींद्रनाथ’ हे जेष्ठ साहित्यिक श्री विश्वास देशपांडे लिखित नोव्हेंबर २०२५ मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक वाचले. या आधीही ललित लेखांवर आधारित अनेक पुस्तकांत, विशेषतः ‘अष्टदीप’ या पुस्तकात लेखकाने विविध व्यक्तिरेखांना अतिशय सुरेखरित्या शब्द्बबद्ध केले होते. ते वर्णन कांही पानांपुरतेच मर्यादित असे. मात्र या ‘आनंदयात्री रवींद्रनाथ’ चा पोतच निराळा! कारण बंगालचे सुपुत्र कवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक, रवींद्रसंगीताचे प्रणेते, गायक, नृत्यकार, शिक्षक, तत्वज्ञ, नोबेल पुरस्कार विजेते आणि ‘जन गण मन’ या आपल्या राष्ट्रगीताचे तसेच बांगला देशाच्या राष्ट्रगीताचे लेखक, थोर राष्ट्रभक्त असे रवींद्रनाथ टागोर अथवा विश्ववंदित खरेखुरे १ नंबरी विश्वगुरू ‘कवींद्रनाथ’ हे या चरित्रलेखनाचे महानायक आहेत!
बंगालच्या उपसागराच्या साक्षीने या बालरवीचे एका तेजोनिधी लोहगोलात जेव्हा रूपांतर झाले, तेव्हा ते तेज त्यांच्या पैतृक जोराशंको वाडीत मावेनासे झाले आणि अखिल भूमंडळाला वेधते झाले. त्यांच्या गगनभेदी कर्तृत्वाचे मोजमाप त्यांना प्राप्त झालेल्या अगणित पुरस्कारांनी तर सोडाच, अगदी प्रतिष्ठित नोबेल पुरस्काराने देखील करता येणार नाही! गुरुदेवांच्या कॅलिडोस्कोपसम व्यक्तिमत्वाचे विविध पैलू दर्शवणे म्हणजे रविकिरणांच्या सोनेरी गर्भरेशमी जाळीला आपल्या ओंजळीत पकडून त्यांचे इंद्रधनुषी रंग वाचकांना दर्शवणे झाले. त्यांच्या विशालकाय साहित्यनिर्मितीची गगनभरारी अक्षरशः अवाक करणारी आहे! ‘गीतांजली’तील आणि ‘सहजपाठ’ या प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांसाठी त्यांनी रचलेल्या सहजसुंदर कविता, ‘काबुलीवाला’ सारख्या भावपूर्ण कथा, आधुनिक महाकाव्याचा दर्जा लाभलेली ‘गोरा’ ही दीर्घ कादंबरी, ‘रक्तकरबी’ हे अलौकिक प्रतीकात्मक नाटक, या आणि अशाच अनेक लक्षवेधी सृजनशील साहित्यकृतींची निव्वळ माहिती न सांगता त्यांचे लेखकाद्वारे रसिक मनोवृत्तीने केलेले विश्लेषण आपल्याला निव्वळ मोहून टाकत नाही तर त्या समग्र साहित्यकृती (मूळ बंगाली नाही तर किमान आपल्याला येणाऱ्या भाषानुवादात) वाचण्यास प्रवृत्त करते हे निश्चित! या अनुभवास कारणीभूत आहे देशपांडे सरांची ओघवती व प्रतिभासंपन्न लेखन शैली.
लेखकाने रवींद्रनाथांच्या संपर्कात आलेल्या लोकांतील महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, अल्बर्ट आईन्स्टाईन इत्यादींच्या सानिध्याचे देखील मनोरम वर्णन केलंय. त्याचबरोबर गुरुदेवांचा जन्म आणि मृत्य पाहिलेली कोलकत्ता येथील प्रसिद्ध जोराशंको वाडी, शांतिनिकेतन, श्री निकेतन, विश्वभारती, पद्मावती नदीतील त्यांच्या मुक्कामाची पद्मा बोट, यासारख्या निर्जीव वस्तू आणि वास्तूत देशपांडे सरांनी प्राण फुंकले आहेत असा भास होतो. त्यांच्याद्वारे निर्मित स्थावर त्रिमूर्ती म्हणजे शांतिनिकेतन, श्रीनिकेतन आणि विश्वभारती या तिन्ही परममंगल वास्तू गुरुदेवांच्या सत्य, शिव आणि सुंदर संकल्पनेचे प्रारूप जणू! लेखकाच्या सहज, सोप्या व निरामय भाषासौंदर्याने नटलेल्या वर्णनशैलीद्वारे या कर्ममंदिरांची आपल्याला या पुस्तकाद्वारे सफर घडते. त्यावरून आपल्या लक्षात येते की या निर्जीव वास्तू नव्हेत तर गुरुदेवांच्या परिसस्पर्शाने पुनीत झालेल्या साहित्य, कला, नवनिर्मिती, संशोधन आणि मानवाचा सर्वांगीण विकास करणाऱ्या निरंतर कार्यमग्न असणाऱ्या अलौकिक प्रयोगशाळाच आहेत. लेखकाचे एक सुंदर वाक्य गुरुदेवांचे विचार प्रकट करते. “दौत आणि औत हे हातात हात घालून चालावेत”. अशा अत्युत्कृष्ट अर्थपूर्ण भाषासौंदर्याशी आपली या पुस्तकात कैकवेळा गाठ पडते! मंडळी, हे पुस्तक वाचल्यावर आपण जणू या ‘रवि’किरणांच्या तेजोमय प्रकाशात नखशिखांत न्हाऊन निघतो.
या चरित्रात वर्णित रवींद्रनाथांच्या सर्वसमावेशक कर्तृत्वाचा अफाट आवाका आपल्याला विस्मयचकित करतो. मोजकीच उदाहरणे बघा! वयाच्या केवळ बाराव्या वर्षी शेक्सपियरच्या ‘मॅकबेथ’चे भाषांतर, १८ व्या वर्षी ‘वाल्मिकी प्रतिभा’ या नाटकाचे लेखन, सादरीकरण, संगीत-नृत्य निर्देशन आणि अभिनय, २५०० पेक्षा अधिक कविता, ५० हून अधिक नाटके, पत्रांचे १२ खंड, हे आणि इतर लेखन! त्यांची ‘कालमृगया’ आणि ‘चित्रांगदा’ ही सुप्रसिद्ध नाटके पौराणिक कथांवर आधारित होती, पण त्यांना गुरुदेवांचा मिडास टच आणि त्यांची सृजनात्मक नवनिर्मिती लाभल्याने ही नाटके अजरामर झाली. या अवलियाचे हे बहुउद्देशीय कलाप्रेम कमी होते म्हणून की काय, पासष्टी ओलांडलेल्या चित्रकार रवींद्रनाथांच्या जीवनातील आणखी एक कलादालन लेखकाने वाचकांसाठी खुले केलेले आहे. २००० पेक्षा अधिक अनवट चित्रे रेखाटणारी ही ऋषितुल्य व्यक्ती! कित्येक देशात त्यांची चित्रप्रदर्शने लागतात काय आणि रसिक चित्रप्रेमी त्यांची अभिनव चित्रे विकत घेतात काय! आपल्यासाठी सगळेच अगम्य म्हणायचे. निसर्गचित्रे आणि प्राचीन भारतीय संस्कृतीचे पुनर्चित्रण, यासारख्या रवींद्रनाथांनी स्पर्श केलेल्या या श्रीमंत चित्रकलेचे अतिशय तरल आणि संवेदनशील वर्णन देशपांडे सरांसारखा भावनाशील लेखकच करू जाणे. रवींद्रनाथ बंगाल प्रांताच्या कणाकणाला व्यापून दशांगुळे उरतातच, म्हणूनच त्यांचे सर्वसमावेशक प्रगल्भ विचार अवघ्या सीमा ओलांडून बंगालच्या सीमा ओलांडून वैश्विक होतात. बघा ना! परदेशात त्यांच्या प्रशंसकांना दिलेल्या स्वाक्षऱ्यांसोबत त्यांनी लिहिलेल्या चारदोन उर्जावान वाक्यांच्या संग्रहाचे अद्भुत वाग्ङ्मय होते. गुरुदेवांद्वारे निर्मित शब्दाशब्दाला आणि एक-एक रेषेला जगन्मान्य दर्जा प्राप्त होतो! यात विविध भारतीय आणि विदेशी भाषांत त्यांच्या साहित्याचे झालेले अनुवाद, दूरदर्शन मालिका, चित्रपट, इत्यादींची मांदियाळी सोडूनच द्या!
१२ व्या वर्षापासून ते ८० व्या वर्षी झालेल्या त्यांच्या ‘देखण्या देहांता’पर्यंतचा हा कलासक्त जीवनप्रवास म्हणजे जणू दिव्य दीपस्तंभच. या देवतुल्य व्यक्तिमत्वाच्या अनेकानेक नवथर स्वरुपांना एका २०० पानी पुस्तकात सामावून घेणे महासागराच्या मोत्यांना आपल्या ओंजळीत सामावून घेण्याइतकेच दुष्कर! पुस्तकातील लालित्यपूर्ण भाषा आणि उत्कट भावभावनांच्या लहरींवर डोलणाऱ्या ४२ प्रकरणांपैकी मला सर्वाधिक आवडले ते ‘जन-गण-मन’ या आपल्या राष्ट्रगीताविषयीचे प्रकरण. ११ डिसेंबर १९११ रोजी कोणत्या परिस्थितीत गुरुदेवांना हे गीत स्फुरले आणि त्यांनी लिहिले, त्यापायी त्यांना किती मानहानी सोसावी लागली, तसेच त्यांच्या प्रखर राष्ट्रभक्तीवर केलेले लांछनास्पद आरोप किती निराधार होते, याचे हृद्य स्पष्टीकरण आणि सांगोपांग विवेचन देशपांडे सरांनी अतिशय स्थितप्रज्ञतेने केले आहे. दुसरे म्हणजे ‘सहजपाठ’ हे गुरुदेवांच्या बंगालीत रचलेल्या बालकवितांचे प्रकरण मला अतिशय मनोज्ञ वाटले! शांतिनिकेतन मध्ये कांही काळ व्यतीत केलेले आपले लाडके पु. ल. या प्राथमिक काव्यरचनेचे गोडवे गात म्हणतात, “असे शिक्षण भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याला मिळावे. ” या दोन्ही प्रकरणांतील विचार राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्याइतके महत्वाचे आहेत.
या पुस्तकाला सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि ‘रवींद्रनाथ टागोर युगनिर्माता विश्वमानव’ या पुस्तकाचे लेखक डॉ. नरेंद्र जाधव यांची मार्गदर्शक आणि विचारप्रवर्तक प्रस्तावना लाभली आहे. शेवटी दिलेली संदर्भसूची टागोरांच्या वैश्विक स्तरावर केलेल्या विशाल साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचा लेखकाने केलेला सखोल अभ्यास दर्शवते. ‘एकला चालो रे’ या स्फूर्तिदायक शब्दांसह गुरुदेवांच्या आनंदयात्रेत ते आपल्याला संपूर्णपणे सहभागी करून घेते हेच या पुस्तकाचे गमक आहे. या महान भारतपुत्राच्या जीवनाचे सर्वंकष दर्शन घडवणारे हे पुस्तक त्यातील विचार आपल्यात समाहित होईपर्यंत वाचावे असे आहे. आपला वाचनसंग्रह समृद्ध करायला हे पुस्तक संग्रही तर ठेवावेच पण, रवींद्र-संस्कृतीचा प्रसार होण्याकरता पुस्तकभेट म्हणून या पुस्तकाची प्राधान्यक्रमाने निवड करावी. माझ्या मते हे पुस्तक मराठी साहित्यातील चरित्रलेखनाचा एक उत्कृष्ट मापदंड ठरावे!
परिचय : डॉ. मीना श्रीवास्तव, ठाणे
भ्रमणध्वनी – ९९२०१६७२११
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






